विठ्ठल साबळे
- २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात जीव धोक्यात घालून गर्भवती महिला आणि नवजात बालकांचे प्राण वाचवणाऱ्या कामा हॉस्पिटलच्या शूर परिचारिकांच्या कथेला 'भारत भाग्य विधाता' चित्रपटातून पडद्यावर आणले जात आहे.
- 'नर्सिंग हा सर्वाधिक सेक्स्युअलाइज्ड व्यवसाय आहे' आणि 'नर्सेसचा युनिफॉर्म अजूनही ब्रिटिशकालीन मानसिकतेचा वारसा आहे' या कंगना रणौतच्या विधानांमुळे देशभरातील परिचारिका संघटना आक्रमक झाल्या आहेत.
- सेवा, समर्पण आणि त्यागाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या नर्सिंग व्यवसायाकडे समाज कोणत्या नजरेने पाहतो? कंगना रणौतच्या एका विधानामुळे सुरू झालेल्या वादाने नर्सेसची सुरक्षा, सन्मान, कामाच्या अटी आणि समाजातील प्रतिमा या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना पुन्हा ऐरणीवर आणले आहे.
२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात प्राणांची बाजी लावून रुग्णांचे रक्षण करणाऱ्या आणि अजमल कसाबसारख्या नराधमाला फाशीच्यापर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाच्या साक्षीदार ठरलेल्या 'कामा हॉस्पिटल'च्या शूर परिचारिका अंजली कुलथे यांच्या शौर्यगाथेवर आधारित एक चित्रपट येत आहे. तो म्हणजे 'भारत भाग्य विधाता'... या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. २६/११ च्या रक्तरंजित रात्री अंजली कुलथे यांनी प्रसूती विभागातील गर्भवती महिला आणि नवजात बालकांचे प्राण वाचवण्यासाठी अतुलनीय धैर्य दाखवले होते. त्यांच्या याच पराक्रमाला आणि कामा हॉस्पिटलमधील नर्सेसच्या पराक्रमाला पडद्यावर आणण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे
या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत हिने एका मुलाखतीदरम्यान नर्सिंग क्षेत्रावर केलेले वक्तव्य सध्या देशात आणि समाजमाध्यमांवर प्रचंड चर्चेत आहे. कंगनाने उपस्थित केलेले मुद्दे केवळ एका चित्रपटाच्या प्रसिद्धीपुरते मर्यादित नसून, नर्सिंग व्यवसायाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आणि आरोग्य व्यवस्थेतील वास्तव परिस्थिती यांवर प्रकाश टाकणारे आहेत.

कंगनाने प्रामुख्याने दोन मुद्दे मांडले पहिला म्हणजे देशातील नर्सेसचा युनिफॉर्म आजही ब्रिटीश कालीन आणि पहिल्या दुसऱ्या महायुद्धातील अमेरिकन नेव्हीच्या प्रभावाखाली आहे, जो भारतीय हवामानाला पूरक नाही. आणि दुसरा अत्यंत संवेदनशील मुद्दा म्हणजे, आजच्या काळात नर्सिंग हा सर्वात जास्त 'सेक्स्युअलाईज्ड' केलेला व्यवसाय आहे.
नर्सिंग क्षेत्राचा अपमान खेदजनक : इंदुमती थोरात
या संदर्भात 'बाईमाणूस'शी बोलताना महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या राज्याध्यक्षा इंदुमती थोरात यांनी कंगना रणौत यांच्या विधानांवर जोरदार आक्षेप नोंदवला.
त्या म्हणाल्या, आम्ही रोज मृत्यूशी झुंजणाऱ्या रुग्णांच्या सेवेत असतो. एखादा रुग्ण आमच्या डोळ्यांसमोर तडफडत असतो, कधी त्याचा जीव वाचतो तर कधी मृत्यू होतो. अशा परिस्थितीत काम करणाऱ्या परिचारिकांच्या व्यवसायाकडे कोणत्या नजरेने पाहिले जाते, हे आम्हाला चांगले माहिती आहे. पण संपूर्ण नर्सिंग व्यवसायाला 'सेक्स्युअलाइज्ड' म्हणणे हे अत्यंत दुर्दैवी आणि अपमानास्पद आहे.
