गायत्री अविनाश सुतार
- भारताच्या विस्तीर्ण आध्यात्मिक परंपरेत जटा केवळ आध्यात्मिक बंधनाचे प्रतीक म्हणून ओळखल्या गेल्या, परंतु त्या पलीकडे काही विशिष्ट परिस्थितींमध्ये केसांत जटा निर्माण होतात. त्यामागची कारणे आजही आधुनिक विज्ञानासाठी गूढ आहेत, परंतु स्त्रियांच्या आरोग्याशी निगडित या समस्येचे स्वतंत्र अस्तित्व आहे.
- अंधश्रद्धा, चुकीने दृढमूल झालेला पारंपरिक विश्वास आणि धर्माधारित रूढी यांच्या प्रभावामुळे अनेक स्त्रिया स्वतःच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊनही जटा काढण्यास धजावत नाहीत. अशा स्थितीत त्यांना केवळ आधारच नव्हे, तर त्यांच्या जगण्याच्या लढाईला दिशा देणारा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मदतीचा हात आवश्यक असतो.
- ही कहाणी केवळ जटा निर्मूलनाची नाही, तर स्वतंत्र विचारसरणी, स्त्री-हक्कांची जागृती आणि विज्ञानाच्या मदतीने सामाजिक परिवर्तन घडवण्याच्या सामर्थ्याची आहे.
दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि सीमाभागातील काही गावांत आजही जटा हा शब्द अनेक महिलांसाठी श्रद्धायुक्त भीती घेऊन येतो. इथल्या सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवस्थेत केसांत न सुटणारा गुंता झाला की तो फक्त केसांचा प्रश्न उरत नाही. तो देवीची खुण मानला जातो. मग त्या मुलीला किंवा महिलेला देवळात नेलं जातं. नवस बोलले जातात. उपास तापास आणि घरातले निर्बंध सुरू होतात. कुणासोबत उठबस करायची, कुठे जायचं, काय घालायचं यावरही बंधनं येतात. जटा जितकी वाढते तितकी आजूबाजूच्या समाजात आणि नातेवाइकांमधील चर्चा वाढते. हळूहळू त्या स्त्रीचं व्यक्ती म्हणून अस्तित्व कमी होत जातं आणि देवीची खुण असलेली बाई ही ओळख अधिक रूढ होते. परिणामी प्रत्यक्ष आयुष्यात तिला स्वातंत्र्य मिळत नाही, उलट जबाबदारी आणि नियंत्रण वाढत जातं. शाळेत जाणं, मैत्रिणींमध्ये बसणं, कामासाठी बाहेर पडणं, लग्नाचा निर्णय, हे सगळे प्रश्न त्या जटेच्या गुंत्यात अडकतात.
काही दशकांपूर्वी केसांचा न सुटणारा गुंता म्हणजे अविवाहित मुलींना देवदासी प्रथेला वाहण्याचे निमित्त ठरत असे. कायद्याने देवदासी प्रथेवर बंदी आली तरी त्यातल्या काही रूढी पद्धती वेगवेगळ्या स्वरूपात आजही काही महिलांना त्रासदायक ठरतात. जटांशी संबंधित श्रद्धेच्या नावाखाली अनेक ठिकाणी एक समान चित्र दिसतं. बाधित स्त्री आणि तिच्या कुटुंबाची भीती वाढते. समाजाची नजर घट्ट होते आणि स्त्रीचा निर्णय हरवतो.
