प्रेमाच्या, सहजीवनाच्या वास्तवातल्या कहाण्या, ‘धर्मरेषा ओलांडताना!’

‘धर्मरेषा ओलांडताना’ या हिनाकौसर खान यांच्या पुस्तकाचे प्रकाशन आज पुण्यात होत आहे. या पुस्तकात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, जैन, बौद्ध अशा आंतरधर्मीय विवाहितांच्या 15 मुलाखती आहेत. या मुलाखतींमधून आंतरधर्मीय विवाहितांचे सहजीवन समजून घेण्याची धडपड आहे. या जोडप्यांचे जरी प्रेमविवाह असले तरी व्यावहारिक पातळीवर परस्परांशी, कुटुंबियांशी, सभोवतालाशी त्यांनी कशा पद्धतीने जुळवून घेतलं, त्यांच्या एकमेकांविषयीच्या, स्वत:च्या आणि परस्परांच्या धर्माविषयीच्या समजूती काय होत्या, त्या मोडल्या अगर त्यात नवी भर पडली इत्यादी बाबी जाणून घेतल्या आहेत. आजच्या व्हॅलेंटाईन डे निमित्त लेखिका हिनाकौसर खान यांच्या ‘धर्मरेषा ओलांडताना’ पुस्तकातील मनोगताचा हा संपादित अंश…

  • हिनाकौसर खान
व्हिडिओ क्रेडिट : किरण क्षीरसागर

Close your eyes, fall in love and Stay there – रुमी

तेराव्या शतकातला हा आवडता कवी तत्त्वत्वेता रूमी. तो सांगून गेलाय… काय ? तर प्रेमात राहा. त्याचं हे थेट सरळ, साधं म्हणणंय. पण तेच इतकं अवघड का वाटत असेल? कदाचित प्रेम करण्यात काहीच अवघड वाटत नसणार; पण बिनशर्त प्रेम करण्यात आणि त्यात संपूर्णपणे खरं उरण्यात निश्चितच काहीतरी कष्ट असणार. कष्ट करायची इच्छा कुणाकडेय? नाहीतर आपल्या आसपास इतका विद्वेष, इतकं जहर, इतकं सततचं दुभंगलेपण डोकं वर काढून नसतं. अलीकडं तर आणखीच एक पेव फुटलंय. कुणी काही म्हणण्याचा अवकाश की आपली मनं लगेच आजारतात. दुखणंच येतं आणि तेही साधंसुधं नाही, एकदम संसर्गजन्य, एकाला धरलं की आळीभर पसरलं तसं काही. भावना तर इतक्या कमकुवत आणि आंधळ्या झाल्यात की त्या सतत धडपडत असतात. त्यांना सारखीच ठेच लागते. ती तेवढी ठेचही सहन करण्याचं अवसान तिच्याकडं नाही. मग सगळ्या क्रिया-प्रतिक्रिया ‘लाऊड’ होऊन जातात. जणू आक्रस्ताळेपणा केल्याशिवाय चालणार नाही. अशावेळी संवादाची जागा वजा; पण त्याचंही कुणाला काय पडलंय? उलट टक्करबाज उच्छादाचं आकर्षण अधिक; पण एखादी मिठी मारण्याची फुरसत नकोय. शहाणपणानं वागणं तर त्याहून नकोय. ‘नफरत स्वस्त म्हणून फुकट, प्रेम अनमोल म्हणून अप्राप्य’ अशा काळात आपण जगतोय की काय असं वाटत राहतं, की प्रत्येकच काळात थोड्याफार फरकानं हीच स्थिती होती/आहे आणि मग, म्हणूनच की काय त्या त्या काळात उत्तराच्या शोधात भटकणं क्रमप्राप्त ठरतं! तसंच असणार…