थोरात पुढे सांगतात, १९९५ पासून महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये नर्सेसच्या गणवेशात मोठे बदल झाले आहेत. आज ब्रिटिशकालीन कडक युनिफॉर्म बदलून बहुतांश ठिकाणी सलवार कमीज, ट्राउझर, एप्रन आणि कामासाठी सोयीस्कर असा युनिफॉर्म वापरला जातो. आम्ही त्यामध्ये पूर्णपणे कम्फर्टेबल आहोत. मग कंगना रणौत यांना अजूनही ब्रिटिशकालीन ड्रेस कुठे दिसला? शासनाने आम्हाला काही वर्षांपूर्वीच त्या जुन्या पद्धतीच्या पोशाखातून मुक्त केले आहे. वस्तुस्थितीची माहिती नसताना अशा प्रकारची विधाने करणे योग्य नाही.
त्यांच्या मते, नर्सिंग व्यवसायाची खरी ओळख ही सेवा, समर्पण आणि त्याग आहे. कोरोना काळात संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये होता. लाखो कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत होते. पण डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी मात्र जीव धोक्यात घालून रुग्णालयात उभे होते. पीपीई किटमध्ये तासन्तास काम करणाऱ्या, स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहणाऱ्या आणि संसर्गाचा धोका पत्करणाऱ्या नर्सेसना देशाने पाहिले आहे. त्यामुळे नर्सिंग व्यवसायाचे वर्णन करताना अत्यंत जबाबदारीने बोलणे आवश्यक आहे," असे थोरात म्हणाल्या.
नर्सच्या युनिफॉर्मबद्दल आतापर्यंत काय झालं
आधुनिक नर्सिंगची जननी मानल्या जाणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या काळापासून, म्हणजेच १८५० च्या दशकापासून नर्सेससाठी एका विशिष्ट युनिफॉर्मची सुरुवात झाली. त्या काळी पाश्चिमात्य देशांमधील कडक थंडी, स्वच्छता आणि लष्करी शिस्त लक्षात घेऊन लांब गाऊन, कडक कॉटनचा स्कर्ट, कंबरेला घट्ट बेल्ट आणि डोक्यावर पिन केलेली कॅप असा पेहराव निश्चित करण्यात आला होता. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्करी रुग्णालयात काम करणाऱ्या अमेरिकन आणि ब्रिटीश नेव्हीच्या नर्सेसनी यात काही बदल केले, ज्यामध्ये बेल्ट आणि पिन अधिक घट्ट आणि शिस्तबद्ध करण्यात आल्या.
२६ एप्रिल २०११: महाराष्ट्र शासनाने नर्सेसच्या पारंपरिक पांढऱ्या गणवेशात बदल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नर्सेस संघटनांनी त्याला तीव्र विरोध दर्शवला होता. पांढरा फ्रॉक सांभाळणे कठीण आणि अस्वच्छ होत असल्याची जाणीव असतानाही, नवीन गणवेश निश्चित करताना नर्सेसना विश्वासात घेण्यात आले नसल्याची त्यांची तक्रार होती. या निर्णयाविरोधात पुण्यातील ससून रुग्णालयासह मुंबईतील विविध ठिकाणी नर्सेसनी निदर्शने केली होती.

जुलै २०२५: महाराष्ट्र राज्य नर्सेस असोसिएशनने राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. या आंदोलनात केंद्र सरकारच्या धर्तीवर युनिफॉर्म भत्ता आणि नर्सिंग भत्ता लागू करणे, रिक्त पदे भरणे, पदोन्नती धोरणात सुधारणा करणे, हेड नर्स व ट्रेनिंग ऑफिसर यांच्या वेतनातील त्रुटी दूर करणे तसेच स्वतंत्र नर्सिंग संचालनालय स्थापन करणे यांसारख्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या. या आंदोलनातून नर्सिंग क्षेत्रातील सुविधा, व्यावसायिक सन्मान आणि प्रशासकीय सुधारणा यांचे मुद्दे पुन्हा ऐरणीवर आले होते.
या संदर्भात बाईमाणूस शी बोलताना एमजीएम स्कूल ऑफ फिजिओथेरपीच्या प्रशासकीय प्रमुख प्रेरणा दळवी यांनी जमिनीवरील वास्तव अधिक स्पष्टपणे मांडले.
