प्रशांत पवार
- सोनू निगम म्हणतो, गाण्यामध्ये अल्ला, मौला असे शब्द टाकून सुफी संगीत बनत नसतं, सुफी सगीत नावाचा काही प्रकारच नाहीये.
- वास्तविक सूफी कल्चर म्हणजे बंडखोरी, रोमॅण्टिसिझम आणि अध्यात्माचा एक अद्वितीय मिलाफ. सूफी हे संगीत नसून ती एक विचारधारा आहे.
- जगभराचे संस्कार पचवत बंडखोर बनलेले हे सूफियाना कल्चर आज जगभरात पसरलेले असले तरी ते खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक भारतीय संस्कृतीचे प्रतीक बनले आहे.
‘’देखिए तब तक सूफी-फूफी तो आया नहीं था कुछ भी। ये फूफी जो आया ना, ये आया है 2000 के बाद में फूफी। उसके पहले ये फूफी था ही नहीं। सूफी तो म्यूजिक होता ही नहीं, सूफी तो थॉट (विचार) होता है। अब ये चल गया गया सूफी म्यूजिक, सूफी म्यूजिक। सिर्फ किसी गाने में अल्लाह, मौला डालकर सूफी नहीं बनता वो।’’
सूफी संगीताबद्दलचा सोनू निगमचा एक व्हिडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात सोनू म्हणतो की, सुफी असं काही संगीतच नाही. जरी हा व्हिडियो जुना असला तरी त्यावर सोशल मीडियामध्ये आता घमासान युद्ध सुरू झालयं.
याच पार्श्वभूमीवर सूफी म्हणजे काय आणि सोनू निगम म्हणतो त्याप्रमाणे खरचं सूफी असं काही संगीत नसतं का, याचा घेतलेला हा आढावा…
जुल्फे उलझाये तो दुनिया परेशान हो,
जुल्फे सुलझाये तो ये झिस्त आसां हो
जुल्फ जंजीर है फिर भी कितनी हसीं,
रेशमी रेशमी अंबरी अंबरी
नुसरत फतेह अली खानमुळे सूफीच्या जन्मखुणा मिळाल्या. या सूफीमुळे सुरांचे भान नाही की ते बेभान आहेत, हे सांगणे कठीण ठरू लागले. ‘मैने काबे का हज कर के देख लिया’ असे म्हणत सहाशे वर्षांच्या इतिहासाचा भूगोल बदलायला लागला. ‘तेरा तुझ को सोप दे, क्या लागत हे मोर... मेरा मुझ मे नहीं जो हावत सो तोर’ असे म्हणत परमेश्वराला सिंहासनावरून खाली खेचून काळजात खोचायला सुरुवात झाली.

पीर, थडगे, उद्ध्वस्त फकिराचा दर्गा... ऐकावे ते नवलच! सूफी, हृदयाला गोंदवावे, आत्म्याला पिंजून काढावे, वैराण फासळ्यांना अज्ञाताचे आव्हान करावे... इतका का परमेश्वर जवळ असतो सुरांच्या? कंठाळ कोरस जाऊन ड्रम्सच्या बीट्स आल्या, इकताराऐवजी इलेक्ट्रॉनिक गिटार आले, रागातून सरगम आले. पण प्रार्थनांची मग्नता कशानेही मोडली नाही. डोळे उघडायचे तरी कशाला... ‘नैनों को तो डसने का चस्का लगा रे।’ आतल्या आतच उघडतात आणि मिटतात ऐहिक डोळे. आतल्या आतच होतात दिव्यत्वाचे साक्षात्कार.
सूफी म्हणजे बंडखोरी, रोमॅण्टिसिझम आणि अध्यात्माचा एक अद्वितीय मिलाफ
सूफी कल्चर म्हणजे बंडखोरी, रोमॅण्टिसिझम आणि अध्यात्माचा एक अद्वितीय मिलाफ. तत्त्वज्ञानातील चिरतरुण कलंदराचा हा कारवाँ. अधिक सोपे करून सांगायचे झाले तर सूफीच्या उगमाकडे जावे लागेल. सूफी हे संगीत नसून ती एक विचारधारा आहे. सूफी विचारधारा ही इस्लाम धर्माचा एक थोडासा वेगळा असलेला भाग. मुख्य मुस्लिम धर्म तसेच सूफी विचारधारा दोन्ही मान्य करतात की, माणूस देवाकडे पोहोचण्याच्या मार्गात आहे. फरक इतकाच की, मुख्य मुस्लिम धर्मात असे मानले जाते की मानवाचे देवाशी मिलन हे मृत्यूनंतरच होऊ शकते, तर सूफी विचारधारेनुसार हे मिलन जिवंतपणीही शक्य आहे आणि या अशा देवापर्यंत पोहोचण्याच्या अनेक मार्गापैंकी सूफी संगीत, कव्वाली हे एक साधन आहे.
