टीम बाईमाणूस
- ‘टायटॅनिक’ची कथा जगभर पोहोचली, तिच्यावर चित्रपट झाले, पुस्तके लिहिली गेली. पण मुंबईच्या उंबरठ्यावर घडलेल्या आणि शेकडो प्रवाशांना जलसमाधी देणाऱ्या 'रामदास' बोटीची शोकांतिका मात्र इतिहासाच्या धूसर पानांत हरवत गेली.
- १७ जुलै १९४७ रोजी अवघ्या काही मिनिटांत समुद्रात गडप झालेल्या या बोटीने केवळ ६९० जीव घेतले नाहीत; तर शेकडो कुटुंबांच्या आयुष्यावर कायमची जखम कोरली.
- त्या दुर्घटनेतून वाचलेल्या काही मोजक्या प्रवाशांच्या आठवणी, रेवसच्या कोळी बांधवांचे अद्वितीय बचावकार्य आणि या विस्मृतीत गेलेल्या इतिहासाला पडद्यावर आणण्याचा दिग्दर्शक किशोर बेळेकर यांचा प्रयत्न, या निमित्ताने 'रामदास'ची कहाणी पुन्हा एकदा समोर येते.
‘’माझ्यात आता शक्ती उरली नाही... माझ्या घरच्यांना नमस्कार सांगा..."
इतकंच बोलला तो…
समुद्राच्या खाऱ्या पाण्यात दोघेही जीवाच्या आकांताने किनाऱ्याकडे पोहत होते. आकाश काळवंडलं होतं, प्रचंड लाटा अंगावर कोसळत होत्या. काही वेळापूर्वीच शेकडो प्रवाशांनी भरलेली 'रामदास' बोट समुद्रात उलटली होती. आजूबाजूला मदतीसाठीच्या किंकाळ्या, तरंगणाऱ्या पेट्या, लाकडी फळ्या, सामान आणि माणसं... सगळं एका भयानक भोवऱ्यात अडकून पडलं होतं.
पोहत असलेल्या त्या दोघांपैकी एकाचा दम अखेर संपला. त्याने आपल्या सोबत्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, "माझ्यात आता शक्ती उरली नाही... मी आता वाचत नाही. माझ्या घरच्यांना नमस्कार सांगा."
क्षणात त्याचा हात सुटला… एका प्रचंड लाटेने त्याला आपल्या कवेत घेतलं आणि तो कायमचा समुद्रात विलीन झाला. मात्र त्याचा सोबती कसाबसा किनाऱ्यावर पोहोचला. त्या दोन वाक्यांनी त्याचा आयुष्यभर पाठलाग केला. पुढे त्याला मुलगा झाला, तेव्हा त्याने मुलाचं नावच 'रामदास' ठेवलं. मृत्यूच्या दारातून परत आणणाऱ्या आणि त्याच वेळी त्याच्याकडून मित्र हिरावून नेणाऱ्या त्या बोटीची आठवण त्याने आपल्या मुलाच्या नावात जपून ठेवली.

मृत्यूच्या दारातून परतलेले साक्षीदार
ही कहाणी एका व्यक्तीची नाही. ती १७ जुलै १९४७ रोजी रामदास बोट दुर्घटनेतून वाचलेल्या शेकडो जिवांपैकी एका जिवाची आहे. टायटॅनिकची गोष्ट माहिती असलेल्या आजच्या पिढीला मुंबईजवळची रामदास बोट दुर्घटनेबद्दल कितपत माहिती आहे? आजपासून ७९ वर्षांपूर्वी मुंबईच्या भाऊच्या धक्क्याहून निघालेली रामदास बोट बुडाली आणि तब्बल ६९०प्रवाशांना जलसमाधी मिळाली. त्या दिवशी मुंबईहून रेवसकडे निघालेली 'रामदास' बोट काशाच्या खडकाजवळ वादळात सापडली आणि काही मिनिटांत समुद्राने तिला गिळंकृत केले. जे वाचले, तेही पूर्णपणे वाचले नव्हते. त्यांच्यापैकी अनेकांच्या मनात समुद्राचा तो आक्रोश, मदतीसाठी पसरलेले हात आणि डोळ्यांसमोर लाटांमध्ये नाहीसे झालेले माणसं शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत राहिले.