प्राध्यापिका-लेखक समीना दलवाई यांनी 15 ऑक्टोबर 2020 रोजी इंडियन एक्सप्रेसमध्ये ‘आय अॅम द अनबॉर्न बेबी’ या नावाचा एक लेख लिहिला. ज्यात त्यांनी आपल्या आंतरधर्मीय आईवडिलांमुळं आणि पुढं त्यांनी स्वतः आणि भावानं केलेल्या आंतरराज्य, आंतरदेशीय विवाहामुळे काय संचित मिळालं याचं खुसखुशीत वर्णन केलंय. लेखाच्या शेवटी त्यांनी म्हटलं होतं, “आम्ही भिन्नवंशीय नुसतं सहजीवन जगतायेत असं नव्हे, तर ते सहसमृद्ध होत होत जगतोय.” हे म्हणणं फारच अर्थपूर्ण आणि महत्त्वाचं होतं. हाच धागा धरून आंतरधर्मीय विवाह झालेल्या लोकांशी बोलून एखादा लेख किंवा मालिका असं काही करता येईल का, असा विचार साधनाचे विश्वस्त सुहास पळशीकर यांनाही वाटू लागलं आणि ‘धर्मरेषा ओलांडताना’ ही मालिका आकाराला आली. या मालिकेची मूळ कल्पना पळशीकर सरांची.

संपादक विनोद शिरसाठ यांनी पळशीकर सरांची ही कल्पना साधनेच्या संपादकीय टीमसमोर मांडली. चुकीचे नरेटीव्ह असणाऱ्या संकल्पना रुजत असतील तर त्यांच्या मुळांची माती सैल करण्यासाठी दीर्घ स्वरूपातलं लेखन असावं असं आम्हाला वाटू लागलं. त्यातून वर्षभर चालणारी मालिका असावी या मुद्द्यावर शिक्कामोर्तब झालं. मालिका ठरली तरी त्याची दिशादेखील ठरणं महत्त्वाचं होतं. अंदाधुंदपणे विषय मांडण्यातून साध्य काहीच होणार नव्हतं. मग पुन्हा ब्रेनस्टॉर्मिंग सुरू झालं. लवजिहाद म्हणत ट्रोल आणि हिंसा करणाऱ्यांना ‘आमचं जगणं हेच उत्तर आहे,’ असं दलवाईनी लेखात म्हटलं होतं. मनाशी तो विचार घोळत होता. शिवाय विभिन्नधर्मी प्रेमविवाहांचा स्वीकार, ऑनरकिलींगला विरोध आणि सांस्कृतिक प्रथा-परंपरांची सरमिसळ व्हायची असेल तर मिश्रविवाहांचं सामान्यीकरण होणं गरजेचं वाटत होतं. आंतरधर्मीय विवाहित म्हणजे परग्रहावरचे वासी किंवा अदृश्य जमात असंच बहुतेकांना वाटत असल्यामुळं ते कुतूहल शमवणदेखील महत्त्वाचं वाटत होतं. म्हणजे एकाच धर्मातले, जातीतले वा एकाच उपजातीतल्या लोकांचं सहजीवन आणि या वेगवेगळ्या धर्मातल्या व्यक्तींच्या सहजीवनातलं साम्य/फरकही समोर यायला हवं असंही वाटत होतं. अशा अमूर्त मुद्द्यातून एखादं सूत्र आकाराला येईल का यावर खल सुरू झाला. सरतेशेवटी दीर्घकाळ एकत्र असणाऱ्या जोडप्यांची एकमेकांना असणारी समृद्ध सोबत, सहजीवन आणि त्यांचं जगणं, हेच मांडूयात यावर एकमत झालं आणि त्या सगळ्याचं खोदकाम मुलाखतीच्या माध्यमातून करायचं हेही पक्कं झालं.

