संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाच्या वेळी 106 हुतात्म्यांचा बळी घेणाऱ्या मोरारजी देसाई यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रात तमाशा कलेवर बंदी आणली होती. कालच सार्वत्रिक निवडणुकीचे कारण सांगून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तमाशावर बंदी घातली गेल्याची बातमी कानावर आली आहे. रात्रीच पश्चिम महाराष्ट्रातील सत्तरीच्या उंबरठ्यावरील एका तमाशा सम्राटाचा मला फोन आला. तो थोर कलावंत फोनवरंच ओक्साबोक्सी रडत मला सांगत होता, “ साहेब कोरोनाच्या नावाखाली तीन तीन सिझन फड बंद पडला. आता चैत्री जत्रांचा हंगाम आला आणि पुन्हा शासनाने तमाशाचा गळा दाबला. फडातले सारे कलावंत घेऊन आम्ही कलावंतांनी आमची मथुरा कोणत्या नदीच्या डोहात बुडवायची हो ?”

कोणतीही निवडणूक आली की, रस्तोरस्ते दारूचा महापूर वाहतो. तमाशासारख्या गोरगरिबांच्या, दलितांच्या लोककलेवर बंदी आणू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनी निवडणूक होईपर्यंत हिम्मत असेल तर संपूर्ण दारूबंदीची मोहीम यशस्वी करून दाखवावी. वर्षभर रोजगार हमीवर काम करणाऱ्या व चैत्राच्या मोसमात गावोगाव छोटे तमाशाचे फड उभे करून आपल्या पोटाची खळगी कशीबशी भरणाऱ्या महाराष्ट्रातील सुमारे दहा हजार लोककलावंतांनी जायचे कुठे, खायचे काय आणि जगायचे तरी कसे ?
महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना आणि प्रशासकांना मी रेठरे हरणाक्षेचे शाहीर पट्ठे बापूराव कुलकर्णी यांची आठवण करून देतो. दोन लाख लावण्या लिहिणाऱ्या या शाहीराने ब्रिटिशांच्या न्यायालयात आपल्या तमाशा कलेची कैफियत मोठ्या अभिमानाने पेश केली होती…
“श्रेष्ठ वर्ण मी ब्राह्मण असुनी
सोवळे ठेवले घालून घडी
मशाल धरली हाती तमाशाची
लाज लावली देशोधडी !”
महाराष्ट्राचे कर्तबगार माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई… ते कोल्हापुरात सर्किट हाऊसवर मुक्कामाला होते. तेथे त्यांना जोतिबाच्या जत्रेची कोणीतरी आठवण करून दिली. तेव्हा बाळासाहेबांनी रात्री जाऊन जोतिबाच्या डोंगरावर काळू बाळू तमाशा मंडळाचा “राजा हरिश्चंद्र” नावाचा अप्रतिम पौराणिक वग पाहिला होता. तेव्हा स्वतः तमाशाच्या मंचावर जाऊन त्यांनी सर्व कलावंतांना फेटे बांधून त्यांचा जाहीर सत्कार केला होता. आता योगायोगाची गोष्ट म्हणजे याच बाळासाहेबांचे नातू शंभूराजे देसाई हे महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत.

भारत-चीन युद्धानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी नेफा आघाडीवर जवानांच्या मनोरंजनासाठी काही कलावंतांना पाठवले होते. ज्यामध्ये आमच्या तमाशासम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर होत्या. तेव्हा विठाबाईंनी आपल्या धमाल नृत्त्याने वैजयंतीमालेचा सुद्धा दिमाख हिरावून घेतला होता.
शरद पवार साहेबांचे मूळ गाव म्हणजे बारामती नव्हे, तर सातारा जिल्ह्यातील नांदवळ. हे नांदवळ गावच तमाशाची एक पंढरी मानली जाते. आता तिथे नांदवळकर या लोककलावंताची चौथी पिढी तमाशा सादर करते आहे. महाराष्ट्रातील विशेषत: दलित व भटक्या समाजातील अशिक्षित, कमशिक्षित गरीब कलावंतानी महाराष्ट्राची ही अभिजात कला, पोटाला चिमटे देऊन पिढ्यानपिढ्या जपून ठेवली आहे. केवळ निवडणुकीच्या नावावर त्यांच्या पोटावर गंडांतर येत असेल तर चांगले नव्हे. संबंधितांची ही करनी आमच्या शेकडो हुतात्म्यांचा बळी घेणाऱ्या मोरारजी सारखीच भयंकर ठरणारी आहे.
महाराष्ट्रातील अनेक मोठे नेते बॉलिवूड मधील कलावंतांच्या मुलांची लग्न, वाढदिवस गाठण्यासाठी नेहमीच हेलिकॉप्टर व विमानाने पोहोचायची घाई करतात. पण आपण ज्या बहुजन समाजातून आलो. आपले वडील, आजोबा चुलतेमालते ज्या लोककलेवर पोसले. त्याच कलेला आज असे वैधव्य येणार असेल तर काय समजावे?
“बुडाली लोककलावंतांची मथुरा चिखलात… फिरती गर गर नेते आस्मानात “
आता दुर्दैवाने मराठी भाषा, लोककला व संस्कृतीचा कोणी त्राताच उरलेला नाही. कोरोना नंतर दारूची दुकाने सुरू करायला राजकर्त्यांनी किती प्रचंड घाई केली होती. पण सार्वजनिक वाचनालये मात्र त्यानंतर चार-पाच महिन्यांनी उघडली गेली. हीच या भूमीची शोकांतिका आहे. इतर वेळी या कलावंतांसाठी जनता व शासन काहीच करत नाही. निदान निवडणुकीच्या नावाखाली त्यांचा चैत्राचा हंगाम हिरावून घेऊ नये असे मला मनोमन वाटते. लोककलावंत फक्त दारूच्या कैफात जगतात असा अनेकांचा गैरसमज असतो. नृत्य, नाट्य आणि संगीत ही पिढ्यान पिढ्यांची एक आराधना असते. महाराष्ट्रातील अनेक तमाशा कलावंतांच्या रामायण आणि महाभारतासह 18 पुराणे तोंडपाठ आहेत. तसेच दत्त संप्रदायाची सुद्धा परंपरा त्यांच्या पाठीशी आहे. पाचसहा वर्षांपूर्वी दक्षिणेतील जगप्रसिद्ध संगीतकार इलाई राजा महाराष्ट्रात आले होते. त्यांनी दत्तांच्या अनेक शक्तीपीठांना भेटी दिल्या होत्या. ते सारे अध्यात्म, तंत्रमंत्र, शास्त्र यांचा अतिशय सखोल अभ्यास या कलावंतांच्या हाडामांसात भिनलेला असतो. म्हणून तर उपाशी पोटाने ते पिढ्यानपिढ्या आपली कला जागवत असतात.

