(किरण गिते, बुलढाणा)
हे सांग ना रे निसर्गा
मीच का रे बळीराजा,
माझ्या घामातून पडतो
रानात रक्ताचा सडा
तेव्हाच फुलतो शिवार सारा…
कष्ट हेच माझे बिरूद
राबणे हेच माझे ध्येय
तेंव्हाच मिळतो शांतनिवारा…
13 मार्च रोजी विष प्राशन करून स्वत:चे आयुष्य संपवणाऱ्या कैलास नागरेची ही कविता…निसर्ग आणि शेतीवरच्या जवळपास 200 कविता लिहिणाऱ्या कैलासला त्याचा कवितासंग्रह प्रसिद्ध करायचा होता, मात्र आर्थिक अडचणींमुळे त्याला ते साध्य झालं नव्हतं… 
महाराष्ट्रात एकूण 2706 शेतकऱ्यांनी गेल्या वर्षात आत्महत्या केल्या आहेत. 365 दिवसात 2706 म्हणजे दिवसाला जवळपास 8 आत्महत्या...आपण इतके सुखासीन जगत असतो की आपल्या जगण्यावर राजकीय, सामाजिक परिघावर त्याची साधी रेषही उमटत नाही..आमच्या आनंदाच्या कल्लोळात, वाजत गाजत निघालेल्या मिरवणुकांच्या ढोल ताशात या वेदनेच्या किंकाळ्या कुठे ऐकू ही येत नाही.. बातम्यांच्या वेगवान आढाव्यात काही सेकंदात पडद्यावर येणारे हे मृत्यू क्षणात नाहीसे होतात... जगापुढे येणारे एवढेच त्यांचे अस्तित्व.. बाकी आकड्यांचा भाग होऊन जातात...
मात्र तरीही कैलास नागरे या युवा शेतकऱ्याची आत्महत्या आकडेवारीपेक्षा अधिक काही सांगू पाहते... कैलासची नुकतीच वयात आलेली 18 वर्षाची मुलगी संचिता नागरे आपल्या बापाच्या मृत्यूबद्दल जेव्हा बोलते तेव्हा पायाखालची जमीन सरकते. ‘’माझी बारावीची परीक्षा सुरू होती. बाबा मला रोज सेंटरवर सोडायचे आणि पेपर संपला की घ्यायलाही यायचे. दररोज पेपरपूर्वी बाबा एक गोष्ट सांगत असे, 'शेतीत काहीही नाही. खूप अभ्यास कर आणि डॉक्टर हो.' मी शिकून डॉक्टर व्हावी असं बाबांना नेहमी वाटे. सगळ्यांना ते तसंच सांगत. पण, त्यादिवशी बाबा बोलत होते तेव्हा त्यांच्या डोळ्यात स्वप्न नाही तर खूप तळमळ आणि काळजी दिसली.
मनात कुरबुर झाली पण त्यावर जास्त विचार केलाच नाही. काही दिवसांपासून बाबांनी बोलणही कमी केलं होतं. पाणी, शेती, सरकारची आश्वासनं हेच ते सतत बोलायचे., पाणी नाही तर कसं जगणार? फक्त हीच चर्चा होती. आम्हाला त्यांची अस्वस्थता दिसत होती पण ती या टोकाच्या निर्णयावर येऊन ठेपेल असा विचार कधीच केला नव्हता. आता तेच आमच्यात नाहीत तर मी डॉक्टर कोणासाठी होऊ? माझी आई, लहान दोन असणारे भावंड यांच्यासाठी वाली कोण आहे?" 
(कैलास नागरेची मोठी मुलगी संचिता नागरे)
होळीच्याच दिवशी ‘युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त’ कैलासची आत्महत्या
13 मार्च 2025… त्यादिवशी सबंध देश होळी साजरा करत होता. प्रत्येक गावा गावात आणि प्रत्येकाच्या दारात एक होळी पेटवली जात होती. वाईट प्रवृत्ती नष्ट व्हावी यासाठी समाजातील कुप्रवृत्तीचे दहन केले जात होते आणि नेमक्या त्याच होळीच्या दिवशी राज्याला हदरवून टाकणारी घटना घडली.
