अप्सरा आगा
- नाथपंथी डवरी गोसावी समाज महाराष्ट्रातील भटक्या-विमुक्त नाथपंथी समुदाय आहे; बहुतेक लोक रोजीरोटीसाठी सतत भटकतात, स्थिर घर नाही.
- हवामान बदलामुळे उन्हाळ्यात उष्णतेचा फटका, पावसाळ्यात अतिवृष्टी-दुष्काळ, हिवाळ्यात थंडी व अनियमित पाऊस यामुळे जीवनमान अत्यंत कठीण झाले आहे.
- महिलांवर घर सांभाळणे, मुलं सांभाळणे, पाणी व अन्न मिळवणे याचे दुहेरी ओझं आहे; आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.
- पूर्वी ठराविक मार्ग आणि ऋतू होते; आता पूर, दुष्काळ आणि उष्णतेमुळे भटकंती धोकादायक झाली आहे, मुलांचं शिक्षण तुटतंय.
- हवामान बदल हा केवळ पर्यावरणाचा नाही, तर या समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे; स्थिर निवास, सुरक्षित उपजीविका व संरक्षण देणे अत्यावश्यक आहे.
हातात डमरू, खांद्यावर मोठी झोळी, कपाळावर भस्म अन् ‘अलख निरजन’चा जयघोष… पिढ्यान्पिढ्या भटकंती करत भिक्षा मागणारा हा समाज म्हणजे नाथपंथी डवरी गोसावी समाज. जगण्यातली शेवटची लाचारी म्हणजे भिक मागणे. ही लाचारी एका आर्थिक-सामाजिक समाजव्यवस्थेच्या विपन्नावस्थेतून येत असते. जगण्याच्या भौतिक साधनाच्या अभावातून असे भिक्षेकरी जीवन स्वीकारण्यात येत असते, स्कीलच्या नाकारलेपणातून येत असते, एखाद्या समाज गटावर दाखवलेल्या अविश्वासातून येत असते. भटक्या प्रवर्गात मोडणारा डवरी गोसावी हा याच सामाजिक व्यवस्थेचा बळी ठरलाय.
नाथपंथी डवरी गोसावी ही एक ऐतिहासिक भटकी जमात. राज्यात या समाजाची अंदाजे लोकसंख्या किमान चार-पाच लाख. या पैकी निम्मे लोक भिक्षेवरच जगतात. भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन भिक्षा मागूनच आपला उदरनिर्वाह करतात. नवरा-बायको, लहान मुलं, आई-वडील, इतर नातेवाईक एकंदरीतच जवळपास सगळेच. देवांच्या मूर्तीचा छोटा रथ बनवितात व त्यावर भिक्षा मागतात. कधी कधी काळूबाई, दुर्गामाता, साईबाबा, स्वामी समर्थ यांची पालखी करून त्यावर भिक्षा मागतात. पाच-सहा पाय गाई, तीन शिंगे, तीन डोळे, दोन जननेंद्रिय, असलेली जनावरे घेऊन त्यावर भिक्षा मागतात, सर्व प्रवास पायीच. दिवसाला दहा-पंधरा ते वीस-पंचवीस मैलाचे अंतर चालून रस्त्यातील वाड्या-वस्त्या व शहरे आढळल्यास तेथे या साधनाचा वापर करून भिक्षा मागतात. उष्णतेची लाट, मुसळधार पाऊस, पूर, दुष्काळ अशा कोणत्याही आपत्तीला न जुमानता यांचं हे जगणं असचं सुरू आहे पिढ्यानपिढ्या…
