Skip to main content

‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ : टीआरपीच्या नावाखाली इतिहासाची गळचेपी?

Sanjana Khandare
Today
3 min read
0 views
‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ : टीआरपीच्या नावाखाली इतिहासाची गळचेपी?

संजना खंडारे 

  • स्टार प्रवाहवरील ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका अवघ्या १५२ भागांनंतर बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली आहे.

  •  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित ही मालिका केवळ मनोरंजन नव्हती, तर इतिहास, स्त्री शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाची कथा घराघरांत पोहोचवणारे माध्यम होती. 


  •  दरम्यान, अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केवळ टीआरपी हा अशा मालिकांचे भवितव्य ठरवण्याचा निकष असू शकत नाही, असे मत व्यक्त करत फुले दाम्पत्याची कथा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. 



मराठी दूरचित्रवाणी विश्वात गेल्या काही वर्षांत अनेक ऐतिहासिक, सामाजिक आणि कौटुंबिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. मात्र त्यामध्ये काही मालिका केवळ मनोरंजनापुरत्या मर्यादित न राहता समाजाला विचार देणाऱ्या, इतिहासाची ओळख करून देणाऱ्या आणि नव्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या ठरल्या. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही अशीच एक मालिका होती. स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले आणि समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनावर आधारित ही मालिका अवघ्या पाच महिन्यांत, 152 भागांमध्ये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. वाहिनीने यामागे कमी टीआरपी आणि आर्थिक गणिताचे कारण दिले. मात्र या निर्णयामुळे प्रेक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि मालिकेतील कलाकारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. 


वाहिनीने यामागे टीआरपी आणि आर्थिक गणिताचे कारण दिले असले, तरी प्रेक्षक, कलाकार आणि सामाजिक क्षेत्रातील अनेकांच्या मनात एकच प्रश्न घोळतोय. इतिहास घडवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची कथा खरोखरच टीआरपीच्या मोजपट्टीवर मोजली जाऊ शकते का? आणि जर नाही, तर ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ मालिका बंद होण्यामागचे खरे कारण नेमके काय आहे? या संपूर्ण वादाचा, आरोप-प्रत्यारोपांचा आणि पडद्यामागील वास्तवाचा या रिपोर्टमधून सविस्तर आढावा घेण्यात आलाय. 


 ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ मालिका 


‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका केवळ एक ऐतिहासिक मालिका नव्हती, तर भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या पर्वाची कहाणी होती. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यांचे सहचर, समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संघर्षमय, प्रेरणादायी आणि क्रांतिकारी जीवनकार्यावर ही मालिका आधारित होती. समाजात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नसलेल्या काळात सावित्रीबाई आणि ज्योतिराव यांनी शिक्षणाची ज्योत पेटवली. त्यासाठी त्यांना सामाजिक बहिष्कार, अपमान, धमक्या आणि अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र त्यांनी आपला लढा थांबवला नाही.


User Image

मालिकेत स्त्री शिक्षणाची चळवळ, मुलींसाठी सुरू केलेली पहिली शाळा, जातीय भेदभावाविरुद्धचा संघर्ष, अस्पृश्यता निर्मूलन, विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार, बालविवाहास विरोध, अंधश्रद्धेविरोधातील भूमिका, शोषित आणि वंचित समाजासाठी केलेले कार्य तसेच सत्यशोधक समाजाची स्थापना अशा अनेक ऐतिहासिक घटनांचे चित्रण करण्यात आले होते. त्यामुळे ही मालिका केवळ मनोरंजनाचे साधन न राहता समाजप्रबोधन करणारे माध्यम बनली होती.


मालिकेत ज्योतिराव फुले यांची भूमिका अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी साकारली होती, तर सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत मधुराणी प्रभुलकर दिसल्या. दोन्ही कलाकारांच्या अभिनयाचे प्रेक्षकांसह समीक्षकांनीही कौतुक केले. विशेषतः ऐतिहासिक व्यक्तिरेखांचे सादरीकरण, संवाद आणि घटनांची मांडणी यामुळे मालिकेने अल्पावधीतच एक वेगळे स्थान निर्माण केले. अनेक शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी या मालिकेकडे इतिहास समजून घेण्याचे आणि समाजसुधारणेच्या चळवळींची माहिती मिळवण्याचे प्रभावी माध्यम म्हणून पाहिले.


