'इब्बरु' हा मूळ कन्नड प्रमाण भाषेतील शब्द. या शब्दाचा अर्थ होतो 'दोघी'! बोली भाषेत या शब्दाची इब्रु आणि इब्रू अशी दोन रूपे आढळतात, पैकी 'इब्रू'चा अर्थ दोघीही असा आहे इब्रुचा अर्थ आहे दोघी!
लेखिका प्रियांका पाटील यांच्या कथासंग्रहाचे नाव 'इब्रु' आहे, याचे मुखपृष्ठ नावाच्या अन्वयार्थास साजेसे आहे. यातल्या कथा बंडखोरीकडे कल असणाऱ्या आहेत. चला कथा सुचल्या वा काही तरी लिहू अशा आवेगाने त्या लिहिलेल्या नाहीत हे वाचता क्षणी जाणवते. या कथांना प्रयोजन आहे, मात्र त्या बाळबोध ठाशीव पद्धतीच्या प्रबोधनात्मक बाज घेऊन समोर येत नाहीत.
संवादी पद्धतीने एकेक कथा समोर येतात आणि कथेगणिक लेखिकेच्या वैचारिक प्रगल्भतेचे कौतुक वाटू लागते. कारण या सर्व कथांचे विषय भिन्न आशयांचे आहेत मात्र त्यात काही साम्य आहे, केवळ स्त्रीवादी झापडं लावून या कथा समोर येत नाहीत आणि हरेक कथेतील विचारसूत्र पुढच्या कथेला बेस मिळवून देण्याचे काम करते. वाचकाची मानसिक तयारी करवून घेते. या कथा दोन दशकांपूर्वी प्रकाशित झाल्या असत्या तर त्यांना बोल्ड वा हॉट असाही शेरा काहींनी मारला असता.
मात्र काळ पुढे गेलाय, नव्या पिढीचे दृष्टिकोन काही बाबतीतअधिक परिपक्व आहेत त्यामुळे सद्यकाळात या कथांना बोल्डचा शेरा कुणी देणार नाही. या कथांत विचारांचे खुलेपण आहे, विविध सामाजिक घटनांकडे पाहण्याचा स्वच्छंदी मानवतावादी आयाम आहे. विषय गंभीर असूनही बोजडपणा टाळून लेखिका थेट मुद्द्यांना हात घालतेय हे पानोपानी जाणवते.

कथासंग्रहाचे शीर्षक असणारी 'इब्रु' ही कथा समलिंगी संबंधांवर आधारलेली आहे. कावेरी आणि चन्नवा ह्या दोघी कथानायक आहेत नि कथानायिकाही आहेत! त्यांचं परस्परांवरचं प्रेम नितांत निर्मळ नितळ आहे! समाजाने कितीही झिडकारले तरीही एक युगुल म्हणून एकत्र राहण्याची त्यांची तगमग अस्वस्थ करते. लाईफ पार्टनर म्हणून त्यांना एकत्र राहायचेय मात्र जग त्यांना तसं राहू देत नाही.
त्यांच्या देहभावना समजून घेण्याइतके आपण परिपक्व झालो नाहीत हे सातत्याने जाणवते. कथेतील पात्रांच्या मानसिकतेचे तपशील, प्रवाही संवादशैली यामुळे ही कथा वाचकाचा ताबा घेते. उथळपणा नि अश्लीलतेकडे झुकणारी वर्णने टाळली असल्याने अशा विषयांना बिचकून असणाऱ्या कोणत्याही वय, लिंग, प्रांत भाषा असणाऱ्या व्यक्तीस अवघडलेपण येत नाही.
'निळावंती' ही कथा एका जुन्या समजावर आधारलेली आहे. पक्षांची बोली जर कुणी आत्मसात केली तर त्यास पक्षांच्या विश्वातील भावविश्व आपल्या जगापेक्षा उजवे वाटू लागते. किंबहुना त्यांचं जग किती सच्चे नि शुद्ध आहे याची प्रचिती येते, त्यांच्यापुढे आपलं विश्व निव्वळ भोंगळ, उठवळ वाटू लागते. पक्षांची भाषा जर कुणी शिकून घेतली तर त्या व्यक्तीचा वंशविच्छेद होतो असा एक समज रूढ असण्यामागे हेच कारण असावे. वास्तवात असे काही नसते हे सर्वांना ज्ञात आहेच!
समाजाला फाट्यावर मारुन आपल्या न्याय्य हक्कांसाठी आपलं अस्तित्व नव्याने सिद्ध करणाऱ्या प्रतिभा या तरुणीची कथा 'रणमर्दिनी'मध्ये आहे. सत्ता, पैसा यांच्या बळावर कुठल्याही बाईच्या अब्रूला हात घालण्याच्या प्रवृत्तीवर यात प्रहार आहे. जो अत्याचार करतो तो मोकाट सुटतो मात्र जिने त्या वेदना सोसलेल्या असतात तिला मात्र बळजोरीचे मातृत्व स्वीकारावे लागते. त्याचाही ती स्वीकार करते.
