- अमोल उदगीरकर
- भारतीय सिनेमाचं व्याकरण नव्याने रचणाऱ्या ‘सत्या’ला आज २८ वर्ष पूर्ण झाली. प्रवाहातील हिंदी सिनेमातील ‘नवसिनेमा’चा ‘सत्या’ हा आरंभबिंदू होता.
- भारतीय सिनेमाला वेगळं वळण देणाऱ्या ‘सत्या’बद्दल आणि त्याचे दिग्दर्शक रामगोपाल वर्मा याबद्दल तमाम भारतीय सिनेमा रसिकांची एक कृतज्ञ भावना आहे.
- पण मग रामू नावाच्या इतक्या सर्जनशील माणसाचं अधःपतन नेमकं का झालं…? कधी सुरू झालं…? त्याची कारणं काय होती…? ‘सत्या’च्या निमित्ताने आघाडीचे सिने समीक्षक अमोल उदगीरकर यांनी घेतलेला हा आढावा…
पीयूष मिश्राने त्याच्या एका लेखात अनुराग कश्यपबद्दल ‘बुरी लत’ असा शब्दप्रयोग केला होता. पण ‘वाईट सवय’ असा शब्दशः मराठी भाषांतरित अर्थ त्याला अपेक्षित नव्हता. पीयूषचं नेमकं वाक्य असं होत, ‘अनुराग एक बुरी लत की तरह है. चाहके भी पिछा नही छुडवा सकता.’ अनुराग आणि पीयूष जेव्हा जेव्हा एकत्र काम करतात तेव्हा त्यांच्यात एखाद्या सीनवरून किंवा गाण्यावरून प्रचंड मतभेद होतात आणि त्यांचं रूपांतर अबोल्यात होतं. मग काही महिन्यांनी अबोला सुटतो आणि दोघंही पुन्हा काम करायला हजर.
‘बुरी लत’ म्हणजे तुमची एखादी टॉक्सिक सवय, ज्याचा तुम्हाला त्रास तर होतो, पण तरीही तुम्हाला ती हवीहवीशी वाटते. कारण त्यात अशी एखादी झिंगअसते जी तुम्हाला दुसरीकडे मिळत नाही. गुरुदत्तला झोपेच्या गोळ्यांची होती आणि बाल्झाकला कॉफीची होती तशी. रामगोपाल वर्मा ही अनेक चित्रपटप्रेमींची अशीच ‘बुरी लत’ आहे जी सुटता सुटत नाहीये.
रामू अतिशय वाईट काम करतोय, अनाकलनीय कॅमेरा अँगल्स लावतोय, सीनच्या मागे वाजणाऱ्या पार्श्वसंगीताचा अतिरेक करतोय, अतिशय वाईट पटकथा लिहितोय तरी त्याचे असंख्य चाहते पुन्हा नव्या आशेने तो ‘सत्या’ , ‘रंगीला’ आणि ‘कंपनी’मधील जुना रामू पुन्हा थिएटरमधल्या अंधारात भेटेल, या अपेक्षेने जातात आणि श्रीमुखात कुणीतरी खणकन भडकावल्यासारखे बाहेर येतात.
भारतीय सिनेमाचं व्याकरण नव्याने रचणारा ‘सत्या’...
भारतीय सिनेमाचं व्याकरण नव्याने रचणाऱ्या ‘सत्या’च्या पंचविशीच्या निमित्ताने मध्यंतरी ‘सत्या’च्या स्क्रिनिंग्ज निवडक ठिकाणी झाल्या. रामू नावाची बुरी लत लागलेले वेडेपीर पुन्हा थिएटरला गर्दी करायला लागले.
‘सपने मे मिलती है...’ या गाण्यावर प्रेक्षकांनी पुन्हा थिएटरात ताल धरला, चंदरच्या वाईट विनोदावर देखील ते पुन्हा खो खो हसले, भिकू म्हात्रेच्या अचानक अंगावर येऊन आदळलेल्या मृत्यूमुळे दिग्दर्शकाने आपल्याशी ‘चीटिंग’ केली आहे, अशी जी भावना मनात दाटून येते ती पुन्हा अनुभवली आणि ‘मुंबई का किंग कौन’ या संवादाने पुन्हा हरखले.

या सगळ्यांत नॉस्टेल्जिया तर होताच, पण त्या पलीकडे जाऊन भारतीय सिनेमाला वेगळं वळण देणाऱ्या सिनेमाबद्दल आणि त्याच्या दिग्दर्शनाबद्दल एक कृतज्ञ भावनाही होती.
