Skip to main content

भारत शहरांची ‘इस्लामी’ नावं बदलतोय; पाकिस्तान मात्र परत आणतोय ‘हिंदू’ ओळख… लाहोरमध्ये आता ‘लक्ष्मी चौक’, ‘राम गल्ली’ आणि ‘कृष्ण नगर’

Ritesh Shisode
19 May 2026
0 views
भारत शहरांची ‘इस्लामी’ नावं बदलतोय; पाकिस्तान मात्र परत आणतोय ‘हिंदू’ ओळख… लाहोरमध्ये आता ‘लक्ष्मी चौक’, ‘राम गल्ली’ आणि ‘कृष्ण नगर’

रितेश शिशोदे


  • भारतात अलाहाबादचं प्रयागराज, औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर अशा इस्लामी नावांच्या बदलांवरून मोठे राजकीय वाद झाले; पण पाकिस्तानमध्ये सध्या याच्या अगदी उलट प्रक्रिया सुरू आहे.


  • लाहोरमधील ‘बाबरी मशीद चौक’ पुन्हा ‘जैन मंदिर चौक’, ‘इस्लामपुरा’ पुन्हा ‘कृष्ण नगर’ आणि ‘सुन्नत नगर’ पुन्हा ‘संत नगर’ होत आहे.


  • पाकिस्तानच्या पंजाब सरकारने हिंदू, शीख, जैन आणि ब्रिटिशकालीन ऐतिहासिक नावं पुन्हा अधिकृत करण्याचा निर्णय घेतला असून, या बदलांविरोधात अद्याप मोठा कट्टर विरोधही दिसलेला नाही.


  • फाळणीनंतर पुसण्याचा प्रयत्न झालेल्या लाहोरच्या सांस्कृतिक स्मृती आजही स्थानिकांच्या बोलण्यात जिवंत राहिल्या, आणि अखेर सरकारलाही तीच नावं मान्य करावी लागली.


  • पाकिस्तानात सुरू झालेल्या या ऐतिहासिक नामांतर मोहिमेमागे नेमकं काय राजकारण, सांस्कृतिक वास्तव आणि लोकमानस दडलं आहे, याचा घेतलेला हा सविस्तर वेध.


२०१४ नंतर भारतामध्ये अनेक शहरांची नावं बदलण्यात आली… विशेषत: या सगळ्या शहरांची नावं इस्लामी होती. उदाहरणार्थ अलाहाबादचं प्रयागराज, फैजाबादचं अयोध्या, मुघलसरायचं दीनदयाळ उपाध्याय नगर, तर महाराष्ट्रातील औरंगाबादचं छ. संभाजीनगर.. शहरांच्या या नामकरणाच्यावेळी देशभरात चर्चा, मोर्चे, आंदोलनं आणि राजकीय वादही पाहायला मिळाले.  . इतिहास, संस्कृती आणि मूळ ओळख परत आणण्याच्या नावाखाली अनेक शहरांची इस्लामी किंवा मुघलकालीन नावं बदलून पुन्हा हिंदू किंवा प्राचीन भारतीय वारशाशी जोडली गेली. काहींनी याचं स्वागत केलं तर काहींनी याला इतिहासाचा “राजकीय वापर” म्हटलं. 


पण तुम्हाला जर हे सांगितलं की, सध्या भारताचा कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तानमध्ये मात्र नेमकं याच्या उलट घडत असेल तर…? पाकिस्तानमधील काही गल्ल्यांना, चौकांना, परिसरांना असलेली इस्लामी नावं बदलून हिंदू नावं देण्यात येत असतील तर…? लाहोर शहरातील प्रसिद्ध बाबरी मशीद चौक” चे नाव “जैन मंदिर चौक” असं बदलण्यात येत असेल तर…?


असं सध्या पाकिस्तानमध्ये प्रत्यक्ष घडत आहे. फाळणीच्या भीषण जखमा आणि तब्बल आठ दशकांच्या प्रदीर्घ काळानंतर पाकिस्तानमधील पंजाब प्रांताने आपल्या सांस्कृतिक राजधानीचा म्हणजेच लाहोरचा गमावलेला इतिहास पुन्हा जिवंत करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. लाहोरमधील ज्या रस्ते, गल्ल्या आणि चौकांची नावे फाळणीनंतर बदलून इस्लामिक किंवा पाकिस्तानी नेत्यांच्या नावावर ठेवण्यात आली होती, त्यांना आता पुन्हा त्यांची जुनी आणि मूळ हिंदू, शीख, जैन तसेच ब्रिटिशकालीन नावे दिली जात आहेत.


