- काशी विनोद
वाढदिवस साजरा करण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधत असतात. आपला वाढदिवस हा इतरांपेक्षा वेगळा साजरा झाला पाहिजे अशी अनेकांची इच्छा असते. काहीजण या दिवशी नवीन कपडे घालून देवदर्शनाला जातात, तर काहीजण आपला वाढदिवस एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन तेथील लोकांसोबत साजरा करतात. एकंदरीत काय तर वाढदिवस साजरा करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. त्याप्रमाणे कोणी हॉटेल, रेस्टरंटमध्ये तर कोणी घरीच वाढदिवस साजरा करतात. पण एखाद्या व्यक्तीने त्याचा वाढदिवस स्मशानात जाऊन साजरा केल्याचं तुम्हाला सांगितलं तर तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही आणि हा स्मशानात वाढदिवस साजरा करण्याचा प्रकार फक्त एकदाच नव्हे तर गेल्या 25 वर्षांपासून एक अवलिया स्मशानात त्याचा वाढदिवस साजरा करतोय.
अंधश्रद्धेला फाटा देत नविन विचारांचा पायंडा पा़डण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीतील पत्रकार मनोज पवार त्यांचा वाढदिवस स्मशानात करण्याचा उपक्रम सलग पंचवीस वर्षांपासून राबवत आहेत! स्मशानभूमी हे अपवित्र ठिकाण मानले जाते, रात्री येथे गेले की भूत पाठी लागतात अशा अनेक अंधश्रद्धा नागरिकांच्या मनात आहेत. या विचारांना फाटा देत नविन विचार रुजविण्याची सुरुवात आपल्या पासून झाली पाहीजे या उद्देशाने मनोज पवार हा उपक्रम करतात. ते मध्यरात्रीच्या सुमारास तथाकथित भुताखेतांना न घाबरता स्मशानात जातात व तेथे केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करतात. कधी त्यांचे मित्र त्यांच्याबरोबर असतात. त्यांनी तो उपक्रम 1996 मध्ये सुरू केला. पवार स्वत:ही ‘एका स्थानिक वृत्तपत्रात काम करतात. असे काहीसे विचित्र वाटणारे धाडस करणाऱ्याला समाजातील लोकांची साथ सहज मिळत नाही; तसेच मनोज यांचे झाले. मनोज पवार महाराष्ट्र ‘अनिस’ चे कार्यकर्ते होते. ते दापोली शाखेसाठी काम करतात. मात्र त्यांनी स्मशानातील वाढदिवस व्यक्तिगत पातळीवर राबवला.
संबंधित वृत्त :
- वृद्धाने केली करोडोंची मालमत्ता सरकारला दान!
- …आणि ‘भुताळीण’ ठरवलेल्या महिलेच्या हातचे अन्न खाऊन अंधश्रद्धेला पिटाळून लावले‘
मनोज यांचे बंधू प्रवीण व काही मित्र-सहकारी पवार यांना साथ हळूहळू देऊ लागले. ते वाढदिवसाच्या रात्री त्यांच्यासोबत जाऊ लागले. आश्चर्य म्हणजे मनोज यांच्या धीट आईने- सुनंदा यांनी मुलाच्या त्या उपक्रमावर दबाव आणून बंदी घातली नाही. उलट, त्यांनी स्वतः वाढदिवसासाठी घरगुती गोडधोडही बनवून दिले. त्यांना त्यांचा मुलगा मनोज ऊर्फ नाना हा जिद्दी आहे व भय-भीती त्याला माहीत नाही हे ठाऊक होते.
मनोज तात्याजी पवार यांचा जन्म 1974 चा. वाढदिवस 12 ऑक्टोबर. म्हणजेच 11 ऑक्टोबर ही वाढदिवसाची रात्र ! तेव्हा तो स्मशानात साजरा होई. पवार यांना धाडस-धैर्य यांची आवड आहे. त्यांना छोटीमोठी आव्हाने तोलण्याची व संकटे झेलण्याची सवय लहानपणापासून आहे. ते दापोलीच्या ए.जी. हायस्कूलचे विद्यार्थी. त्यांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मुंबईतही गोरेगावला नंदादीप विद्यालय आणि पाटकर कॉलेज येथे झाले आहे. त्यांचे वय पन्नाशीच्या आसपास आहे. पवार म्हणाले, “मी स्मशानातील वाढदिवस सुरू केल्यानंतर माझे नुकसान झाले, मला बाधा झाली, वाईट स्वप्ने पडली; असे काही घडलेले नाही. उलट, पत्रकारितेच्या व्यवसायात मी स्थिर झालो व सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांतही सहभाग, सहकार्य करत गेलो.”