 मालिका बंद होण्यामागील अधिकृत कारण…


मालिका बंद करण्याबाबत स्टार प्रवाहकडून अधिकृतपणे टीआरपी आणि आर्थिक गणिताचा मुद्दा पुढे करण्यात आला. दूरचित्रवाणी उद्योगातील वास्तव असे आहे की कोणतीही मालिका चालवण्यासाठी प्रेक्षकसंख्या आणि जाहिरात महसूल हे दोन प्रमुख घटक मानले जातात. एखाद्या कार्यक्रमाचा टीआरपी जितका जास्त, तितकी त्या कार्यक्रमाला जाहिरातदारांकडून अधिक पसंती मिळते. परिणामी वाहिनीला अधिक महसूल मिळतो. उलट, टीआरपी अपेक्षेपेक्षा कमी राहिल्यास निर्मिती खर्च आणि मिळणारा महसूल यामध्ये तफावत निर्माण होऊ शकते.



‘गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही’ - डॉ. अमोल कोल्हे 


याबाबद्दल बाईमाणूसने अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हेंशी संवाद साधल्यावर त्यांनी सांगितले की,


"ही मालिका बंद होण्यामागे चॅनेलकडून या मालिकेतून मिळणारा महसूल आणि निर्मिती खर्च यांचा ताळमेळ जुळत नसल्याचे कारण देण्यात आले आहे. मात्र, केवळ टीआरपी हा मालिका सुरू ठेवायची की बंद करायची याचा एकमेव निकष असू शकतो का", असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 


ते पुढे म्हणाले, "फुले दाम्पत्यावरील मालिकेसारख्या ऐतिहासिक आणि समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमांची ‘आर्काइव्हल व्हॅल्यू’ आणि ‘परसेप्शन व्हॅल्यू’ विचारात घेतली पाहिजे." उदाहरण देताना त्यांनी ‘राजा शिवछत्रपती’ मालिकेचा उल्लेख केला आणि "अशा मालिका अनेक वर्षांनंतरही पाहिल्या जातात तसेच इतर भाषांमध्ये डब करून नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात", असे नमूद केले. काहीजण इतिहासातील महापुरुषांवरील मालिका मुद्दाम बंद केल्या जात असल्याचा संशय व्यक्त करत असले तरी त्याबाबत माझ्याकडे कोणतीही ठोस माहिती नसल्याने भाष्य करणे योग्य ठरणार नाही.


मात्र लोकांच्या मनात अशा शंका निर्माण होण्यामागे टीआरपी हा एकमेव निकष मानण्याबाबतचे प्रश्नच कारणीभूत आहे. ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका स्टार प्रवाहवरून बंद होत असली तरी फुले दाम्पत्याची गोष्ट थांबणार नाही, ही कथा दुसऱ्या वाहिनीवर किंवा अन्य माध्यमातून पुन्हा प्रेक्षकांसमोर आणण्याचा मी निश्चय केला आहे. “गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,” असे ठाम विधान करत येत्या काही दिवसांत याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.


प्रेक्षकांचा संताप का झाला?


‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ मालिका बंद होणार असल्याची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटू लागल्या. अनेक प्रेक्षकांनी वाहिनीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली, तर काहींनी थेट टीकाही केली. विशेष म्हणजे, ही नाराजी केवळ एखादी लोकप्रिय मालिका बंद होत असल्यामुळे नव्हती, तर समाजप्रबोधन करणारी आणि इतिहासाची ओळख करून देणारी मालिका इतक्या कमी कालावधीत संपवली जात असल्याची खंत त्यामागे होती.

अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावर असा मुद्दा उपस्थित केला की, "आज दूरचित्रवाणीवर कौटुंबिक वाद, सासू-सुनेचे संघर्ष, कटकारस्थाने आणि कृत्रिम नाट्यमय प्रसंगांवर आधारित मालिका अनेक वर्षे सुरू राहतात. अशा मालिकांना सातत्याने संधी दिली जाते. मात्र समाजाला विचार करायला लावणारी, इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांचे कार्य समोर आणणारी आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारी मालिका काही महिन्यांतच बंद केली जाते", हे दुर्देवी असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.