मालिका, त्याची दिशा आणि मुलाखत हा लेखनप्रकार असं ठरल्यानंतर आमच्याशी संवाद साधू शकणाऱ्या जोडप्यांचं संशोधन सुरू केलं. त्याबाबतही एक निकष ठरवणं आवश्यक होतं. कारण आमच्यासमोर काही नावं ही अगदीच नवविवाहित या प्रकारात मोडणारी होती. मग आम्ही किमान दहा वर्ष वा अधिक सहजीवन असणारी जोडपी घेण्याचं ठरवलं. त्यानुसार या मालिकेत 15 जोडप्यांच्या मुलाखती आहेत. सहजीवनाचं वयोमान या निकषावर विशाल आणि आरजू यांचा केवळ अपवाद आहे; पण नियम सिद्ध करायला एखादा अपवाद असावाच लागतो. तर केवळ हे जोडपं मुलाखतीच्या वेळी सहजीवनाची 5 वर्षे वय असलेलं आहे. लवजिहादचं नॅरेटिव्ह हे फक्त मुस्लीम पुरुष-हिंदू स्त्री असं असलं तरी मुलाखती घेताना त्यापलीकडं जाण्याचा कटाक्षानं प्रयत्न केला. त्यातही केवळ ते हिदू-मुस्लीम इतकंच सीमित राहणार नाही असं पाहिलं. या मालिकेच्या मर्यादित अवकाशातः सर्वच धर्मांना स्पर्श करता आलं नसलं तरी हिंदू, मुस्लीम, बौद्ध, शीख, ख्रिश्चन या धर्मांपैकी प्रातिनिधिक जोडप्यांपर्यंत पोचण्यात सफल झाले.

सर्वच मुलाखतीत दोन्ही जोडीदार अत्यंत मोकळेपणानं बोललेत. ‘सहजीवन’ फोकस्ड असल्यानं दोघांनी बोललं पाहिजे हे गृहीतच होतं. पण दोघांनी बोलावं म्हणजे निम्मंनिम्मं असं गणितीय विभाजनही नको होतं. दाम्पत्यांची मुलाखतीत आस्थापूर्ण गुंतवणूक असावी म्हणजे दोघांचाही दृष्टिकोन समजायला सोपं जाईल इतकंच अपेक्षित होतं. झालंही तसंच. आमच्या मुलाखतवजा गप्पा प्रत्येक जोडप्यानं मिळून पुढं नेल्या. दोघांनी एकमेकांच्या अडलेल्या, विसरलेल्या रिकाम्या जागा भरल्या. हे अस आणि एवढं पुरेसं होतं. गंमत अशी की, प्रत्येक जोडप्यात एक बोलकी एक मितभाषी व्यक्ती होती, ते पथ्यावर पडलं. या 15 मुलाखतीमधून जोडीच्या सहजीवनातले चढउतार, या प्रकारच्या लग्नामुळे वैयक्तिक आणि सामाजिक वर्तुळातल्या वावरामध्ये झालेला बदल वा परिणाम, निकटच्या आणि दूरच्या नातेवाईकांसोबतच्या संबंधांतली गुंतागुंत, त्यातून त्यांनी काढलेला मार्ग, कुठल्याही परिस्थितीत एकमेकांना साथ देताना झालेली ओढाताण/दमणूक, सहवासात एकमेकांबाबत झालेला नवा साक्षात्कार, अपत्यांविषयीचे प्रश्न, अपत्यांचे प्रश्न, त्यांना उमजलेला प्रेम आणि सहजीवनाचा अर्थ अशा काही मुद्द्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

ही मालिका 14 फेब्रुवारी ते 24 ऑक्टोबर 2021 या काळात साधना ट्रस्टच्या ‘कर्तव्य साधना’ या डिजिटल पोर्टलवर प्रसिद्ध झाली. त्याचं हे पुस्तक. मालिकेतल्या एकेका मुलाखतींतून दोन व्यक्तींचं सामायिक आणि स्वतंत्र आयुष्य, त्यांचं जगणं, भोगणं, उभं राहणं आपल्यापुढं येतं. त्या मुळातूनच वाचायला हव्यात. तरीही मुलाखत घेणं, मग लेखन, वाचन, पुनर्लेखन, वाचन अशा प्रक्रियेत पहिल्यापासूनच असल्यानं काही गोष्टी अधोरेखित करण्याचा मोह होतोय.

