संजना खंडारे
- महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाची आजपासून जन्मशताब्दी सुरू असताना त्याचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात घडलेल्या अशाच एका कटू प्रसंगाची कहाणी ‘बाईमाणूस’ने समोर आणली आहे.
- ही घटना आहे १९३४ सालाची आणि घटना घडली होती औरंगाबाद येथील दौलताबाद किल्ला परिसरात…
- पाण्यावरून मुस्लिमांनी आमच्यासोबत कसा भेदभाव केला याची ही कहाणी स्वत: बाबासाहेब आंबेडकरांनीच त्यांच्या 'वेटिंग फॉर व्हिसा' या पुस्तकामध्ये नमूद केली आहे.
- ज्या ठिकाणी बाबासाहेबांना हा अपमान सहन करावा लागला होता, तिथे आज काय स्थिती आहे, याचा ‘बाईमाणूस’ने घेतलेला हा आढावा…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं पाण्याशी काहीतरी गहिरं नातं असावं असं त्यांचा सबंध आयुष्याचा पट उलगडून पाहिल्यावर लक्षात येतं. पाणी आणि जगण्यामधल्या पायाभूत समतेची आणि करुणेची जाणीव यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर संघर्ष केला. बाबासाहेबांनी पाण्याला सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी अथक परिश्रम केले. महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहापासून ते भारताच्या जलनीतीचा पाया रचण्यापर्यंत आपल्याला बाबासाहेबांचं पाणीविषयक काम पाहता येतं.
‘’प्राथमिक शाळेमध्ये शिकताना अस्पृश्य मुलांना तहान लागली, तर शाळेतल्या पाण्याला स्पर्श करता येत नसे. शाळेतल्या शिपाईदादांनीच या मुलांसाठी पाणी द्यायचं अशी रूढी असल्यामुळे शिपाईदादा नसतील तर आम्हांला पाणी मिळत नसे…’’
अशी आठवण बाबासाहेबांनी लिहून ठेवली आहे.
पुढे 20 मार्च 1927 या दिवशी महाड चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह होत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोकांना उद्देशून म्हणाले,
"चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही. आजपावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो, तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जावयाचे ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरिता नाही. इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिताच त्या तळ्यावर आपल्याला जावयाचे आहे."
महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहामागची पार्श्वभूमी अशी होती की, भारतातील जातीव्यवस्थेने शोषण केलेल्या तसंच त्यावेळी सवर्णांकडून 'अस्पृश्य' मानल्या जाणाऱ्या दलित जातींना सरकारी आणि सार्वजनिक मालमत्तेवर समान हक्क देणारा कायदा 1923 साली मुंबई कायदे मंडळाने संमत केला. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महाड नगरपालिकेच्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सभा आयोजित करण्यात आली होती. सार्वजनिक ठिकाणं, पाणवठे आणि चवदार तळं अस्पृश्यांसाठी खुलं करण्यात यावं यासाठी झालेल्या सत्याग्रहात सवर्ण समाजातील नेते मंडळीही सहभागी झाली होती. या ऐतिहासिक सत्याग्रहात त्यादिवशी तीन हजारांहून अधिक लोक सहभागी झाल्याची सरकार दफ्तरी नोंद आहे.
(दौलताबाद किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची हीच ती जागा जिथे बाबासाहेबांना पाणी बाटवल्यामुळे अपमानित करण्यात आलं होतं.)