बुलढाणा जिल्ह्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळमध्ये शेतकरी कैलास नागरे यांनी भल्या पहाटे विष प्राशन करून आत्महत्या केली. कैलास हा महाराष्ट्र शासनाचा “युवा शेतकरी पुरस्कार” प्राप्त विजेता शेतकरी होता हे अधिकच क्लेषदायक…आत्महत्या करण्यापूर्वी तीन पानांची एक सुसाईड नोट लिहून कैलासने इथल्या शासकीय व्यवस्थेचे अक्षरश: वाभाडे काढले होते.
देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ हे गाव तसं बऱ्यापैकी मोठं आहे. गावात शिरताच उजव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा आणि डाव्या बाजूला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा... गावात प्रामुख्याने मराठा समाज मोठ्या प्रमाणात राहतो. त्यानंतर वंजारी, बंजारी, दलित आणि इतरही जातीतील नागरिकांचा समावेश. संपूर्ण गाव तसं एकोप्याने राहणारं… शाळेच्या उजव्या बाजूला कैलास नागरे यांचं घर होतं. घराभोवती शेकडो गावकरी गोळा झाले होते. ते चित्र अंगावर शहरा आणणारं होतं. प्रत्येक गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणि अंगार दिसत होता. कोणी कोणाशी बोलत नव्हतं, कोणाकडे बघतही नव्हतं. आज नागरेंच्या घरांवर असलेलं छप्पर कायमचं उडून गेलं होतं. 
(याच आंब्याच्या झाडाखाली विष प्राषन करून शेतकरी कैलास नागरेने आपली जीवनयात्रा संपवली! / घरासमोर जमलेले गावातील नागरीक)
‘’माझ्या नवऱ्याने आत्महत्या केली नाही तर सरकारने त्यांचा खून केला’’
त्या घरात एक विधवा महिला, नुकतीच वयात आलेली 18 वर्षांची मुलगी संचिता, 14 वर्षांचा सार्थक आणि निळे डोळे, भुरे केस असलेली 7 वर्षांची एक गोंडस मुलगी. तिन्ही लेकरांचा समुद्र आटला होता. हसत खेळत रहाणारं कुटुंब आज उन्हात भाजत होतं. आठवणींनी चिंब झालेल्या डोळ्यांनी पत्नी स्वाती नागरे ही कैलास यांचे जुने फोटो बघत एकटीच बसलेली होती.
अचानक पत्नीचा टाहो जोरात फुटला. "मी कुठे जाऊ? वय झालेला सासरा, माझी तीन लेकरं त्यांची काळजी मी कशी घेणार? माझ्या नवऱ्याने आत्महत्या केली नाही तर सरकारने माझ्या नवऱ्याचा खून केला आहे. सरकारी यंत्रणा काही कामाची नाही. आज माझा नवरा मला सोडून गेला. मी कुणाकडे पाहू? मी काय करू?" 
(कैलास नागरेची पत्नी स्वाती नागरे)
कैलासच्या आत्महत्येवर गावकऱ्यांची प्रतिक्रिया काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, "लय हसून राहायचा माय, कोणाशीच वाकडं नाय का 2 रुपयाची उधारी नाय. सगळ्यांना सोबत घेऊन लढला. फकस्त एकट्यासाठी नाही तर पंचक्रोशीतील 14 गावांमधील साऱ्या शेतकऱ्यांसाठी त्यो लढला. साऱ्या शेतकऱ्यांचा झुंजार नेता होता त्यो. साऱ्यासाठी काळजी करायचा. आता त्योच राहिला नाही. आम्ही अन आमच्या लेकरांनी कुणाकडं बघायचं? काय करायचं? सरकारनं काहीतरी लवकर करावं." अशी प्रतिक्रिया शिवनी आरमाळमधील एका आजीने व्यक्त केली.
