अभिजीत तांगडे
- तमाशा क्षेत्रातील महान वगसम्राट काळू-बाळू यांची आज जयंती… उपजत असलेली विनोद बुद्धी, निसर्गाने दिलेली जुळ्या भावंडांची किमया याचा योग्य वापर करत संपूर्ण महाराष्ट्राला काळू-बाळूंनी भारावून टाकले होते.
- आजघडीला जवळपास सगळे तमाशा फड मालक कर्जबाजारी असताना काळू-बाळू यांच्या तमाशाचा फड कधीही कर्जाच्या विळख्यात सापडला नाही हे विशेष. याचे कारण म्हणजे इतर तमाशा फडांप्रमाणे त्यांनी कधीही बडेजाव केला नाही.
- दादा कोंडके हे काळू-बाळू यांचे मोठे ‘फॅन’ होते. मुंबईला काळृ-बाळूंचा प्रयोग असला की दादा कोंडके दररोज तिकीट काढून त्यांच्या प्रयोगाला जाऊन बसायचे.
किस्सा तसा फारच जुना… शिवा-संभा कौलापूरकर यांचा तमाशा त्या वेळी फारच लोकप्रिय होता. कोल्हापूरमध्ये त्यांच्या तमाशाचा खेळ रंगला असताना राजर्षी शाहू महाराज तमाशा पाहायला आले. महाराज आल्याबरोबर तमाशाच्या कनातीमधले सगळे प्रेक्षक, तमाशातील कलाकार त्यांना वाकून नमस्कार करायला लागले. संभा त्या वेळी राजा विक्रमादित्याची भूमिका साकारत होता. त्याने मात्र शाहू महाराजांना नमस्कार केला नाही. लोकांना खूपच आश्चर्य वाटले आणि रागही आला.
वग संपल्यानंतर शाहू महाराज कलाकारांना भेटायला गेले आणि संभाने लगेच त्यांना वाकून नमस्कार केला आणि दिलगिरी व्यक्त केली. संभा म्हणाला की,
‘’महाराज, माफ करा. तुम्ही आल्याबरोबर नमस्कार केला नाही. कारण मी त्या वेळी राजाची भूमिका करत होतो आणि तुम्हाला नमस्कार केला असता तर राजाचा अपमान झाला असता.’’
संभाचे हे उत्तर ऐकताच शाहू महाराज प्रचंड खुश झाले आणि पाठीवर शाबासकी दिली. आपल्या भूमिकेशी, तत्त्वांशी इतके प्रामाणिक असलेले कलाकार म्हणजे शिवा-संभा कौलापूरकर आणि त्यांचा तमाशाचा वारसा तितक्याच समर्थपणे पुढे नेणारे काळू-बाळू ही त्यांची पुढची पिढी.

काळू म्हणजे लहू संभाजी खाडे तर बाळू म्हणजे अंकुश संभाजी खाडे
आयुष्यात बराच खस्ता खाऊनही उभ्या महाराष्ट्राला पोट धरून हसायला लावणारी सोंगाड्यांची जोडी म्हणजे काळू-बाळू. खरे नाव लहू आणि अंकुश खाडे. हे दोघे जुळे भाऊ. त्यांच्या जन्माची पण एक भन्नाट कथा आहे. त्याचं झालं असं की, सांगलीतील कवलापूरमध्ये एका महिलेचे बाळंतपण घरीच सुरु होते. त्यावेळी गावाकडे फारशी आरोग्य सुविधा उपलब्ध नसायची नाही, त्यामुळे गावातल्या एका वयोवृद्ध सुईणीकडूनच बायकांची बाळंतपणं व्हायची. सुईणबाईंनी बाळंतपण अगदी व्यवस्थित केलं. त्या महिलेला एक मुलगा झाला. सुईनबाई त्या महिलेची वार साफ करून उकिरड्यात पुरायला गेल्या. तेव्हा सुईणीला त्या वारेत हालचाल जाणवली. आणि त्या महिलेच्या दुसऱ्या बाळाचे अस्तित्व उकिरड्यात लक्षात आले. या महिलेची ही राम लक्ष्मणाची जोडी म्हणजे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा कलावंत. काळू आणि बाळू दोन जुळे भाऊ.
शिवा-संभा कवलापूरकरपैकी संभाची ही दोन मुले. आज २०० वर्षांची तमाशाची परंपरा या कवलारकर घराण्याने जोपासली आहे. सातू हिरू हा या घराण्याचा मूळ पुरुष. त्यांचा तमाशा पुढे शिवा-संभा यांनी चालवला आणि पुढे काळू-बाळूने सबंध महाराष्ट्रात नाव कमावले. बालगंधर्व एकदा त्यांचा तमाशा पाहायला गेले होते आणि त्या वेळी त्यांनी तमाशात हार्मोनियम वापरण्याची सूचना केली. तेव्हापासून तमाशात हार्मोनियमची पद्धत सुरू झाली.