भटक्या समाजाचा या सगळ्या वातावरण बदलाशी अत्यंत जवळचा संबंध येत असतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे, हवामान बदलाच्या चिंताजनक परिस्थितीमुळे शोषित-वंचित घटकांवर विशेषत: महिलांवर गंभीर परिणाम कसा होतोय या यावर जगभरातून संशोधन सुरू आहे, COP सारख्या आंतरराष्ट्रीय हवामान परिषदेत यावर अनेक अभ्यासक संशोधनात्मक अहवाल प्रसिद्ध करत आहेत. मात्र या सगळ्या अजेंड्यामध्ये अगोदरच गावकुसाबाहेर असलेला भटका विमुक्त समाज कुठेच दिसत नाही. आज कित्येक वर्षे उलटून गेली. मात्र, भटक्या समाजाकडे पाहिल्यास आजही परिस्थितीशरण, पराभूत मानसिकता आणि गतानुगतिकता यात हा समाज अडकून पडलाय, असे दिसून येते. कुठेच हक्काची जमीन नसलेल्या, पाठीवर बि-हाड घेऊन गावोगाव भटकणाऱ्या या समाजाची जगण्याची फरपट अजूनही थांबलेली नाही. समाजाचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन, राजकीय उपेक्षा, पोलिसांचा अतोनात जाच आणि याचबरोबर जात-पंचायतींसारख्या रूढी-परंपरा यांच्या कोंडीत हा समाज गेल्या कित्येक वर्षांपासून अजूनही भरडलाच जातोय, त्यातच आता नैसर्गिक आपत्तीच्या संकटाची भर पडली आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील माण नदीच्या काठावर वसलेलं बामणी हे छोटंसं गाव. हे गाव सांगोल्यापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. बामणी गावाच्या वेशीवर उभं राहिलं की, वस्तीपेक्षा आधी माणसांच्या चेहऱ्यावरचं जगणं दिसतं. डवरी गोसावी, नाथपंथी भिक्षेकरी समाजाच्या या वस्तीत वयस्कर माणसं, महिला, लहान मुलं सगळ्यांच्या डोळ्यांत एकच प्रश्न आहे, उद्या कसं होणार? हवामान बदल हा शब्द त्यांना माहिती नसला, तरी त्याचे परिणाम मात्र त्यांच्या रोजच्या श्वासात उतरलेले आहेत. हवामान बदलामुळे त्यांच्या आयुष्याची सगळी गणितं विस्कळीत झाली आहेत.
गावात पाऊल टाकताच समोर येतात, डवरी गोसावी समाजातील छोटी छोटी विखूरलेली घरं, कच्चे रस्ते, रस्त्याच्या कडेला ऊस, झाडी आणि तीस-पस्तीस घरांची एक विस्मरणात गेलेली वस्ती. कोणी आजही तेथे राहण्यासाठी छोटी छोटी घरे बांधताना दिसतात. तेथे एक कुटुंब तर तात्पुरतं गावातील व्यायाम शाळेत राहत असल्याचं दिसलं. दरवाजाच्या बाहेरच्या बाजूलाच चूल, दरवाज्यासमोर खेळत असलेली त्यांची छोटी मुलं, बाहेरच साडीने बांधलेला झोपाळा, त्यात असलेलं एक सहा महिन्याचं बाळ अन् त्या बाळाला झोका देत देत, डोक्याला हात लावून बसलेली ती माऊली. समोरच भिक्षा मागण्यासाठी तयार केलेली चार चाकी गाडी. तेथेच वरून पडलेलं कडक उन्ह, सुटलेलं वारं, पसरलेली धूळ अशा स्थितीत त्या माऊलीच्या चेहऱ्यावर भविष्याची चिंता स्पष्ट जाणवली.