शेतीमातीशी लळा असलेला आणि संपूर्ण आयुष्य शेतीमय म्हणून जगणारा..उठता बसता शेतीमातीचाच विचार करणारा, अगदी श्वासा श्वासात शेती आणि शेती अशा विषयांणे स्वतः आयुष्य व्यापून जगणारा एक समर्पित भाव असलेला 44 वर्षांचा कार्यकर्ता म्हणजे कैलास नागरे… त्याच्यातील सच्चा, हाडाचा कार्यकर्ता त्याला कधी स्वस्थ बसू देत नव्हता. शेती प्रश्नाची जाण असताना, त्या माध्यमातून इतरांना भान आणि अवधान करणार हा त्याचा स्थायी स्वभाव होता. त्याच्या याच कार्यामुळे 2020 साली राज्य शासनाचा त्याला "युवा शेतकरी पुरस्कार’ मिळाला होता. विदर्भातील दुष्काळी पट्ट्यात जमीन असूनही सेंद्रिय शेती करत या पठ्ठ्याने फळबाग फुलवली होती.
खरबूज, टरबुज, तूर, पपई अशा कित्येक प्रकारची पिके घेतली. सबंध देशातील शेतकरी आवर्जून कैलासला कॉल करून शेतीविषयी माहिती घेत. पण, शेतकरी कितीही शेतात राबला, हाडाचं पाणी केलं. तरीही पाणी हा शेतीचा मूळ गाभा. कैलास इथेच खचले. खचले म्हणजे दुष्काळी पट्टा असला तरी पाणी नव्हतंच ही बाब मूळीच नव्हती तर. पाणी होतं पण ते पाणी सरकारच्या ताब्यात होतं… हे पाणी फक्त कैलासच्याच नव्हे तर आजूबाजूच्या 14 गावांना ते पाणी कसं मिळेल याचा पक्का आराखडा कैलासकडे होता.
कैलास नागरेची पाण्याची मागणी नेमकी काय होती?
बुलढाणा जिल्ह्यात अंढेरा मंडळात एक लघु प्रकल्प आहे. याच प्रकल्पात खडकपूर्णा धरणाचं पाणी डाव्या कालव्यातून सोडण्यात यावं जेणेकरून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या जमिनी फुलतील यासाठी कैलास अनेक वर्षांपासून लढा देत होता. शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्याची निवेदने आंदोलने हे नेहमी सुरू असायची. अलीकडच्या काळात त्यांन एक फार मोठे उपोषण, पाणी प्रश्नांसंदर्भात शिवनी आरमाळ धरणाजवळ केले होते. मात्र, सरकारकडून झोळीत फक्त आश्वासनं पडली. धरणाचा डावा कालवा हा चिखली तालुक्याला गेला आहे.
त्यातूनच 110 मीटर अंतरावरून काही अंशी पाणी वळते करून 14 गावांना पाणी द्यावं अशी विनंती केली. परंतू सरकारमार्फत केवळ आश्वासन मिळालं. 2 महिन्यांपूर्वी कैलासने शेतात खरबूज पिक घेतलं. त्याच्या ऐन काढणीवेळी पाण्याची कमतरता भासली आणि नजरेसमोर ते पीक करपून जाताना त्याला ते सहन झालं नाही. आंदोलनं करूनही काहीच होत नाहीये हे पाहून हतबल होत त्याच्याच शेतात असलेल्या आंब्याच्या झाडाखाली बसून शेताकडे पाहत त्याने तीन पानी सुसाईड नोट लिहिली आणि विषारी औषध पिऊन तो त्याच्याच काळ्या मातीत विलिन झाला. 
(बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरण / कैलास नागरेचं मृत्यूपत्र)
कैलास नागरेची तीन पानी सुसाईड नोट…
"राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार साहेब ही शेती आहुती मागत आहे. कृपया पंचक्रोशीला हमी पाणी द्या. मला सर्वांनी सुखदुःखात संकटात संघर्षात साथ दिली आहे. पण कोणालाच एका पैशाचाही किंवा एक क्षण वेळेचाही आधार मी कोणाला देऊ शकत नाही. याचा खूप पश्चाताप होतोय, मन गुदमरतोय कित्येकांना हिम्मत देणारा मी आता फार हतबल झालोय. मानसिकरित्या खूप थकलोय.
