- टीम बाईमाणूस
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच त्यांच्या ट्विवर हँन्डलवर लिहिले की, ’Proud of Lahari Bai, who has shown remarkable enthusiasm towards Shree Ann. Her efforts will motivate many others.’’ लहरी बाई नावाच्या एका 27 वर्षांच्या आदिवासी महिलेबद्दल थेट पंतप्रधानांनीच असे गौरवोद्गार काढल्यामुळे देशभरात या नावाची चर्चा सुरू झाली. लहरीबाई यांनी तृणधान्याच्या दीडशेहून जास्त प्रजातींची बियाणी जतन केली आहेत. लहरीबाईंच्या या बियाणांच्या बँकेवर दूरदर्शनने दोन मिनिटांचा एक व्हिडियो प्रसारित केला होता. संयुक्त राष्ट्राने घोषित केल्यानुसार यंदाचे वर्ष हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. याच निमित्ताने पंतप्रधान मोदी हे लहरीबाईच्या कार्याने प्रभावित झाले आणि त्यांनी दूरदर्शनचा तो व्हिडियो त्यांच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट केला.
बाजरीची बियाण्याची बँक स्थापन करणाऱ्या मध्य प्रदेशातील डिंडोरी जिल्ह्यातील लहरी बाईची त्यामुळेच बरीच चर्चा आहे. बैगा जमातीतील लहरीबाई या डिंडोरी जिल्ह्यातील सिलपाडी या गावातील रहिवासी आहेत. कुटकी, सवा, कोडो, कटकी यांसारख्या बाजरीच्या संवर्धनात त्या दशकाहून अधिक काळ गुंतल्या आहेत. त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या भरड धान्यांच्या बियांचा साठा आहे. ग्रामीण गृहनिर्माण योजनेतून बांधलेले त्यांचे दोन खोल्यांचे घर आजूबाजूच्या परिसरात बाजरीच्या बियांचे दुकान म्हणून ओळखले जाते. लहरीबाई सांगतात की, आमच्या ठिकाणच्या नामशेष झालेल्या बियाण्यांना वाचवण्यासाठी आम्ही इतर गावांतून बियाणे आणून उत्पादन घेतले. हे बियाणे शेतकर्यांना वाटले, शेतकर्यांनी त्यांच्या शेतातील छोट्या भागात पेरले. आणि पीक आले की आम्ही पुन्हा बियाणे त्यांच्याकडून परत घेतले. आता आपल्याकडे अनेक नामशेष झालेल्या पिकांच्या बिया आहेत.
सिलपडी गावात अवघ्या दोन छोट्या खोलींच्या घरात लहरीबाई राहतात. फक्त जुजबी अक्षरओळख असलेल्या लहरीबाईंनी वयोवृद्ध आजारी आई-वडिलांची सेवा करता यावी यासाठी लग्नही केलेले नाही. लहरीबाई हे नाव जरी सध्या चर्चेत आले असले तरी त्यांच्या डिंडोरी जिल्ह्याची ओळख यापूर्वीच सबंध भारतभर झाली आहे. भरड धान्यांची बँक असा नावलौकिक मिळवणाऱ्या डिंडोरी जिल्ह्याला यापूर्वीही अनेक मानसन्मान प्राप्त झाले आहेत.

संबंधित वृत्त :
लहरीबाईंकडे भरड धान्यांचे असे बियाणे आहेत जे लोकांच्या ताटातूनच नव्हे तर शेतातूनही कधीच गायब झाले आहे. लहरीबाईंकडे असे दुर्मीळातील दुर्मीळ बियाणांचा साठा आहे. दोन खोल्यांपैकी एका खोलती लहरीबाईंनी अशा ३० वेगवेगळ्या बाजरीच्या जातींच्या बियाणांचा साठा करून ठेवलाय. त्या सांगतात की, आता शेतीची पद्धत पूर्णपणे बदललीये. जास्त पैसा कमावण्यासाठी शेतकरी भरड शेतीपासून लांब गेले. लोकांना फक्त ज्वारी, बाजरी, मका, कुटकी हीच नावं माहितीये. मात्र आमच्या आदिवासी संस्कृतीत आम्ही लहानपणापासूनच भरड धान्य खात आलोय. मला ही चिंता होती की, जर भरड धान्यांपासून लोकांनी पळ काढायला आणि मग या धान्यांची बियाणेच संपुष्टात आली तर…? मग मी हळूहळू भरड धान्यांच्या बियाणांचा साठा कराला सुरूवात केली. मी आजूबाजूच्या गावी गेले, तिथून बियाणं घेऊन माझ्या शेतात लावली आणि जेव्हा मुबलक प्रमाणात बियाणे उगवले तेव्हा त्याची बँक तयार केली. घरोघरी जाऊन भरड धान्यांचा प्रचार केला, याच धान्यांमुळे तुमचे आरोग्य व्यवस्थित राहील हे त्यांना समजावून सांगितले. आता अनेक गावांतील लोकं माझ्याकडूनी ही बियाणे घेऊन जात आहेत.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही त्यांचे कौतुक केले. मुख्यमंत्री म्हणाले की, बैगा जमातीच्या लहरीबाईंनी ‘श्री अण्णा’साठी केलेल्या प्रयत्नांनी राज्याचा नावलौकिक मिळवला आहे. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली भरड धान्याला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांना यश मिळत आहे.

दिंडोरी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या लहरीबाईंनी भरडधान्य ‘श्री अण्णा’च्या संवर्धनासाठी केलेल्या अभूतपूर्व कार्यामुळे राज्याचा अभिमान वाढल्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली ‘श्री अण्णा’ म्हणजेच भरड धान्याला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. लहरीबाईंच्या प्रयत्नांचे पंतप्रधान मोदींनी केलेले कौतुक हे त्यांच्या संवेदनशीलतेचे प्रतिबिंब आहे. असे मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. दिंडोरी जिल्ह्यातील लहरीबाईंनी ‘श्री अण्णा’च्या संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करताना पंतप्रधान मोदींनी लिहिले आहे की- लहरीबाईंच्या प्रयत्नांमुळे इतर लोकांना ‘श्री अण्णा’चे संवर्धन आणि दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
संयुक्त राष्ट्राने 2023 हे वर्ष बाजरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. भरड धान्य कमी सिंचनात चांगले उत्पादन देते आणि पौष्टिकतेने परिपूर्ण असते. पीक चक्र सुव्यवस्थित करण्यात आणि लहान शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यातही त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.