बामणी गावातील लोकांशी बोलताना समजलं की, हवामान बदलाचा प्रभाव या समाजावर खूप भयानक आहे. पूर्वी पाऊस वेळेवर पडायचा. जून-जुलैमध्ये शेतं हिरवीगार व्हायची. लोकांकडे धान्य असायचं, ते देत असत. पण आता पाऊस अनियमित झाला आहे. कधी खूप पाऊस, कधी अजिबात नाही. दुष्काळ पडतो. गावातील लोक स्वतः उपाशी राहतात, मग आम्हाला काय देतील? अनियमित पावसामुळे रस्ते खराब होतात. पूर येतात. अतिउष्णतेमुळे लांब अंतर चालणं अशक्य होतं. उन्हाळ्यात चालताना थकवा येतो, पाणी मिळत नाही. शरीर तापतं, डोकं दुखतं. कधी कधी दिवसभर फिरूनही काही मिळत नाही. दुष्काळात चारा कमी होतो. जनावरं मरतात किंवा विकावी लागतात. जे कुटुंब जनावरं घेऊन फिरायचे, त्यांच्याकडे आता काहीच उरलं नाही. पाण्याची टंचाई सगळीकडे. गावात पाणी शोधणं, मुलांना घेऊन फिरणं, हे सगळं कठीण झालं आहे. महिलांवर तर याचा जास्त भार पडतो. घर सांभाळणं, मुलं सांभाळणं, पाणी आणणं, अन्न शोधणं सगळं त्यांच्यावर. मुलं उपाशी राहतात. शिक्षण घेण्याची संधीच मिळत नाही. कारण भटकणं अनियमित झालं आहे. कधी लवकर निघावं लागतं, कधी थांबावं लागतं.
हवामान बदल आणि भटक्या समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न
महिलांच्या आरोग्यावरही याचा मोठा परिणाम झाला आहे. उष्णतेमुळे अशक्तपणा, पावसामुळे संसर्ग, पाण्याअभावी आजार वाढले आहेत. आरोग्य सुविधा नाहीत. हवामान बदलामुळे आजार वाढतात, पण उपचार मिळत नाहीत. हवामान बदल हा केवळ पर्यावरणाचा प्रश्न नाही, तर या भटक्या समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यांच्या संस्कृती, कला, जीवनपद्धती सगळ्यांवर त्याचा घाव बसतो आहे. वस्ती सोडताना त्या समाजातील एक वृद्ध म्हणतो, “जर असंच चालू राहिलं, तर आमचं भटकणं थांबेल. पण थांबायला जागा नसेल, तर आम्ही कुठं जाऊ?” हा प्रश्न अजूनही हवेतच आहे.
या समाजाने लोककलेचं जतन केलं आहे. त्यांची सोंगं, गाणी, वाद्यं...हे सगळं लोप पावत चाललेल्या लोककलेचे भाग आहेत. पण शहरं वाढलीत. लोकांकडे मनोरंजनाची साधनं वाढलीत. टीव्ही, मोबाइल, इंटरनेट यामुळे त्यांची कला पाहण्यासाठी वेळच उरत नाही. शहरात गेटच्या आत परवानगी नसते. त्यामुळे ते खेडोपाडी, शहरातील वस्त्यांमध्ये जातात. पण तिथेही दुष्काळामुळे लोकांची स्थिती बिकट असते. भिक्षा मिळणं कठीण होऊन होतं.

पूर्वी पावसाळा सुरू होण्यापूर्वी किंवा एखाद्या धार्मिक जत्रेच्या काळात त्यांची ठरलेली स्थलांतराची चक्रे असत. ठराविक मार्ग, ठराविक गावं, तिथली परिचित घरं जिथे त्यांना भिक्षा, धान्य, कपडे, कधी थोडे पैसे मिळत. पण आता गावांतील लोक स्वतःच पिकांचं नुकसान, उत्पन्न घट, पाणीटंचाई या समस्यांनी त्रस्त असल्याने भिक्षेची पद्धतही कमी होत चालली आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे जत्रा, उत्सव, धार्मिक कार्यक्रमांची वेळ बदलते किंवा तेच रद्द होतात. म्हणजेच हवामानातील बदल त्यांच्या पारंपरिक उपजीविकेच्या चक्रात थेट अडथळा निर्माण करतात.
एक शेतकरी म्हणाला, ‘पूर्वी हातातलं धान्य देत होतो, आता आमचंच घर रिकामं आहे. पाऊस नाही, पीक नाही, मग द्यायचं काय? एका वृद्ध महिलेनं सांगितलं, या लोकांना पाहून वाईट वाटतं. बायकांची लेकरं उन्हातान्हात फिरतात. सरकारनं यांना थांबायला जागा द्यायला हवी. तर एका तरुणीचं म्हणणं होतं, भीती वाटते अफवांमुळे. पण सगळे वाईट नसतात. मुलं मात्र कुतूहलानं पाहतात, डमरू, गाणी आवडतात.. पण ते कायम का फिरतात?’ अशा प्रश्नांतून त्यांच्या वेदना उमटतात.
