"गावाच्या बाहेर असलेल्या विहिरीतून पाणी काढायला मी दररोज चार किलोमीटर चालत जायची. दिवसातून चार वेळा हेच काम करावं लागायचं, आमच्या गावात जराही पाणी नाही. उन्हाळ्यात तर जगणं लयं अवघड जायचं..." गावातल्या त्रस्त झालेल्या अनेक महिलांच्या या प्रातिनिधिक प्रतिक्रिया!
या महिला दुष्काळग्रस्त जिल्हा असा शिक्का बसलेल्या धाराशिवच्या. याच जिल्ह्यातील लाहोरा तालुक्यातील भोसगा गावाच्या… धाराशिव जिल्ह्यात मांजरा आणि तेरणा या दोन नद्यांची पात्रे जरी येत असली तरी या लोकांना दुष्काळ आणि पाणीटंचाई काहीकेल्या चुकत नाही. याच जिल्ह्यातील लाहोरा तालुक्यातील भोसगा गाव ही दुष्काळाच्या सावटात पुरेपूर अडकलं... उन्हाळ्यात गावातल्या विहिरी पाण्यावाचून कोरड्याठाक पडलेल्या, गावातील बोअरवेलला थेंबभर ही पाणी नाही, पिण्याच्या पाण्यासाठी गावातील बायकांनी चार किलोमीटर पायपीट केली तर कुठे दोन ते तीन हंडे पाणी त्यांच्या नशिबी. अशा परिस्थितीत गावातील लोकांना उन्हाळ्याचे चार महिने कसे तरी काढावे लागत असे.
आपल्याकडे दर वर्षी आपण जलसंधारण महोत्सव भरवतो आणि शेवटी त्या सर्व उपक्रमांचा खेळ करून टाकतो. आपण सगळे फारच वैशिष्ट्यपूर्ण लोक आहोत. आपल्याला पाणी, पर्यावरण, शेती, राजकारण, क्रिकेट इत्यादी गोष्टींमधलं सगळं कळत असतं, असा आपला प्रामाणिक समज असतो. पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे तर खूप लोकांकडे रामबाण उपाय असतात. पण, सगळे प्रयत्न करूनही हे प्रश्न सुटलेला नाही, खरं तर तो आणखी क्लिष्ट होत चालला आहे असं दिसून येतं. एवढे महोत्सव, स्पर्धा, यात्रा, असे वेगवेगळे उपक्रम राबवूनही मूळ प्रश्न सुटत का नाही?
मुकेश सोनकांबळे यांना हा प्रश्न कायमच सतावत होता आणि त्यासाठी काय करता येईल याचा ते सातत्याने विचार करायचे.

(भोसगा गावातील ग्रामस्थ गाव हवामान डायरीवर चर्चा करतांना)
गावातील युवकांसाठी मुकेश सोनकांबळे बनले होकायंत्र
मुकेश सोनकांबळे हा याच भोसगा गावाचा एक तरुण तडफदार युवक… वयाच्या 21 व्या वर्षीच सरपंच झालेले मुकेश सोनकांबळे सध्या RSCD (रिसोर्स अँड सपोर्ट सेन्टर फॉर डेव्हलपमेंट) या संस्थेत मध्ये पर्यावरण संवादक म्हणून काम करतात. गावातील दुष्काळी परिस्थिती असेल, पाण्याची टंचाई असेल या सर्व प्रश्नांची त्यांना जाण होती. मुकेश सोनकांबळे सांगतात, "RSCD मध्ये जेव्हापासून पर्यावरण संवादक म्हणून काम करायला लागलो तेव्हापासून हवामान बदल आणि त्याचा महिलांवर होणार परिणाम या संदर्भात RSCD ला गावपातळीवरून काम सुरु करायचे होते. तेव्हा माझ्या मनात विचार आला की आपण आपल्या गावापासून सुरवात केली तर…?
मुकेश सोनकांबळे यांनी मग लगेचच अनेक संवाद गटांसोबत गावपातळीवर बैठका घेतल्या, वेगवेगळ्या विषयांवर गावातील लोकांशी चर्चा केली. त्यातली एक बैठक होती गावातील युवक-युवतीच्या सोबतची. युवावर्गासोबत हवामान बदल आणि त्याचा महिलांवर होणारे परिणाम यावर त्यांनी एक चर्चासत्र आयोजित केलं होतं. युवावर्गाच्या सोबत चर्चा करतांना चर्चेअंती निष्कर्ष निघाला की, हवामान बदलाला कोणते घटक कारणीभूत असतील? तर ते म्हणजे निसर्गातील जैवविविधता, जी हळू हळू नष्ट होत चालली आहे.जैवविधतेत सर्वात महत्वाचा घटक जर कोणता असेल तर ते म्हणजे पाणी.
वाढत्या तापमानाला नेमकी कोणती गोष्ट कारणीभूत आहे?