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. मा. उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब मला वादा करा काही करा पण माझ्या पंचक्रोशीतील शेतीला हमी पाणी द्या. आमची धरणं तुडूंब भरा किंवा आमच्या परिसरातील अनाथांचे नाथ भगवानराव मुंडे साहेब यांचा १४ गावांची पाण्याची मागणी का होईना तात्काळ मार्गी लावा. त्यांचा पाण्यासाठीचा संघर्ष खूप जुना आहे आणि बहुउपयोगी आहे. हमी पाणी जर शेतीला आमच्या पंचक्रोशीत आलं तर शेतकरी भरकटणार नाही. खूप कष्ट घेईल आणि प्रगती साधेल. माझ्या परिसरातील शेतकरी खूप प्रयोगशील आहे.
कारण, आमच्याकडे सिंचनाच्या सर्व सुविधा आहेत फक्त शेतीला हमी पाणी नाही. म्हणूनच शेतकऱ्यांचा आर्थिक समतोल बिघडतो आणि तो कर्जबाजारी होतो. वैफल्य येऊन तो नैराश्याचा गर्तेत जातो आणि त्याला जीवन जगणं असहाय्य होतं. जिवाभावाचे नाते गोते, मित्र परिवार बहिणी, भाऊजी, सासू सासरे, मामा मामी, भाचा, भाची, मुलं बाळं, आई-वडील, काका काकू आजोबा आजी जावई आधी आप्तेष्ठांच समाजाचा गाव शिवारातील मदत करणाऱ्यांचा बळी घेत स्वतःची मुक्ती करून घेतो त्याला सर्वकाही समजत असते. परिवाराचाही तो विचार करतो. पण तो एवढा वैफल्यग्रस्त होतो की त्याला स्वतःच्या मुक्तीशिवाय दुसरा मार्गच दिसत नाही.
असो, माझ्याकडे शेती अजूनही नसल्यासारखीच होती. पिढ्यानपिढ्यांचा वारसा हक्काचा कोर्टकचेरीत असलेला वाद नाना तरीच्या संकटांना माझ्या पाचवीपासून सामोरे जातोय. गेल्या वर्षापासून शुगर पेशंट असून कित्येक उद्योग केले पण अपयशच मिळालं. १८ वर्षांच्या शेती आयुष्यात महापूर, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ आदी. संकटांनाच जास्त सामोरे गेलो. कधी कधीच या शेतीला ओटीभरून देताना पाहिलं. शेतीला पूरक धंदे भरपूर केले पण यात अपयशच जास्त आहे.
शेतीच्या उत्पादनात सातत्य नसल्याने मी भरकटलो. घर गाडा शेतीचा गाडा कोर्टकचेरी मुलांचे शिक्षण सुखदुःख करण्यासाठी मी असमर्थ्य ठरलो. मी स्वतः शून्य झालो मागेही शून्य सोडून चाललो आणि दुसऱ्यांनाही म्हणजे मित्र नातेवाईक व सहकारी यांनाही शून्यच करून चाललो. मुलं, बाबा, बहिणी, भाऊजी, बायको, यांनाही शून्यच करून जातोय. माझ्या बाबाच्या भाषेत हे प्रारब्धाचे भोग आहेत. ते सर्वांना भोगावेच लागणार. ही विवादित शेतीच नको होती या विवादित शेतीमुळेच मी भरकटलो. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार नाही कामदार यांनी माझ्या मुलांचं पालकत्व कृपया स्वीकारावं. माझ्या जिवाभावाच्या मित्र नातेवाईक व्यावसायिक इतर सहकारी ज्यांनी ज्यांनी मला वेळोवेळी सामाजिक मानसिक आणि आर्थिक मदत केली प्रत्येक सुखदुःखात माझ्या अडीअडचणी माझ्यासोबत राहिले त्यांच्या उपकाराची फेड करायची होती. त्यांनाही मदत करायची होती. पण, असमर्थ ठरलो.