महाड सत्याग्रहानंतर बाबासाहेब आणखी एक पाऊल पुढे गेले. पाणी ही सर्वसजीवांची मूलभूत गरज आहे. हे पाणी सगळ्यांना न्याय्य पद्धतीनं मिळायला हवं या तत्त्वासाठीबाबासाहेबांनी चळवळीच्या माध्यमातून प्रयत्न केले. त्यासाठी वृत्तपत्रं, आकाशवाणी अशा विविध माध्यमांमधून लिहून, मुलाखती देऊन समाजाच्या मनाला दिशा दिली. कायदे बनवण्याच्या मार्गाचा अवलंब केला. न्यायालयात लढा दिला. आणि धोरण बनवताना सर्वांगीण अभ्यास करून भारतासारख्या नव्याने स्वतंत्र होत असलेल्या देशाच्या जलनीतीचा पाया रचला. म्हणजे सामाजिक चळवळ, संपर्कमाध्यमांचा प्रभावी वापर,राज्यकर्ता म्हणून उत्तम धोरण निर्माण करणं,समाजाच्या हिताचे कायदे बनवणं आणि ते अंमलात आले नाही तर न्यायालयाचा रस्ता धरणं अशा पाच वाटांनी बाबासाहेबांनी पाण्याला सर्वांपर्यंत पोचवण्याचे प्रयत्न केले.
दौलताबाद किल्ला परिसरात बाबासाहेबांसोबत काय झालं होतं…?
मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाण्यासाठीच्या या संघर्षयात्रेत एक अशी घटना घडली होती, ज्याबद्दल फारसं बोललं जात नाही किंवा त्याबद्दलची माहिती लोकांना नाही. महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाची आजपासून जन्मशताब्दी सुरू असताना त्यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात घडलेल्या अशाच एका कटू प्रसंगाची कहाणी ‘बाईमाणूस’ने समोर आणली आहे.
ही घटना आहे १९३४ सालाची, म्हणजे महाडचा सत्याग्रह उलटून गेल्यानंतर सात वर्षांनी. घटना घडली होती छ. संभाजी नगर येथील (पूर्वीचे औरंगाबाद) दौलताबाद किल्ला परिसरात…
’टीम बाईमाणूस’ आता याच परिसरात बाबासाहेबांच्या आयुष्यात घडलेल्या त्या घटनेचा शोध घ्यायला आली आहे.
रमजानचा महिना सुरू आहे. मार्चचा उन्हाळा जाणवायला लागलाय. सूर्य डोक्यावर आला असला तरीही दौलताबाद किल्ल्यात पर्यटकांची गर्दी काही कमी झालेली नाही. दौलताबाद किल्ला परिसरात फिरताना ‘टीम बाईमाणूस’ची नजर शोधत होती एका पाण्याच्या हौदाला…
स्वत: बाबासाहेब आंबेडकरांनीच त्यांच्या 'वेटिंग फॉर व्हिसा' या पुस्तकामध्ये दौलताबाद किल्ला परिसरातील या हौदाचा उल्लेख केल्यामुळे ‘तो हौद कुठे आहे’ याची तिथल्या परिसरातील अनेकांना विचारणा केली. मात्र कुणालाच त्याचे उत्तर ठाऊक नव्हते. याचे कारण म्हणजे तो पाण्याचा हौदच आता पूर्णपणे बुजवण्यात आला असून त्याजागी वाहनांची पार्किंग करण्यात आली आहे.
या परिसरातील अनेकांना इथे कधीकाळी हौद होता, हे माहीत नाही. गावातील काही वयोवृद्ध मात्र एक आठवण सांगतात की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इथे खुप वर्षांपूर्वी आले होते आणि त्यावेळी एक वाईट घटना घडली होती हे त्यांनी त्यांच्या वडीलधाऱ्यांकडून ऐकलं होतं.
याच जागेला तीन वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी भेट दिली होती हे मात्र इथला प्रत्येकजण सांगतो. बाबासाहेब दौलताबादला का आले होते, त्यांच्यासोबत काय घडलं हे मात्र कुणालाच ठाऊक नव्हतं…
(या सगळ्या प्रसंगाचा उल्लेख बाबासाहेबांनी त्यांच्या 'वेटिंग फॉर व्हिसा' या १९३५-३६ साली लिहिलेल्या आत्मचरित्रात्मक पुस्तकात केला आहे.)