वाढत्या तापमानाला जर काही कारणीभूत असेल तर मानवाने भूगर्भातून प्रमाणापेक्षा जास्त केलेला पाण्याचा उपसा. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत गेली आणि जमिनीचे तापमान वाढत गेले, आणि जसजशी पाण्याची पातळी कमी होत गेली तसतसे भूगर्भाचे तापमान वाढत गेले आणि जैवविधतेतील सूक्ष्म घटकावर त्याचा परिणाम होत गेला. त्यामध्ये काही वनस्पती, जीव-जंतू अश्या सगळ्या गोष्टींचा ऱ्हास होत गेला.
मग आता काय करायचं…? तर या गोष्टी पुन्हा नव्याने जिवंत करण्यासाठी जलसंधारण करणे आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवणे गरजेचे होते. नाल्याचे खोलीकरण, सरळीकरण करायचं आणि त्यानंतर नदी नांगरणी करून रुंद ओढ्यातून जे काही पाणी वाहून जाईल त्यानंतर एका समतोल पातळीवर पाणी स्थिरावेल जे जमिनीमध्ये मुरेल आणि त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढायला मदत होईल.

(गावातील जेष्ठ नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्यांना हवामान बदलांमुळे निर्माण होत चाललेल्या परिस्थितीबद्दल सांगताना मुकेश सोनकांबळे)
गावातील तरुणांना दुष्काळाच्या परिस्थितीला कारणीभूत असलेले घटक काय आहेत हे तर समजलं होतं. पण त्यावर काम कसं करायचं हे खूप मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं. गावातील सर्व लोकांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून देणं, गावातील ग्रामपंचायतच्या सदस्यांना आणि लोकप्रतिनिधींना परिस्थितीची जाणीव करून देऊन त्यांचा पाठिंबा मिळवणं, यावर मुकेश सोनकांबळे आणि त्यांच्या सहाकाऱ्यांनी अधिक भर द्यायला सुरुवात केली.
ग्रामपंचायतीसमोर गावातील विदारक दृश्य ठेवले. त्याचसोबत जलसंधारण करणं आपल्यासाठी आणि गावासाठी किती महत्वाचं आहे हे देखील पटवून दिलं. ग्राम पंचायतीला ते ते पटलं देखील. त्यांनी या कामासाठी होकारही दिला. मात्र या कामासाठी पैसाही तितकाच लागणार होता. ग्रामपंचायतकडे निधी नसल्याने आणि गावकऱ्यांकडूनइतका पैसा जमा करणं शक्य नसल्याने एकाच पर्याय या भोसगावासीयांसमोर होता. तो पर्याय म्हणजे..?
भोसगे गावाचा जलसंधारण पॅटर्न
‘बाईमाणूस’ शी बोलताना सोनकांबळे सांगतात की, दुष्काळी परिस्थिती असल्याकारणाने गावातील तलाव कोरडे झाले होते. तलाव कोरडा पडल्यामुळे तलावातील गाळ उपसा काही ट्रक आणि जेसीबी वाले करत होते. पण हे जे काही गाळ उपसा प्रकरण होतं ते अर्थातच नियमबाह्य होतं. नियमानुसार तलाव जर गावाच्या हद्दीत येत असेल तर त्या ग्रामपंचायतीला गाळ उपसा करण्याचा मोबदला मिळतो आणि आणि सोबतच शासनाला देखील त्यातून मोबदला द्यावा लागतो. मात्र इथे तसं घडत नव्हतं.
यावर मग मुकेश सोनकांबळे आणि सहकाऱ्यांना एक कल्पना सुचली. त्यांनी तलावातील गाळ उपसा करणाऱ्या ट्रक आणि जेसीबीवाल्यांकडे गावातल्या प्रतिनिधींनी विनंती केली की, "तुम्ही हा जो गाळ उपसा करत आहात त्याचा आमच्या ग्रामपंचायतींना मोबदला देऊ नका परंतू त्याबदल्यात आमच्या गावातील ओढ्याचे आणि नाल्या-नदीचे सरळीकरण-खोलीकरण करून द्या. तुमच्याकडं जेसीबी आहेत, ट्रॅक्टर आहेत. तो गावाच्या विकासासाठी वापरूया…"
जेसीबीच्या मदतीने गावातील ओढ्याचे आणि नाल्या-नदीचे सरळीकरण-खोलीकरण झाले. नदीपात्र खोल झाल्याने पाण्याच्या प्रवाहावर नियंत्रण मिळवता आले. पूर्वी ओढ्यात-नदीत गाळ साचलेला असल्याकारणाने प्रमाणाच्या बाहेर पाणी आलं तर ते पात्राच्या बाहेरुन वाहायला लागायचं. त्याचा दुष्परिणाम ओढ्याशेजारील-नदीशेजारील लोकांना भोगावा लागायचा.