त्या म्हणतात, "महाराष्ट्रातील बहुतांश शासकीय रुग्णालयांमध्ये नर्सेससाठी पंजाबी ड्रेससोबत एप्रन तर अनेक खासगी रुग्णालयांमध्ये पँट शर्ट आणि पॉकेट असलेला युनिफॉर्म वापरला जातो. हा युनिफॉर्म नर्सेसच्या मागणीनुसार आणि त्यांच्या सोयीचा विचार करून स्वीकारण्यात आला आहे. पूर्वी वापरली जाणारी कॅप आता बहुतांश ठिकाणी बंद झाली असून त्याऐवजी केसांचा जूडा आणि त्यावर जाळी वापरण्याची पद्धत आहे. संसर्ग नियंत्रणासाठी केस बांधून ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे सध्याचा युनिफॉर्म हा अधिक व्यावहारिक आणि कामासाठी पूरक आहे."
सध्याच्या युनिफॉर्ममधे परिचारिकांना काय अडचणी
ब्रिटीशांनी हीच व्यवस्था भारतात आणली आणि स्वातंत्र्यानंतरही अनेक दशके हीच पद्धत हुबेहूब चालू राहिली. भारतासारख्या उष्ण आणि दमट हवामानाच्या देशात, जिथे नर्सेसना उन्हाळ्यातही १२ १२ तास सलग उभे राहून किंवा धावपळ करून काम करावे लागते, तिथे कॉटनचा कडक युनिफॉर्म, कमरेला बेल्ट आणि डोक्यावर सतत पिन टोचलेली कॅप घालणे शारीरिकदृष्ट्या अत्यंत त्रासदायक ठरत आले आहे. अनेक परिचारिका संघटनांनी भूतकाळात यावर आवाज उठवला आहे की, या युनिफॉर्ममुळे त्यांना डोकेदुखी, पाठीचे आजार आणि वाकताना किंवा रुग्णाला हाताळताना प्रचंड अडचणी येतात. त्यामुळे कंगनाचा हा दावा ऐतिहासिकदृष्ट्या आणि हवामानाच्या दृष्टीने पूर्णपणे नाकारता येत नाही.
यावर बाईमाणूस शी बोलताना जालना जिल्ह्यातील एका हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या परिचारिका सुवर्णा जाधव सांगतात कि,
या गंभीर सामाजिक मानसिकतेचा थेट संबंध कामाच्या ठिकाणच्या सुरक्षेशी येतो. नर्सेस अनेकदा २४ तास चालणाऱ्या शिफ्टमध्ये काम करतात, आणि रात्रीच्या वेळी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. रुग्णालयांमध्ये अंतर्गत सुरक्षेसाठी विशाखा गाईडलाईन्स किंवा प्रिव्हेंशन ऑफ सेक्स्युअल हॅरेसमेंट कायदे कागदावर असले, तरी त्यांची कडक अंमलबजावणी अनेक खाजगी आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये होत नाही. रुग्णांचे दारू पिऊन आलेले नातेवाईक किंवा वॉर्डमधील काही घटकांकडून नर्सेसना शाब्दिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागते, अशा अनेक तक्रारी पोलीस दप्तरी नोंद आहेत. त्यामुळे जोपर्यंत समाजाचा आणि सिस्टीमचा नर्सेसकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत नाही, तोपर्यंत केवळ कपडे बदलून हा प्रश्न सुटणारा नाही.
नर्सिंगचे ‘सेक्स्युअलायझेशन’ आणि समाजाचा दृष्टिकोन
कंगना रणौतचा दुसरा आणि सर्वाधिक वादग्रस्त ठरलेला मुद्दा म्हणजे, नर्सिंग क्षेत्राचे झालेले 'सेक्स्युअलायझेशन'(लैंगिकीकरण). ती म्हणाली की, पॉप कल्चर, सिनेमा आणि पाश्चिमात्य प्रभावामुळे या व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दूषित झाला आहे. हॅलोविन पार्ट्या असोत, बॉलिवूड हॉलिवूडमधील गाणी असोत किंवा सोशल मीडियावरील रील मीम्स असोत, अनेकदा 'नर्स'च्या पात्राला ग्लॅमराईज किंवा चुकीच्या पद्धतीने सादर केले जाते. या विधानामागे समाजातील एका विशिष्ट वर्गाची विकृत मानसिकता कारणीभूत आहे, हे नाकारता येत नाही.