या दुर्घटनेचे अखेरचे साक्षीदार मानले जाणारे विश्वनाथ उर्फ बारक्याशेठ मुकादम तेव्हा अवघे दहा-बारा वर्षांचे होते. बोट उलटताच ते समुद्रात फेकले गेले. चारही बाजूंनी किंकाळ्या, पाण्यावर तरंगणारे सामान आणि जीव वाचवण्यासाठीची धडपड, हा सगळा गोंधळ त्यांच्या डोळ्यांसमोर होता. पोहण्याच्या जोरावर आणि रेवसच्या कोळी बांधवांच्या मदतीने ते वाचले. अनेक दशकांनंतरही त्या दिवसाची आठवण सांगताना त्यांच्या आवाजातील कंप कमी झाला नव्हता.
अब्दुल कैस हेही त्या दुर्घटनेतून बचावलेल्या मोजक्या प्रवाशांपैकी एक. तेव्हा तेही बालवयात होते. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी त्या दुर्घटनेच्या आठवणी संशोधकांसमोर सांगितल्या. अब्दुल कैस मूळचे कोकणातल्या माणगावचे होते. रामदास बोट बुडाली त्यावेळी ते बोटीत होते, मात्र ते बचावले.. पुढे त्यांनी मुंबईत एलफिन्स्टन कॉलेजला पदवी घेतली आणि दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झाले. तिकडे नेल्सन मंडेलासोबत दक्षिण आफ्रिकेच्या अहिंसेच्या मार्गाने चाललेल्या स्वातंत्र्य लढ्यात अब्दुल कैस सहभागी झाले होते. तिथेच त्यांचे निधन झाले.

दुर्घटनेनंतर सर्वात आधी धावून आले ते रेवस परिसरातील कोळी. कोणतीही अधिकृत यंत्रणा पोहोचण्यापूर्वी त्यांनी आपल्या होड्या वादळी समुद्रात वळवल्या. पाण्यावर तरंगणाऱ्या प्रवाशांना एकेक करून होड्यांत घेतले. काहींना दोऱ्यांच्या साहाय्याने बाहेर काढले, तर काही जण पोहत पोहत त्यांच्या होड्यांपर्यंत पोहोचले. अनेक बचावलेल्या प्रवाशांनी नंतर सांगितले की, त्या कोळ्यांनी काही मिनिटे उशीर केला असता तर तेही समुद्राच्या तळाशी गेले असते. त्या दिवशी त्यांनी केवळ जीव वाचवले नाहीत; तर शेकडो कुटुंबांचे भविष्य वाचवले.
मात्र किनाऱ्यावर पोहोचल्याने सगळेच संकट संपले, असे नव्हते. रामदास दुर्घटनेतून वाचलेले अनेक जण मानसिकदृष्ट्या त्या समुद्रातून कधीच बाहेर आले नाहीत. काहींनी पुन्हा कधी बोटीत पाय ठेवला नाही. काहींना आयुष्यभर समुद्राचा आवाज ऐकला की त्या दिवशीच्या किंकाळ्या आठवत. झोपेतून दचकून उठणे, लाटांचे स्वप्न पडणे, पाण्याची भीती वाटणे आज ज्याला 'पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस' म्हणतात, त्याची छाया त्यांच्यावर अनेक वर्षे होती. पण त्या काळात मानसिक आघातांबद्दल फारशी चर्चा नव्हती; त्यामुळे त्यांनी त्या जखमा मुक्यानेच सोसल्या.
'रामदास' : स्वदेशीच्या स्वप्नातून जन्मलेली आगबोट
रामदास बोट एका नावाजलेल्या कारखान्यात आकारास आली. स्कॉटलंडच्या ज्या स्वान अँड हंटर कंपनीने 'क्वीन एलिझाबेथ' ही आलिशान बोट बांधली होती. त्याच कारखान्याने 179 फूट लांब आणि 29 फूट रुंद, 1000 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेली अशी देखणी 'रामदास' बोट 1936 मध्ये जन्मास घातली. जन्मानंतर काही वर्षांनी तिची मालकी इंडियन कोऑपरेटिव्ह स्टीम नेव्हिगेशन कंपनीकडे आली.