सांगली जिह्यातील कवलापूरकर गावात पूर्वाश्रमीच्या महार जातीत १६ मे १९३३ रोजी काळू-बाळूंचा जन्म झाला. दोघेही दिसायला इतके हुबेहूब की त्यांच्या चेहऱ्याची ठेवण, त्यांचा रंग, केसांची रचना, दंतपंक्ती, चष्म्याची फ्रेम, उंची सगळेच सारखे. त्यामुळे अनेकांची तर पंचाईत व्हायचीच, परंतु त्यांच्या बायकांची पंचाईत तर जास्तच व्हायची. तमाशात याच गोष्टीचा फायदा उचलत काळू-बाळू यांनी धमाल उडवून दिली होती.
त्यांची अनेक वगनाट्ये गाजली. त्यात प्रामुख्याने जहरी प्याला, राजा हरिश्चंद्र, रक्ताने रंगली दिवाळी, इंडियन पिनल कोड कलम ३०२, शेराला भेटला सव्वाशेर यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. आपल्या ५२ वर्षांच्या रंगमंचावरच्या वास्तव्यात जिवंत हाडाचा सैतान, कोर्टात मला नेऊ नका, काळसर्पाचा विषारी विळखा, कथा ही दोन प्रेमिकांची, इंदिरा काय भानगड, रक्तात न्हाली अब्रू, इश्क पाखरू आदी वगनाट्येही चांगलीच गाजली होती. वगनाट्यांबरोबरच काळू-बाळू यांच्या ऑडिओ कॅसेटलाही रसिकांनी भरभरून दाद दिली. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर इंग्लंड आणि अमेरिकेतही त्यांच्या कॅसेट लोकप्रिय झाल्या होत्या.
वडिलांच्या निधनानंतर बंद पडलेला तमाशा मोठ्या जिद्दीने उभा केला
वयाच्या पाचव्या वर्षीच वडिलांचे छत्र हरपले. शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत झालेले. तमाशा डबघाईला आलेला…अशा भीषण परिस्थितीत गरिबीचा सामना करत काळू-बाळू वाढत गेले. मात्र काही झाले तरी घराण्याने नावारूपाला आणलेला तमाशा बंद होऊ द्यायचा नाही असा निर्धार त्यांनी लहानपणापासूनच केला होता. शिवा-संभाचा तमाशा त्या काळी वर्तमान काळातील घडामोडींवर भाष्य करणारा एकमेव तमाशा होता. सामाजिक समस्यांना वाचा फोडणारा हा तमाशा संभाजी खाडे अचानक निधन पावल्याने मोडकळीस आला. पुढे तमाशाचा फड कसा चालवायचा हा पेच निर्माण झाला.
तमाशा बंद पडण्याच्या मार्गावर असताना गावातील लोकांच्या मार्गदर्शनामुळे शिवाने तमाशाचा बोर्ड उभा केला. काळू-बाळू १५-१६ वर्षांचे असताना वडिलांची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी तमाशा सुरू करायचा असा निश्चय केला. चुलती दुर्गाबाईंच्या मदतीने तमाशा उभा करण्याचा प्रयत्न सुरू केला. हलगी, ढोलकी, झांज, तुणतुणे ही वाद्ये आणि वेशभूषा घेण्यासाठी जनावरांसाठी आणलेले वैरण विकून काळू-बाळूला दुर्गाबाईंनीनी मदत केली. कवलापुरातील मुले एकत्र करून तमाशाच्या तालमी सुरू केल्या. आणि त्यांच्या या कष्टाला यश आले. तमाशाचा फड उभे करणे सोपे काम नाही. पण हे आव्हान त्यांनी जिद्दीने पेलले. अशा लोकांच्या मग कथा होऊ न जातात इतकी त्यांची कामगिरी सुंदर बनत जाते.
खरंतर तमाशाचा आत्मा म्हणजे सोंगाड्या सरदार आणि नाच्या. यांच्याशिवाय तमाशा पूर्णच होत नसे. तमाशात काम करणारी माणसे तर मिळाली, पण नाच्या आणि नाचे काही मिळेना, तेव्हा बाळूने तमाशात नाचकाम करण्याचा निर्णय घेतला. कागलवाडी येथील शकुंतला या जोगतीणीची मुलगी नायकीण म्हणून मिळाली. शकुंतलेबरोबर काळू-बाळूचा तमाशा उभा राहिला. पुढे शामराव, रामराव, धृपदा, मारूती, भीमराव हे कलावंत काळू-बाळूला येऊन मिळाले. काळू-बाळूने तमाशाची बांधणी एकदम जबरदस्त केली होती. सामाजिक भान असलेला तमाशा कलावंत भाऊ फक्कड यांनी लिहिलेला प्रेमाची फाशी हा वग सादर करायचा ठरवला. शामरावाने सूत्र हाती घेऊन सर्व कलावंतांना कथानक समजावून सांगितले. पात्रांची वाटणी केली आणि काळू-बाळूचा पहिला वग तमाशाच्या बोर्डावर उभा राहिला.