नर्सिंग व्यवसायाला 'सेक्स्युअलाईज्ड' करण्याच्या कंगनाच्या मताशी फिजिओथेरपीच्या प्रशासकीय प्रमुख प्रेरणा दळवी यांनी पूर्णपणे असहमती दर्शवली आहे. त्यांच्या मते,
"अशा प्रकारची परिस्थिती केवळ नर्सिंग क्षेत्रापुरती मर्यादित नसून कोणत्याही क्षेत्राबाबत असे सर्वसाधारण विधान करणे योग्य ठरणार नाही." हा मुद्दा अत्यंत तंतोतंत आणि वस्तुनिष्ठ आहे. कॉर्पोरेट क्षेत्र असो, विमान वाहतूक क्षेत्र असो, माध्यम क्षेत्र असो वा मनोरंजन क्षेत्र महिला जिथे जिथे काम करतात, तिथे तिथे पितृसत्ताक मानसिकतेचे आणि दृष्टिकोनाचे आव्हान असतेच. त्यामुळे केवळ नर्सिंग क्षेत्रालाच या चौकटीत बसवून एकतर्फी निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल.
वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांकडून किंवा कधीकधी सिस्टीममधील घटकांकडून दुय्यम वागणूक दिली जाते. परिचारिका रात्रीच्या पाळीत काम करत असताना त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. 'रुग्णाची सेवा करणे' या उदात्त भावनेला काही वेळा लोक त्यांच्या अंतर्गत मानसिकतेतून चुकीच्या नजरेने पाहतात. कंगनाने मुलाखतीत एका संवादाचा संदर्भ दिला, ज्यामध्ये दोन पुरुष नर्सकडे पाहून म्हणतात, "वेळ मिळाला तर दोन चार गप्पा मारून घेऊ." हे वाक्य मनोरंजन विश्वातील असले, तरी ते समाजातील एका विशिष्ट वर्गाच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व करते.
नर्सेसना पडद्यावर कशाप्रकारे दाखवलं गेलं
मनोरंजन सृष्टीने अनेक दशकांपासून 'नर्स' या पात्राचा वापर केवळ ग्लॅमर वाढवण्यासाठी किंवा विनोदाचा भाग म्हणून केला आहे. सिनेमांमधील गाणी किंवा कॉमेडी शोमध्ये नर्सेसना ज्या प्रकारे दाखवले जाते, त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या मानसिकतेवर होतो. जेव्हा एखादी व्यक्ती रुग्णालयात जाते, तेव्हा ती त्याच सिनेमाचा चष्मा डोळ्यावर लावून या कर्मचाऱ्यांकडे पाहते, ही सर्वात मोठी शोकांतिका आहे...
हा केवळ एका युनिफॉर्मचा प्रश्न नाही, तर तो या व्यवसायाला मिळणाऱ्या आदराचा प्रश्न आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये हॅलोविन सारख्या सणांमध्ये नर्सच्या युनिफॉर्मचा ज्या प्रकारे फॅशन म्हणून वापर होतो, तोच ट्रेंड आता भारतीय उपखंडातही डोके वर काढत आहे. त्यामुळे या अत्यंत कष्टाच्या आणि पवित्र व्यवसायाच्या सन्मानाला धक्का पोहोचत असल्याची चिंता अनेक परिचारिकांनी व्यक्त केली आहे.कंगनाचे विधान या छुप्या आणि वाढत्या विकृतीवर थेट प्रहार करणारे आहे.

तथापि, कंगना रणौत यांच्या या वक्तव्यांशी नर्सिंग क्षेत्रातील अनेक संघटना आणि कार्यरत परिचारिका सहमत नाहीत. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनने या वक्तव्यांचा तीव्र निषेध नोंदवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्र पाठवून भारत भाग्य विधाता चित्रपटातील नर्सेसविषयीच्या संवादांचे पुनरावलोकन करण्याची मागणी केली आहे. फेडरेशनच्या महाराष्ट्र राज्याध्यक्षा इंदुमती थोरात आणि सरचिटणीस विशाल सोनार यांनी पाठवलेल्या पत्रात चित्रपटातील काही दृश्ये आणि संवाद नर्सिंग व्यवसायाची प्रतिमा मलिन करणारे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच नर्सेसच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारे कोणतेही दृश्य अथवा संवाद चित्रपटातून वगळण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
बाईमाणूस शी बोलताना मुंबईमधील MGM हॉस्पिटल कामोठे येथील परिचारिका मनीषा बोचरे सांगतात कि,
नर्सिंग हा केवळ एक जॉब नाही, तर ते २४ तास चालणारे चोख व्यवस्थापन आहे. कंगनाजींचे वक्तव्य हे त्या मानसिकतेवर प्रहार करते जी मानसिकता नर्सेसच्या अखंड सेवेला केवळ एका ठराविक चौकटीत पाहू इच्छिते. खाजगी क्षेत्रात काम करताना माझा अनुभव असा आहे की, डॉक्टर आणि रुग्ण आमच्यावर खूप विश्वास ठेवतात आणि माझ्या वैयक्तिक व्यावसायिक प्रवासात मला कधीही नकारात्मक मानसिकतेचा सामना करावा लागला नाही.