देशात ज्यावेळी स्वदेशीच्या चळवळी जोर धरू लागल्या होत्या, त्यावेळी काही स्वाभिमानी देशभक्तांनी, देशाभिमानाच्या भावनेतून सहकाराच्या तत्त्वावर इंडियन कोऑपरेटिव्ह स्टीम नेव्हिगेशन कंपनी काढली. ब्रिटिश कंपनीच्या विरोधात उभं राहून या कंपनीने कोकण गोवा किनारपट्टीवर सुखकर बोट सेवा सुरू केली. याच कंपनीला पुढे लोक आपलेपणाने माझी आगबोट कंपनी असं संबोधायचे. लोकांच्या भावनांचा आदर करून, देवदेवतांची, संतांची नावं बोटीला दिली जायची. जयंती, तुकाराम, रामदास, सेंट अँथनी, सेंट फ्रान्सिस, सेंट झेव्हियर ही त्यातली काही नावं.

रामदास बोट दुर्घटनेवर गेल्या काही वर्षांपासून किशोर पांडुरंग बेळेकर हे सिनेमा तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत. आपल्या संशोधनादरम्यान त्यांनी त्या काळातील अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यांना एस.एस. रामदास बोटीच्या अपघाताची माहिती मिळवत असतानाच आणखी दोन भारतीय बोटींचे अपघात झाल्याचीही माहिती मिळाली. रामदास बुडण्याआधी म्हणजेच 11 नोव्हेंबर 1927 रोजी सायंकाळी 7.20 वाजता एस.एस. जयंती आणि एस.एस. तुकाराम नावाच्या दोन प्रवासी बोटी एकाच दिवशी, एकाच वेळी, एकाच मार्गात, एका पाठोपाठ बुडाल्या. जयंती बोटीतले खलाशी आणि इतर प्रवासी अशा सर्व 96 लोकांना जलसमाधी मिळाली. तुकाराम बोटीवरील 143 पैकी 96 प्रवाशांना जीवनदान मिळाले. जयंती आणि तुकाराम बुडाल्यानंतर बरोबर 20 वर्षांनी रामदास बोट बुडाली. रामदास बुडाली त्यावेळी तिच्यात 48 खलाशी, 4 अधिकारी, हॉटेलचे 18 कर्मचारी आणि अधिकृत उतारू 673 होते. 35 फुकटे प्रवासी होते. म्हणजेच एकूण 778 प्रवासी त्यावेळी रामदास बोटीमधून प्रवास करत होते.
१७ जुलै १९४७ : एका सकाळी समुद्राने इतिहास बदलला
किशोर बेळेकर त्यादिवशीचा पूर्ण घटनाक्रम सांगतात…
रामदास 17 जुलै 1947ला सकाळी 8 वाजता भाऊच्या धक्क्याहून रेवसला जायला निघाली. गटारी अमावस्येच्या निमित्ताने सुट्या होत्या आणि म्हणूनच बरीचशी मंडळी घरच्यांना भेटण्यासाठी निघाली होती. रामदासवर पंढरपूरची वारी करून आलेली वारकरी मंडळी होती. कोळी बांधव होते. काही आपल्या मळ्यातला भाजीपाला विकून, गाडगी मडकी मुंबईत विकून पुन्हा घराकडे निघालेली अशी व्यवसाय करणारी मंडळी होती. वरच्या डेकवर इंग्रज अधिकारी त्यांच्या कुटुंबीयांसहित प्रवास करत होते. बोटीवर अनेक गरोदर महिलाही होत्या.
सगळे प्रवासी चढल्याची खात्री झाली आणि बोटीचा धीरगंभीर भोंगा झाला. व्हार्फ सुपरिडेंटने शिट्टी फुंकली. हमालांच्या टोळीने शिडी काढायला सुरुवात केली. तेवढ्यातही काही प्रवासी चपळतेने बोटीत घुसलेच. नांगर वर उचलला गेला. बोटीच्या मागच्या बाजूस खूप सारे फेसाळणारे पाणी उधळले. सुकाणूवाल्या खलाशाने सुकाणू फिरवलं आणि बोट समुद्राकडे निघाली. पाऊस पडत होता पण डेकला झाकलेल्या ताडपत्रीमुळे तो विशेष जाणवत नव्हता. आणखी अर्ध्या तासाने सगळे रेवसला पोहोचणार होते. बरेच लोक एकमेकांना ओळखणारे होते. कारण ते नेहमीचे अपडाऊन करायचे.