मी तुमच्या उपकाराची आणि मदतीची फेड करू शकलो नाही. मला माफ करा. पण ईश्वराजवळ मी तुमच्या नेहमी चांगल्याची प्रार्थना करत राहील. माझ्या बहिणी आणि भाऊजी माझे पालक होते. वडील प्रारब्ध मानतात अन् अर्धांगिनीचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. ती माझ्यापेक्षा शेतीत कष्टाला आणि नियोजनाला एक पाऊल समोरच होती. ती माझ्यासोबत नेहमीच प्रामाणिक आणि वचनबद्ध होती. माझ्या मुलांना मी कधीच वेळ देऊ शकलो नाही. मी फक्त शेतीच्या मागे पळत राहिलो. त्यांना मी पोरकं करून चाललो. कृपया मुलांचं पालकत्व मायबाप सरकार नक्कीच स्वीकारतील.
शेतीतून विक्रमी उत्पादन भेटेन फक्त हमी पाणी पाहिजे. शेती करणाऱ्यांसाठी बारमाही पाणी भेटेल तर सर्व गाडा सुरळीत चालतो. नाहीतर शेतकरी सैरभैर होऊन भरकटतो आणि कर्जबाजारी होतो. अन मग तो चुकीच्या दिशेने वाटचाल करतो. मी हमी पाण्यासाठी अन्नत्याग आमरण उपोषणही केलं होतं. माझ्या शेतीत हमी पाणी नाही तर एक साल बुडलं की पुढची काही वर्षांची घडी बसत नाही. अनेक साल बुडत राहिले तर मग पर्याय काय आहुती निश्चित आहे.
मला समजत होतं. हा निर्णय माझा सर्वस्वी आहे. कोणालाच आरोपी करू नका. मलाच आरोपी करा. कारण मी जरी माझी आहुती देत असलो हमी पाण्यासाठी तरी माझ्या बहिणीचा भाऊजीचा वडिलांचा मुलांचा भाचे भाचींचा अर्धांगिनीचा नातेवाईकांचा सासू-सासरे साले मित्र भाऊ आदी नातेवाईकांचा बळी घेऊन राहील. म्हणून माझ्यावरच कृपया गुन्हा दाखल करा.
गट नंबर 60 मध्ये माझ्या केळी पपईच्या शेतात माझा अंत्यसंस्कार करा. माझी राख आमच्या आनंद स्वामी धरणात टाका. अन् रक्षा विसर्जनाच्या दिवशीच सर्व विधी आटपून सर्वांनी कृपया आपापल्या कामाला लागावे. श्री भगवानराव मुंडे साहेब आज खरोखरच अनाथांचे नाथ आहात. उपोषणापासून आपल्याविषयी जास्त माहिती मिळाली. आपल्या घरी दोन वेळेस येणं झालं. आपण किती संसार उभे केले याचा अभिमान वाटतो.
आपणामुळेच वैभव आलं. आपली 14 गावांसाठी पाण्यासाठी तळमळ शेतकऱ्यांसाठीचा कैवार खूप आहे. आपलं योगदान खूप आहे आपले. मानावे तेवढे आभार कमीच. माझ्या बहिणी भाऊजी भाचे भाची मुलं अर्धांगिनी आई वडिलांचे आधार नक्कीच आपण बनाल. मला कायम आपल्या त्यागाविषयी अभिमान आहे. सर्वांवर पांडुरंगासारखी कृपादृष्टी असू द्या. अजून बरंच काही सांगायचं आहे पण सर्वांची माफी मागतो माझी चूक पदरात घ्या.
आपलाच काळ्या मातीचा धनी कैलास अ. नागरे.
14 गावांना पाणी मिळणं सहज शक्य आहे, पण…?
या दुर्दैवी घटनेनंतर व्याकुळ झालेले कैलास यांचे चुलत भाऊ गणेश नागरे ‘बाईमाणूस’ शी अतिशय सविस्तर बोलले. दाटून आलेल्या कंठातून ते सांगत होते, “माझा भाऊ आमच्या हक्काचं पाणी मागत होता. मग ते पाणी का नाही दिलं? ही आत्महत्या नाही. हा सरकारने केलेला खून आहे. शिवनी आरमाळच्या दहा किलोमीटरपासून एक डावा कालवा गेलाय.
रोडच्या पलीकडच्या साईडला 110 मीटर वरून तुम्ही एक नाला खोदला तर आमच्या 14 गावांना पाणी फ्री मध्ये मिळेल. माझ्या भावाची मागणी हीच होती की ते पाणी डाव्या कालव्यामार्फत आमच्या गावांना सोडा. त्यामुळे आमची धरणं भरतील आणि आमचं धरण भरल्यानंतर तेच पाणी खाली जिंतूरमध्ये असलेल्या येलदरी धरणात जाईल. यासाठी काहीही खर्च लागत नाही.
आनंद स्वामी धरण झाल्यापासून अक्षरशः आजपर्यंत त्याची कसल्याही प्रकारची डागडुजी करण्यात आलेली नाही. तीन वर्षांपूर्वी माझ्या भावाने सरकारी ऑफिसात एक तक्रार केली होती. धरणांच्या भिंतीमधून पाणी वाहत होतं. ते धरण गावाच्या वरच्या भागाला आहे. त्या धरणाच्या भिंतींवर मोठ मोठी झाड उगवली आहेत.
त्या झाडांच्या मुळांनी ती भिंत संपूर्णपणे पोखरून काढली आहे. त्या भिंतींमधून पाणी झिरपत आहे. यदाकदाचित ती जर भिंत फुटली तर इथून पुढचे पाच गावं पाण्याखाली जातील आणि गावातील नागरिकांचे मृतदेह थेट अरबी समुद्रात सापडतील, अशी भिती गणेश व्यक्त करतात.
गणेश नागरे पुढे संतापाने म्हणतात की, "हजारो कोटींच्या योजना उभ्या करण्यासाठी सरकारला काहीच वेळ लागत नाही. पण, आमच्या 110 मीटरची योजना करण्यासाठी तुम्हाला वेळ लागतोय. गेल्या अठरा वर्षांपासून विभागीय स्तरावरून राज्यस्तरावर या संदर्भातील फाईल पोहोचलेली नाही. आम्ही शेतकरी आज कष्ट करायला तयार आहेत. मग आम्ही जे मागत आहोत ते तुम्ही द्या. आम्हाला लाडकी बहीण, आनंदाचा शिधा, पीक विमा, पीएम किसान या फुकटच्या योजना नको. आम्ही तुम्हाला या मागितलेल्या नाहीत. या योजनांमार्फत तुम्ही आम्हाला भिक देताय का? आता तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास उखरून काढायला वेळ आहे. शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. पण, आता इतिहासातील मुद्दे विधानसभेत उकरून काढताय वेळ वाया का घालताय? आज जग कुठे चालले आणि कोणत्या प्रश्नांवर तुम्ही चर्चा करताय? आम्ही मीडियालाही वारंवार विनंती करतोय गेल्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्र वैतागलाय. तुमच्या प्राईम टाईममध्ये दररोज ‘खोक्या’ चालतो. पण, शेतकरी मेला तो नाही चालत. काही दिवसानंतर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे अक्षरशः ढिगारे पडतील. गडचिरोलीमध्ये ज्या पद्धतीने नक्षलवादी तयार झाले तसेच नक्षलवादी आमच्या जिल्ह्यात आमच्या भागात तयार व्हायला वेळ लागणार नाही. आता ती वेळ आम्हाला आमच्या डोळ्यासमोर दिसत आहे.” 