तरीही, हे नाकारता येत नाही की संपूर्ण देशभरात ग्रामीण किंवा लहान रुग्णालयांमध्ये रात्रीच्या पाळीत काम करणाऱ्या आमच्या भगिनींच्या सुरक्षेचा प्रश्न अजूनही महत्त्वाचा आहे. नर्सेसकडून समाजाला केवळ औषध देणारी व्यक्ती म्हणून अपेक्षा नसावी, तर आम्ही देखील उच्चशिक्षित वैद्यकीय तज्ज्ञ आहोत हे समाजाने स्वीकारले पाहिजे. आजची नर्स ही आयसीयू आणि क्रिटिकल केअर सांभाळणारी सक्षम स्त्री आहे. त्यामुळे विनाकारण संपूर्ण क्षेत्राचे सामान्यीकरण करून त्याला एकाच दृष्टिकोनातून पाहणे योग्य नाही. गरज आहे ती आमच्या कामाच्या सुलभतेचा, सुरक्षिततेचा आणि हक्काच्या मानधनाचा विचार करण्याची.
डॉक्टरांच्या आज्ञा पाळणाऱ्या सेवक की सक्षम वैद्यकीय तज्ज्ञ?
कंगनाने मांडलेल्या या शोषणाच्या आणि विकृतीच्या नाण्याची दुसरी आणि अत्यंत आश्वासक बाजू अशी आहे की, आजची भारतीय नर्स ही केवळ 'डॉक्टरांच्या आज्ञा पाळणारी' किंवा 'कमी शिकलेली' सेवक राहिलेली नाही. या क्षेत्राने शैक्षणिक आणि व्यावसायिक पातळीवर प्रचंड मोठी झेप घेतली आहे. याविषयी फिजिओथेरपीच्या प्रशासकीय प्रमुख प्रेरणा दळवी यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला..
"नर्सेसच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठे बदल झाले असून आज नर्सेस पीएच.डी.पर्यंत शिक्षण घेत आहेत, आधुनिक तंत्रज्ञानासोबत काम करत आहेत आणि त्यांना प्रगत ज्ञान उपलब्ध झाले आहे. आजची नर्सिंग पिढी अधिक जागरूक असून त्यांना स्वतःचे मत मांडता येते तसेच कायदे आणि अधिकारांचीही माहिती आहे."
