एनडीए सरकारचा शपथविधी झाल्यानंतर सोशल मीडियावर एक कार्टून फार व्हायरल झालं. कोणाचाही सत्ता, कोणाचाही पक्ष… मंत्रीपद मिळवण्यावरच माझं लक्ष…! भारतातील सर्वात हुशार राजकारणी, निवडणूक नाही, प्रचार नाही, खर्च नाही, व्याप नाही, कोणताही त्रास नाही, जिंकण्या-हरण्याचं टेन्शन नाही, मंत्रिपद मिळेल का अशी घालमेल नाही… थेट मंत्रिपदाचं लेटरचं हातात…!
अर्थात हे कार्टन होतं दलित नेते रामदास आठवले यांच्याबाबतीत. रामदास आठवले यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात सलग तीन वेळा शपथ घेतली. रिपब्लिकन चळवळीतील महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याच्या नावे हा विक्रम नाही. बौध्द समाजाचे तुकाराम शृंगारे कॅबिनेट मंत्री होते. लातूर लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. ही घटना 1978ची त्यानंतर महाराष्ट्रातून बौध्द समाजाचे रामदास आठवले हेच मंत्री झाले. यांच्यात आणखी एक फरक आहे.. आठवले मेहरबानीवर मंत्री आहेत म्हणजे ते राज्यसभेत आहेत तर शृंगारे लोकसभेवर निवडून गेले होते आणि त्यांना यशवंतराव चव्हाण यांनी संधी दिली होती तर आठवले यांना प्रथम गोपीनाथ मुंडे यांनी तर नंतर भाजपने आपल्या बेरजेच्या राजकारणासाठी राज्यसभेवर संधी दिली.

आठवले यांचा राजकीय प्रवास
आठवले यांचा राजकीय प्रवास तसा फार काही आडवळणाचा नाही. 1989 च्या काळात शिवसेना ग्रामीण भागात पोहोचली होती… भाजप आणि शिवसेना युतीने कॉँग्रेसपुढे आव्हान निर्माण केलं होतं.. एक वर्षांपूर्वी बाबासाहेब आंबेडकर यांच्या रामायण महाभारतावरील पुस्तकाचा वाद निर्माण झाला. हा लढा आंबेडकरी जनतेने जिंकला होता. यावेळी स्थापन झालेल्या संवर्धन समितीच्या नेतृत्वाखाली सर्व रिपब्लिकन गट एकत्र आले होते. त्यामुळे एक मोठी ताकद निर्माण झाली होती.त्याचा फायदा घेण्यासाठी मुख्यमंत्री शरद पवार यांनी रामदास आठवले यांना जाळ्यात ओढले.कोणाशी युती करायची की स्वतंत्र लढायचे या मुद्द्यावर समिती फुटली. समितीत झालेल्या मतदानात प्रकाश आंबेडकर एका मताने मागे पडले आणि कॉंग्रेस सोबत युती करण्याचा रामदास आठवले यांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली. त्यानुसार शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात रामदास आठवले मंत्री झाले.
त्यापूर्वी रामदास आठवले वडाळा येथील सिद्धार्थ विहार वसतीगृहात वक्तव्याला होते. रूम क्रमांक 50 हे त्यांचे निवासस्थान आणि भारतीय दलित पँथरचे कार्यालय होते. वसतीगृह ते थेट मलबार हिल या त्यांच्या प्रवासात नंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. जबरदस्त संघटक, जनतेत मिळण्याचा स्वभाव आणि कोणाचे सुख दुःख आपले मानून धावून जाण्याची वृत्ती त्यामुळे रामदास आठवले एक जनाधार असलेले नेते होते. शरद पवार आणि कॉंग्रेसला आंबेडकर घराण्याविषयी एक प्रकाराचा आकस असल्याने शरद पवार यांनी नेहमीच आठवलेंना ताकद दिली. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून आठवलेंना निवडून आणले. नंतर पंढरपूर राखीव लोकसभा मतदार संघ आठवले याना देण्यात आला. मतदारसंघ पुर्नरचना झाल्यावर पुन्हा आठवलेंना शिर्डी या राखीव मतदारसंघात लढविण्यात आले. यावेळी शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि कॉंग्रेस युतीचे उमेदवार होते. पण या वेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी आठवले यांचा पराभव केला. त्यानंतर आठवले शरद पवार यांना सोडून पुरोगामी लोकशाही आघाडीत सहभागी झाले. पण तिथे त्यांचा जीव रमला नाही कारण तोपर्यंत त्यांना सत्तेची चव माहित झाली होती. मग थोडा वेळ शिवसेना व्हाया भारतीय जनता पक्ष असा प्रवास त्यांनी केला.