User Image


या ऐतिहासिक निर्णयामुळे लाहोरमधील प्रसिद्ध 'इस्लामपुरा' आता पुन्हा एकदा 'कृष्ण नगर' म्हणून ओळखले जाईल. तर 'बाबरी मशीद चौक' शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या आपल्या जुन्या 'जैन मंदिर चौक' या नावाने दिमाखात उभा राहणार आहे. “सुन्नत नगर” पुन्हा “संत नगर” होतंय आणि विशेष म्हणजे या निर्णयाविरोधात पाकिस्तानातील कट्टर संघटनांनी ना आंदोलनं केली ना निषेध व्यक्त केला… 


पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात म्हण आहे ‘जिन्ने लाहोर नहीं वेख्या, ओ जमिया ही नहीं’ (ज्याने लाहोर पाहिले नाही, त्याचा जन्मच झाला नाही). पाकिस्तानच्या पंजाब प्रांताची राजधानी असलेले लाहोर शहर हे भारताच्या अमृतसरपासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. हे पाकिस्तानमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे आणि प्रमुख शहर म्हणून ओळखले जाते. भारत-पाकिस्तान फाळणीच्या आधीच्या काळात हिंदू आणि शीख बांधवांसाठी लाहोर हे अत्यंत मोलाचे साहित्यिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक तसेच पौराणिक केंद्र मानले जात होते. परंतु, हे शहर पाकिस्तानात समाविष्ट झाल्यानंतर तिथल्या हिंदू संस्कृतीची आणि इतिहासाची ओळख पुसून टाकण्याचे अनेक प्रयत्न केले गेले. त्यानंतर १९९२ च्या काळात भारतात बाबरी मशीद पाडल्याची प्रतिक्रिया म्हणून लाहोरमधील अनेक प्राचीन हिंदू मंदिरांचे आणि धर्मस्थळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले. इतकेच नव्हे तर, तिथल्या हिंदू आणि शीख इतिहासाशी संबंधित असलेल्या अनेक जुन्या ठिकाणांची नावे देखील बदलण्यात आली.


नवाज शरिफ यांच्या काळात बदलली अनेक नावं, मुलीकडून आता दुरुस्ती


आता मात्र या संदर्भात एक अत्यंत रोचक घडामोड समोर आली आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या आणि सध्या पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळत असलेल्या मरियम नवाज यांच्या सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार लाहोरमधील अशा नऊ परिसरांची नावे बदलून ती पुन्हा त्यांच्या पूर्वीच्याच जुन्या प्रचलित हिंदू नावांनीच ओळखली जातील, असे जाहीर करण्यात आले आहे. 


पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या मते, परकोटा शहर लाहोरचे दिल्ली गेटसह सर्व ८ दरवाजे दुरुस्त होतील. सूत्रांनुसार, नामकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पाकिस्तानच्या सिंध व खैबर पख्तुनख्वा प्रांतातही मूळ नावांची घोषणा शक्य आहे.


पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ व पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी १९ मार्च रोजी उच्च स्तरीय बैठक बोलावली. यामध्ये लाहोर हेरिटेज एरिया रिवाइव्हल (एलएचएआर) प्रकल्पावर चर्चा झाली. लाहोरच्या नवीन नावांना पुन्हा जुन्या हिंदू किंवा ब्रिटिश वारशाच्या काळातील नावांवर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नवाज यांचे म्हणणे होते की, आपल्याला युरोपपासून शिकले पाहिजे. ते ऐतिहासिक नावांसोबत छेडछाड करत नाहीत. लाहोरची जुनी नावे आपला इतिहास आहेत, हे आपल्याला जतन करायचे आहे, बदलायचे नाही. मरियम यांचे म्हणणे होते की लाहोरचा इतिहासच त्याची ओळख आहे.


या अत्यंत महत्त्वाच्या निर्णयाबाबत प्रशासनाकडून लगेचच अधिकृत अधिसूचना म्हणजेच सरकारी आदेश देखील प्रसारित करण्यात आलाय. याच नामांतराचे एक उदाहरण म्हणजे, तिथल्या 'कृष्णा नगर' या ऐतिहासिक परिसराचे नाव पूर्वी बदलून 'इस्लामपुरा' असे करण्यात आले होते. स्थानिक लोकांच्या स्मृतीनुसार, त्या ठिकाणी पूर्वी भगवान श्रीकृष्णांचे एक भव्य मंदिर अस्तित्वात होते, जे नंतरच्या काळात पाडून टाकण्यात आले. आता मरियम नवाज सरकारच्या नवीन निर्णयामुळे पुन्हा एकदा त्या संपूर्ण भागाला 'कृष्णा नगर' याच मूळ नावाने अधिकृतपणे ओळखले जाणार आहे. म्हणजेच आधी दिलेले इस्लामी नाव बदलून त्या जागी पुन्हा जुने हिंदू नाव परत आणले जात आहे.