कधी पीकंच्या पीकं वाहून जायची तर कधी शेतीयोग्य जमीन वाहून जायची. पण, जेव्हापासून खोलीकरण-सरळीकरणचे काम झालंय तेव्हापासून पाऊस पडल्यावर जेवढं पाणी वाहून जायचं तेवढं जात, पण, तीन फूट खोलीचा आणि पाच फूट रुंदीचा जो ओढा आहे. त्यात पाणी थांबतं आणि थांबलेलं पाणी तिथेच मुरतं.
त्याचा सकारात्मक परिणाम असा झाला की, ओढ्याच्या शेजारील बोअरवेलांना आणि विहिरींना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झालं. जो गाळ वाहून जात होता आणि त्यामुळे जी काही मातीची धूप होत होती ती देखील थांबली. भवतालचे जे शेतकरी होते त्यांची वाहून गेलेली जमिनीची माती पुन्हा त्यांच्या शेतात येऊन पडली. त्यामुळे 'मृद संधारण' ही झालं. ओढ्यातील गाळ काढून पात्राचं जे रुंदीकरण करण्यात आलं, त्यामुळे नदीपात्राची उंची वाढली. पुराचा धोकाही टळला.

(गावालगत असलेला हाच तो ओढा ज्यामध्ये गाळ काढण्याचे काम करण्यात आले आहे.)
भोसगा गावातील राजू मनाले हा युवक ‘बाईमाणूस’शी बोलताना सांगतो, गावात फक्त तरुणांसोबतच नाही तर सहा गटांसोबत मुकेश सरांनी बैठक घेतली. त्यामध्ये गावातील शेतकरी असतील, गावातील भजनी मंडळ असेल, गावातील दलित-वंचित-उपेक्षितांची एक स्वतंत्र बैठक, गावातील लोकप्रतिनिधींची एक वेगळी बैठक आणि गावातील युवक-युवतींची एक वेगळी बैठक अश्या सहा गटांमध्ये बैठक घेतली होती.
या सर्व लोकांनी कामासाठी होकार दिला. पण, या कामामध्ये हिरीरीने पुढाकार हा गावातील युवक-युवतींनीच घेतला. कारण आमच्या मागच्या पिढ्यांनी निसर्गाच्या सानिध्यात त्यांचं आयुष्य जगलं होतं पण आता निसर्ग लोप पावत चालला आहे. त्यामुळे आम्हाला जर निसर्गाच्या सानिध्यात आयुष्य जगायचं असेल तर त्या साठी आम्हालाच काहीतरी करावं लागेल हे आमच्या लक्षात आलं."
गावातील युवतींनी गावातील बचत गटांच्या मिटिंगमध्ये जाऊन महिलांना वारंवार जैविविधतेचं महत्व पटवून दिल. जलसंधारण झालं तर पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट कशी थांबेल हे पटवून दिलं. गावातील युवकांनी लोकप्रतिनिधींना पटवून दिलं की तुमच्या काळात जर गावात जलसंधारण झालं तर भविष्यात तुमचं नाव गावातली लोकं काढतील. युवकांचं म्हणणं गावातील प्रतिनिधींना आणि लोकांना ही पटलं. बघताबघता सर्व गाव युवकांच्या पाठीमागे उभं राहिलं.
गावातील जे सधन शेतकरी आहेत त्यांच्या शेतात बोअरवेल होत्या. ओढ्याच्या शेजारी जमीन असणारे शेतकरी असतील किंवा तलावाच्या शेजारी जमीन असणारे शेतकरी, ती मंडळी थेट त्यांच्या घरापर्यंत-शेतापर्यंत पाईप लाईन करून घ्यायचे. गावातील दलित वस्तीतील लोकं असतील किंवा ओबीसी वर्गातील लोकं असतील ज्यांच्याकडे अल्प शेतजमिनीहोत्या त्यांना पाणीटंचाईचा भीषण त्रास व्हायचा.
गावातील जे वंचित घटक आहेत, जी शेतमजुरी करतात,ज्यांचं हातावर पोट आहे त्यांना दुष्काळात 3-4 किलोमीटर पायपीट करूनच स्वतःची तहान भागवावी लागायची. पण,या जलसंधारणच्या कामामुळे गावातील वंचित घटकाला थोडा का होईना पण दिलासा मिळाला.
पूर्वी दुष्काळाच्या काळात या गावातील लोकांना गावच्याबाहेर 3-4 किमी जाऊन पाण्यासाठी पायपीट करावी लागत असे पण, ओढ्यातलं पाणी जेव्हापासून जमिनीत मुरायला लागलं तेव्हापासून जास्त नाही पण पिण्याजोगे पाणी तरी गावातील लोकांना बोअरवेल मधून मिळायला लागलयं.
(असर आणि बाईमाणूस यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘प्रोजेक्ट धरित्री’ उपक्रमांतर्गत ‘पर्यावरण बदल आणि लिंगभाव’ (Climate & Gender) या विषयावरची ही एक विशेष मालिका आहे.)