त्यामुळे, या क्षेत्राला केवळ एका 'पीडित' किंवा 'शोषित' चौकटीत पाहणे आजच्या आधुनिक, स्वावलंबी आणि उच्चशिक्षित नर्सेसच्या कर्तृत्वाकडे डोळेझाक करण्यासारखे ठरेल. आजच्या नर्सेस या आयसीयू , व्हेंटिलेटर ऑपरेशन्स आणि वैद्यकीय प्रक्रियांमध्ये डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्या स्वतःचे हक्क, मानधन आणि कायदेशीर संरक्षण चांगल्या प्रकारे जाणतात आणि त्यासाठी लढाही देतात.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO च्या २०२५ च्या अहवालानुसार जगातील नर्सिंग क्षेत्रात महिलांचे प्रमाण तब्बल ८५ टक्के आहे. तसेच आरोग्य आणि सामाजिक आरोग्य व्यवस्थेतील महिला कर्मचाऱ्यांचा वाटा जागतिक स्तरावर सर्वाधिक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. याच अहवालात जगभरात अद्याप लाखो नर्सेसची कमतरता असल्याचे नमूद करण्यात आले असून, आरोग्य व्यवस्थेचा कणा म्हणून नर्सिंग व्यवसायाकडे पाहिले जाते. जगभरातील आरोग्यसेवा सुरळीत ठेवण्यात नर्सेसची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

या क्षेत्रासमोरील सर्वात मोठे आव्हान हे ग्लॅमर किंवा प्रतिमेचे नसून, नर्सेसवरील वाढता कामाचा ताण आणि मनुष्यबळाची कमतरता हे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार प्रति १,००० लोकसंख्येमागे किमान ३ नर्सेस असणे अपेक्षित आहे. मात्र, भारतात हे प्रमाण सुमारे १.७ ते १.९ नर्सेस इतकेच आहे. याचा परिणाम थेट रुग्णालयांवर दिसून येतो. अनेक सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये नर्सेसची संख्या अपुरी असल्याने एका नर्सवर अनेक रुग्णांची जबाबदारी येते. काही ठिकाणी रात्रीच्या पाळीत एका नर्सला २० ते ३० रुग्णांची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे केवळ कामाचा ताणच वाढत नाही, तर नर्सेसच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. नर्सेसची कमतरता ही केवळ कर्मचाऱ्यांची समस्या नसून, ती रुग्णसेवेच्या गुणवत्तेशी आणि आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेशी थेट संबंधित बाब आहे...
टाळ्या थाळ्यांमागचे वास्तव
या अमानवी वर्कलोडसोबतच खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील मानधनाची तफावत हा अत्यंत गंभीर विषय आहे. बड्या कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये लाखो रुपयांचे पॅकेज घेणाऱ्या डॉक्टरांच्या तुलनेत, तिथल्या नर्सेसना १२-१२ तास ड्युटी करूनही महिना अवघे १० ते १५ हजार रुपये मानधन दिले जाते. कोरोना महामारीच्या काळात ज्यांना 'फ्रंटलाईन वॉरियर्स' आणि 'आरोग्यदूत' म्हणून टाळ्या थाळ्या वाजवून सन्मानित करण्यात आले, त्याच कंत्राटी नर्सेसना महामारी संपताच नोकरीवरून काढून टाकण्यात आले किंवा त्यांचे हक्काचे भत्ते रोखण्यात आले. हा आर्थिक अन्याय आणि व्यावसायिक शोषण हा या क्षेत्राला लागलेला खरा कलंक आहे, ज्यावर संसदेत आणि विधानसभेत कायदा होण्याची गरज आहे.
यामुळेच या संपूर्ण वादाकडे केवळ कंगना रणौत विरुद्ध नर्सेस असा संघर्ष म्हणून पाहता येणार नाही. एका बाजूला नर्सिंग व्यवसायाविषयी समाजात असलेल्या काही चुकीच्या समजुती, सुरक्षेचे प्रश्न आणि पॉप कल्चरमधील चित्रण यावर चर्चा करण्याची गरज आहे, तर दुसऱ्या बाजूला लाखो परिचारिकांच्या सन्मान, प्रतिष्ठा आणि व्यावसायिक ओळखीचे रक्षण करण्याची जिम्मेदारीही तितकीच महत्त्वाची आहे. कंगना रणौत यांनी उपस्थित केलेले प्रश्न वास्तवातील काही समस्यांकडे लक्ष वेधणारे असू शकतात, मात्र त्यांची मांडणी आणि शब्दांची निवड यावरून निर्माण झालेला वादही तितकाच महत्त्वाचा आहे.
कारण नर्सिंग हा केवळ एक व्यवसाय नाही, तर तो रुग्णाच्या वेदनेशी, कुटुंबाच्या आशेशी आणि जीव वाचविण्याच्या संघर्षाशी थेट जोडलेला आहे. त्यामुळे या क्षेत्राविषयी होणारी कोणतीही सार्वजनिक चर्चा संवेदनशील, तथ्याधारित आणि संतुलित असणे आवश्यक आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यापासून ते कोविड महामारीपर्यंत प्रत्येक राष्ट्रीय संकटात नर्सेसने बजावलेली भूमिका पाहता, या व्यवसायाचा सन्मान राखणे आणि त्याचवेळी त्यांच्यासमोरील वास्तविक समस्यांवर प्रामाणिक चर्चा घडवून आणणे, हीच या वादातून पुढे येणारी सर्वात महत्त्वाची बाब ठरते.