मनोज पवार हे इतर अनेक उद्योग-छंद करत असतात. ते मल्लखांब संघटनेच्या अध्यक्षपदावर कार्यरत होते. ते म्हणाले, “वाढदिवसाच्या रात्री आम्ही मित्र गप्पा करत स्मशान परिसरात बसायचो. ‘भुताटकी असेल तर त्या भूताने मला धरावे! आहे का कोणी? द्या मला अनुभव’ असे आव्हानच मी द्यायचो. मला कधी वेगळे असे काहीही जाणवले नाही. तशा गोष्टी नाहीत तर जाणवणार कशा? पहिल्या वेळी, मी एकटा होतो. भुताखेतांवर माणसाचा कमीजास्त विश्वास असतो, पण तसे माझे नाही. माणूस मरण पावला, की सगळे संपले ! एखादी फिल्म जळून गेल्यावर पुन्हा सिनेमा व ते पात्र दिसेल का? तसेच या जीवनाचे आहे. मला संसारी माणसाचे समाधान व माध्यमात काम करत असल्यामुळे मिळणारे नाव एवढे श्रेय पुरेसे वाटते. माझे विचार माझ्या पत्नीने- मानसी किंवा एकुलत्या एका कन्येने- मधुराने मानले पाहिजेत असा माझा आग्रह नाही. माझे म्हणणे फक्त एवढे, की “लोकांनी स्मशानातील माझ्या वाढदिवसातून बोध घ्यावा की भूतेखेते अस्तित्वात नाहीत. तेव्हा ती भीती काल्पनिक आहे. ती लहानपणी बालकाच्या मनात त्याच्याच लोकांनी घातलेली असते. अशा सामाजिक अंधारात मी माझ्यापुरता एक दिवा लावला. आरामखुर्चीत बसून, नुसत्या गप्पा मारण्यापेक्षा कृतीतून त्या गोष्टी सिद्ध कराव्या या मताचा मी आहे. विज्ञाननिष्ठ असणे, सत्यशोधक असणे यांत चुकीचे काय आहे?” असा सवालही मनोजने उपस्थित केला आहे.
पंचवीस वर्षांपूर्वी, जेव्हा पवार वाढदिवस साजरा करण्यासाठी मध्यरात्री एकटेच स्मशानात गेले तेव्हा गंमतच झाली होती. पवार यांनी वाढदिवसाचा केक स्मशानभूमीत बसून कापला. तेवढ्यात त्यांना तेथून चालणाऱ्या एका वाटसरूची चाहूल लागली. त्यांनी त्या गृहस्थाला हाक मारली, “काका, या, केक घ्या, खाऊन जा.” बापरे ! स्मशानातून आलेली हाक ! तो बिचारा गावकरी घाबरून जवळजवळ धावत सुटला. याठिकाणी सर्व सामान्य कोणी बसला आहे हे मुळीच कोणाला पटणारे नव्हते, भुताने हाक मारली म्हणुन संबंधित इसम यांनी जीव मुठीत धरून पळ काढला.