2014 मध्ये गोपीनाथ मुंडे बीड लोकसभा मतदारसंघात उभे राहणार होते पण त्यांना आत्मविश्वास नव्हता. नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते आणि मुंडे यांचे पंख कापले जात होते. प्रमोद महाजन हयात नव्हते. त्यामुळे आपली युती अधिकाधिक मजबूत करण्याचा मुंडे यांचा प्रयत्न होता. यासाठी त्यांनी रामदास आठवले यांना ” ब्रेक” दिला. भाजपने त्यांना राज्यसभेत पाठवले. काही वर्षात त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. मोदींच्या मंत्रिमंडळात जे स्थान मंत्र्यांना होते तशीच अवस्था आठवले यांची होती. पण महाराष्ट्रात दुसरा कोणी मंत्री नाही, त्यामुळे आठवले यांच्या मागे वलय कायम राहिले.
रामदास आठवले यांचे वैशिष्ट्य काय आहे?
सांगली जिल्ह्यातील एका खेडे गावात जन्मलेल्या आणि लहान वयाच बापाचे निधन झाल्यामुळे आईने सांभाळ केलेल्या रामदास आठवले यांचा हा प्रवास तसा रोमांचकारी समजला पाहिजे. रामदास आठवले यांचे वैशिष्ट्य काय आहे? त्यांना हे यश का मिळत गेले ? याचे पाहिले कारण आहे ते आठवले यांचा स्वभाव आणि निर्णय घेण्याची क्षमता. ढाले, ढसाळ यांनी दोन गट केल्यावर भारतीय दलित पँथरचे नेते होते गंगाधर गाडे. नंतर अरुण कांबळे… या काळात रामदास आठवले संघटक होतेच. अरुण कांबळे यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर प्रश्नावर थोडी वेगळी भूमिका घेतली आणि रामदास आठवले यांनी पुढाकार घेऊन अरुण कांबळे यांना काढून टाकले. आठवले स्वतः अध्यक्ष झाले आणि आजवर ते या पदावर कायम आहेत. सत्तेत जाताना त्यांनी पँथर बरखास्त केली आणि रिपब्लिकन पक्ष स्थापन केला. हा पक्ष गेले तीन दशके सत्तेत आहे. इतर कारणांमुळे आणि रामदास आठवले हे सर्वांना सोयीचे नेते असल्याने त्यांचे नेतेपद अढळ आहे.
कधीकाळी आपल्या सहकारी मित्रांना जीव लावणारा नेता म्हणून आठवले यांना जनाधार होता पण गेल्या काही वर्षात सत्तेचे सर्व अवगुण त्यांच्यात आलेत अशी तक्रार जवळचे पदाधिकारी करतात. पण आठवले आता एवढे पुढे गेलेत की त्यांना अशा तक्रारीची चिंता करण्याचे कारण राहिले नाही. बदलत्या काळात आठवले सारखी जीवनशैली हे प्रत्येकाचेच स्वप्न असल्याने आठवले विषयी कोणाला काही वावगे वाटत नाही.