'वेटिंग फॉर व्हिसा' पुस्तकात बाबासाहेबांनी ‘त्या’ घटनेचा उल्लेख केला आहे
घडलं असं होतं की, 1934 मध्ये बाबासाहेब दौलताबाद किल्ला पाहण्यासाठी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत आले होते आणि इथल्या पाण्याच्या हौदात हात-पाय धुतल्यामुळे त्यांना स्थानिक मुस्लिम लोकांच्या प्रखर विरोधाला सामोरे जावे लागले होते. या सगळ्या प्रसंगाचा उल्लेख बाबासाहेबांनी त्यांच्या 'वेटिंग फॉर व्हिसा' या १९३५-३६ साली लिहिलेल्या आत्मचरित्रात्मक पुस्तकात केला आहे. बाबासाहेब लिहितात,
"१९३४ साली, चळवळीतील माझ्या काही सहकाऱ्यांनी मीही त्यांच्यासोबत आलो तर प्रेक्षणीय स्थळे पाहण्याच्या सहलीवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. मी होकार दिला. आम्ही मुख्यत्वे वेरूळ येथील बौद्ध लेण्यांना भेट देण्याची योजना आखली. वेरूळला जाण्यासाठी आम्हाला औरंगाबादला जावे लागणार होते. औरंगाबाद हे हैदराबादच्या मुस्लिम राज्यातील निजामाच्या वर्चस्वात असलेले एक शहर आहे. औरंगाबादला जाताना आम्हाला सर्वप्रथम हैदराबाद राज्यात असलेल्या दौलताबाद नावाच्या आणखी एका गावातून जावे लागणार होते. दौलताबाद हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे आणि एकेकाळी रामदेव राय नावाच्या एका प्रसिद्ध हिंदू राजाची राजधानी होती. दौलताबादचा किल्ला हे एक प्राचीन ऐतिहासिक स्मारक आहे आणि त्या परिसरात जाणाऱ्या कोणत्याही पर्यटकाने त्याला भेट देण्याची संधी दौडू नये. त्यानुसार आमच्या पक्षाने किल्ल्याला भेट देण्याचे ठरवले होते.
आम्ही काही मोटार कार भाड्याने घेतल्या. आम्ही एकूण सुमारे ३० जण होतो. औरंगाबादला जात असताना मधे येवला लागते, त्यामुळे आम्ही नाशिकहून येवल्याला जाण्यासाठी निघालो. आमच्या दौऱ्याची मुद्दामच आम्ही घोषणा केली नव्हती. देशाच्या विविध भागांत अस्पृश्य पर्यटकाला ज्या अडचणी येतात त्या टाळण्यासाठी आम्हाला गुप्तप्रवास करायचा होता. आम्ही ज्या ज्या ठिकाणी थांबायचे ठरवले होते तिथल्या आमच्या कार्यकर्त्यांना पूर्वसूचना दिलेल्या होत्या. म्हणूनच वाटेत आम्ही निजाम राज्यातील अनेक गावांतून गेलो तरी आमचे लोक आम्हाला भेटायला आले नव्हते. दौलताबादमध्ये साहजिकच ते वेगळे होते. आम्ही येणार आहोत असे आमच्या लोकांना कळवण्यात आले होते, त्यामुळे ते आमची वाटच पाहत होते आणि गावाच्या वेशीजवळ जमले होते. त्यांनी आम्हाला खाली उतरायला सांगितले आणि आधी चहा आणि नाश्ता घ्या आणि मगच किल्ला पाहायला जा असे सांगितले. आम्ही त्यांचा प्रस्ताव मान्य केला नाही. आम्हाला तशी तर चहाची खूप गरज होती, पण संध्याकाळ होण्याआधी किल्ला पाहण्यासाठी आम्हाला पुरेसा वेळ हवा होता. म्हणून आम्ही किल्ल्याकडे निघालो आणि परत आल्यावर आम्ही चहा घेऊ असे आमच्या लोकांना सांगितले. त्यानुसार आम्ही आमच्या ड्रायव्हर्सना सूचना दिल्या आणि काही मिनिटांतच आम्ही किल्ल्याच्या गेटवर पोहोचलो.