(कातरीचा वापर न करता हाताने जटा सोडविण्याचा पर्यंत करतांना डॉ. सुधीर कुंभार आणि त्यांचे साथीदार)
इथेच जटा निर्मूलन चळवळीची कहाणी सुरू होते. ही चळवळ कोणत्याही एका संस्थेच्या माध्यमातून तयार न होता स्वयंस्फूर्तीने अनेक ठिकाणी अनेक व्यक्ती आणि गटांच्या पुढाकारातून उभी राहिली. आरोग्य छावण्या, प्रबोधन आणि स्थानिक पुनर्वसनाच्या कामातून जटा निर्मूलनाचे अनेक कृती कार्यक्रम समोर आले. अंनिस आणि तत्सम संस्थांच्या प्रबोधनामुळे अंधश्रद्धा निर्मूलन आणि जटा निर्मूलन अशी ओळख ठळक झाली. मात्र माध्यमांनी तयार केलेल्या या ओळखीपलीकडे ही चळवळ विविध वैचारिक भूमिकांमधून विकसित होत राहिली आहे. अलीकडच्या दोन दशकांत काही कार्यकर्त्यांनी ठामपणे मांडलं की जटा काढणं म्हणजे फक्त गुंतलेले केस कापणं नाही. तो स्त्रीच्या सुरक्षिततेचा, आरोग्याचा आणि स्वायत्ततेचा प्रश्न आहे.
या नव्या भूमिकेतूनच सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरातील डॉ. सुधीर कुंभार यांचं काम ठळकपणे पुढे येतं. ते जटा कात्रीने कापण्यापेक्षा शक्य तितकी हाताने अलगद सोडवण्यावर भर देतात. त्यांच्या म्हणण्यानुसार अनेक कुटुंबांसाठी जट कापणे म्हणजे देवीचा अपमान, अशी जट असलेल्या स्त्रिया आणि त्यांच्या कुटुंबीयांची भावना असते. म्हणून कात्रीचा आग्रह धरण्याऐवजी संवादातून विश्वास निर्माण करणं गरजेचं ठरतं. या गटाच्या प्रत्यक्ष हस्तक्षेपाला संशोधनाची आणि मानवी हक्कांची भाषा मिळाली, ती प्रा. डॉ. गोविंद धस्के यांच्या कामामुळे. जटा निर्मूलन चळवळीत स्वयंसेवक म्हणून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे नोंदी, फोटो आणि व्हिडिओ दस्तऐवजीकरण, विश्लेषण, केस स्टडी आणि नंतर पीएचडी संशोधनापर्यंत गेला. त्यामुळे जटा निर्मूलनाचा विषय फक्त स्थानिक परंपरा म्हणून न राहता जागतिक पातळीवर समाजशास्त्रीय चौकटीत मांडला जाऊ लागला.
जटा म्हणजे काय आणि ती आरोग्यापलीकडे का जाते?
जटा म्हणजे केसांचा न सुटणारा गुंता, हे जितकं बरोबर आहे तितकंच ते अपुरंही आहे. वैद्यकीयदृष्ट्या केस गुंतण्यामागे अनेक कारणं असू शकतात. सतत ओले राहिलेले केस, घाम, केसांची योग्य निगा न राखणं, उवा, बुरशीजन्य संसर्ग, त्वचेच्या तक्रारी, दीर्घकाळ आजारपण इत्यादी कारणांमुळे केस घट्ट गुंतू शकतात. काही वेळा घरात पाण्याची कमतरता, साबण तेलाचा अभाव, कामाचा ताण, सतत धूळ धूर, यांचाही परिणाम केसांवर होतो. त्यामुळे जटा हा प्रश्न फक्त रूढी किंवा परंपरेपुरता राहत नाही, तो आरोग्याचा प्रश्न ठरतो.
मात्र केसांत जटा तयार होऊ लागलेल्या महिलांच्या बाबतीत इथं एक महत्त्वाची गोष्ट घडते. जटा दिसू लागल्यावर किंवा ती असल्याचं कळल्यावर संबंधित महिलेकडे पाहण्याची सामाजिक नजर बदलते. अशा वेळी आरोग्य केंद्रात जायचं की देवळात, हा निर्णय अनेकदा घरातले इतर लोक घेतात. जटा झाली म्हणजे देवी आली, असं सांगितलं गेलं की मग वैद्यकीय उपचार मागे पडतात. केसांची निगा, संसर्गाची शक्यता आणि मानसिक वेदना याकडे दुर्लक्ष होतं आणि यातून देवीची किंवा देवाची जटा असलेली स्त्री अशी एक नवी ओळख तयार होते.