User Image

विशेषतः पालक आणि शिक्षक वर्गाकडून या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत होता. अनेक पालकांनी आपल्या मुलांना सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांच्या कार्याची ओळख या मालिकेमुळे झाली असल्याचे सांगितले. काही शिक्षकांनी तर विद्यार्थ्यांना ही मालिका पाहण्याचा सल्ला दिला होता. "शालेय पुस्तकांमध्ये काही पानांपुरता मर्यादित असलेला इतिहास या मालिकेमुळे जिवंत स्वरूपात पाहायला मिळत होता", असे मत अनेकांनी मांडले. त्यामुळे या मालिकेचे बंद होणे हे केवळ मनोरंजन क्षेत्राचे नुकसान नसून सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्याही नुकसान असल्याचे मत प्रेक्षकांकडून व्यक्त करण्यात आले.


याशिवाय, मालिकेचा कथानक महत्त्वाच्या टप्प्यावर असताना अचानक घेतलेल्या निर्णयामुळेही प्रेक्षकांची नाराजी वाढली. फुले दाम्पत्याच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या घटना आणि सामाजिक चळवळींचा प्रवास अद्याप दाखवायचा बाकी असताना मालिका थांबवली जात असल्याने अनेकांना ही कथा अपूर्ण राहिल्याची भावना निर्माण झाली आहे. 


मुलं, पालक, शिक्षक आणि कार्यकर्त्यांचा एकच सूर; मालिका सुरू ठेवा... 


संचित राऊत याने बाईमाणूसशी बोलतांना त्याच्या भावना व्यक्त करत सांगितले की,


"मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका बंद झाल्याने नुकसान कोणत्याही वाहिनीचे होणार नसून नुकसान त्या विद्यार्थ्यांचे आहे ज्यांना खरा इतिहास समजणं गरजेचं आहे. नुकसान त्या सवतींच्या लेकीचं आहे ज्यांना आजही समाज घराचा उंबरा ओलांडताना नाव ठेवतो पण ती सावित्रीमाई चे कार्य डोळ्यासमोर ठेवून त्या समाजाला उत्तर देऊन उंबरा ओलांडते. जर मालिका सुरु राहिली नाही तर येणाऱ्या पुढच्या पिढींना इतिहास कळणार नाही त्यामुळे ही मालिका पुन्हा सुरु होणे गरजेचे आहे आणि सावित्रीबाईंचे आणि ज्योतिराव फुलेंचे कार्य समाजाला कळणे गरजेचे आहे." 

यवतमाळ मधील सत्यशोधक विचार मंचाची सचिव कमल खंडारे या मालिकेबाबत बोलतांना म्हणतात, "जेव्हा आम्हाला माहिती पडलं की मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले हे मालिका टीआरपी अभावी मालिका बंद पडतेय. हे एकूण आम्हाला सर्वांना खूप वाईट वाटलं. जेव्ह पासून ही मालिका सुरु झाली होती. तेव्हा आमच्या गावातील सगळेजण साडेसात वाजेच्या आधी सगळी काम आटपून ही मालिका बघत होते.  लहान लेकरं देखील मोठ्या आवडीने ही मालिका बघायचे. म्हणून टीआरपीचे कारण देऊन मालिका बंद पडू नये." 


User Image

यवतमाळ मधल्याच उषा सोनटक्के यांनी बाईमाणूसशी बोलतांना सांगितले,


"आम्ही स्टार प्रवाहाला निवेदन दिले आहे की, ही मालिका बंद पाडू नये. सावित्रीबाईंचा इतिहास लोकांपर्यंत पोहचवणं ही काळाची गरज आहे. सावित्रीच्या लेकी ह्या इतिहास वाचूनच घडतात. हा इतिहासच जर समोर येण्यापासून थांबवला जात असेल तर याच्यापेक्षा घटक समाजासाठी काही नाहीये. त्यामुळे ही मालिका लवकरात लवकर सुरु करण्यात यावी असं निवेदन आम्ही स्टार प्रवाह वाहिनीला दिलेलं आहे." 