मुळातच संघर्ष किवा वाद न करता, उगाच तत्त्वज्ञान न सांगता आपल्या “गॉडफादर” सोबत प्रामाणिक राहण्याचा ते आटोकाट प्रयत्न करतात. शिवसेनेसोबत असताना उद्भव ठाकरे यांना सोयीच्या असलेल्या मुद्यावर ते बोलत असतं. म्हणजे राज ठाकरे यांच्यावर टीका करणे वगैरे. मात्र आपल्या पक्षाच्या बाबतीत असे कोणी बोललेले ठाकरे यांना आवडले नाही. 2014 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षासोबत जाण्याबाबत आठवले थोडे गोंधळलेले होते. पण शेवटी राष्ट्रीय पक्षा सोबत म्हणजे भाजप सोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. रामदास आठवले यांची ही खासियत आहे. ते निर्णय घेतात. अरुण कांबळे यांना घराचा रस्ता दाखविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि ते नेते झाले. शरद पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्याची फळ ते आयुष्यभर चाखणार आहेत.

भाजपने सांगायचे आणि आठवलेंनी निमुटपणे मान्य करायचे…
2014 मध्ये ते भारतीय जनता पक्षासोबत गेले तेव्हा सामाजिक उधळण बरीच झाली होती. त्यामुळे समाजातून त्यांच्या विरोधात मोठी प्रतिक्रिया आली नाही. प्रकाश आंबेडकर किवा इतर कोणी नेता सत्तेच्या जवळ असता तर आठवलेंना थोडे जड गेले असते पण गेली तीन दशके आठवले एकटेच सत्तेत आहेत. आठवले आपल्या बॉसचा अजेंडा राबविण्यात धन्यता मारणारे नेते आहेत. आता ते संघ परिवारासाठी काम करतात. भाजपसोबत त्यांची युती म्हणजे भाजपने सांगायचे आणि आठवलेंनी निमुटपणे मान्य करायचे अशी आहे. काही किमान समान कार्यक्रम नाही, काही धोरण नाही फक्त आठवलेंना मंत्री केले की झाले !
एवढ्यावरच हे संपत नाही तर गेल्या दोन्ही निवडणुका आठवलें लढलेले नाहीत. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत आठवलेंना 5 जागा देण्यात आल्या आणि या जागेवर उमेदवारही देवेंद्र फडणवीस यांनीच दिले. हे उमेदवार कमळ चिन्हावर लढले. 2019 आणि 2024 या लोकसभा निवडणुकीत आठवलेंना एकही जागा देण्यात आली़ नाही. तर स्वतःच्या पक्षाला निवडणुकीच्या रिंगणात आठवले यांनी उतरवले नाही. तर कट्टर हिंदुत्ववादी उमेदवारांच्या प्रचारात ते हिरीरीने उतरले होते. मोदीच्या गेल्या दहा वर्षात मागासवर्गीयांच्या बजेट मध्ये कपात करण्यात येत आहे. अनेक योजना बंद करण्यात आल्या आहेत. मोदी सरकारची अनेक निर्णय आणि धोरण हे राज्य घटनेच्या विरोधात आहेत. पण आठवले मंत्रीपदाची खुर्ची गरम करण्यात धन्यता मानत असल्याने याबाबतीत ते काय बोलतील ?
आज आठवले मोठे नेते असले तरी आंबेडकरी विचाराशी त्यांचे काही देणेघेणे बाकी आहे असे म्हणता येणार नाही. खरं तर त्याच्याकडून आता अशी अपेक्षा करणे हेच चुकीचे ठरेल. आठवलेंच्या नावे तीन वेळा मंत्री होण्याचा विक्रम असेल, ही इतिहासात नोंद होईल पण त्याच वेळी आठवले यांनी कट्टर हिंदुत्ववादी, आंबेडकरी विचाराच्या विरोधी पक्षाला, फॅसिस्ट विचारधारेला हातभार लावला अशीही त्यांची इतिहासात नोंद होणार आहे.