सुरुवातीला काहीशी दैवी म्हणून, भीतीयुक्त आदर मिळवणारी ही ओळख स्त्रीला मानसिकदृष्ट्या दोन्ही टोकांना नेते. काहींना जटा म्हणजे संरक्षण वाटतं. देवीने आपल्याला निवडलं, अशी क्षीण पण जगवणारी भावना तयार होते. पण त्याच वेळी भीतीही वाढते. जर जटा काढली तर देवी रागावेल का, काही विपरीत घडेल का, घरात अपघात होईल का, ही भीती खोलवर बसते. या भीतीतून उपास तापास लादले जातात. कधी बाहेर जाण्यावर बंदी येते. कधी स्वयंपाक, पूजा, झाडू, पाणी भरणं अशा कामांबद्दल विचित्र नियम लागू होतात. काही ठिकाणी हे निर्बंध आदराच्या भाषेत येतात. देवीची मान्यता आहे म्हणून काळजी घ्या, असं सांगितलं जातं. पण प्रत्यक्षात त्यातून स्त्रीची हालचाल, शिक्षण, काम आणि निर्णयक्षमता संकुचित होत जाते. इथेच जटा हा फक्त आरोग्याचा दुर्लक्षित प्रश्न राहत नाही. तो सामाजिक नियंत्रणाचा प्रश्न बनतो.
या ग्रामीण समाजरचना आणि स्थानिक श्रद्धाव्यवस्थेत जटा निर्मूलन चळवळीचं वेगळेपण आणि महत्त्व जाणवतं. चळवळीतले अनेक कार्यकर्ते ठामपणे सांगतात की जटा काढणं म्हणजे फक्त केस सोडवणं नाही. जटेमुळे कुचंबणा झालेल्या स्त्रीला तिच्या शरीरावरचा आणि आयुष्यावरचा ताबा परत मिळवून देणं, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. अर्थात हे करताना स्त्रियांच्या भीतीची खिल्ली उडवणे किंवा श्रद्धेला थेट अपमानित करणं अशा कृती टाळाव्या लागतात. कारण इथे प्रश्न श्रद्धा विरुद्ध विज्ञान असा सरळ नसतो. प्रश्न असतो भीतीच्या चौकटीत अडकलेली स्त्री आणि तिच्या निर्णयाचा हक्क.

डॉ सुधीर कुंभार यांच्या कामातून ही जाणीव प्रकर्षाने पुढे येते. त्यांच्या अनुभवात अनेकदा स्त्री जटा काढायला तयार असते, पण कुटुंबाची भीती आड येते. काही वेळा कुटुंब तयार असतं, पण स्त्रीची भीती आड येते. म्हणून जटा सोडवण्याआधी संवाद, समजावणं, प्रक्रियेत पारदर्शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्त्रीची स्पष्ट परवानगी, या टप्प्यांना ते केंद्रस्थानी ठेवतात. प्रा डॉ गोविंद धस्के यांनी याच प्रक्रियेचं संशोधन करताना दाखवलं की जटेला समजून घ्यायचं असेल तर केवळ वैद्यकीय कारणं पुरेशी नाहीत. जात, वर्ग, स्त्रीचे हक्क, मानसिक आरोग्य आणि समाजरचना यांचा विचार करावा लागतो.
चळवळीतली अनेक प्रवाहांची उभारणी
जटा निर्मूलन चळवळ वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांच्या पुढाकारातून उभी राहिली. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागात, विशेषतः निपाणी, गारगोटी, गडहिंग्लज आणि आसपासच्या पट्ट्यात जटा ही सौंदती यल्लमा, कोकटनूर यल्लमा, चीचली मायाक्का अशा देवतांच्या मंदिरपरंपरांशी जोडलेली गोष्ट मानली जात असे. बहुतेक ठिकाणी जटा देवदासी प्रथेशी जोडली गेली होती. काही ठिकाणी ती कौटुंबिक नवसाची खूण मानली जात होती. अशा विविध पार्श्वभूमीवर जटा सोडवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे केवळ आधुनिक वैद्यकीय ज्ञानाच्या प्रभावातून केलेला हस्तक्षेप नव्हता. तो गावोगावच्या श्रद्धाव्यवस्थेतल्या एका मजबूत कड्याला हात घालण्यासारखा होता.