तो रमजानचा महिना होता, मुसलमानांचा उपवासाचा महिना. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर पाण्याने काठोकाठ भरलेला एक छोटासा हौद होता. सर्वत्र दगडगोट्यांचाच परिसर होता. प्रवासादरम्यान आमचे चेहरे, शरीर आणि कपडे धुळीने माखले होते आणि म्हणून हाथ पाय व तोंड धुण्याची आमची इच्छा होती. फारसा विचार न करता पक्षाच्या काही सदस्यांनी हौदातून पाणी घेऊन रस्त्याच्या कडेला आपले चेहरे आणि पाय धुतले. यानंतर आम्ही किल्ल्याच्या प्रवेशद्वाराशी गेलो. आत सशस्त्र सैनिक होते. त्यांनी मोठे दरवाजे उघडले आणि आम्हाला कमानदरवाजातून आत घेतले. आम्ही नुकतीच सुरक्षारक्षकाकडे किल्ल्यावर जाण्याच्या परवानगीबद्दल विचारण्यास सुरुवात केली होती.
‘’धेडांनी पाण्याचा हौद बाटवला, त्यांना धडा शिकवा’’
दरम्यान, पांढऱ्या दाढीवाला एक वृद्ध मुसलमान पाठीमागून मोठ्याने ओरडत येत होता, "धेडांनी (म्हणजे पूर्वाश्रमीचे अस्पृश्य) पाण्याचा हौद बाटवला आहे." ताबडतोब जवळपास असलेले सर्व तरुण आणि वृद्ध मुसलमान त्याच्याबरोबर सामील झाले आणि सर्वांनी आम्हाला शिवीगाळ करायला सुरुवात केली.
"धेड उद्धट झाले आहेत…
धेड आपला धर्म विसरले आहेत (म्हणजे खालचा आणि क्षुद्र दर्जा असलेला).
धेडांना धडा शिकवला पाहिजे."

त्यांनी अत्यंत रौद्र रूप धारण केले होते. आम्ही त्यांना म्हणालो की आम्ही बाहेरचे आहोत आणि आम्हाला स्थानिक प्रथा माहीत नव्हती. मग गेटवर पोहोचलेल्या स्थानिक अस्पृश्यांवर ते आपला संताप व्यक्त करू लागले. "हा हौद अस्पृश्यांना वापरता येणार नाही हे तुम्ही या बाहेरच्यांना का सांगितले नाही?" हा प्रश्न ते त्यांना विचारत होते. बिच्च्यारे गरीब लोक ! आम्ही हौदावर गेलो तेव्हा तिथे आमचे हे लोक नव्हते. ती आमची चूक होती कारण आम्ही कोणतीही चौकशी न करता तसे वागलो. ही आपली चूक नसल्याची ते त्यांना सांगत होते. परंतु मुसलमान माझे स्पष्टीकरण ऐकायला तयार नव्हते. ते त्यांना आणि आम्हाला शिवीगाळ करत राहिले. हा अत्याचार इतका अश्लील होता की त्यामुळे आम्ही संतापून गेले होतो. वातावरण एवढे संतप्त झालेले होते की तेथे दंगल घडण्याची आणि कदाचित खून होण्याची शक्यता निर्माण झाली होती; परंतु आम्ही स्वतःला खूप रोखण्याचा प्रयत्न केला. आमचा दौरा असा अचानकपणे संपुष्टात येईल अशा फौजदारी खटल्यात सहभागी व्हायचे नव्हते.
अस्पृश्याने मुस्लिम धर्म स्वीकारला तर तुम्ही पाणी घेण्यापासून रोखाल का?"