आई झाल्यानंतरती स्वतःला अनेकार्थाने सिद्ध करून दाखवते. सफलतेचे नवे मानकांक हासिल करते. सर्वत्र तिचा बोलबाला होऊ लागताच अन्यायी अत्याचारी पुरुष पुन्हा तिच्या कच्छपी लागतो तेंव्हा ती त्याचा सणसणीत मुखभंग करते.
'रांजण' ही एका अकाली विधवा झालेल्या स्त्रीची कथा आहे जिची रचना ग्रामीण बोलीची आहे. कथेचे शीर्षक कथेला न्याय देणारे आहे. गावगाड्याचा विधवेकडे पाहण्याचा दृष्टिकोन तेंव्हाच बदलू शकतो जेंव्हा त्या स्त्रीच्या कुटुंबियांचा नजरिया बदलेल हे गृहीतक यातून समोर येते. ग्रामीण कथेचे बेअरिंग नेटके पकडले असल्याने कथा सुसह्य झालीय.
पौगंडावस्थेत होणाऱ्या बदलांना नीट सामोरे जाणे आजकाल थोडे सोपे झालेय मात्र एखाद्याचे भावविश्व समलैंगिकतेकडे ओढ घेणारे असेल तर त्याला मात्र समजून घेतले जात नाही. त्याची हेटाळणी होते, त्याची टवाळी केली जाते, कुत्सितपणे टोमणे मारले जातात. अशांना स्वीकारण्यास समाज प्रचंड खळखळ करतो हे कटुसत्य 'त्याच्यातली ती' या कथेत रेखाटलेय. पुरुष हा स्त्रीपेक्षा काकणभर अधिक सरस असल्याच्या पुरुषसत्ताक समाजाच्या मखलाशीवर 'डेस्टिनेशन' या कथेत भाष्य केलंय.

(लेखिका प्रियांका पाटील)
पुरुष हाच अव्वल असून स्त्रीला नेहमीच दुय्यम मानले जाण्याच्या प्रवृत्तीवर यात मार्मिक प्रहार केले गेलेत. पुरुष कितीही बलवान पराक्रमी मानला गेला तरी स्त्रीदेखील तितकीच महत्वाकांक्षी नि सामर्थ्यशाली आहे हे यातून ध्वनित होते. कथानायिका आरोहीच्या आयुष्यातली उत्तुंग भरारी सर्वच स्त्रियांना हवीहवीशी वाटावी अशी आहे.
अलिकडील काळात ज्या काही विवाह - प्रेमविषयक साधनांचा सुळसुळाट झालाय त्यांचा यथार्थ समाचार घेण्याचे काम 'सिक्रेट बॉक्स' ही कथा करते. प्रेमाची भुरळ पाडून कशी फसवणूक केली जाते याचे प्रभावी चित्रण यात आहे. 'बोगदा' या कथेत रेडलाईट एरियात सेक्सवर्करचे काम करणाऱ्या स्त्रीची समस्या रेखाटलीय. अंधारलेल्या बोगद्यासारखं या स्त्रियांचा जिणं आहे हे यात अधोरेखित केलेय.
पोटी मुलगा जन्मला आला नाही तर आपल्याला सरणावर रचल्यानंतर पाणी पाजलं जाणार नाही नि मग आपण मोक्षास पात्र नसू या भाकड संकल्पनेच्या ठिकऱ्या उडवण्याचे काम 'मोक्ष' ही कथा करते. शिकलेली माणसं देखील अंधश्राद्धेच्या आहारी कशी जातात नि त्यांच्या हवालदिल अवस्थेचा फायदा कसा घेतला जातो हा कथाविषय आहे.
आजघडीला स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारा आजार म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर होय! एखाद्या स्त्रीस जर ब्रेस्ट कॅन्सर झाल्यास तिच्या मनात कोणत्या भावना येतात, स्तन नसले तर आपल्याबद्दल समाज काय म्हणेल, कुटुंबिय काय म्हणतील, आपण कसे दिसू, आपलं सौंदर्य बाधित होईल का अशा शेकडो शंकांनी त्या स्त्रीचे मन घायाळ होऊन जाते.
मात्र कधीकधी एखादा आधुनिक विचाराचा पती आपल्या खचलेल्या स्त्रीला मोलाचा आधार देतो. 'ना-स्तन' या कथेत पत्नीचे स्तन काढल्याने तिच्यात काहीच फरक पडणार नाही हे तिचा पती तिला पटवून देतो. एक वेगळा विषय इथे उत्तम रीतीने हाताळला गेलाय. काही कथांत कादंबरीचे बीज दडून आहे!
इब्रू (कथासंग्रह)
लेखिका - प्रियांका पाटील
मेनका प्रकाशन
किंमत 275 रु, पृष्ठे 163
(सौजन्य - दै. संचार, इंद्रधनु पुरवणी )