मुलाखतीतल्या कुठल्याही जोडप्यांनी आपल्या जोडीदाराचं धर्मपरिवर्तन केलेलं नव्हतं. कुणी कुणाला बुरखा घालण्याची किंवा दाढी-टोपी ठेवण्याची सक्ती केली नव्हती, की कुणी कुणाला टिकली लावण्याचा किंवा नाम ओढण्याचा हट्ट केला नव्हता. आंतरधर्मीय लग्नासाठी तुम्हाला जन्मानं मिळालेला धर्म सोडायलाच हवा असंही काही नव्हतं. केवळ नास्तिक असल्यावरच किंवा धर्म नाकारल्यावरच आंतरधर्मीय लग्न करता येईल ही कथित समजूत यामुळं निकाली निघाली. मुलाखतीतले काही जण धार्मिक होते. धर्माचरण करणारे होते. मुद्दा इतकाच होता की कुणाही जोडीदारानं धर्मपालन/धर्माचरण करावं यासाठी आग्रही नव्हतं. माझे संस्कार असतील म्हणून, इतक्या वर्षांची सवय म्हणून किंवा अगदी आवडतं, आनंद वाटतो म्हणूनही धार्मिक गोष्टी, उपासतापास, साग्रसंगीतपद्धतीनं सणवार करणारे होते. पण त्यामुळे त्यांच्या सहजीवनावर नकारात्मक प्रभाव पडला नाही. हा दोघांमधला समंजसपणा महत्त्वाचा वाटला. खरंतर सजातीय असतानाही अनेकदा घराघरातली पद्धत भिन्न असते. पण आपल्याकडे बहुतांश जणांना मुलीनं सासरी आल्यावर माहेरचं सगळं विसरून जावं असंच वाटतं. अगदी जेवण बनवण्याची पद्धतही ‘आमच्याकडची’च हवी असते. त्या पार्श्वभूमीवर हा समजसपणा काही केवळ धार्मिक आचरणाच्याच नव्हे तर एकूणच सर्वच देवघेवच्या व्यवहारासाठी किती आवश्यक आहे हे लक्षात येतं. त्या समजूतदारपणामुळेच सहजीवन असतं असंही म्हणायला हरकत नाही.

बरं यातील बहुतांश सर्वच जोडप्यांनी लग्नानंतर स्वतंत्रपणे घरोबा केला. असतील नसतील त्या हालअपेष्टा एकत्र सोसल्या; पण कुटुंबीयांबरोबर सोबत राहण्यातला ताणतणाव टाळला. मुळातच कुटुंबीयांचा थेट विरोध किंवा पुरेसा स्वीकार नसतानाही तिथंच गुंता करत राहण्यात काहीच हशील नसतं. रुसवेफुगवे, हेवेदावे, हालहाल, छळवणूक, भांडण-तंटे यांना आपोआप फाटा मिळाला. यामुळे देखील जेव्हा दोन्हीकडच्या कुटुंबीयांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि जाणं-येणं वाढलं, तेव्हा त्यांचा निकोप स्वीकार झाला. तसंच आपल्या जोडीदारानं कुटुंबीयांचे तीव्र वाग्बाण झेलण्यासाठी पहाडासारखं उभं राहावं यातला रोमान्सही त्यांना अनुभवता आला.

तुमचं आर्थिक स्वातंत्र्य महत्त्वाचं हा मुद्दा सर्वच मुलाखतींतून वारंवार प्रकट होत होता. आंतरधर्मीय, आंतरजातीय वा सजातीय असो प्रेमविवाह करताना तर गाठीला पैसे असायलाच हवे, हा जणू अलिखित नियम आहे. कुणावरचंही विशेष करून पालकांवरच आर्थिक अवलंबित्व असेल तर तुम्हाला तुमच्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहता येत नाही. पालकांकडून आर्थिक कोंडी केली जाण्याची शक्यता असते. मालमत्ता/संपत्तीतून बेदखल केलं जाण्याची धमकी दिली जाते. नातं मोडण्यासाठी दबाव आणला जाऊ शकतो; पण जर तुम्ही पुरेसं कमवते असाल तर आपोआपच तुम्हाला निर्णयस्वातंत्र्य मिळतं आणि मग निर्णयस्वातंत्र्य आलं की कुठलाही विवेकी निर्णय घेण्यास तुम्ही स्वतंत्र असता. जोडीदार निवडीचं स्वातंत्र्यदेखील अखंडित राहातं. थोडक्यात प्रेम करण्यासाठी पैशांची गरज नसली तरी ती निभावण्यासाठी असतेच हा व्यावहारिकपणा यातून स्पष्ट होत होता.