गर्दीतला एक तरुण सतत म्हणत होता की प्रत्येकाने आपल्या धर्माप्रमाणे वागले पाहिजे, याचा अर्थ अस्पृश्यांनी सार्वजनिक हौदातून पाणी घेऊ नये. आता मात्र माझा संयम सुटला होता आणि त्याला रागाच्या भरात विचारले, “तुमचा धर्म हेच शिकवतो का? जर एखाद्या अस्पृश्याने मुस्लिम धर्म स्वीकारला तर तुम्ही या हौदातून पाणी घेण्यापासून रोखाल का?" या सरळ प्रश्नांचा त्या मुसलमान लोकांवर काहीसा सकारात्मक परिणाम होताना दिसत होता. त्यांनी काहीच उत्तर दिले नाही आणि ते गप्प उभे राहिले. सुरक्षारक्षकाकडे वळून मी पुन्हा रागाच्या भरात म्हणालो, "आम्ही किल्ल्यावर जाऊ शकतो की नाही? आम्हाला सांगा, जर नसेल जाऊ द्यायचे तर इथे थांबण्यात आम्हाला काही स्वारस्य नाही." सुरक्षारक्षकाने माझे नाव विचारले. मी ते एका कागदावर लिहून त्याच्याकडे दिले. तो आत अधीक्षकाकडे ते दाखवून बाहेर आला. आम्हाला सांगण्यात आले की आम्ही किल्ल्यावर जाऊ शकतो, परंतु आम्ही किल्लयावर कुठेही पाण्याला हात लावू शकत नाही आणि आम्ही आदेशाचे उल्लंघन केले नाही हे पाहण्यासाठी एका सशस्त्र सैनिकाला आमच्याबरोबर जाण्याचा आदेश देण्यात आला.
- (संदर्भ - 'वेटिंग फॉर अ व्हिसा' - लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर)
दौलताबादमध्ये जेव्हा बाबासाहेब आले होते तेव्हा लक्ष्मण रखमाजी गायकवाड हे त्यांना दौलताबाद गावातील राजवाड्यामध्ये (महारवाड्यात) घेऊन आले होते. त्यांचा मुलगा गिरीधर गायकवाड हे आज ८० वर्षांचे आहेत आणि त्यांना या घटनेबद्दल ठाऊक आहे. गिरीधर गायकवाड यांनी भारतीय पुरातत्व विभागात २४ वर्ष नोकरी केली आहे.
(गिरीधर गायकवाड यांना आजही ती घटना चांगली आठवते… (फोटो क्रेडिट - अविनाश गवळी))
‘बाईमाणूस’शी बोलताना गायकवाड यांनी सांगितलं की,
"त्यावेळी माझ्या वडिलांनी आम्हाला सांगितलं होतं, बाबासाहेब किल्ला बघायला येणार आहेत. त्यामुळे इथल्या महारवाड्यातले सगळेजण किल्ल्याजवळ गेलो होते. बाबासाहेब आणि त्यांचे सहकारी गाडीमधून उतरले आणि हौदाजवळ त्यांनी हातपाय धुतले. किल्ल्यावर महारवाड्यातले काहीजण चौकीदार म्हणून काम करायचे. बाबासाहेब किल्ला चढायला जाणार तेवढ्यातच मागून एक मुस्लिम व्यक्ती आला आणि त्याने हौदातून पाणी का काढले म्हणून शिवीगाळ करायला सुरवात केली. त्यानंतर तिथे वाद मिटला. बाबासाहेब किल्ला बघायला वर गेले. त्यानंतर बाबासाहेबांसोबत माझे वडील आणि गावातील काही लोक असतांना ‘तुम्ही लोक कुठे राहता’? असं बाबासाहेबांनी माझ्या वडिलांना विचारलं होतं. बाबासाहेब त्यानंतर राजवाड्यात आले. लिंबाच्या झडाखाली बसून लोकांना मार्गधर्स केलं. "
“मुस्लिम ऐसा कर ही नहीं सकते’’
या घटनेवर दौलताबादमध्ये काही स्थानिक मुस्लिमांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायचा ‘बाईमाणूस’ने प्रयत्न केला. काही जणांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त केला, तर काहींनी तर थेट नाकारलं. “हमें इस बात पर यकीन नहीं है,” असं एक जण म्हणाला. तर एकाने “मुस्लिम ऐसा कर ही नहीं सकते’’ असं खात्रीलायक सांगितलं. आणखी एकाने सांगितलं, “वो समय अलग था, आज ऐसा कुछ नहीं होता. अब सब लोग साथ में रहते हैं.”