तसेच इचलकरंजी मधील १० वर्षीय वेदिका शिंदे हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. त्यात ती म्हणते, "आमच्या शाळेत सावित्रीबाईंचा फोटो आहे रोज शाळेत जात असतांना त्यांचा चेहरा दिसतो. त्यांच्यामुळेच मुली शिक्षण घेऊ शकत आहेत हे ही आम्हाला शाळेत शिकवलं जातं. आणि मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका सुरु  झाल्यापासून मला त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळाली. मात्र मधातच ती बंद पडली याचं मला खूप वाईट वाटतंय. आम्हा लहान मुलांसाठी तरी ही मालिका पुन्हा सुरु व्हावी अशी माझी इच्छा आहे." 



 टीआरपी म्हणजे काय आणि त्याच्या मर्यादा काय?


मालिका बंद करण्यासाठी टीआरपी हे प्रमुख कारण सांगितले जात असले, तरी सर्वप्रथम टीआरपी म्हणजे नेमके काय हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. टीआरपी म्हणजे ‘टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट’. एखादा कार्यक्रम किती लोक पाहतात, कोणत्या वेळेत पाहतात आणि त्या कार्यक्रमाची लोकप्रियता किती आहे याचा अंदाज या प्रणालीद्वारे घेतला जातो. वाहिन्या, जाहिरातदार आणि निर्माते यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा निर्देशक मानला जातो.


मात्र, गेल्या काही वर्षांत माध्यमांच्या वापराच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. पूर्वी बहुतेक प्रेक्षक मालिका ठरलेल्या वेळेला टीव्हीवर पाहत असत. आता मात्र मोबाईल, स्मार्ट टीव्ही, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि विविध डिजिटल माध्यमांचा वापर झपाट्याने वाढला आहे. अनेक प्रेक्षक मालिका थेट प्रसारणावेळी पाहण्याऐवजी नंतर त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार पाहतात. त्यामुळे टीव्हीवर दिसणारी प्रेक्षकसंख्या आणि प्रत्यक्षात मालिका पाहणाऱ्या एकूण प्रेक्षकांची संख्या यामध्ये मोठा फरक असू शकतो.


याच मुद्द्यावर अमोल कोल्हे यांनीही प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांच्या मते, आज मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक मालिका डिजिटल माध्यमांवर पाहतात. मात्र पारंपरिक टीआरपी प्रणाली प्रामुख्याने टीव्ही प्रसारणावर आधारित असल्याने डिजिटल प्रेक्षकांचा संपूर्ण आकडा त्यामध्ये प्रतिबिंबित होत नाही. त्यामुळे टीआरपी हा लोकप्रियतेचा एक निर्देशक असला, तरी तो एखाद्या मालिकेच्या यशाचे संपूर्ण चित्र दाखवत नाही.

यामुळेच ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ मालिकेच्या बाबतीतही एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. जर एखाद्या मालिकेला डिजिटल माध्यमांवर चांगला प्रतिसाद मिळत असेल, सोशल मीडियावर तिची चर्चा होत असेल आणि समाजातील विविध स्तरांतून तिचे कौतुक होत असेल, तर केवळ पारंपरिक टीआरपीच्या आधारे तिचे यश किंवा अपयश ठरवणे कितपत योग्य आहे? याच प्रश्नामुळे या मालिकेच्या बंद होण्याभोवतीचा वाद अधिक तीव्र झालाय.


स्त्रीला लढताना पाहण्यापेक्षा रडताना पाहणेच अधिक पसंत केले जाते का?


‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ मालिका बंद झाल्यानंतर सोशल मीडियावर आणखी एक प्रश्न मोठ्या प्रमाणात उपस्थित करण्यात आला. दूरचित्रवाणीवरील अनेक लोकप्रिय मालिका आजही स्त्रीच्या आयुष्याला मुख्यतः घर, संसार, नातेसंबंध आणि कौटुंबिक संघर्षांच्या चौकटीतच मांडताना दिसतात. सासू-सुनेचे वाद, कुटुंबातील राजकारण, स्त्री-स्त्री संघर्ष आणि त्यागाच्या पारंपरिक कल्पना याभोवती फिरणाऱ्या कथांना वर्षानुवर्षे प्रेक्षकांसमोर स्थान मिळते. मात्र स्त्रीने अन्यायकारक व्यवस्थेला दिलेले आव्हान, शिक्षणासाठी केलेला संघर्ष, सामाजिक परिवर्तनातील तिचे नेतृत्व आणि समानतेसाठीची तिची लढाई मांडणाऱ्या कथा तुलनेने कमी काळ टिकतात. 