इब्राहीम खान यांनी मुलाखतीत एकेठिकाणी म्हटलंय, “वैचारिकदृष्ट्या फार स्पष्ट असणं, तुमचा विचारांचा पाया पक्का असणं, अशा विवाहाचं महत्त्व पटलं म्हणून ते करायला तयार असणं हे सगळे मुद्देच गौण असतात. तुमचा तुमच्या प्रेमावर विश्वास आणि धाडस करण्याची तयारी या गोष्टी महत्त्वाच्या असतात. फार बुद्धिवादाची गरज नाही. प्रेमात असणारी, बाकी जग माहीत नसलेली साधी सरळ माणसंसुद्धा किती सुखाने राहतात; कारण त्यांचा प्रेमावर आणि त्यासाठी वाट्टेल त्या खस्ता खाण्याच्या तयारीवर विश्वास असतो.” हा मुद्दा फार महत्त्वाचा वाटतो. म्हणजे आंतरधर्मीय/जातीय विवाह करण्यासाठी तुम्ही अभ्यासू, विचारवंत, वैचारिकदृष्ट्या ‘प्रगल्भ, तर्कबुद्धीचे, आधुनिकतावादी दृष्टिकोन बाळगणारे इत्यादी इत्यादी असण्याची काहीएक गरज नाही. मात्र आर्थिक स्वातंत्र्याबरोबरच दोन अत्यंत मूलभूत गोष्टी हव्यात. त्या म्हणजे प्रेम करण्याचीच धमक आणि वेळ पडल्यास त्या प्रेमाची पाठराखण करण्याचं धाडस. या दोन्ही गोष्टी ‘यू मस्ट हॅव’ कॅटेगरीत येतात. वधु/वर संशोधनातल्या बायोडाटामध्ये जसे जोडीदाराविषयीच्या अपेक्षा लिहिलेल्या असतात, तशाच या मिश्रविवाहातल्या न उच्चारलेल्या अपेक्षा म्हणाव्या लागतील. एखाद्या व्यक्तीला आंतरधर्मीय/जातीय लग्नांचं सामाजिक महत्त्व पटलेलं असेल, वैचारिक स्पष्टता असेल तर ते बोनस धरता येईल; पण सामाजिक महत्त्व आणि वैचारिक स्पष्टता याची जाण असूनही जर ऐनवेळी व्यक्ती कुठल्याही दबावाला बळी पडणार असेल, कच खाणार असेल आणि जोडीदाराला तोंडघशी पाडणार असेल तर ते निव्वळ ‘पुस्तकी’ ज्ञान. त्याचा व्यावहारिक उपयोग शून्य. हेही या मुलाखतींतून जाणवत होतं.

‘आंतरधर्मीय विवाहितांचे आईवडील आणि त्यांची मुलं यांना मानसशास्त्रीयदृष्ट्या विनाकारणच जरा जास्त भोगावं – सहन करावं लागतं. आईवडिलांना मनाविरुद्ध चौकटी मोडाव्या लागतात आणि मुलांना इतर सर्वसामान्य कुटुंबापेक्षा वेगळं काही वाट्याला आलं आहे याचा अनुभव घ्यावा लागतो.’ श्रुती पानसे यांचं हे वस्तुनिष्ठ निरीक्षण कित्येक दिवस मनात राहिलं. बऱ्याचदा आंतरधर्मीय विवाहितांच्या पालकांकडे ‘व्हिलन’ म्हणूनच पाहिलं जातं. आपल्याच देशात ‘ऑनरकिंलींग’सारखे प्रकार घडत असले, तरी सर्वच पालक काही मुलांच्या मुळावर उठलेले नसतात. जगण्याविषयीच्या त्यांच्या स्वतःच्या धारणा, समजुती असतात. मुला/मुलींच्या निर्णयाबाबत विरोधापेक्षाही नाराजी अधिक असते. काहीवेळा त्यांना त्यांच्या दृष्टीनं ‘वेळेवर’ न सांगितल्याचं दुखावलेपण असतं आणि बहुतांशवेळा आपल्या अपत्याविषयी काळजी असते. काळजीचा मुद्दा तर आईवडील स्वतः मुलांसाठी जोडीदार निवडतात तेव्हाही असतोच. त्याच सगळ्या भावनिक उलथापालथीतून काहीवेळा संताप केला जातो. बोलणं बंद केलं जातं. काही पालकांना सामाजिक अवहेलना नको असते. ती सोसण्याची ताकद नसते. अशावेळी ते मुलांपासून दुरावतात. पण याच मुलाखतींतून लक्षात आलं की पालकांच्या वागण्या बोलण्याचा राग मनात न ठेवता मुलांनी सातत्यानं पाठपुरावा केला, तेव्हा तीच नाराजी प्रेमात रूपांतरित झाली.