(कैलास नागरेचा चुलत भाऊ गणेश नागरे)
जिल्हाधिकारी म्हणतात, आत्महत्येमागे काही वैयक्तिक कारणं असू शकतात
कैलास नागरेच्या आत्महत्येनंतर राजकीय वतुर्ळात चांगलीच खळबळ उडाली होती. या सगळ्या प्रकरणावर सरकारतर्फे स्पष्टीकरण देताना बुलढाण्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील सांगतात,"त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्यातील धरणाकडेच्या झाडंझुडपांची कामं करून दिली आहेत. बंधारा दुरूस्तीची जी मागणी होती, तर त्याच्यासाठी दोन कोटी रूपयांचा निधी जानेवारी महिन्यामध्येच उपलब्ध करून दिला होता. शिवाय त्याच्या पुढील कामासाठी टेंडर देखील काढण्यात आलेलं.
त्यांची अजून एक मागणी होती की, खडकपूर्णा धरणावरून त्यांच्या गावाजवळच्या धरणाला एक स्वतंत्र कालवा करावा, तर त्याला काही कालावधी लागणार होता. त्याबाबत त्यांच्याशी चर्चाही झाली होती आणि त्याबाबत त्यांनी समाधानही व्यक्त केलं होतं. त्यामुळे प्रशासनाच्या आणि शासनाच्या उदासीन भूमिकांमुळे त्यांनी हे पाऊल उचललं असं म्हणणं योग्य नाही.
कारण एक धरण दुसऱ्या धरणाला इतक्या कमी कालावधीत कधी जोडलं जात नाही. त्याला काही कालावधी लागतोच, हे त्यांनाही माहिती होतं. आम्ही अगदी आत्तापर्यंत खडकपूर्णा धरणावरून पाणी सोडलेलं आहे. ज्या भागात ते पाणी पोहचलं, त्या भागात अनेक लोकांनी उन्हाळी पिकंही घेतली आहेत. कैलास नागरे यांच्या या निर्णयामागे त्यांची काही वैयक्तिक कारणंही असू शकतात असं म्हणत, किरण पाटील यांनी शासन आणि प्रशासनानं कैलास नागरे यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत.
केद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, खडकपूर्णा धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी युवा शेतकरी कैलास नागरे यांनी दिलेले बलीदान व्यर्थ जाऊ देणार नाही, कैलासराव हे प्रयोगशिल शेतकरी होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांची तळमळ होती, पण त्यांनी एवढे टोकाचे पाऊल उचलणे ही दुदैवी बाब आहे.
त्यांचे बलीदान व्यर्थ जाऊ देणार नाही. विदर्भ आणि बुलढाणा जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढणाऱ्या वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पाबाबत वेळोवेळी लोकसभेत प्रश्न उपस्थित करून तो मंजूर करून घेतला. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात 88 हजार 554 कोटी रुपये मंजूर केले. हा प्रकल्प झाल्यावर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार.
"ही आत्महत्या सगळ्यांच्या मनाला चटका लावून जाणारी आहे. आदर्श शेतकरी म्हणून तो गणला जातो, त्याला पुरस्कार मिळतो. परंतु निसर्गाच्या कोपामुळे किंवा पाणी न मिळाल्यामुळे त्याला आत्महत्या करावी लागते हे दुर्दैवी आहे. मात्र निसर्गावर अवलंबून असलो तरीही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शासनाला द्यावी लागतात. म्हणून सरकार नेहमीच प्रयत्नशील राहिलेलं आहे." असं मंत्री संजय शिरसाट म्हणाले.
बुलढाणा जिल्ह्याची रचना कशी आहे?
बुलढाणा जिल्ह्याच्या (https://buldhana.nic.in/) या शासकीय वेब साईटवर असलेल्या माहितीनुसार, विदर्भाच्या पश्चिम सीमेवर असलेला बुलढाणा जिल्हा अमरावती विभागात येतो. हवामान बदलाच्या गहिऱ्या संकटामुळे कधी जिल्ह्यात अतिवृष्टी होते तर उष्ण आणि कोरड्या उन्हाळ्यामुळे शेतातील पिकांचं अतोनात नुकसान होतं. मका, बाजरी, मूग, तूर, उडीद, कापूस, सोयाबीन आणि ऊस यांसारखी पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. काही भागांमध्ये फळबागही शेतकऱ्यांनी फुलवल्या आहेत.
(महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार)
उतवळी नदी, खडकपूर्णा, नळगंगा, निपाणी, पूर्णा, पैनगंगा, बाणगंगा, बोर्डी, मन, मास, वाण, विश्वगंगा, ज्ञानगंगा, आमना. या सर्व नद्या बुलढाणा जिल्ह्यात वाहतात. खडकपूर्णा प्रकल्पातून जिल्ह्यातील शेतीला पाणी पुरवलं जातं. शेतीसाठी पुरेसा पाण्याचा पुरवठा होत नसल्याने शेतकरी पाण्याच्या समस्यांना सामोरे जात आहेत. यामुळे शेतकरी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येते. गतवर्षी एकट्या बुलढाणा जिल्ह्यातील 120 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बातमी ‘लोकसत्ता’ने दिली होती.
विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक
विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. उपलब्ध माहितीनुसार, गेल्या 24 वर्षांमध्ये 49 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी अस्मानी आणि सुल्तानी संकटाचे बळी ठरत आत्महत्या केल्या आहेत.यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या पश्चिम विदर्भात झाल्या आहेत. त्यानंतर, मराठावाड्यात 12 हजार 512 शेतकऱ्याने आपल्या जीव दिला. छत्रपती संभाजीनगरमधील 948 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं आहे.
डावा कालवा संघर्ष समितीचे आंदोलन
कैलासने पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आता एक व्यापक आंदोलन सुरू झालं आहे. 14 मार्च रोजी जोपर्यंत पालकमंत्री किंवा जिल्हाधिकारी येत नाही आणि दिवंगत कैलास नागरे यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा ठोस आश्वासन देत नाही, तोपर्यंत मृतदेह शवविच्छेदानासाठी नेऊ देणार नाही, अशी भूमिका गावातील डावा कालवा संघर्ष समितीने घेतली होती.
शेतकऱ्याला शहीदाचा दर्जा मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार करण्यास गावकऱ्यांनी नकार दिला होत आणि यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर प्रक्षुब्ध नातेवाईक आणि शेतकऱ्यांची समजूत घालण्यात शासकीय यंत्रणाना अखेर यश आले आणि कैलास नागरेवर अंत्यसंस्कार झाले.
कैलास नागरेच्या रक्षा विसर्जन कार्यक्रमात त्याची बहीण स्नेहल नागरे यांनी सरकारला खडे बोल सुनावले. यात्यावेळी तिथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव व स्थानिक आमदार मनोज कायंदे यांची देखील उपस्थिती होती. ‘’माझ्या भावासमोर आत्महत्या हा शब्द वापरू नका, तर बलिदान हा शब्द वापरावा, माझ्या भावाला हे माहीत होतं की या देशात बलिदान दिल्याशिवाय काहीही होत नाही आणि म्हणून त्याने शेतकऱ्यांसाठी बलिदान दिलेलं आहे. हे राजकारणी लोक आपल्या देशाला कृषी प्रधान म्हणतात. पण देशाला कृषीप्रधान म्हणताना त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत, असं त्या म्हणाल्या.
(डावी कडून कैलास नागरेची बहीण स्नेहल नागरे-गाठीबांधे, मुलगा सार्थक आणि मुलगी स्वरा)
कैलासने पाहिलेले स्वप्न ज्या दिवशी सत्यात उतरवण्याकरता एक व्यापक आंदोलन आम्ही उभं करू शकलो आणि त्या आंदोलनाची फलश्रुती म्हणून डावा कालवा संघर्ष समितीच्या माध्यमातून 14 गावाच्या शेती शिवारात ज्या दिवशी पाणी फिरेल त्याच दिवशी खऱ्या अर्थाने कैलासला ती श्रद्धांजली ठरेल, असा ठाम निर्धार आता गावकऱ्यांनी केला आहे.
(फोटो क्रेडिट: अभिजीत तांगडे / किरण साकळे)
व्हिडिओ रिपोर्ट:
(असर आणि बाईमाणूस यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘प्रोजेक्ट धरित्री’ उपक्रमांतर्गत या विषयावरची ही एक विशेष मालिका आहे.)