आमच्यावर दुहेरी ओझं - लक्ष्मी इंगोले
जवळच तिथं इंगोले कुटुंब राहतंय. जनन्नाथ इंगोले आणि त्यांची पत्नी लक्ष्मी, त्यांचा मुलगा नारायण, तसेच त्यांच्या घरातील इतर लोक हे एकत्र आपलं लहानसं कुटुंब सांभाळत आहेत. लक्ष्मी इंगोले (वय वर्ष 50) लहान नातवांना जवळ घेत सांगतात, 'आमच्यावर दुहेरी ओझं आहे. भिक्षा मागणं, पाणी आणणं, मुलं सांभाळणं सगळं आम्हालाच. पाऊस आला तर झोपडी गळते. ऊन पडलं तर मुलं तापाने फणफणतात. मीही काही काम शोधतोय, पण कुठेही संधी नाही. भिक्षा मागायला बाहेर पडतो, पण उन्हात, पावसात सगळं कठीण झालंय. मग हात पुढे करावा लागतो, हेच आपलं भाग्य. दुष्काळाच्या काळात गावागावात पाणी मिळत नाही. लांब चालावं लागतं. कधी कधी लोक ओरडतात, 'इथं येऊ नका’. आम्ही कुठं जावं?'
लक्ष्मी इंगोले आणि सावित्री ताई
बामणी गावातीलच सावित्राताई सांगतात,
'आम्हाला गावात कामधंदा नाही, त्यामुळं लहान लेकरांना घेऊन भिक्षा मागून जगतो. भिक्षा मागायला उत्तर प्रदेश, राजस्थानपर्यंत जातो. राजस्थानमध्ये भिक्षा मागायला गेलो. तिथे सगळं वाळवंट आहे. वरती कडक उन्हाच्या झळा लागत होत्या. अंगाला चटके लागत होते. याच्या अगोदर पण १०-१२ वर्षांपूर्वी गेलो होतो, पण इतकं उन्ह नव्हतं. पण यावेळी उन्हाचा खूप त्रास झाला. पायात चप्पल नव्हती. चालताना पायाला फोड आले. दुसऱ्या दिवशी चालताही येत नव्हतं. अक्षरशः पाय लालभडक झाला. त्रास होत होता, पण भिक्षा मागण्याशिवाय पर्याय नव्हता. मग आम्ही झाडाची पानं तोडून पायाला बांधली आणि त्या उन्हातून भिक्षा मागायला गेलो.'
डवरी गोसावी समाजातील तरुणींना भविष्याची भीती सतावते. अश्विनी भोसले सांगते, “आम्ही कुठं थांबायचं? जमीन नाही, घर नाही. हवामान असंच बदलत राहिलं तर भिक्षा मागूनही पोट भरणार नाही.” तिच्या शब्दांतून हवामान बदल आणि उपजीविकेचं संकट स्पष्ट दिसतं. पूर्वी ठराविक मार्ग, ठराविक ऋतू होते. आता पूर, दुष्काळ, उष्णतेमुळे ते मार्ग बंद झाले आहेत. रस्ते खराब झाले आहेत. चालणं धोकादायक झालं आहे. याचा परिणाम वृद्धांवर आणि लहान मुलांवरही जास्त होतो.
पुण्यासारख्या शहरात उघड्यावरच रात्र काढावी लागते
पुण्यातील डवरी गोसावी समाजातील बहुतेक कुटुंबांकडे आजही कायमचं घर नाही. त्यामुळे हे लोक वर्षभर एका ठिकाणी थांबत नाहीत. सकाळी लवकर किंवा सण-वार, मंगळवार, गुरुवार अशा दिवशी भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडतात. कधी शहरात, कधी उपनगरात तर कधी गावोगावी फिरतात. पावसाळ्यात कुठे आडोसा मिळेल तिथे, उघड्यावरच रात्र काढावी लागते. पुणे-सोलापूर रस्त्यालगतचे परिसर, हडपसर, मुंढवा, वानवडी, कोंढवा, येरवडा, धानोरी, तसेच आळंदी रस्ता, वाघोली आणि लोहगाव परिसरात काही काळासाठी त्यांचा मुक्काम असतो. रेल्वे लाईनजवळ, मोकळ्या सरकारी जागा, नदीकाठ, उड्डाणपुलाखाली किंवा बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी राहतात.