काळू-बाळूंचे दादा कोंडके मोठे फॅन
दादा कोंडके हे काळू-बाळू यांचे मोठे ‘फॅन’ होते. मुंबईला काळृ-बाळूंचा प्रयोग असला की दादा कोंडके दररोज तिकीट काढून त्यांच्या प्रयोगाला जाऊन बसायचे. इतका मोठा कलावंत दररोज येतो हे पाहून काळू-बाळू खूपच ओशाळायचे. मात्र तुमच्याकडून मला बरेच काही शिकायला मिळत आहे, असे जेव्हा दादा कोंडके सांगायचे तेव्हा काळू-बाळूंना स्फुरण चढायचे. दिसण्यात कमालीचे साधर्म्य हेच काळू-बाळू यांच्या अभिनयाचे खास वैशिष्ट्य असायचे. ‘जहरी प्याला’ या वगात दोघेही शिपायाची भूमिका करायचे आणि त्यात त्यांची नावे काळू-बाळू अशी होती. तेव्हापासूनच लहू-अंकुश खाडे या नावाऐवजी त्यांना काळू-बाळू कौलापूरकर या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांच्या विनोदाची एक स्वतंत्र अशी बैठक होती. वगनाट्यात जोडगळीचा एकसूत्रीपणा दिसत असल्यामुळे लोकांना आनंद मिळायचा.

कधीच कर्जबाजारी झाले नाहीत…
आजघडीला जवळपास सगळे तमाशा फड मालक कर्जबाजारी असताना काळू-बाळू यांच्या तमाशाचा फड कधीही कर्जाच्या विळख्यात सापडला नाही हे विशेष. याचे कारण म्हणजे इतर तमाशा फडांप्रमाणे त्यांनी कधीही बडेजाव केला नाही. तमाशा मालकांमध्ये इतकी जीवघेणी स्पर्धा असते की ऐपत नसतानाही केवळ दुसऱ्याचा तमाशा फड कमी लेखण्यासाठी अवास्तव खर्च हे तमाशा फड मालक करीत असतात. त्यातूनच त्यांचा कर्जबाजारीपणा वाढतो. मात्र काळू-बाळू या जीवघेण्या स्पर्धेत कधीच शिरले नाहीत. मोजकेच परंतु महत्त्वाचे साहित्य घेऊन त्यांनी तमाशाचा फड सुरू केला आणि त्याचे नियोजन इतके व्यवस्थित केले की त्यांनी आर्थिक घडी कधीच विस्कटली नाही. आज त्यांची मुले ही परंपरा पुढे चालवत आहेत.
महान वगसम्राट…अनेक पुरस्कारांनी सन्मानित
काळू-बाळू यांचा अनेक पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला होता. पुण्याच्या महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय एकात्मता व विश्वबंधू विचार संवर्धन समितीने निर्व्यसनी कलाकार म्हणून या दोघांचा सत्कार केला होता. १९९५ मध्ये बारामतीत झालेल्या अमृतमहोत्सवी नाट्यसंमेलनात पहिला मोरोपंत पिंगळे स्मृती पुरस्कार या दोघांनी शरद पवारांच्या हस्ते स्वीकारला होता. १९९६ मध्ये महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार, १९९८ ला नाट्यगौरव, राष्ट्रीय पातळीवर नाट्य अकादमी असे शंभराहून अधिक पुरस्कार या जोडगोळीला मिळाले आहेत. २००० मध्ये पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानने मुंबईत आयोजित केलेल्या ‘लोकोत्सव’ कार्यक्रमात खास काळू-बाळू यांना आमंत्रित केले होते.

आपल्या आजारपणातही काळू-बाळू यांनी हे आमंत्रण स्वीकारून रंगमंचावर तुफान राजकीय फटकेबाजी केली. दया पवार प्रतिष्ठानच्या मागणीवरून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्याच वेळी काळू-बाळू यांच्या उपचारांसाठी प्रत्येकी एक लाख रुपयांची वैद्यकीय मदत जाहीर केली होती. काळू-बाळू आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत. अवघ्या मराठी मुलखाला परिचित असणारे काळू-बाळू जोडीतील ज्येष्ठ तमाशा कलावंत काळू ऊर्फ लहू संभाजी खाडे यांनी २०११ साली तर बाळू यांनी २६ एप्रिल २०१४ साली तमाशा फडातून एक्झिट घेतली.