विशेष म्हणजे, ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका एका अशा स्त्रीची कथा सांगत होती जिने केवळ स्वतःसाठी नाही तर संपूर्ण स्त्रीसमाजासाठी शिक्षणाचा मार्ग खुला केला. ज्या काळात स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नाकारला जात होता, त्या काळात सावित्रीबाईंनी समाजाच्या विरोधाला सामोरे जात मुलींसाठी शाळा उभारल्या. शेण-दगडांचा मारा, अपमान आणि सामाजिक बहिष्कार सहन करूनही त्यांनी आपला लढा सुरू ठेवला. त्यामुळे ही मालिका केवळ ऐतिहासिक घटनांचे चित्रण नव्हती, तर स्त्रीच्या स्वातंत्र्याची, आत्मसन्मानाची आणि प्रतिकाराची कथा होती.


User Image

याच कारणामुळे अनेक प्रेक्षकांच्या मनात एक अस्वस्थ करणारा प्रश्न निर्माण झालाय. स्त्रीला सहनशील, त्यागी आणि कुटुंबासाठी स्वतःचे अस्तित्व विसरणारी म्हणून दाखवणाऱ्या कथा सहजपणे लोकप्रिय होतात.  मात्र स्त्रीला विचार करणारी, प्रश्न विचारणारी, परिवर्तन घडवणारी आणि समाजाच्या रूढ चौकटींना आव्हान देणारी व्यक्ती म्हणून मांडणाऱ्या कथांना तितकीच जागा मिळते का? सावित्रीबाईंच्या संघर्षाची कथा अकाली थांबण्यामागे केवळ टीआरपीचे गणित आहे की समाजाला कोणत्या प्रकारच्या स्त्रीकथा सतत दाखवल्या जातात, याचाही विचार करण्याची वेळ आलीये.


अर्थात, कोणतीही मालिका चालवताना व्यावसायिक वास्तव महत्त्वाचे असते. मात्र स्त्री सक्षमीकरण, शिक्षण, सामाजिक न्याय आणि समानतेचा इतिहास सांगणाऱ्या कथांचे मूल्य केवळ बाजारपेठेच्या निकषांवर ठरवता येईल का? हा प्रश्न ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण सावित्रीबाईंची कथा ही फक्त इतिहास नाही. ती आजही स्वतःचा आवाज शोधणाऱ्या, शिक्षण आणि समानतेसाठी लढणाऱ्या प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे.


Share this article
‘द व्हॉइस ऑफ हिंद रजब’ : एका चिमुकल्या मृत्यूचा जिवंत दस्तऐवज
कला / साहित्य / सिनेमा

‘द व्हॉइस ऑफ हिंद रजब’ : एका चिमुकल्या मृत्यूचा जिवंत दस्तऐवज

ट्युनिशियन दिग्दर्शिका काओथर बेन हानिया यांचा ‘द व्हॉइस ऑफ हिंद रजब’ हा चित्रपट गाझातील पाच वर्षांच्या हिंद रजबच्या मृत्यूची हृदयद्रावक कथा मांडतो. युद्ध, भीती, मानवी असहाय्यता आणि प्रशासकीय हिंसेचे भयावह वास्तव प्रेक्षकांसमोर उभे करणारा हा सिनेमा केवळ कलाकृती न राहता मानवतेच्या जखमेचा जिवंत दस्तऐवज ठरतो.

5 min read
H
Harun Sheikh
लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस
कला / साहित्य / सिनेमा

लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस

फुटपाथवरच्या संघर्षमय आयुष्यातून देशाच्या संरक्षणमंत्री पदापर्यंत पोहोचलेले जॉर्ज फर्नांडिस हे भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावी समाजवादी नेत्यांपैकी एक होते. १९७४ च्या ऐतिहासिक रेल्वे संपापासून ते आणीबाणीविरोधातील लढ्यापर्यंत त्यांनी सत्तेविरोधात निर्भीड भूमिका घेत लोकशाही मूल्यांचे रक्षण केले. कामगार नेता, उद्योगमंत्री, रेल्वेमंत्री, संरक्षणमंत्री आणि लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता अशा विविध भूमिकांमधून त्यांनी भारतीय सार्वजनिक जीवनावर अमिट ठसा उमटवला.