काही जण त्यांच्या समजुतींना मोडून मुलांसाठी स्वतःत बदल घडवतात. नातेवाईक किंवा मित्रपरिवारातल्या टोमण्यांचे वार झेलतात. तेव्हा श्रुतीताईंच्यां म्हणण्यातलं हे मर्म अधिक खोलपणे समजून घ्यायला हवं असंच वाटलं. मुलांबाबतही तेच. आपल्या आईवडिलांचं सहजीवन हे सामाजिकदृष्ट्या असमान्य आहे हे उमजून घ्यायला कष्ट घ्यावे लागतात. शाळेत, सार्वजनिक ठिकाणी काही वेळा कुतूहलानं, तर कधी कुजकेपणानं विचारलेल्या प्रश्नांना सामोर जाव लागतं, ते दुर्लक्षून कसं चालणार. इथं पालकांना स्वत:ची वेगळी ऊर्जा द्यावी लागते. शिवाय आंतरधर्मीय विवाहितांच्या मुलामुलींचं लग्न हा चिंतेचा विषय म्हणून समोर आला. त्यांनी स्वतःचे जोडीदार निवडले तर उत्तमच; पण तसं नसेल तर मग मुलामुलींचा धर्म कुठला? हा मुद्दा येतो. भारतीय परिप्रेक्ष्यात तो बहुतांशवेळा वडिलांचाच असतो. एक सामाजिक चौकट मोडली तरी सर्वच चौकटी मोडता येतात असं नाही. त्यामुळे मालिकेतल्या कुटुंबांवरदेखील पितृसत्तेचा प्रभाव जाणवतोच.

बाकी दोन वेगळ्या धर्मातली, संस्कृतीतली माणसं एकत्र येत होती म्हटल्यावर खानपान, सणवार, प्रथा, परंपरा यात वैविध्य असणारच होतं. त्यात ‘तडजोड’ करायची असा विचार न करता त्यातून आनंद घ्यायचा, खाद्यसंस्कृती अनुभवायची असाच दृष्टिकोन प्रत्येक जोडीत दिसत होता. याचा अर्थ या सर्वच जणांच्या सहजीवनात सगळंच छानछान होतं असं नाही. घरकाम आणि आर्थिक जबाबदाऱ्यांचा वाटणीमध्ये इथंही बोंबाबोंब होतीच. प्रेम असलं तरी ‘पुरुष’ असल्याच्या प्रिविलेजमधून सुटका करून घेता आली नाही. त्यामुळं घरकामात जोडीदाराची एकतर ‘मदत’ इतकीच भूमिका राहिली किंवा हातच वर असाही तोरा राहिला. घरकामात ते ‘तू अर्ध कर मी अर्ध कर’ अशा भूमिकेतून मी बघत नव्हतेच. ज्याच्याकडे वेळ आहे आणि काम पडलंय त्यानं ते करावं. मग काम कोणतंही असो. कामाची अर्धी वाटणी असं घरकामात तरी शक्य नाहीये कारण त्याचा रोजचा क्वांटम वेगवेगळा असतो तेव्हा तो मुद्दा कामाची दोघांच्या क्षमतेनुसार पूरक वाटणी असावी इतकं नक्कीच वाटत होतं. आर्थिक जबाबदाऱ्याही वाटून घ्यायच्या असतात ही गोष्टदेखील आपल्याकडे रूढ नाही. इथंही ते अर्ध-अर्ध नाहीच तर कमाईनुसार वाटा असावा इतकंच सूत्र होते; पण काही कुटुंबात स्त्रियांची नोकरी/काम करण्याची इच्छा असतानाही त्यांना कुटुंबाला प्राधान्य द्यावं लागलं. आपल्यावरच्या पुरुषसत्ताक विचारांचा, संस्कारांचा परिणाम नाकारून चालणार नाही. आपण अजूनही समाज म्हणून प्रगल्भ नाहीयोत, उलट अशा सर्वच मुद्द्यांवर आपली ‘सामूहिक समज’ कधी वाढवणार असा प्रश्न पडला. मुलाखतीत जोडीदार आणि सहजीवन या संकल्पनांबाबतची काही प्राथमिक मतं, निरीक्षणंही खूप बोलकी, स्वयंसिद्ध आणि सुस्पष्ट आहेत. ती मुद्दाम सांगावीशी वाटतायेत.