सत्तरच्या दशकात निपाणी परिसरात कोल्हापूरचे डॉ अरगडे यांनी देवदासी प्रथेच्या विरोधात आणि जटा निर्मूलनाच्या दिशेने काम सुरू केल्याचे उल्लेख आढळतात. गारगोटी परिसरात डॉ वासकर आणि त्यांच्या पत्नीने पुढाकार घेऊन जट काढण्याचे प्रयत्न केले. पुढे गडहिंग्लज परिसरात माजी देवदासी गौराबाई सालवडे यांच्या पुढाकाराने पुनर्वसनासोबत जटा निर्मूलनाचे प्रयत्न वेगाने पुढे गेले. विठ्ठल बन्ने यांचे योगदानही अनेकांनी महत्त्वाचे मानले आहे. ही नावे म्हणजे एका मोठ्या सामाजिक बदलाच्या प्रवासातील ठळक टप्पे आहेत. या प्रयत्नांनी जटेला सार्वजनिक चर्चेत आणलं आणि जट काढणे शक्य आहे, हा विश्वास निर्माण केला.
यानंतर या चळवळीत काही प्रवाह समांतरपणे दिसू लागले. पहिला प्रवाह प्रबोधनाचा, श्रद्धेच्या आडून होणारे गैरसमज, भीती आणि शोषण याविरुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा. दुसरा प्रवाह आरोग्याचा, आरोग्य छावण्या, तपासण्या, उपचार आणि समुपदेशनाच्या माध्यमातून जटेला वैद्यकीय भाषेत समजावण्याचा. तिसरा प्रवाह सामाजिक न्याय आणि पुनर्वसनाचा, कारण जटा हा मुद्दा अनेकदा वंचित समुदायातील स्त्रियांशी जोडला जात असल्यामुळे त्यांना आधार देणे, शिक्षण किंवा उपजीविकेकडे वळवणे आणि समाजात मानाने जगण्याची संधी निर्माण करणे, हा त्याचा केंद्रबिंदू होता.
या प्रवाहांमध्ये काही वेळा मतभेदही झाले, आणि कदाचित आजही होत असतील. काही गटांना जटा ही सरळ अंधश्रद्धा वाटते आणि ती कात्रीने कापून लगेच संपवली पाहिजे असा आग्रह असतो. काही गटांना वाटते की कुटुंबाचा विश्वास न मिळवता केलेलं निर्मूलन स्त्रीवर मानसिक आघात ठरू शकतं. काही ठिकाणी देवस्थान, पोलिस किंवा गावातील शक्तिसंबंध यामुळे हस्तक्षेपाचा मार्ग अधिक गुंतागुंतीचा होतो. त्यामुळे जटा निर्मूलन हे केवळ केसांवरचे काम न राहता पद्धत कशी असावी, स्त्रीची भूमिका काय असावी आणि कोणत्या भाषेत संवाद साधावा, यावर सातत्याने चर्चा होत राहिली.
याच संदर्भात सातारा, सांगली परिसरात विकसित झालेला विज्ञाननिष्ठ पण संवेदनशील प्रवाह ठळक ठरतो. या प्रवाहात जटेला आरोग्याचा प्रश्न मानतानाच स्त्रीच्या भावविश्वाला आणि कुटुंबाच्या श्रद्धेला समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला. डॉ राजेंद्र कुंभार आणि डॉ सुधीर कुंभार या शिक्षकद्वयीमुळे हा प्रवाह आकाराला आला, असं अनेक कार्यकर्ते सांगतात. इथं जटा काढण्याचा अर्थ जटा कापणे नाही, तर जटा सोडवणे आणि तेही स्त्रीच्या स्पष्ट सहभागाने, अशी भूमिका तयार झाली.

