- टीम बाईमाणूस
- भारतातल्या बऱ्याचशा मुली या आळशी आहेत.
- त्यामुळेच की काय त्यांच्या बहुतांशी अपेक्षा या सगळ्या नवऱ्याकडून आहेत.
- त्याचे स्वत:चे घर, चांगला जॉब, मोठा पगार, दरवर्षी त्याच्या पगारात होणारी वाढ अशा वेगवेगळ्या त्यांच्या अपेक्षा आहेत.
- स्वतः कमवत नसल्या री हनिमून भारतात नको परदेशात हवा, असा त्यांचा हट्ट असतो.
- मात्र या सगळ्याचा नात्यावर काय परिणाम होतो हे कुणी सांगायला तयार नाही. त्यावर विचारही होत नाही. त्यांना आपण संसारासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे हे लक्षात का येत नाही.
प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या या बेधडक विधानामुळे सोशल मीडियावरचे वातावरण चांगलेच गरम झाले आहे. अनेकांनी सोनालीच्या या भूमिकेचे समर्थन केलयं तर काहींनी सोनालीला खडे बोल सुनावले आहेत.
नेमकं काय म्हणाली सोनाली ते पाहू?
चतुरस्त्र अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या परखड स्वभावामुळे ओळखली जाते. फक्त अभिनयच नव्हे तर तिने अनेक सामाजाकि कामांमधून आणि सामाजिक चळवळीत झोकून देऊन स्वत:ला सिद्ध केलं आहे. आपल्या याच स्वभावानुसार एका कार्यक्रमात सोनालीने मांडलेली मतं सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. या कार्यक्रमात सोनालीने स्त्री पुरुष समानता, लग्नाळु मुलींचे प्रश्न, त्यांच्या अवास्तव अपेक्षा त्यामुळे निर्माण होणारे सामाजिक प्रश्न यावर बोट ठेवले आहे.
सोनाली म्हणते, आजकाल बऱ्याचशा मुलींच्या लग्नाच्या अपेक्षा फारच वेगळ्या आहेत. मुलींना आपला होणारा पती फार पैसेवाला हवा आहे. त्याला चांगला जॉब हवा आहे. त्याचे स्वत:चे घर हवे आहे, त्याच्याकडे सगळ्या सोयीसुविधा हव्या आहेत. मात्र ते एकत्रितपणे काम करण्यास नकार देतात. वेगळ्या प्रकारच्या अपेक्षा वाढताना दिसत आहेत. कित्येक कुटूबांनी मुलींना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. याचा अर्थ हाच की त्यांनी त्यांच्या जबाबदारीनं जगावं.
भारतातल्या बऱ्याचशा मुली या आळशी आहेत. त्यामुळेच की काय त्यांच्या बहुतांशी अपेक्षा या सगळ्या नवऱ्याकडून आहेत. त्याचे स्वत:चे घर, चांगला जॉब, मोठा पगार, दरवर्षी त्याच्या पगारात होणारी वाढ अशा वेगवेगळ्या त्यांच्या अपेक्षा आहेत, मात्र यासगळ्याचा नात्यावर काय परिणाम होतो हे कुणी सांगायला तयार नाही. त्यावर विचारही होत नाही. त्यांना आपण संसारासाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे हे लक्षात का येत नाही. असा प्रश्न सोनालीनं यावेळी उपस्थित केला.
सोनालीने एका मैत्रिणीचा किस्सा सांगितला. मैत्रीण लग्नासाठी मुलगा शोधत होती आणि 50 हजारांपेक्षा कमी पगाराचा मुलगा नकोच, एकटा राहत असेल तर खूपच उत्तम, सासू सासरेही नको आणि त्याच्याकडे कार असावी, असं तिचं म्हणणं होतं. “मी तिला म्हटलं की तू काय मॉलमध्ये आली आहेस का? तुला मुलगा हवाय की ऑफर हवी आहे. हे खरंच खूप अपमानास्पद आहे,” असं मत सोनालीने मांडलं.
मुलं 18 वर्षांची झाल्यावर त्यांना पैसे कमावण्याचा दबाव असतो. कुटुंबाला हातभार लावण्याची जबाबदारी येते. हे पाहून मला माझ्या या भावांसाठी रडायला येतं. दुसरीकडे मुली मात्र 25-27 वर्षांच्या होईपर्यंत फक्त विचारच करत असतात. स्वतः कमवत नसल्या तरी हनिमून भारतात नको परदेशात हवं, असा त्यांचा हट्ट असतो. “आता तर डेस्टिनेशन वेडिंग्स, प्री-वेडिंग सगळं आलंय आणि त्याचा खर्चही त्या मुलाने करायचा असतो. का? तुम्हाला सर्व ऐशोआराम हवा असेल तर मग तुम्हीही कमवा. तुम्हीही शिका, नोकरी शोधा, चार ऑफिसमध्ये जा, कामासाठी विचारा,” असं सोनाली म्हणाली.
बिलं भरणं, हे फक्त तुमच्या नवऱ्याचं काम नाही. कधीतरी तुमच्या नवऱ्याला म्हणा, पुढचे सहा महिने त्याला सुट्टी आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हसू बघा, असं सोनाली म्हणाली. मी सगळ्यांना सांगू इच्छिते की, येत्या काळात तुम्ही अधिक स्वावलंबी व्हावं. तुमच्या पार्टनर सोबत खर्च देखील शेयर करावा. केवळ कुणावर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही. असं मत सोनालीनं यावेळी व्यक्त केले आहे.
सोनाली झाली ट्रोल
सोनालीच्या या वक्तव्यानंतर काहींनी तिचं समर्थन केलंय, तर काहींनी मात्र तिला ट्रोल केलं आहे. तिचं हे वक्तव्य चुकीचं असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. एका नेटकऱ्यानं सोनालीच्या व्हिडीओला कमेंट केली, ‘खूप छान बोलली. पोटगीवरही बंदी घालणे ही काळाची गरज आहे. लोकोमोटिव्ह चालवण्यापासून ते प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये रेजिमेंटच्या प्रमुख तुकडीपर्यंत, प्रत्येक क्षेत्रात मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावत असतील तर घटस्फोटासाठी पोटगी का मागतात?’ तर दुसऱ्या युझरने कमेंट केली, ‘ती खूप चांगलं बोलली आहे. मुलींवर योग्य संस्कार न करण्यासाठी मी पालकांना जबाबदार धरतो.’
“भारतातील स्त्रिया आळशी आहेत, असं उच्चवर्णीय महिलाच म्हणू शकते. या देशातील महिलांकडे पाहा. कामाचा योग्य मोबदला न मिळणाऱ्या महिलांना त्या गुन्हेगार असल्यासारखं वाटतं. या देशात महिला कोणत्या परिस्थितीतून जातात याचा सरकारी डेटा तुम्ही वाचायला हवा,” असं एका युजरने म्हटलं आहे.
“यांचं म्हणणं आहे की गृहिणी आळशी असतात, पण नोकरी करणाऱ्या स्त्रिया ज्या आपल्या पती आणि कुटुंबाप्रती कोणतीही जबाबदारी पार पाडत नाहीत त्या आळशी नसतात. पगारी सुट्ट्या नसतानाही जबाबदाऱ्या पार पाडणे हे गृहिणींचे सर्वात कठीण काम आहे,” असं दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे.