- कावेरी बामजई
‘पाताल लोक’च्या दुसऱ्या मोसमात एकाच गोष्टीची पुनरावृत्ती आहेः जे होणार आहे, ते होईलच! जयदीप अहलावतच्या कारकिर्दीला ही गोष्ट शोभून दिसते. पाताल लोक मधली हाथी राम चौधरीची व्यक्तिरेखा तो अशा पद्धतीने साकारतो जणू ती त्याचीच आहे. त्याचं वागणं-बोलणं, स्पष्टवक्तेपणा, मूर्खांना सहन न करण्याची सवय, सर्व गोष्टी जयदीप बारकाईनं चितारतो.
चार वर्षांनी हाथी रामच्या भूमिकेत परतल्यावर मिळणाऱ्या कौतुकाला तो सहजपणे घेतोय. मी लहानपणी अनेक हाथी राम पाहिले होते, असं तो सांगतो. “ते सारे पोलिसवालेच होते असं नाही. हाथी राम त्या लोकांपैकी आहे जो समाज बदलण्यासाठी कामावर जात नाही तर त्या भावनेनं काम करत राहतो व त्यातच तो आनंदी आहे.”
अहलावत हाथी राम सारखाच आहेः- शहरातील आपल्या कौतुकाने आनंदी पण त्यात वाहवत जात नाही. तो मीम्समध्ये झळकतोय. अमूलच्या जाहिरातीत तो दिसला जी पॉप कल्चरमधील त्याच्या अस्तित्त्वाची ठळक दखल आहे.
त्याची तुलना इरफान खान सोबत केली जात आहे. मुलाखती देण्यासाठी त्याला मागणी आहे पण अलिकडेच वडिलांच्या झालेल्या निधनानंतर तो सध्या पटकथा वाचण्यात व्यस्त आहे. हाथी रामच्या अभिनयासाठी कोणी कौतुक केलं तर तो हाथी रामी अंदाजातच म्हणतो, “कोणी आम्हाला हाथी राम विषयी काही सांगू शकत नाही. कोणी त्याला आमच्यापेक्षा जास्त समजू शकत नाही.”
या ठिकाणी येण्यासाठी त्याला वेळ लागला आहे. तो पुण्यातील एफटीआयआय मध्ये शिकत असताना, इश्किया (2010) चित्रपटात विद्या बालनच्या पतीच्या भूमिकेसाठी त्याचा विचार केला गेला होता. “माझ्या टीमने त्याची ऑडीशन घेतली होती पण दिग्दर्शक अभिषेक चौबेला वाटलं की जयदीप या भूमिकेसाठी खूप तरुण व कमी प्रगल्भ आहे. ती भूमिका मग आदिल हुसैनला मिळाली,” कास्टींग एजेंट हनी त्रेहन सांगते.
2012 मध्ये जयदीपला चित्तागाँग चित्रपटात अनंता सिंहची भूमिका मिळाली जो 1930 च्या चित्तागाँग शस्त्रागारावर हल्ला करणाऱ्या क्रांतिकारकांपैकी एक होता. या चित्रपटात जयदीपच वर्गमित्र राजकुमार राव आणि विजय वर्माही होते. यात सूर्यसेनची भूमिका करणाऱ्या मनोज वाजपेयीने जयदीपचं नाव अनुराग कश्यपला सुचवलं जो तेव्हा गँग्स ऑफ वासेपूर बनवत होता.
अहलावत यातील दोन्ही भागात झळकला. अहलावत रईस आणि राजी चित्रपटातही होता. त्याच्या कामाचं कौतुक होत होतं पण ते चरित्र अभिनेत्यांना मिळणारं ठराविक कौतुक होतं. त्याची वेळ यायची होती अजून. दिग्दर्शक सुदीप शर्माने त्याला पाताल लोक मध्ये हाथी राम चौधरी म्हणून निवडलं.