पूर्वीच्या काळी गावामध्ये ह्या गरीब कलावंतांच्या फडासाठी गावंदरीची, म्हणजेच हागणदारी जवळची जागा मिळायची. त्यामुळे आपल्या सादरीकरणात कोणाही गुढशक्तीचा, भूताखेतांचा तंत्र मंत्राचा, त्रस्त पापीबुद्धीचा कसलाही परिणाम होऊ नये म्हणून खास गण गाईले जायचे. पठ्ठे बापूरावांनी रचलेल्या एका गणातील शब्द पुढील प्रमाणे आहेत…
“आग्या वेताळ, खंकाळ मंकाळ
डंकीनी किंकिनी विक्राळ
प्रेतखाना पूजला
तिथे लाखो मुडदा निजला
या मसणखाईवरती
कैकांची हाडे करकरती
कोणी पिशाच्च होऊन फिरती कोणी नरकी चारा चरती
पहा कवीमंत्र झटका
कवी सुचवी अमृतघटका
म्हणे पठ्ठे बापूराव तयांचा
झाडूनिया काढू नीर नीर”
आपले राजकीय अस्तित्व टिकावे म्हणून सर्वच पक्षांचे राज्यकर्ते आकाश आणि पाताळ एक करतात. कोणी हेलिकॉप्टरने हिमालयात जाऊन जडीबुटी घेऊन येतो. कोणी मध्य प्रदेशात जाऊन मिरची हवनाची आग अंगावर घेऊन सिद्धी प्राप्त करतो. तर काहीजण एखाद्या डोंगरावर जाऊन नवसाचे दगड उचलून फलिते प्राप्त करून घेतात. तर कोणी दक्षिणेत रामेश्वरला सलग पाच पौर्णिमेला जाऊन चांदण्या रात्री फलप्राप्तीसाठी समुद्र स्नानाची पर्वणी साधतात. आणि हे आमचे लोककलावंत बिचारे गावातल्या लोकांनी वाढलेली शिळी भाकरी आणि चटणी खाऊन बहुजन समाजापुढे इंद्राचा दरबार उभा करतात.
त्यांना जगायचं अधिकार नाही का?
वर्षभर रोजगार हमीच्या कामावर लोखंड पहारी चालवून जे आपल्या जखमी बोटानी दोन्ही वेळची भाकर कमावतात. त्याच कलावंतांची तीच बोटे चैत्राच्या महिन्यात झाडाखालच्या तमाशात हलगी, कडे आणि मंजिरी वाजवतात. तमाशाचे छोटे छोटे फड उभे करून कसेबसे जगतात. त्याच गरीब कलावंतांच्या जगण्याचे साधन कोणी सत्तेच्या आणि अधिकाराच्या बळावर हिरावून घेत असेल. तर त्या कलावंतांचे शाप आणि तळतळाट संबंधितांना बाधल्याशिवाय राहणार नाहीत. निवडणुकीच्या निकालपत्रावेळी त्याची प्रचिती अनेकांना येईलच. पण यानंतर सुद्धा दहा वर्षांनी संबंधितांनी आपल्या गत दशकाच्या प्रवासाचे सिंहावलोकन जरूर करावे.

संबंधितांना व त्यांच्या पुढच्या पिढ्यानाही या कलावंतांचे आणि त्यांच्या उपाशी पोटांचे शाप नडल्याशिवाय राहणार नाहीत. पठ्ठे बापूराव यानी लिहिलेल्या वरील स्मशानातील गणामागचा भावार्थ नीट समजून घ्या.
जगाच्या इतिहासात जिथे जिथे कलावंत आणि त्यांची कला सत्तेच्या मग्रूरबाज वरवंट्याखाली दाबली जाते. तिथे तिथे गरीब कलावंतांचा तळतळाट आणि हाय मानगुटीवर बसल्याशिवाय राहत नाही.
शाहू महाराज, डॉक्टर आंबेडकर, अण्णाभाऊ, अमर शेख, आचार्य अत्रे यांच्या महाराष्ट्रात मायमराठीच्या गळ्यातील “तमाशा कला” नावाचा रत्नालंकार बेमुर्वतपणे काढून घेतला जातो आहे. लोककलेच्या द्रोपदीला विवस्त्र केले जात आहे. आणि मराठी साहित्यिकांसह सर्वजण भ्याड पांडवांसारखे खाली माना घालून बसले आहेत, यासारखे दुर्दैव ते कोणते?
(लेखक मराठी साहित्य विश्वातील एक प्रथितयश कादंबरीकार आहेत.)