वृद्ध महिला पारूबाई गोसावी सांगतात,
'भिक्षा मागणं हेच पोट भरण्याचं साधन राहिलं आहे. पण मिळणारी भिक्षा अपुरी पडते. कुटुंब मोठं असतं, लहान मुलं, वृद्ध माणसं, आजारी लोक सगळ्यांचा खर्च भागवणं अवघड होतं. रोज किती मिळेल याची खात्री नसते. सतत चालणं, उन्हात-पावसात फिरणं याचा आरोग्यावर मोठा परिणाम होतो. पाय दुखणं, अंगदुखी, ताप, सर्दी, त्वचेचे आजार कायमचे झालेत. उपचारासाठी पैसे नसतात, सरकारी दवाखान्यापर्यंत पोहोचणंही कठीण जातं. घर असतं, एक जागा असती, तर भटकंती थांबली असती,' अशी त्यांची सल सतत बोलण्यातून व्यक्त होते. पैशांची कमतरता, अस्थिर आयुष्य आणि समाजाकडून मिळणारी उपेक्षा यातच डवरी गोसावी समाजातील अनेक कुटुंबं पुण्यात दिवस काढत आहेत.
हवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम महिलांवरच का होतो?
स्थलांतराच्या वेळी घर, मुलं, जनावरं, अन्न-पाण्याची जबाबदारी मुख्यतः महिलांवर असते. उन्हाळ्यात तापमान ४० अंशांच्या पुढे गेल्यावर उघड्या आभाळाखाली किंवा तात्पुरत्या तंबूत राहणं म्हणजे आरोग्याचा मोठा धोका. उष्माघात, पाण्याअभावी होणारे आजार, मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेच्या सुविधा नसणे या सगळ्या समस्या अधिक तीव्र होतात. पाणी मिळवण्यासाठी महिलांना अधिक लांब चालावं लागतं; त्यामुळे स्थलांतराचा मार्गही वाढतो. काही ठिकाणी पाणवठे कोरडे पडल्याने त्यांना नवीन मार्ग शोधावे लागतात, जे अपरिचित आणि कधी धोकादायकही ठरतात.
हवामान बदल म्हणजे नेमके काय, तो कसा होतो, हवामान बदलाची आताची स्थिती काय, त्याचा या समाजातील लोकांवर काय परिणाम होतो, याकडे बघितलं तर समजतं की, 2024-25 च्या आंतरराष्ट्रीय आयपीसीसी (Intergovernmental Panel on Climate Change) आणि भारतीय हवामान खात्याच्या अहवालांनुसार, हवामान बदलाचे मुख्य कारण मानवी क्रियाकलाप आहेत. कोळसा, पेट्रोल-डिझेलसारख्या जीवाश्म इंधनाच्या मोठ्या वापरामुळे कार्बन डायऑक्साइड व इतर हरितगृह वायूंचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे पृथ्वीचे सरासरी तापमान झपाट्याने वाढत आहे. जंगलतोड, वेगाने वाढणारे शहरीकरण आणि औद्योगिकीकरण यामुळे हा परिणाम अधिक तीव्र झाला आहे. याचा परिणाम म्हणून तापमानवाढ, अनियमित आणि अतिवृष्टी, उष्णतेच्या लाटा, पूर-दुष्काळ यांसारख्या टोकाच्या हवामान घटनांमध्ये वाढ होत आहे. आयपीसीसीच्या अहवालानुसार, तातडीने उपाय न केल्यास याचे परिणाम शेती, पाणीपुरवठा, आरोग्य आणि अर्थव्यवस्थेवर गंभीर स्वरूपाचे ठरतील.