शिखांसाठी जसा दिलजीत तसाच हरियाणवी लोकांसाठी जयदीप
शर्मा सांगतात, “तो एक सहजपणे घेतलेला निर्णय होता. मी जयदीपचं काही काम पाहिलं होतं. पण त्यालाच का निवडलं याचं काही निश्चित कारण माझ्याकडे नव्हतं. मला वाटलं आणि मी त्याला घेतलं. तो योग्य निर्णय ठरला.
आज ही मालिका त्याच्याशिवाय अपूर्ण आहे.” जयदीप आता हरियाणवी तोऱ्याचा पोस्टर बॉय ठरला आहे. त्याचं वागणं-बोलणं आता गर्वाचा विषय झाला आहे. त्याचा वर्गमित्र गौरव द्वीवेदी म्हणतो, “शिखांसाठी जसा दिलजीत दोसांज आहे तसाच हरियाणवी लोकांसाठी जयदीप आहे, टिपीकल बाऊंसर्सच्या अगदी उलट.” २०२० मध्ये कोविड-१९ च्या काळात पाताल लोकच्या पहिल्या मोसमातील हाथी राम चौधरी लोकांच्या मनात घर करून गेला. आपलं काम निष्ठेनं करणारा आणि त्यासाठी कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न ठेवणारा.
सुदीप शर्मा सांगतो की हाथी रामचं पात्र हे त्याच्या वडिलांवर आधारीत होतं. “ते एक इन्कम टॅक्स सल्लागार व वकील होते. त्यांच्या ऑफिसात बोर्ड होता- काम हीच पूजा आहे. आपलं काम ते निष्ठेनं करायचे. पण त्यात व्यावहारीकता होती आणि सहजताही होती. अगदी हाथी राम प्रमाणेच जो निष्पक्षता, सहानुभूती व दयेला महत्त्व देतो.” हाथी राम त्या लोकांसारखा आहे जे वरकमाई करत नाही, कोणत्या लफड्यात अडकत नाहीत. त्यांच्याकडे वरीष्ठांना प्रभावित करणारे व्यक्तिमत्व नाही. नेहमी पैशांची अडचण राहते. पण आपल्या मुलांसाठी ते स्वप्नं बघतात ज्याचा उच्चार करण्याची क्षमता मात्र त्यांच्यात नसते.
एफटीआयआयचे दिवस
जयदीप खरकरा गावातून आहे. त्याची आई पीटी इंस्ट्रक्टर होती आणि वडील विज्ञान व इंग्रजीचे शिक्षक होते. घरात शिस्त होती आणि ज्ञानाविषयी प्रेम होतं. वडिलांना मुंशी प्रेमचंद यांचं लिखाण आवडायचं. टीव्ही आणि व्हिसीआर आणून ते चित्रपट बघायचे. खरकरामध्ये दहावी पर्यंत शिकल्यानंतर जयदीप रोहतक मध्ये शिकला. तिथून महर्षी दयानंद युनिव्हर्सिटीतून त्यानं इंग्रजी साहित्यात एमए केलं. इथं त्याची भेट सुनील चिटकाराशी झाली ज्यांच्याकडून त्याला नाटकाची आवड लागली.
चिटकारा सांगतात, “जयदीपनं मला एकदा इडीपस नाटक करताना पाहिलं आणि म्हटलं की त्यालाही हे करायचं आहे. मी जेव्हा शंकर शेष नाटक बसवलं तेव्हा त्यात जयदीपनं काम केलं आणि उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला.” चिटकारा यांनीच त्याला एफटीआयआय मध्ये जाण्याचा सल्ला दिला व मदतही केली. जयदीपच्या वर्गमित्रांमध्ये इथं राजकुमार राव, विजय वर्मा, गौरव द्वीवेदी, सनी हिंदुजा, जतिन गोस्वामी, गौरव के. शर्मा, पितोबाश त्रिपाठीसारखे गुणवंत कलाकारही होते.
मुलाखतीच्या वेळी विद्यार्थ्यांना एखादा प्रसंग दिला जायचा व त्यावर कथा रचून सादरीकरण करायला सांगितलं जायचं. जयदीपने युद्धाची कथा रचली आणि सादर केली. त्यांचे शिक्षक पांडे सांगतात, “जयदीपने सर्वच गोष्टीत आपला ठसा उमटवला होता. त्याची अभिनयासाठी निवड झाली. जेव्हा मी त्याला शिकवायला सुरूवात केली तेव्हा समजलं की त्याला कधीतरी सैन्यात जायची इच्छा होती. त्याची शिस्त व अभिनय निष्ठा मला अधिकच भावली.”
सुरूवातीला जयदीपला इथं अडचणी आल्या. “वेगवेगळ्या संस्कृतितून आलेल्या लोकांसोबत एकत्र राहणं सुरूवातीला कठीण गेलं. मला जागतिक सिनेमाचीही फारशी समज नव्हती.” हळूहळू तो इथं रुळत गेला. “तुम्हाला शून्यापासून सुरूवात करायची आहे असं तुम्हाला वाटतं. तुम्हाला काही येत नाही. पण तुमच्या वर्गमित्रांनाही काही येत नाही. त्यामुळे सारे एक होतात आणि हा भावनात्मक बंध मजबूत होत जातो. तुम्ही ही कला शिकत असता तेव्हापासून एकमेकांना ओळखत असता. तुमचं खरं रुप सर्वांनी पाहिलेलं असतं. तुम्हीही त्यांना पाहिलेलं असतं. त्यामुळे तुम्ही एकमेकांना एक एफटीआयआय विद्यार्थी म्हणूनच ओळखता.” जयदीप आपल्या वर्गातील सर्वांत निष्ठावान विद्यार्थी होता. त्याने नेहमी योग्य आणि अचूक प्रश्न विचारले. एकदा त्याने मोहन राकेश यांच्या आधे-अधूरे नाटकातील एक प्रसंग सादर केला.
‘मजबूत एक्टर्स एसोसिएशन’
द्वीवेदी आणि जयदीप दोघेही पांडे यांच्याकडे जाऊन अभिनयावर दीर्घ चर्चा करायचे. पांडे सांगतात, “अभिनय समजण्याची त्यांची भूक प्रत्येक चर्चेत दिसायची. जयदीप शांत स्वभावाचा होता. अंतर्मूख, गहन विचारी, अभिनयात खोलवर उतरण्यासाठी उत्सुक. त्याचे प्रश्न व अभिनयाचं विश्लेषण नेहमीच गंभीर आणि सखोल असायचं.”
द्वीवेदी सांगतो, “एफटीआयआयच्या ज्ञानवृक्षाखाली बसून आम्ही अनेक गोष्टी शिकलो- परिणामांची चिंता न करता जगणं, दुसऱ्या संस्कृतिचा चित्रपट समजून घेणं, स्वतंत्र विचारांच्या मुलींसोबत राहणं.” जयदीप आपल्या मुळांना धरून राहिला. त्याने एफटीआयआय मधील आपल्या एका मैत्रिणीशी, ज्योतिशी लग्न केलं. तो आजही मुंबईत बांगुर नगर मधील जुन्या फ्लॅटमध्येच राहतोय. ज्योतिने अभिनय सोडून नृत्य आणि मुव्हमेंट थेरपी शिकवण्याचा निर्णय घेतला.
त्याचे वर्गमित्र आणि अभिनय-प्रशिक्षक प्रभात रघुनंदन सांगतात, “आम्ही एकदा कोणाच्या तरी घरी पार्टी करत होतो आणि जिम जाण्याची किंवा ग्रुमिंग करण्याची चर्चा सुरू होती. तेव्हा कोणीतरी गमतीनं म्हटलं की आम्हाला याची गरज नाही. आम्ही सशक्त कलाकार आहोत. मग आम्ही ‘मजबूत एक्टर्स एसोसिएशन’ नावाचा व्हॉट्सएप ग्रुप तयार केला.” जयदीपसाठी हा ग्रुप विरंगुळ्याचा तसेच भावनिक आधाराचा विषय आहे.