9 min read
V
Vikas Meshram
'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?
कला / साहित्य / सिनेमा

'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?

‘ऐ मेरे वतन के लोगो’ गाण्याची संधी ऐनवेळी हातातून निसटली, पण सुमन कल्याणपूर यांनी त्यासाठी कधीही लता मंगेशकरांना दोष दिला नाही. • लता मंगेशकर यांच्या आवाजाशी असलेल्या विलक्षण साम्यामुळे सुमनताईंना काम मिळालं, पण त्याच साम्यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख अनेकदा झाकोळली गेली. • मराठी आणि हिंदी संगीतविश्वात दर्जेदार गायकीचा ठसा उमटवणाऱ्या सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीत प्रतिभेपेक्षा नियतीनेच अधिक परीक्षा घेतल्याची भावना अनेकदा उमटते.

7 min read
S
Sameer Gaikwad
जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!
कला / साहित्य / सिनेमा

जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!

महान शायर बशीर बद्र गेले, काळजात कळ उठली. पिकलं पान गळून पडलं. खरं तर ते गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनीक जीवनापासून दूर असले तरी त्यांचे काव्य हे असंख्य रसिकांच्या मनाला कायम भुरळ घालत राहिले आहे. बशीरजींच्या गेल्यानंतर त्यांच्या कार्याला प्रचंड प्रमाणात दिला जाणारा उजाळा हा त्यांच्या महत्तेची ग्वाही देणारा ठरला आहे.

7 min read
S
shekhar patil
महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष
कला / साहित्य / सिनेमा

महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष

ज्याकाळात आधुनिकता ह्या शब्दाचा मागमूस देखील नव्हता. जेव्हा स्त्रिया सोडाच पण माणसालाच माणूस म्हणून वागवलं जात नव्हतं. अशा काळात एका महात्म्याने मासिक पाळीला विटाळ म्हणण्यास कडकडून विरोध केला होता. महात्मा बसवेश्वर यांनी जनन, मरण, जात, रजस्व आणि उच्छिष्ट हे पंचसूतक नाकारलंय. त्यापैकी जन्म आणि रजस्व ही दोन्ही सुतकं थेट स्त्रीत्वाशी नातं सांगतात. त्यामुळे मासिक पाळीतला विटाळ पाळणं, स्पर्श केल्यास अपवित्र झाल्याचं मानणं, हे बसवण्णांच्या विचारांच्या विरोधात आहे.

4 min read
C
Channveer Bhadreshwarmath
 ‘’जेव्हा फाळणीने क्रिकेटच्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…’’
कला / साहित्य / सिनेमा

‘’जेव्हा फाळणीने क्रिकेटच्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…’’

भारत-पाकिस्तान क्रिकेटचा इतिहास आपण अनेकदा युद्ध, राष्ट्रवाद आणि तणावाच्या चौकटीत पाहतो. पण या वैराच्या मुळाशी एक अशी कहाणी दडलेली आहे, जिथे दोन क्रिकेटपटू एकाच शहरात वाढले, एकाच मैदानावर खेळले आणि एकमेकांना मित्र मानत मोठे झाले. फाळणीने त्यांना दोन देशांच्या विरुद्ध बाजूंवर उभं केलं; पण त्यांच्या मैत्रीच्या आठवणी सीमारेषाही पुसू शकल्या नाहीत. ही केवळ दोन क्रिकेटपटूंची गोष्ट नाही; ती फाळणीने जखमी झालेल्या उपखंडाची, तुटलेल्या नात्यांची आणि तरीही माणुसकी जिवंत राहू शकते, या आशेची कहाणी आहे. आता आशुतोष गोवारीकर आणि आमिर खान फाळणीच्या पार्श्वभूमीवर याच घटनेवर आधारित चित्रपटाची तयारी करत असल्याची चर्चा सुरू आहे.

10 min read
A
Akshay Ramesh

Comments

Comments are currently disabled or loading...