कात्री नको तर जटा सोडवण्याचा संवाद हवा
जटा निर्मूलनाच्या कामात सर्वात सहज मार्ग कोणता, असा प्रश्न विचारला तर अनेकदा उत्तर मिळतं कात्री. केस कापले की जटा संपली, असं वाटतं. पण या उत्तरात एक मोठा धोका लपलेला असतो. जटा जर देवीची खुण मानली जात असेल, तर कात्री हे फक्त जटा कापण्याचं साधन राहत नाही. ती देवीवरील श्रद्धेवरचा हल्ला मानली जाते आणि त्या कृत्याची शिक्षा मिळू शकते, अशी भीती कुटुंबालाही असते आणि स्त्रीलाही. म्हणूनच काही कुटुंबं जटा कापण्याच्या प्रयत्नांना विरोध करतात. काही वेळा जटा कापली तर देवी रागावेल, घरात अनर्थ होईल, असं सांगून स्त्रीला दबावाखाली ठेवलं जातं.
ही तेढ सोडवण्यासाठी डॉ सुधीर कुंभार यांनी एक वेगळा पर्याय उभा केला. त्यांचा आग्रह असा की जटा कापणं ही शेवटची वैद्यकीय गरज असू शकते, पण पहिली निवड नाही. त्यांच्या पद्धतीत शक्य तितकी जटा हाताने अलगद सोडवली जाते. यामागची भूमिका साधी पण परिणामकारक आहे. कुटुंबासाठी कापणे म्हणजे देवीचा अपमान असेल, तर सोडवणे म्हणजे देवीच्या कृपेने सुटका, अशी भावना स्वीकारणं त्यांना सोपं जातं. म्हणजेच बदलाचा मार्ग श्रद्धेला तुडवत नाही, तर श्रद्धेच्या भाषेतच स्त्रीला सुरक्षिततेकडे आणतो.
या पद्धतीत वेळ लागतो. संयम लागतो आणि प्रत्येक टप्प्यावर संवाद लागतो. जटा सोडवण्याआधी स्त्रीला समजेल अशा भाषेत प्रक्रिया समजावली जाते. काय करणार आहोत, किती वेळ लागू शकतो, वेदना होतील का, मध्ये थांबता येईल का, कोण कोण उपस्थित असेल, फोटो किंवा व्हिडिओ होणार का, हे स्पष्ट सांगितलं जातं. त्यानंतर स्त्रीची स्पष्ट परवानगी घेतली जाते. ही परवानगी एकदाच घेतली जात नाही. प्रक्रिया सुरू असताना पुन्हा पुन्हा विचारलं जातं, आपण पुढे जाऊ का, थांबू का. त्यामुळे स्त्रीला असं वाटतं की निर्णय तिच्या हातात आहे. हीच अनुभूती तिच्या मनातील भीती कमी करते, असं डॉ कुंभार सांगतात. याच वेळी डॉ गोविंद धस्के हे अनुभव वैज्ञानिक संशोधकीय पद्धतीने समजून घेऊन दस्तऐवजीकरण करणं आणि जगासमोर मांडणं आवश्यक असल्याचं नमूद करतात.
जटा सोडवण्याच्या सुरुवातीच्या काळात जटेला तेलात भिजवणे किंवा गरम पाण्याने ती हलकी करणे असे प्रयोग झाले. मात्र जटा ओली झाल्याने सोडवताना हात सटकण्यासारख्या अडचणी काही वेळा जाणवल्या. त्यामुळे इतर द्रव्ये न वापरता कोरडे केस फक्त हाताने सोडवण्याची पद्धत अधिक उपयुक्त ठरली, असं या गटाकडून सांगितलं जातं. हाताने सोडवताना केसांचा ताण कमी होईल अशी काळजी घेतली जाते. जटा खूप घट्ट असेल तर ती तुकड्या तुकड्याने, थोडं थोडं करून सोडवली जाते. स्त्री थकली तर थांबून काही वेळाने पुन्हा काम सुरू केलं जातं. समुपदेशन हा या प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग असतो. स्त्रीच्या मनातली भीती, घरातल्या लोकांची भीती आणि समाज काय म्हणेल ही चिंता, या सगळ्या गोष्टी धीराने समजून घेऊन तिच्यासोबत काम करावं लागतं.