हे सगळं बघून एरवी, आपण कसे कुणात गुंतत नाहीआणि आपल्याला कुणाशीही काहीही देणंघेणं नाही, असं सतत ठासून सांगणारा रामू पण विरघळला. अनेक वर्षांपासून आपण आपलं काम गांभीर्यानं घेत नव्हतो आणि पाट्या टाकत होतो, याची कबुली त्याने ट्विटरवर लांबलचक पोस्ट टाकून दिली.
यापुढे मी माझ्या फिल्ममेकिंगला गांभीर्यानं घेणार आहे आणि पुन्हा ‘सत्या’च्या तोडीस तोड काम करेन, असं आश्वासन पण त्याने दिलं. पण या निमित्तानं रामू नावाच्या सर्जनशील माणसाचं अधःपतन नेमकं कधी सुरू झालं आणि त्याची कारणं काय होती, याचा आढावा घेणं क्रमप्राप्त आहे.
रामूनं भारतीय सिनेमासाठी नेमकं काय केलं?
त्यानं त्याच्या सिनेमातून अनेक प्रतिभावान, पण पारंपरिक नायक-नायिकांच्या साच्यात न बसणाऱ्या अभिनेत्यांची भारतीय सिनेमातल्या स्टारसिस्टमला समांतर जाणारी फळी तयार केली. अनुराग कश्यप, श्रीराम राघवन, शिमीत अमीन, मधुर भांडारकरआणि अनेक प्रतिभावान लेखक-दिग्दर्शकांना आपल्या पंखाखाली घेतलं, ज्यांना एरवी तेव्हाच्या प्रस्थापित प्रोडक्शन हाऊसेसनी दाराशीही उभं केलं नसतं.
‘बबलगम एस्केपिझम’मध्ये अडकण्याचा धोका असलेल्या आपल्या सिनेमाला त्याने त्यावेळेस अनेक हार्ड हीटिंग विषय हाताळून पुन्हा वास्तवात आणलं. निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून त्याने गँगस्टरपट तर केलेच, पण त्याचबरोबर थ्रिलर, हॉरर, रोमान्स असे अनेक जॉनर हाताळले आणि त्यांना यथोचित न्याय देखील दिला. ‘रंगीला’सारख्या सिनेमातून नवीन फॅशन ट्रेंड्स आणले.

रहमानसारख्या संगीत दिग्दर्शकाला हिंदीत आणण्याचं श्रेय पण त्याचंच. आणि हे सगळं करत असताना तत्कालीन प्रस्थापितांना त्यानं सतत अंगावर घेतलं. त्यावेळेसच रामूचं एक विधान फार गाजलं होतं. ‘यशराज आणि धर्मा प्रोडक्शन्स जर ट्वीन टॉवर्स असतील, तर मी ओसामा बिन लादेन आहे.’ हे विधान बरंच थेट असलं तरी रामूच्या अंगभूत आत्मघातीपणाची चुणूक दाखवणारं होतं.
रामू नावाच्या सर्जनशील माणसाचं अधःपतन नेमकं कधी सुरू झालं?
सन २००७ मध्ये आलेला ‘रामगोपाल वर्मा की आग’ हा सिनेमा रामूचं स्टॅलिनग्राड/ वॉटर्लू होता. नवीन काळातला ‘शोले’ पुन्हा बनवण्याचं शिवधनुष्य रामूला मुळीच पेलवलं नाही. सिनेमा बॉक्सऑफिसवर फ्लॉप झाला यापेक्षा रामू पण एवढा वाईट सिनेमा तयार करू शकतो, हा धक्का जास्त मोठा होता. रामूचं शेवटचं उत्तम काम सन २०२०मध्ये आलेले ‘रक्त चरित्र’ सिनेमाचे दोन भाग आहेत असं मानलं जातं.
पॉवरच्या राजकारणाची उत्तम जाणकार असणारा आणि हिंसाचाराचं मानसशास्त्र आकळलेला रामू मला तरी यात सगळ्यांत शेवटी दिसलेला. नंतर मात्र सतत उतरती भाजणी आहे. रामूनं ‘सत्या २’, ‘शिवा’ (जुना ‘शिवा’ वेगळा), ‘डिपार्टमेंट’ असे एकाहून एक फ्लॉप आणि वाईट सिनेमे द्यायला सुरुवात केली. रामूसोबत काम करणारे त्याचे प्रतिभावंत सहाय्यक एक एक करून त्याला सोडून जायला लागले.