“मला वाचनाची आवड आहे. श्याम मानव यांचा एखादा कार्यक्रम मुंबईत शिक्षण घेत असताना पाहिला तरी मला प्रेरणा मिळे. नरेंद्र दाभोलकर यांच्याशी माझा प्रत्यक्ष परिचय होता. कोवळ्या वयात त्यांच्या आचारविचारांचा प्रभाव माझ्यावर पडत गेला. मी गोरेगावात राहत असे त्या टोपीवाला बंगल्यात समाजवादी, परिवर्तनवादी विचारांचे वातावरण होते. मृणाल गोरे तेथेच राहत. मुंबईमुळे माझ्या सुधारणावादी विचारांना खतपाणी मिळाले. दापोलीत डॉक्टर मंडलिक यांच्या जाणत्या परिवाराशी घरोबा आहे, तेथे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम सुरू झाले, तेव्हा मी त्यात सहभागी झालो.” मनोज पवार यांचा ‘स्मशानात वाढदिवस’ हा उपक्रम पंचविसाव्या वर्षी वाढदिवस साजरा करून थांबवण्यात आला. अजित सुर्वे, शैलेंद्र केळकर, मंगेश शिंदे, अरविंद वानखेडे, प्रशांत कांबळे, स्वप्निल जोशी, संदेश मोरे ही मंडळी भयभीत न होता, त्यांच्या त्या वेगळ्या उपक्रमात सहभागी होत असत. प्रशांत जुवेकरपासून सर्पमित्र किरण करमरकर यांच्यापर्यंत इतर स्नेहीदेखील असत.”
मनोज पवार यांच्या साहसाला भावनिक पदरदेखील आहे. ते म्हणाले, “माझा मोठा भाऊ हेमंत याचे कोवळ्या वयात, विद्यार्थी असताना अपघाती निधन झाले. त्याला दापोलीजवळच्या ज्या स्मशानभूमीकडे नेण्यात आले तेथे मी हा वाढदिवस साजरा करत आलो आहे. मी त्या ठिकाणी गेल्यावर भावाचे स्मरण दरवेळी केले. माणूस एकदा या जगातून गेला आणि परत दिसणार किंवा येणार नसला, तरी आठवणी हा एक दिलासा आहे.”
पवार मुंबईत राहत असताना, पिंजऱ्यातील पक्षी विकत घेऊन, त्यांना खाद्य देण्याचे, रानात स्वातंत्र्य देण्याचे यशस्वी प्रयत्न एका निसर्गप्रेमी व्यक्तीबरोबर करत असत. त्यांनी तो उपक्रम एक दशकभर राबवला. ते मुक्त केलेले पक्षी नंतर त्यांना दिसत. ‘त्यात एक वेगळा आनंद होता’ असे पवार सांगतात. त्यांनी सर्प पकडणे-हाताळणे हे कौशल्य आत्मसात केले आहे. त्यांनी वृक्षारोपणाची, बागेची आवड जोपासली आहे. व्यायामशाळा हे त्यांचे आवडते ठिकाण. व्यायाम केल्याशिवाय ते स्वस्थ बसू शकत नाहीत. त्यांना तबलावादनाची आणि चित्रकलेचेही आवड आहे. वार्तांकन हा त्यांचा पेशा आहे.
दापोलीतील एखादी माहिती उघड करायची असेल एखाद्याला अद्दल घडवायची असेल तर मनोज पवार यांच्या कामाला दाद दिली जाते. मनोजला एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणूनही ओळखले जाते, दांडगा जनसंपर्क असलेले मनोज सारखे लोक चळवळीत काम करत आहेत, अंधश्रद्धेला खतपाणी कसे घातले जाते यातून होणारे मानवी जीवनावरील विपरीत परिणाम, माणूस जातो तेव्हा त्याचे संपूर्ण शरीर नष्ट होते, मग त्याचा आत्मा कुठून येतो , लोकांनी स्वतःच्या डोक्यांनी हे भूत संकल्पना रंगवून पुढे आणली आहे असे मनोजचे म्हणणे आहे. मनोजने आपल्या लेकीला ही याबाबत आतापासूनच मजबूत करायला सुरुवात केली आहे. तिने स्वयंपूर्ण व्हावं, बिनदास्त जगावं यासाठी तो वेळोवेळी तिला प्रत्येक गोष्टीची कल्पना देत असतो.
स्मशानभूमीत जाऊन वाढदिवस साजरा करणारा कोकणातील मनोज हा एकमेव व्यक्ती आहे. जिथून भुताखेतांची गोष्टींना सुरुवात होते असे म्हणटले जाते त्याच अंधश्रद्धेचे मूळ उपटण्यासाठी मनोज गेले 25 वर्षे प्रयत्न करत आहे, केवळ समाजाला दाखवण्यासाठी नाही तर यातून जनजागृती होऊन चांगला संदेश समाजापर्यंत जावा हा त्याचा प्रयत्न आहे.