या सगळ्यात सर्वात नाजूक गोष्ट म्हणजे स्त्रीचं भावविश्व. अनेक महिलांसाठी जटा हा नवस असतो, ओळख असते आणि काही वेळा जगण्याचा आधारही असतो. त्यामुळे जटा काढण्याचा क्षण हा फक्त आनंदाचा नसतो, तो कधी कधी शोकासारखा अनुभवला जातो. अशा वेळी सरळ अंधश्रद्धा म्हणून टोकाचा निषेध करणं त्या स्त्रीसाठी क्रूर ठरू शकतं. म्हणून या पद्धतीत श्रद्धेला अपमान न करता स्त्रीला हळूहळू मुक्त करणे, हा नैतिक पाया तयार झाला.

गावोगावी पोहोचलेली स्वयंसेवकांची फळी आणि जागृती
जटा निर्मूलनाच्या कामात प्रत्यक्ष जटा सोडवणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच महत्त्वाचे आहे त्या प्रक्रियेपर्यंत पोहोचणे. डॉ कुंभार यांनी विद्यार्थ्यांमधून आणि माजी विद्यार्थ्यांमधून स्वयंसेवकांची एक फळी तयार केली. या स्वयंसेवकांचं काम फक्त सोबत जाणे किंवा मदत करणे एवढ्यापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांना गावातील सामाजिक रचना, श्रद्धेची भाषा आणि कुटुंबातील भीती यांचा अंदाज घेऊन संवाद साधावा लागायचा. अनेक वेळा स्वयंसेवक आधी गावात जाऊन माहिती गोळा करतात. जटा असलेल्या महिलेला कोण भेटेल, घरातील निर्णय कोण घेतो, गावात कोणाचा शब्द चालतो, देवळातील भूमिका काय आहे, हे समजून घेतात. त्यानंतर घरातल्या लोकांशी साध्या भाषेत बोलणं सुरू होतं.
या संवादात थेट वाद टाळला जातो. देवी आहे की नाही, हा प्रश्न त्या क्षणी केंद्रात नसतो. केंद्रात असते त्या स्त्रीची वेदना, तिची अडचण आणि तिचा निर्णय. स्वयंसेवक स्पष्ट करतात की जटा सोडवणे ही आरोग्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. पण श्रद्धेला धक्का लागू नये म्हणून जटा कापण्याचा आग्रह न धरता ती सोडवण्याचा मार्ग निवडला जातो, हेही ते सांगतात. यामुळे कुटुंबाचं मन थोडं सैल होतं. काही घरांतली भीती कमी होत जाते. आणि जटा सोडवण्याचा निर्णय शत्रुत्वाच्या वातावरणात न होता सहमतीच्या वातावरणात होऊ लागतो.
ही फळी गावात वेगवेगळ्या ठिकाणी संवाद घडवते. कधी घरात बसून, कधी चौकात, कधी देवळाच्या परिसरात, तर कधी शाळेतल्या पालक बैठकीत. जटा सुटलेल्या महिलांच्या अनुभवकथा या संवादात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्या केवळ कथा म्हणून सांगितल्या जात नाहीत, त्या भीती कमी करण्यासाठी सांगितल्या जातात. जटा काढली आणि काहीही विपरीत घडलं नाही, हा अनुभव अनेकदा एखाद्या गावातल्या भीतीच्या वातावरणावर मोठा परिणाम करतो. जटा असलेल्या महिलेला एकटं वाटू न देणं हीही या कामाची गरज असते. कारण ती एकटी पडली तर भीती वाढते, तिच्याभोवती कुजबुज वाढते आणि निर्णय तिच्या हातातून सुटू शकतो.