आवडत्या माणसासोबत असण्यातला जो आनंद आहे, जे सुख आहे ते कधीच मिळू शकलं नसतं. भौतिक गोष्टीपक्षा विवेकी जोडीदाराची निवड करणं म्हणजेच सुंदर सहजीवनाकडं वाटचाल करणं आहे.” (समीना-प्रशांत)

नवरा बायकोची म्हणून भांडणं झाली, की मग आम्ही एकमेकांचे मित्र होऊन त्याच परिस्थितीकडे त्रयस्थपणे पाहतो. ती किंवा मी त्या पद्धतीनं आधार देतो आणि मग आमचं भांडणही मिटतं.” (प्रज्ञा-बलविंदर)

चांगला जोडीदार मिळणं हे आमच्या दीर्घ सहजीवनाचं यश तर आहेच शिवाय योग्य वेळी घेतलेल्या निर्णयावर ठाम राहणंही आहे. एकमेकांचा सर्वार्थानं स्वीकार करणं हे आनंदानं, समाधानानं राहण्याचं सूत्र.” (हसीना-राजीव)

एकमेकांच्या पायांत गुंता न करताही आपल्याला एकमेकांच्या सोबतीनं छान जगता येतं.” (इंदुमती-महावीर)

लग्न हा माझा वैयक्तिक निर्णय होता, त्यामुळं आपण काहीतरी परिवर्तनासाठी लग्न केलंय आणि ते आता टिकवून दाखवायचं आहे असं कुठलंच बाँदरेशन मला नाही.” (वर्षा-अमीन)

एवढं प्रेम करणारी व्यक्ती आपल्याला सहजासहजी लाभत नाही. मला मिळाली तेव्हा मी करटेपणा केला नाही, याच आज समाधान आहे.” (रुपाली-मॅकेन्झी)

आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो. बरेचदा कालांतरानं ते विरून जातं; पण आमच्याबाबत असं झालं नाही. आम्हाला एकमेकांची कंपनी खूप आवडते. परस्परांबरोबर खूप आनंदी, कम्फर्टेबल असतो. आम्हाला एकमेकांच्या सोबतीचा कधीही कंटाळा येत नाही.” (जुलेखा-विकास)

स्त्रियांनीही आपल्या निर्णयावर ठाम राहणं, सर्व तऱ्हेच्या संकटांसाठी तयार राहणं गरजेचं आहे. अनेकदा प्रेमात आवश्यक असणारी हिंमत त्या दाखवत नाहीत. लगेच घाबरून जातात. आपण जे धाडस करत आहोत त्याच्या वाटेत काटे आहेत, हे कोणतंही पाउल उचलण्याआधी लक्षात ठेवायला हवं. आपले दिवस बदलण्याची ताकद स्त्रियांमध्ये जास्त असते.” (शहनाज सुनील) –