सूफी परंपरा मानते, की प्रेषित महंमद पैगंबरांना देवाचा साक्षात्कार दोन प्रकारे झाला. त्या साक्षात्काराचे स्वरूप म्हणजे सर्वांसाठीचे कुराण आणि दुसरे समाधी अवस्थेतून झालेले ज्ञान म्हणजेच सूफी परंपरा... प्रेमभावनेने ओथंबलेला आत्मा स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगीच्याही पुढे जाऊन ईश्वराशी एकरूप होतो. संसारातून विरक्त होऊन सगळी ऊर्जा ईश्वराशी जोडून एका उंचीवर पोहोचलेला जीव म्हणजेच सूफी अवलिया…

संगीताची घृणा करणारा औरंगजेब हा प्रातिनिधिक मुसलमान आहे, हे त्यामुळे आपसूकच खोटं ठरतं. जिथे रोज मशीनगन, हेलिकॉप्टर, गोळ्या-बंदुकांचे आवाज, बॉम्बस्फोटांचे, त्यानंतरच्या आर्त किंकाळ्यांचे, बांगड्या फुटण्याचे, रडण्याचे आवाज वाढत आहेत; त्या इस्लामी देशात संगीत, गाणे वगैरेंचा काडीमात्रही संबंध नसावा, असा सर्वसामान्यांचा समज त्यामुळेच खोटा ठरतो. हा समज खोटा ठरवतो रुहानी आनंदाचा अनुभव देणारे सूफी संगीत.
जगभराचे संस्कार पचवत बंडखोर बनलेले हे सूफियाना कल्चर आज जगभरात पसरलेले असले तरी ते खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक भारतीय संस्कृतीचे प्रतीक बनले आहे. माहीम दर्ग्यापासून ते अजमेर गरीब नवाजपर्यंत, तबल्यापासून कव्वालीपर्यंत आणि लुंगीपासून जिलेबीपर्यंत भारतीयांवरचा मुस्लिम प्रभाव हा कट्टर आक्रमकांचा नसून प्रेमाचा संदेश देणाऱ्या सूफी संतांचा आहे. कारण त्यांचे कल्चर, तत्त्वज्ञान या मातीतले आहे. त्यांची भाषा वेगळी असेल, शब्द वेगळे असतील, पण त्यांनी मांडलेले तत्त्वज्ञान भारतीय तत्त्वज्ञानापेक्षा वेगळे नाही.
नवव्या ते अकराव्या शतकाच्या दरम्यान हे तत्त्वज्ञान अधिक बंडखोर झाले, असे म्हटल्यास फारसे चुकीचे ठरणार नाही. या संप्रदायात द्वेत-अद्वैताची खुली चर्चा सुरू झाली. भक्तीचा थेट प्रभाव दिसू लागला. गुरुपंरपरा आली. कर्मठांना मंजूर नसलेले संतांचे पूजन सुरू झाले. त्यांचे दर्गे उभे राहिले. त्या दर्ग्यांवर हिंदू-मुस्लिम असा भेदभाव नव्हता. मधुराभक्तीप्रमाणेच देवाला प्रियकर मानून विनवणी आली. त्याही पुढे जात, भक्तीला मदिरा समजून आणि गुरुला मदिरा पाजणारा समजून काव्य लिहिली गेली. शायरांच्या प्रतिभेला बहर आला. नवे आर्त संगीत जन्माला आले.
‘इश्क’पासून ‘फनाह’पर्यंत आजची सगळी प्रेमाची टर्मिनॉलॉजी सूफी परंपरेचीच आहे. सूफींनी नमाजादी विचारांना टाळले नाही. मात्र नमाज पढण्यापेक्षा दानधर्मात अधिक पुण्य आहे, हे सांगितले. तत्कालीन संतपरंपरेप्रमाणेच नामस्मरणाला अधिक महत्त्व दिले. ध्यानाच्याही मार्गावर चालण्याचा आग्रह झाला. नाथ संप्रदायाच्या प्रभावामुळे गूढ आणि तांत्रिक मार्गही दूर राहिला नाही. विशेषत: रसुलशाही, कलंदरी यांसारख्या काही पंथांनी तर उघड बंडखोरी केली. त्यांनी तर मादक व्यसनांनाही आपले मानले आणि यातूनच एक फकिरी तत्त्वज्ञान वाढत गेले.
सूफीचा जनक म्हणजे मोइनुद्दीन हसन चिश्ती…
सूफीचा जनक म्हणजे मोइनुद्दीन हसन चिश्ती. मूळच्या सिजिस्तान (पूर्व इराण आणि पश्चिम अफगाणिस्तान) या भागात जन्मलेला आणि वाढलेला हा ख्वाजा पुढे दिल्लीला आला आणि त्याच्या ज्ञानी प्रवचनांनी कीर्तिमान झाला. हा काळ साधारपणे 1143 ते 1234 असा होता. त्याच्या अखेरच्या काळात तो राजस्थानातील अजमेर येथे स्थायिक झाला. त्याचा दर्गा सर्वधर्मीय श्रद्धास्थान म्हणून आजही परिचित आहे. याच कालावधीत इराणच्या चिश्ती या सूफी पंथातील एक संत अमीर खुस्रो हादेखील भारतात आला आणि त्याने भारतीय संगीत व सूफी संगीत यांचा मिलाफ घडवून कव्वाली हा कलाप्रकार जन्माला घातला. सूफी संत सलीम चिश्तीच्या महान तत्त्वज्ञानातून सम्राट अकबरने समन्वयाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे जीवन म्हणजे सूफी परंपरेचे मूर्तिमंत रूप होते.