रामू आता स्वतःच्याच प्रतिमेच्या प्रेमात पडला होता. सातत्यानं फ्लॉप सिनेमे देऊन देऊन रामूवर कर्जाचा डोंगर निर्माण झाला. कर्जफेडीसाठी रामूवर सातत्यानं प्रचंड दबाव यायला लागला.

दोनेक वर्षांपूर्वी अंधेरीतील न्यायालयाने एका कर्ज प्रकरणात धनादेश न वटल्याने रामूला तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या सगळ्याचा दबाव असह्य होऊन शेवटी एके दिवशी आपल्या ‘फॅक्ट्री’ला टाळं लावून रामू हैदराबादला निघून गेला. ज्या रामूच्या ऑफिसमध्ये संघर्षरत अभिनेते, लेखक, पटकथाकार यांचा सतत राबता असायचा ते ऑफिस एका रात्रीत निर्मनुष्य झालं.
रामूनं मुंबई सोडून जाणं हा त्याच्या कारकिर्दीला वेगळं वळण देणारा प्रसंग होता. मुंबईत त्याला समजून घेणारी, त्याला ताळ्यावर ठेवणारी - हाताच्या बोटावर मावतील इतकी का होईना - माणसं होती. हैदराबादला गेल्यावर रामू चौखूर उधळलाच. सिनेमा बनवण्याला वेळ देण्यापेक्षा त्याने सोशल मीडियावर जास्तीत जास्त वेळ घालवायला सुरुवात केली. रामूनं आपल्या कारकिर्दीतील सर्वांत वाईट काम हैदराबादमध्ये असताना केलं आहे.
सोशल मीडियाचा भारतात उदय आणि रामूचं अधःपतन
भारतात सोशल मीडियाचा उदय एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकाच्या उत्तरार्धात झाला. सन २०१२ पर्यंत सोशल मीडियाचा प्रसार सर्वदूर झाला. रामूच्या अधःपतनाची सुरुवात होण्याचा काळ पण हाच आहे, हा योगायोग नसावा.
कुठलीही गोष्ट झोकून करणारा रामू सोशल मीडियावर निव्वळ ‘सुटला’. सोशल मीडियावर स्त्रियांविषयक, धर्मविषयक, देवांविषयी, इतर निर्मात्यांविषयी, अभिनेत्यांविषयी सतत वादग्रस्त विधानं करण्याचा नाद त्याला जडला. हळूहळू प्रसारमाध्यमांत रामूच्या सिनेमाच्या कमी, आणि त्याच्या वादग्रस्त ट्विटच्या बातम्या जास्त येऊ लागल्या. नंतर नंतर तर रामू सोशल मीडियावरच्या आयुष्याला प्रत्यक्षातील आयुष्यापेक्षा जास्त गांभीर्यानं घेऊ लागला असावा.
त्यानं नवोदित अभिनेत्रींसोबतचे चारचौघांत बघण्याची सोय नसलेले व्हिडीओ सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली. आपल्या सिनेमातून लोकांचं प्रचंड प्रेम मिळवणाऱ्या दिग्दर्शकाला देखील समाजमाध्यमांवरच्या इन्स्टंट प्रतिक्रियांचं एवढं आकर्षण का वाटलं असेल? सोशल मीडिया हा रामूचं ‘अकिलीज हिल’ ठरला. पण त्यातही एक गंमत आहे.
ट्विटरवर सतत वादग्रस्त पोस्ट टाकणारा रामू वेगळा आहे आणि त्याच्या ऑफिशियल यूट्युब चॅनलवरचा रामू खूप वेगळा आहे. त्याच्या यूट्युब चॅनलवर रामू वेगवेगळ्या इझम्सवर बोलतो, अध्यात्मावर बोलतो, माणसांच्या गुंतागुंतीच्या मनोव्यापारावर बोलतो, चित्रपटांच्या सद्यःस्थितीवर बोलतो, आणि हे त्याचं बोलणं खूप मूलभूत आणि मुद्द्याला धरून असतं. यूट्युबवरचा रामू हा सुलझा हुआ धीरगंभीर आहे. अजूनही त्याच्याकडून अपेक्षा ठेवाव्यात अशी आशा देणारा आहे.

रामूला असणारं आंध्र प्रदेश आणि तेलंगणच्या राजकारणाचं प्रचंड आकर्षण हे त्याच्या अधोगतीचं आणखी एक कारण. मुंबईत राहत असताना त्याला असंच कौतुकमिश्रित आकर्षण बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि शिवसेनेबद्दल होतं. त्याच्या ‘सरकार’ त्रयीतल्या सिनेमात या आकर्षणाचे संदर्भ कधी कधी थेट, तर कधी कधी लपून छपून येतात.