आयएमडीच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात तीनही ऋतूंमध्ये अनियमितता वाढली आहे. उन्हाळ्यात (मार्च-मे) तापमान सरासरी 1 ते 1.2 अंश सेल्सियस वाढले, ज्यामुळे उष्णतेची लाट वारंवार जाणवली. पावसाळी (जून-सेप्टेंबर) हंगामात पाऊस अनियमित झाला. काही भागांत अतिवृष्टी तर काही भागांत दुष्काळाचा सामना करावा लागला. हिवाळ्यात (नोव्हेंबर-फेब्रुवारी) थंडी कमी झाली, ठिकठिकाणी कडक थंडी कमी जाणवली. अशा बदलांमुळे कृषी उत्पादनात घट, जलस्रोत कमी होणे आणि जीवनशैलीवर नकारात्मक परिणाम झाला, ज्यामुळे समाजातील दुर्बल गटांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
- उष्णतेमुळे वाढलेले धोके : उन्हाळ्यात (मार्च ते मे) महाराष्ट्रातील तापमान सरासरी १–१.२ अंश सेल्सियस वाढले आहे. उष्णतेच्या तीव्र लाटांमुळे डवरी गोसावी समाजातील लोकांचं जीवन खूप कठीण होतं. अनेकांना स्थिर घर नसल्यामुळं उघड्यावर किंवा तात्पुरत्या ठिकाणी राहावं लागतं. भिक्षा मागणं किंवा रोजीरोटी मिळवणं जास्त उष्णतेमुळे कठीण होतं. शरीरातील पाणी कमी होतं, डिहायड्रेशन, चक्कर येणे, अशक्तपणा, उष्माघाताचा धोका वाढतो. उत्पन्न कमी झाल्यामुळे अन्नाची टंचाई आणि कुपोषण वाढते, तर स्वच्छ पिण्याचे पाणी सहज उपलब्ध नसल्यामुळे उलटी, जुलाब, त्वचारोग आणि ताप यांसारखे आजार होतात. लहान मुलं, वृद्ध आणि गर्भवती महिलांसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक असते.
- अतिवृष्टी व दुष्काळाचे फटके : पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) पाऊस अनियमित पडतो. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळाचा सामना करावा लागतो. या बदलामुळे जलस्रोत कमी होतात, शेतकरी आणि भटकंती करणाऱ्या समाजाला रोजीरोटी मिळवणं कठीण होतं. पावसाळ्यात तात्पुरते निवासस्थान नसल्यामुळे लोकांना उघड्यावरच राहावं लागतं, ज्यामुळे पाणी व आर्द्रतेमुळे संसर्गजन्य आजार वाढतात. पूर किंवा अतिवृष्टीमुळे रस्ते, पूल बुडतात आणि स्थलांतर आणखी कठीण होते.
- थंडी अन् आरोग्याचा धोका : हिवाळ्यात (नोव्हेंबर ते फेब्रुवारी) सामान्यतः थंडी कमी जाणवते, तरीही काही ठिकाणी अचानक पाऊस पडतो. घर नसलेल्या आणि भटकंती करणाऱ्या लोकांसाठी ही थंडी अधिक त्रासदायक ठरते. शरीराच्या उष्णतेची कमतरता, संसर्गजन्य आजार, थरथरती, अंगदुखी आणि मानसिक ताण वाढतात. उष्णता कमी झाल्यामुळे खाण्या-पिण्याच्या साधनांची कमतरता, आहारातील घट, आणि सुरक्षित निवारा नसल्यामुळे जीवनमान प्रभावित होतं.