(पाण्याचा तो हौद आता नामशेष झाला असून त्याजागी आता पार्किंगचा परिसर आहे. (फोटो क्रेडिट - अविनाश गवळी))
दरम्यान, दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी ‘भीमनगर’ नावाची एक वस्ती आजही अस्तित्वात आहे. या वस्तीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात आला असून, तो त्या इतिहासाची आठवण करून देतो. विशेष म्हणजे, या भागात आज सर्व जातिधर्माचे लोक एकत्र राहताना दिसतात. स्थानिकांच्या मते, पूर्वी जितका तीव्र भेदभाव होता, तसा आता जाणवत नाही. त्यामुळे बदलाची चिन्हं स्पष्ट दिसत असली, तरी त्या बदलामागचा इतिहास जपणं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणंही तितकंच आवश्यक आहे.
‘’तेव्हा मुस्लिम समाज सत्ताधारी वर्ग असल्यामुळे सामाजिक वर्चस्वाची भावना होती’’
दौलताबादमधील या प्रसंगात त्या काळातील मुस्लिम समाजाने अशी भूमिका का घेतली असावी या संदर्भात ‘बाईमाणूस’ने आंबेडकरी विचारांचे अभ्यासक, लेखक आणि अनुवादक प्रकाश शिरसाठ यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सांगितले,
"१९३४ साली औरंगाबाद परिसर हैद्राबाद संस्थान अर्थात निजामाच्या सत्तेखाली होता, जिथे मुस्लिम समाज सत्ताधारी वर्ग म्हणून ओळखला जात होता. सत्ताधारी असण्यामुळे सामाजिक वर्चस्वाची भावना तयार होणं हे त्या काळातील वास्तव होतं. अनेकांनी वेगवेगळ्या कारणांमुळे सामाजिक सुरक्षा, सत्तेशी जवळीक किंवा अन्य दबावांमुळे मुस्लिम धर्म स्वीकारला होता. मात्र धर्म बदलला तरी समाजातील खोलवर रुजलेली जातीय मानसिकता सहजपणे बदलली नव्हती. भारतीय समाजातील अस्पृश्यतेची कल्पना इतकी पक्की होती की ती केवळ एका धर्मापुरती मर्यादित राहिली नाही, तर वेगवेगळ्या समुदायांमध्येही तिचा प्रभाव दिसून येत होता. त्यामुळे उच्चवर्णीय हिंदू समाजात ज्या लोकांना अस्पृश्य मानलं जात होतं, त्यांच्याविषयीचा भेदभाव काही प्रमाणात मुस्लिम समाजातही प्रतिबिंबित होत होता. दौलताबादमधील हा प्रसंग त्यामुळे केवळ एका ठिकाणापुरता मर्यादित राहत नाही, तर तो त्या काळातील व्यापक सामाजिक रचनेचं आणि मानसिकतेचं प्रतीक म्हणून समोर येतो. जिथे सत्ता, धर्म आणि परंपरा यांचा एकत्रित परिणाम म्हणून भेदभावाची वागणूक दिसून येत होती."
(आंबेडकरी विचारांचे अभ्यासक, लेखक आणि अनुवादक प्रकाश शिरसाठ. (फोटो क्रेडिट - अविनाश गवळी))
स्मृती जतन करण्याची गरज: केद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची भूमिका
दरम्यान, 2023 मध्ये केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दौलताबाद किल्ल्याला भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित या ठिकाणाचं ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत, या स्मृती जतन करण्यासाठी आणि परिसराचा योग्य विकास करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, अशी भूमिका व्यक्त केली होती. स्थानिकांच्या मते, त्यांच्या या भेटीनंतरच अनेकांना बाबासाहेब या ठिकाणी आले होते, याची माहिती मिळाली; मात्र, या घटनेबाबतची सविस्तर माहिती आजही अनेकांपर्यंत पोहोचलेली नाही.