जटा निर्मूलन चळवळीच्या काही गटांत बाहेरून आलेले लोक जटा कापण्याची घाई करतात. त्या घाईत स्त्रीची तयारी, तिची परवानगी आणि तिच्या मनातील भीती यांना पुरेसा वेळ मिळत नाही. कुंभार यांच्या फळीत मात्र वेगळा आग्रह दिसतो. हे काम एकदाच करून संपवायचं नाही, तर स्त्रीला पुन्हा समाजात उभं राहायला आधार द्यायचा आहे, ही भूमिका असते. त्यामुळे जटा सुटली की तिच्या आयुष्यात सगळं सुरळीत होईल, असा सोपा निष्कर्ष ते काढत नाहीत. अनेकदा जटा सुटली तरी समाजाची नजर बदलायला वेळ लागतो. घरातील नियम लगेच बदलत नाहीत. म्हणून संवाद हा केवळ जटा सुटण्यापूर्वी नाही, तर नंतरही गरजेचा ठरतो.
संशोधनातून चळवळीला मिळालेली मानवी हक्कांची भाषा
जटा निर्मूलन चळवळीत एक समान अडचण वारंवार पुढे आली. गावात घडणारे अनुभव, स्त्रियांच्या कथा आणि हस्तक्षेपाच्या पद्धती यांची नोंद पद्धतशीरपणे होत नव्हती. त्यामुळे एका गावात जे शिकले गेलं ते दुसऱ्या गावात पोहोचत नसे. आणि या प्रश्नाकडे पाहताना बाहेरच्या जगात अनेकदा दोनच चौकटी उरत. एक म्हणजे हा अंधश्रद्धेचा विषय, आणि दुसरी म्हणजे हा स्वच्छतेचा विषय. प्रत्यक्ष अनुभव मात्र या दोन्हीपेक्षा वेगळा आणि व्यापक होता. म्हणून या अनुभवांचं दस्तऐवजीकरण आणि विश्लेषण गरजेचं ठरलं.
प्रा. डॉ. गोविंद धस्के यांचा प्रवास याच गरजेतून पुढे आला. सुरुवातीला ते या गटातून स्वयंसेवक म्हणून काम करत होते. प्रत्यक्ष जटा सोडवताना स्त्रियांच्या भावना, कुटुंबाची भीती, गावातील दबाव आणि हस्तक्षेपाचा परिणाम हे त्यांना जवळून दिसले. या अनुभवांमध्ये केवळ वैद्यकीय मुद्दे नव्हते. निर्णय कोण घेतो, स्त्रीला बोलू दिलं जातं का, तिच्या शरीरावर कोणाचा हक्क मानला जातो, तिच्या आयुष्यावर नियंत्रण कसं येतं, हे प्रश्न सतत पुढे येत होते. त्यामुळे जटा हा विषय केवळ केसांचा न राहता सत्तासंबंधांचा विषय ठरतो, हे त्यांना अधिक स्पष्ट होत गेलं.
(डॉ. सुधीर कुंभार यांचे जटा मुक्ती पुस्तक)
डॉ सुधीर कुंभार यांचा प्रत्यक्ष अनुभव आणि डॉ धस्के यांची नोंद, विश्लेषण आणि लेखन क्षमता यांचा संगम पुढे संशोधनाच्या रूपात दिसला. त्यांनी जटाग्रस्त महिलांच्या केस स्टडी तयार केल्या. जटा कशी झाली, तिच्यानंतर आयुष्यात काय बदलले, घरात कोणते निर्बंध आले, भीती कशी वाढली, जटा सोडवण्याचा निर्णय कसा झाला, सोडवताना काय वाटलं आणि नंतर काय बदललं, याची नोंद झाली. या नोंदींचा एक मोठा फायदा झाला. जटा हा प्रश्न अनुभवांच्या भाषेत बोलू लागला. आकड्यांपुरता तो मर्यादित राहिला नाही, आणि केवळ भावनेपुरताही उरला नाही. तो समाजकार्य, आरोग्य आणि अधिकार या तिन्ही भाषांमध्ये स्पष्टपणे मांडला जाऊ लागला.