“लव्हमॅरेज आहे म्हटलं की तिथं सगळंच छान छान आहे, तुम्ही शंभर टक्के खूश आहात, तुमच्यात कुठलेही वाद नाहीत, सगळं सुरळीत आहे, असा एक समज तयार होतो. प्रेमात आहात म्हणजे सगळं परिपूर्ण आहे, असं होत नाही. दोन भिन्न माणसं आहेत म्हणजे गुणदोष येणारच आणि फक्त तुम्ही कसं समजून घेऊन पुढे जाता हे महत्त्वाचं. उलट लव्हमॅरेजमध्ये अधिक बाद होतात. एकतर तुम्ही एकमेकांना अधिक ओळखता आणि एकमेकांना स्वातंत्र्य देण्याची भाषाही अधिक केलेली असते. स्वातंत्र्याचा संकोच व्हायला लागला की वाद होतातच. एकमेकांना कशी स्पेस देता, एकमेकांना कसं स्वीकारता यावर सहजीवन फुलतं.” (आरजू-विशाल)

प्रेम, लग्न-संसार, जोडीदार, सहजीवन या संकल्पना कधीच आदर्शवत नसतात. परिपूर्णही. बरं त्यांचा जाती-धर्माशी काही संबंधही नाही. तुम्ही आंतरधर्मीय लग्न असो वा सधर्मीय काही टक्केटोणपे तर तुम्हाला खावेच लागतात. यशस्वी सहजीवनाचा कुठलाही रेडीमेड फॉर्म्युला असत नाही, हेही पुन्हा एकदा या मुलाखतींतून प्रतीत झालं. या मुलाखतींतून प्रेम, साथ, सहजीवन, कम्पॅनियनशीप याविषयी बारकुली बारकुली नजर देणारं हे एक दस्ताऐवज तयार झालं. आंतरधर्मीय सहजीवनासाठी ‘प्रिपेअर’ होणाऱ्या आणि आधीच ‘ॲपीअर्ड’ असणाऱ्या अशा दोघांनाही या प्रत्यक्ष अनुभवांतून काहीतरी संचित मिळेल याची खात्री आहे.

हे मनोगत लिहिण्यास बसले तेव्हा समोर पडलेल्या वर्तमानपत्रावरची बातमी लक्ष वेधत होती. वसईतल्या एका आंतरधर्मीय नवविवाहित जोडप्यानं रिसेप्शनचा कार्यक्रम ठरवला होता. त्याची कार्यक्रमपत्रिका व्हायरल झाली आणि घाबरून नवविवाहितांच्या कुटुंबीयांनी कार्यक्रमच रद्द केला, अशी ती बातमी होती. थंडीतल्या दिवसांत देशभर ‘लवजिहाद’चं धुगधुगतं लाकूड पेटलेलं होतंच. त्यामुळं कार्यक्रमात धर्माच्या कथित रक्षकांनी खोडा घातला तर… अधिक स्पष्ट बोलायचं तर राडा घातला तर काय करणार म्हणून कार्यक्रम रद्द झाला होता. कुठल्याही दहशतीपोटी एखादा समारंभ रद्द व्हावा हे आरोग्यदायी समाजाचं लक्षण असू शकत नाही. हे भय अस्वस्थ करणारं आहे. अशा बातम्या समोर येतात, तेव्हा समंजसपणे सकारात्मक आणि आनंदी जगणाऱ्या माणसांच्याच कहाण्या वारंवार का सांगाव्या लागतात याचा अर्थ उमगतो. उत्तराचं एक टोक गवसतं. शोध मात्र संपत नाही. त्यासाठीचं भटकणं निरंतर सुरू राहतं… भटकंती जारी असेल तरच इष्टस्थळी पोचण्याची उमेद कायम राहते. त्याच उमेदीच्या बळावर धर्मरेषा ओलांडून प्रेम शिकवणाऱ्या, ऊर्जा देणाऱ्या या कहाण्या एकमेकांना सांगत राहू-दहशत आणि द्वेष याविरुद्ध प्रेमासह जगून दाखवणे याला पर्याय नाही!

नवीन लेख

संबंधित लेख

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here