एकूणच हातात प्रचंड ताकद असलेल्या लोकांचं रामूला वाटणारं आकर्षण रामूच्या सिनेमात ओसंडून वाहत राहतं.रामूला चंद्राबाबू नायडू, चिरंजीवी आणि पवन कल्याण यांच्या राजकारणाबद्दल काहीशी अढी आहे. पण ‘सरकार’सारखा उत्तम सिनेमा देणाऱ्या रामूनं तिकडे राजकारणावर आधारित वाईट सिनेमे बनवण्याचा उच्चांक गाठला आहे.
आंध्रचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांच्या दुसऱ्या वादग्रस्त लग्नावर एक अतिशय वाईट सिनेमा त्याने बनवला. कळस म्हणजे पवन कल्याण, चिरंजीवी आणि चंद्राबाबू नायडू यांचे डुप्लिकेट्स घेऊन त्याने काही राजकीय कॉन्स्पियरन्सी मांडणारे सिनेमे तयार केले. ते सर्वच आघाड्यांवर फसले; कारण सर्जनशील व्यक्ती म्हणून रामूने त्यात तळ गाठलेला होता. एकेकाळी उत्तमोत्तम सिनेमा देणाऱ्या रामूला ‘रामगढ के शोले’ झोनमध्ये जाताना पाहणं वेदनादायक होतं.
मुझे छोड दो मेरे हाल पे, जिंदा हू यार काफी है...
रामूनं आगामी ढिगभर प्रोजेक्टसची जी घोषणा करून ठेवली आहे त्या सिनेमांची शीर्षकं जरी बघितली तरी रामूचं पुनरागमन प्रकरण किती अवघड आहे हे लक्षात येईल. ‘अर्णब-द न्यूज प्रॉस्टिट्यूट’, ‘किडनॅपिंग ऑफ कॅटरिना कैफ’, ‘द मॅन हू किल्ड गांधी’ आणि ‘थाईज अँड गन्स’. काय वाटतंय? याच्यापेक्षा वाईट अजून काय असू शकतं?
महेश भट्टचं एक फार सुंदर वाक्य आहे. मुळातच हिंदीमधून वाचण्यासारखं. ‘हर किसी के अंदर बिजली का एक नंगा तार झूल रहा होता है. कुछ कमनसीब उसको छू बैठते हैं और भयानक झटके से मर जाते हैं.’ आत्मघाती असण्याची इतकी चांगली व्याख्या अजून दुसरी नसेल. रामूनं त्याच्या आत असलेली लोंबकळणारी विजेची तार हातात घेतली होती आणि तो त्या तारेसोबत मनोसक्तपणे खेळला. आता रामूला पश्चातबुद्धी झाली आहे; पण याला फार उशीर तर झाला नसेल?
काळ बदलला आहे. फिल्मइंडस्ट्री बदलली आहे. सिनेमाचा प्रेक्षकही बदलला आहे.रामू तरी कुठं पहिल्यासारखा राहिला आहे? त्याचं पण तर वय झालं आहे. रामूला खरंच पुनरागमन करण्यात रस आहे का, हा पण कळीचा प्रश्न आहे. अनुराग कश्यप हा भारद्वाज रंगनला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या एकेकाळच्या या गुरूबद्दल जे बोलला होता तेच खरं असावं असं कधी कधी वाटतं.
अनुराग म्हणाला होता की, रामूला आयुष्यात ज्या प्रकारच्या फिल्मस बनवायच्या होत्या त्या त्याने बनवल्या. आयुष्यात जे जे करायचं ते केलं. आता रामूला कशाचीच फिकीर नाहीये. तो फक्त स्वतःचं आयुष्य एन्जॉय करतोय. हे जर सत्य असेल तर ते पचवल्यावर विक्रमादित्य मोटवानेच्या ‘लुटेरा’ सिनेमातल्या गाण्याच्या पुढील ओळी आठवतात...
मुझे छोड दो मेरे हाल पे
जिंदा हू यार काफी है...
रामूच्या सिनेमावर पिंड पोसलेल्या त्याच्या चाहत्यांनी, रामूवर अफाट प्रेम करणाऱ्या लोकांनी रामूला त्याच्या ‘हाल पे’ सोडून द्यायला पाहिजे, कुठल्याही अपेक्षा न ठेवता.रामूने त्याच्या सिनेमातून केलेल्या उपकारांची याच्याहून उत्तम परतफेड आणखी कुठली असेल?
(सौजन्य - amoludgirkar09.blogspot.com)