प्रा. नारायण भोसले हे स्वत: नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. भटक्या, डवरी गोसावी अशा भिक्षेकरी समाजातील कुटुंबातून जन्माला येऊन इतिहासाचा अभ्यासक आणि प्राध्यापक होईपर्यंतचा त्यांचा संघर्ष कमालीचा आहे. प्रा. भोसले, 'भटक्या आणि विमुक्त जातींचं सगळं आयुष्य गावं आणि शहरांवरच चाललेलं असतं. त्यांची कला असते, भारुड, भेदिक शायरी, नाच-गाणं, तमाशा, वेगवेगळे परफॉर्मन्स हे सगळं गावकऱ्यांनी दिलेल्या पैशावर किंवा दानावरच जगतं. पण आता वातावरण बदललंय. कधी दुष्काळ, कधी पाऊस नाही, कधी अतिवृष्टी, कधी उकाडा तर कधी पूर. यात गावकरीच अडचणीत सापडलेत. घरात खायला-प्यायलाच कमी पडलं, तर मनोरंजनासाठी पैसे कुठून येणार? त्यामुळे या भटक्यांना सादरीकरणाचा मोबदला मिळेनासा झालाय.
या समाजातले बरेच जण पशुपालनावर अवलंबून आहेत. पण चारा नाही, पाणी नाही, गुरं उपाशी राहतात. दूध कमी निघतं, उत्पन्न घटतं. याचा फटका थेट त्यांच्या रोजच्या व्यवहारांवर बसतो. आधी लोक जुने कपडे, जुनी भांडी देऊन त्यांच्याकडून नवी भांडी घ्यायचे. आता लोकांकडेच देण्यासाठी काही उरलेलं नाही. त्यामुळे हा व्यवहारही हळूहळू बंद पडतोय. वरून टीव्ही, मोबाईल, इंटरनेट आलं आणि लोक पारंपरिक कलेपासून दूर गेले. आधी रस्त्यावर तमाशा, भारुड पाहायला लोक थांबायचे; आता सगळं मोबाईलमध्येच मिळतं. पूर्वी राजे-महाराजे होते, ते कलाकारांना आधार द्यायचे.

अजिंठा-वेरूळच्या लेण्या चारशे वर्षं खोदल्या गेल्या, कलाकारांना पिढ्यान्-पिढ्या काम मिळायचं. आज तसं कुठेच दिसत नाही. पितळ-तांब्याच्या, जर्मन सिल्व्हरच्या, लोखंडाच्या हाताने बनवलेल्या मूर्ती-भांड्यांची मागणीही कमी झाली आहे. मशीनमधून स्वस्त, चकचकीत वस्तू बाजारात भराभर येतायत. त्यामुळे लोक पारंपरिक कारागिरांकडे फिरकत नाहीत. थोडक्यात सांगायचं तर वातावरण बदल, तंत्रज्ञान आणि माणसांच्या सवयी बदलल्यामुळे भटक्या-विमुक्त समाजाचं जगणंच अडचणीत आलंय. त्यांची कला, व्यवहार, पशुपालन, हस्तकला सगळंच हळूहळू धोक्यात येतंय, असेही प्रा. भोसले सांगतात.
निसर्ग बदलतो आहे, हंगामाची शिस्त मोडली, रस्ते अधिक धोकादायक झाले आणि जगणं दिवसेंदिवस असुरक्षित होत चाललं आहे. हवामान बदल हा आता केवळ पर्यावरणाचा प्रश्न राहिलेला नाही, तर तो डवरी गोसावी समाजासारख्या भटक्या-विमुक्त समुदायांच्या अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. भिक्षा कमी होतेय, पाणी-अन्न मिळणं कठीण झालंय, मुलांचं शिक्षण तुटतंय, महिलांचं आरोग्य धोक्यात येतंय आणि अफवा-संशयातून हिंसाचार वाढतोय. अशा परिस्थितीत, पिढ्यान्पिढ्या रस्त्यावर जगणाऱ्या या समाजाला स्थिर निवास, सुरक्षित उपजीविका, शिक्षण आणि संरक्षण देण्यासाठी शासन, प्रशासन आणि समाज कधी पुढे येणार?
(Apsara Aga is a mentee at the Climate Change Media Hub of the Asian College of Journalism. The program is supported by Interlink Academy, Germany.)
(असर आणि बाईमाणूस यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘प्रोजेक्ट धरित्री’ उपक्रमांतर्गत ‘पर्यावरण बदल आणि लिंगभाव’ (Climate & Gender) या विषयावरची ही एक विशेष मालिका आहे.)