मुंबईतील आपल्या संघर्षाविषयी जयदीप सांगतो, “हा प्रवास तुमची मानसिक स्थिती स्थिर ठेवण्यासाठी उपयोगी पडतो. काही गोष्टी गरजेच्या असतात आणि कराव्याच लागतात. तर काहींची गरज नसते. सर्वांनाच पळावं लागतं. यात चूक-बरोबर असं काही नाही. प्रत्येकाला आपल्या पद्धतीने आयुष्य जगायचं असतं. मी त्यांना समजू शकतो.” मुंबईत एफटीआयआय मधील एका मित्रासोबतच जयदीप एका फ्लॅटमध्ये राहू लागला.
तिथली गर्दी लवकरच वाढली. जयदीप सांगतो, एक वेळेस तर आम्ही सहा लोक वन आरके फ्लॅट मध्ये राहत होतो. पण ती काही वाईट किंवा दुःखाची गोष्ट नव्हती. आम्हाला थोडा त्रास व्हायचा कारण अनेकदा निट जेवायला मिळायचं नाही.” असं असूनही जयदीपने ऑडीशन्स देण्याची घाई केली नाही. एकाच दिवसात अनेक ऑडीशन देणं त्यानं टाळलं. त्याला कधी कोणी म्हटलं नाही की तो या इंडस्ट्रीसाठी योग्य नाही म्हणून. “मी एकही वाईट ऑडीशन दिली नाही आजवर,” तो गर्वानं सांगतो.
हाथी रामची भूमिका कशी साकारली?
जयदीपने हाथी रामची भूमिका करताना आपल्या शिक्षक असलेल्या वडिलांचे हाव-भाव उचलले. तो म्हणतो की जगात अशा लोकांची उणीव नाही की जे अदृश्य आहेत, ज्यांना ओळख नाही, ज्यांच्याकडे नेहमी दूर्लक्ष केलं जातं. हाथी राम मध्ये जयदीपचाही अंश आहे- संथ, संवेदनशील, लालसा नसलेला, कोणत्याही शर्यतीत न धावणारा. जयदीप म्हणतो की आपल्या अवतीभवती सारेच असामान्य लोक नसतात. “पण तेच आपले खरे नायक असतात. आपण त्यांचं कौतुक मात्र करत नाही. आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी ते सारं काही सोसत असतात.
सुदीप म्हणतो त्याप्रमाणे, हाथी राम तोच माणूस आहे, जे मला व्हायचं होतं. तो विशेष आहे कारण तो आमच्यापैकीच एक आहे.” यशामुळे जयदीपमध्ये फारसा बदल झालेला नाही. फक्त त्याचे कपडे थोडे स्टायलिश झाले आहेत आणि त्यांच्याकडे आता एक मर्सिडीज गाडी आहे. पण तो अजूनही चिकित्सकपणेच पटकथेची निवड करतो. तो सातत्यानं स्वतःला वेगळ्या रुपात मांडत असतो. जयदीपला माहिती आहे की त्याचं यश कशामुळे आहे. तो आता नेटफ्लिक्सवरील ज्वेल थिफ चित्रपटात सैफ अली खानच्या समोर आहे तसेच दी फॅमिली मॅनच्या तिसऱ्या मोसमात तो मनोज वाजपेयीसोबत काम करतोय.
इरफान खानच्या जाण्यामुळे दुःखात पडलेल्या हिंदी सिनेमाला जयदीप अहलावतच्या रुपात एक सांत्वन लाभलं आहे. हनी त्रेहन सांगते त्याप्रमाणे “जयदीपकडे एक खरेपणा आणि आत्मविकासाची क्षमता आहे जी इरफानमध्येही होती. तो जमिनीशी जोडलेला, सहज व सरळ स्वभावाचा आहे जसे इरफान साहेब होते. त्याला व्यापक प्रसिद्धी मिळणं आता फार दूर नाही.”
(सौजन्य - द प्रिंट)
अनुवाद - प्रतिक पुरी