या कामाचं पुस्तक रूप २००९ मध्ये उपलब्ध झालं. त्यानंतर २०१४ मध्ये इंडियाना विद्यापीठात जटाग्रस्त महिलांच्या अनुभवांवर आधारित पीएचडी प्रबंध सादर झाला. धस्के यांच्या निष्कर्षानुसार जटा ही केवळ देवाची खूण किंवा अंधश्रद्धा म्हणून पाहिली तर स्त्रीच्या जगण्यातील अनेक स्तर दिसत नाहीत. जटेमुळे शरीरावर ओझं येतं, हालचाली आणि कामावर परिणाम होतो, नातेसंबंधांवर परिणाम होतो, आणि निर्णयक्षमतेवर बंधने येतात. कुटुंबातील सत्ता संबंध आणि समाजातील जात, वर्ग आणि लिंग यांचे ताण इथे काम करत असतात. म्हणजेच जटा ही बहुपदरी हिंसेची व्यवस्था बनू शकते.
याच ठिकाणी जटा निर्मूलनाला एक नवी भाषा मिळाली, महिलांच्या आरोग्याचा मानवाधिकार. जटा असलेल्या स्त्रीला उपचार मिळण्याचा, समुपदेशन मिळण्याचा आणि स्वतःच्या शरीरावर निर्णय घेण्याचा अधिकार आहे, ही भूमिका यातून ठामपणे पुढे आली. पूर्वपरवानगी, प्रक्रिया समजावणे, पारदर्शकता आणि स्त्रीला थांबण्याचा हक्क देणे, हे केवळ संवेदनशीलता म्हणून नव्हे तर अधिकार म्हणून मांडले जाऊ लागले. त्यामुळे जटा निर्मूलन हे केवळ लोकप्रबोधनाचे काम न राहता सार्वजनिक आरोग्य आणि मानवी हक्क यांना जोडणारा मुद्दा बनला आहे.
डॉ धस्के यांच्या संशोधन आणि पाठपुराव्यामुळे अमेरिकेतल्या इंडियाना विद्यापीठाच्या समाजकार्य शिक्षणामध्ये जटांचा प्रश्न समाविष्ट करण्यात आला आहे. सध्या ते जागतिक पातळीवर विविध देशांतील जटेसदृश सांस्कृतिक परंपरा आणि श्रद्धा यांचा अभ्यास करत आहेत. तसेच जटेसारख्या समस्यांमध्ये समाजकार्य क्षेत्र संवेदनशील हस्तक्षेप कसा करू शकते, यावर ते त्यांच्या अमेरिकेतील संशोधक सहकाऱ्यांसोबत पुढचं संशोधन करत आहेत.
जटा निर्मूलन म्हणजे मोठ्या घोषणांनी केलेला संघर्ष नाही. तो छोट्या पण सातत्यपूर्ण कृतीतून घडणारा बदल आहे. संवाद, परवानगी, पारदर्शकता आणि अनुभवांची नोंद, या चार गोष्टींनी या चळवळीला दिशा दिली आहे. पुढचा टप्पा म्हणजे या दिशेला संस्थात्मक पाठबळ देणे. निधी, प्रशिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेत ठरावीक कार्यपद्धती हे महत्त्वाचे आधार तयार झाले, तर जटा हा विषय गावोगावी एखाद्या चमत्काराच्या भाषेत न राहता आरोग्य आणि अधिकारांच्या भाषेत अधिक ठामपणे येईल. जटा निर्मूलन चळवळीचा केंद्रबिंदू स्त्रीच्या शरीरावरचा तिचा अधिकार नव्यानं अधोरेखित करतो, हे चित्र आशादायक आहे.
(गायत्री अविनाश सुतार या मुक्त पत्रकार असून आकाशवाणी पुणे इथे युवावाणी कार्यक्रमाच्या निवेदिका आहेत.)