बोट काही प्रमाणात हिंदकळत होती. पण साऱ्यांना या हिंदकळण्याचा अनुभव होता. कारण मुंबईचा किनारा सोडून बोट पूर्णपणे अरबी समुद्रात लागेपर्यंत असे हिंदोळे घेते. बोटीतलं वातावरण बरंचसं खेळीमेळीचं होतं. लोकांच्या गप्पा रंगल्या होत्या. काहींच्या गप्पांमध्ये याआधीच्या बुडालेल्या जयंती आणि तुकाराम बोटींचे विषय होते. ही माहिती अपघातातून वाचलेल्या इन्स्पेक्टर निकम यांच्या बोलण्यातून मिळाली.
रामदास मुंबईच्या बंदरापासून समुद्रात 13 किलोमीटरपर्यंत गेली असेल तोच लाटांचा, पावसाचा आणि वादळाचा जोर वाढला. डेकवर पाणी साचू लागलं. गप्पा मारणाऱ्या लोकांमध्ये एका क्षणाची शांतता जाणवली. बोट एका बाजूला कलंडून पाणी आत शिरलं आणि बोटीतले सगळे ओरडू लागले. बोटीवर असणाऱ्या तुटपुंज्या लाईफ सेव्हिंग जॅकेटसाठी सगळे धडपडू लागले. काही मिनिटांपूर्वी एकमेकांशी प्रेमाने बोलणारे आता एकमेकांच्या उरावर बसले होते.
कॅप्टन शेख सुलेमान आणि चीफ ऑफिसर आदमभाई सगळ्यांना ओरडून शांत राहाण्याचे सुचवत होते, पण त्यांच्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते. जे पाहू शकत होते त्यांनी बोट एक बाजूला कलंडलेली पाहिली आणि समुद्रात उडया मारल्या. काहींनी लाईफ जॅकेट मिळवून बोट सोडली. बोटीवर हाहाकार होता. वारकऱ्यांनी विठ्ठलाचा धावा करायला सुरुवात केली. रामदास काश्याच्या खडकापासून काही अंतरावर पोहोचली आणि त्याचवेळी समुद्रात एक मोठी लाट उसळली आणि रामदास पूर्णपणे एका बाजूला कलंडली. प्रवासी पावसापासून सुरक्षित रहावे यासाठी लावलेल्या ताडपत्र्यांमध्ये माणसं आणि गरोदर बायका अडकल्या. काही कळायच्या आत पुन्हा एकदा मोठी चाळीस फूट उंचीची लाट समुद्रातून उसळली आणि रामदास समुद्रात दिसेनाशी झाली.

भारतातील नौकानयनाच्या आतापर्यंतच्या अपघातातील हा सगळ्यात मोठा अपघात. मुंबई बंदरापासून तशी हाकेच्या अंतरावर असलेली बोट सकाळी 9च्या सुमारास बुडाली आणि ती बुडाल्याची बातमी सायंकाळी 5 पर्यंत तरी मिळाली नव्हती. अलिबागचे 10 वर्षांचे वय असलेले बारकू शेट मुकादम लाईफ सेव्हिंग जॅकेटच्या मदतीने मुंबई बंदरास लागले आणि रामदास बुडाल्याची माहिती मुंबईत वाऱ्यासारखी परसली.
भाऊच्या धक्क्यावर अख्खी मुंबई जमा झाली होती. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं आणि चेहऱ्यावर भीती. पुढले कितीतरी महिने ही माणसं भाऊच्या धक्क्यावर आणि रेवसच्या बंदरावर नित्यनियमाने जात होती कारण घरातल्या प्रियजनांची अजूनही खबरबात नव्हती ना त्यांची मृत शरीर त्यांना सापडली होती.