शहाजीराजेंचे नावही एका सूफी संतांच्याच नावावरून ठेवण्यात आले होते, तर शिवरायांना नक्की भेटलेले त्यांचे एक गुरू म्हणून कोकणातील केळशीचे बाबा याकूत हेही सूफी होते. यावरून भारतीयांवरच्या सूफींच्या एकूण प्रभावाची कल्पना येऊ शकते. पाकिस्तान, अफगाणिस्तानमधील कर्मठ मुस्लिमांनी सूफी विचारधारेवर बंदी आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. आपल्याकडेही कर्मठ हिंदुत्ववाद्यांनी तोच कित्ता गिरविण्याचा प्रयत्न केला. मात्र हिंदु-मुस्लिम ऐक्यासाठी सूफी विचारधारा किती महत्त्वाची आहे, याचा मात्र कोणीच विचार करत नाही, ही खरोखरच चिंतेची बाब आहे.

इतिहासातून वर्तमानाकडे वळताना आज असे दिसून येते की, मौला, सजदा, ख्वाजा, बुल्लेशाहा या शब्दांशी आपण आता खूपच एकरूप झालो आहोत. मधल्या काळात गायब झालेले सूफी संगीत नुसरत फतेह अली खान, अबीदा परवीन यांच्यामुळे आज भारतात प्रचंड लोकप्रिय झाले. गाण्याचा कोणताही रिअॅलिटी शो पाहा, अगदी दहा वर्षांचा चिमुरडाही सूफीच गात असतो. बॉलीवूडमध्ये आज एकही असा संगीतकार नाही, ज्याने सूफी गाण्याचे कंपोझिशन केलेले नाही. ए. आर. रेहमान तर त्यात सर्वात पुढे आहे. अगदी गझलगायक जगजीत सिंग यांच्याच शब्दांत मांडायचे झाले तर ‘मी सूफी गातो’ असे सांगणारे आज इंडस्ट्रीत अनेक गायक पैदा झाले आहेत. सूफी संगीत असा संगीताचा कोणताही प्रकार नाही. सूफी ही जीवन, देवाबद्दलची विचारसरणी आहे. ती लेखनातून व्यक्त झालेली आहे. पण, संगीतातही हा शब्द वापरून लोकांना मूर्ख बनवले जाते. केस, दाढी वाढवून, फाटके कपडे घालून गायले म्हणजे झाले सूफी संगीत, असे या लोकांना वाटते.
केस, दाढी वाढवून, फाटके कपडे घालून गायले म्हणजे झाले सूफी संगीत
70-८0च्या दशकात गझल गायकीचे पीक आले होते, तसेच काहीसे आता सूफी गाण्यांच्या बाबतीत झाले आहे. अनेक ठिकाणी सूफी नाइट्स, सूफी फेस्टिव्हल्स होऊ लागले आहेत. इतकेच काय, तर लग्नसमारंभातही कोपऱ्यातल्या एका स्टेजवर सूफी गाण्यांचे कार्यक्रम होताना दिसत आहेत. सूफी विचारधारेचा अशा पद्धतीने बाजार मांडलेला पाहून अनेक अस्सल सूफी कलावंतांनी नाराजी प्रकट केली आहे. लग्नसमारंभात किंवा तीन तासाच्या सूफी नाइटमध्ये तुम्ही ईश्वराशी कसे काय एकरूप होणार, असा सवाल त्यांनी केला आहे.
महेश बाबू हे सूफी विचारधारेचे एक मोठे अभ्यासक. ते म्हणतात, सूफी संगीत हे सामान्य लोकांना आवडायला लागलंय, कारण ते थेट हृदयाला जाऊन भिडतं. ख्याल गायकीप्रमाणे सूफी संगीत समजायला फारसे कठीण जात नाही. लोकांना सतत काहीतरी वेगळे हवे असते आणि जर संगीताला अध्यात्माची जोड दिली तर ते का नाही जोर पकडणार?
ही सगळी मेहरबानी बॉलीवूडची आहे. त्यातही मुख्यत: महेश भटसारखे संगीताचा उत्तम कान असलेल्या निर्माता-दिग्दर्शकांनी सूफी संगीताला लोकप्रियता मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला आहे. अस्सल सूफियाना अंदाज या सगळ्या बाजारीकरणामुळे लांब पडत जाण्याची भीती जरी निर्माण झाली असली तरी राहत फतेह अली खान, अबीदा परवीन, कैलाश खेर, ए. आर. रेहमान आणि सध्या तुफान लोकप्रिय ठरत असलेला कोक स्टुडियो यांच्यासारखे अनेक जण अस्सल सूफी परंपरा जिवंत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत, हे काय कमी आहे?