User Image


या नामांतरांचे दुसरे एकउदाहरण म्हणजे 'संत नगर' हा परिसर होय. या भागाचे मूळ नाव बदलून 'सुन्नत नगर' असे करण्यात आले होते, परंतु आता घेतलेल्या नवीन निर्णयानुसार ते पुन्हा बदलून मूळ 'संत नगर' असेच होणार आहे. 


याप्रमाणेच लाहोरमधील अत्यंत गजबजलेले आणि अतिशय प्रसिद्ध ठिकाण असलेल्या 'लक्ष्मी चौक' या परिसराचे नाव देखील बदलून 'चौधरी मौलाना जफर चौक' असे ठेवण्यात आले होते. आता मात्र हा जुना बदल रद्द करून हा चौक पुन्हा एकदा आपल्या मूळ 'लक्ष्मी चौक' याच लोकप्रिय नावाने ओळखला जाणार असून, या सर्व नवीन हिंदू नावांचे अधिकृत फलक (बोर्ड) देखील लाहोर शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.


याची आणखी उदाहरणं द्यायची झाली तर, पूर्वीच्या 'राम गली' या परिसराचे नाव बदलून 'रहमान गली' असे करण्यात आले होते, जे आता पुन्हा बदलून मूळ 'राम गली' केले जात आहे; तसेच 'बाबरी मशीद चौक' हे नाव बदलून त्याला पुन्हा एकदा 'जैन मंदिर चौक'(जैन हिंदू चौक) असे केले जात आहे, आणि 'मुस्तफाबाद' या भागाचे नाव देखील बदलून त्याचे जुने 'धर्मपुरा' हे नाव पूर्ववत केले जात आहे. 


या ऐतिहासिक बदलांमध्ये केवळ हिंदू नावेच नव्हे, तर पूर्वी बदलण्यात आलेल्या काही ब्रिटिशकालीन नावांचाही समावेश असून, ती इस्लामी नावे हटवून पुन्हा जुन्या ओळखीनुसार दिली जात आहेत; आणि सध्या अशा नऊ प्रमुख ठिकाणांची निवड करण्यात आली असली, तरी येणाऱ्या काळात पंजाब प्रांताच्या इतर अनेक भागांतही अशीच मूळ नामांतराची प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत, म्हणजेच या संपूर्ण मोहिमेद्वारे त्या ऐतिहासिक भागांची मूळ संस्कृती, ओळख आणि मूळ नावे पुन्हा एकदा सन्मानाने परत आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे.


‘’आम्ही कधीही बाबरी मशीद चौक म्हटले नाही, लक्ष्मी चौकच म्हणायचो’’


लाहोरमधील या जैन मंदिराजवळच्या अनारकली भागातील मौलाना वाजिद कादरी या नामकरणाच्या बाबतीत सांगतात की,


‘’इस्लामला कोणत्याही मंदिर किंवा गुरुद्वाराशी समस्या नाही. १९९० च्या दशकात जैन मंदिर चौकाचे नाव बदलून बाबरी मशीद चौक केले. हा राजकीय निर्णय होता. आम्ही याला कधीही बाबरी मशीद चौक म्हटले नाही. हे समजावे लागेल की ज्या पूर्वजांनी ही हिंदू नावे ठेवली होती, तेदेखील मुसलमानच होते, आणि यामुळे त्यांच्या इमानाला धक्का लागला नव्हता.’’


लाहोरच्या बीकनहाऊस विद्यापीठाचे प्राध्यापक साद मलिक म्हणतात, 


‘’हा खरेच सुखद बदल आहे. मी याला नेहमी लक्ष्मी चौकच म्हणत आलो, कारण माझे वडील याला याच नावाने बोलवायचे. महापालिकेने आपल्या कागदपत्रांमध्ये याचे नाव भलेही मौलाना जफर अली चौक केले असेल, पण माझ्यासाठी व माझ्यासारख्या अनेकांसाठी लक्ष्मी चौक त्या वारशाचा भाग आहे, ज्याचा जफर अली खान यांच्या नावाशी संबंध नाही. लक्ष्मी चौक हे पिढ्यांपिढ्या जोडलेले नाव आहे.’’


User Image


इम्रान खान यांना नाव बदलण्यापासून तिरस्कार होता


हा संपूर्ण निर्णय ऐतिहासिकदृष्ट्या चांगला पायंडा पाडणारा आहे, कारण पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या सत्ताकाळात आणि त्यांच्याही आधीच्या काळात लाहोरमधील अशा अनेक प्राचीन हिंदू व ऐतिहासिक ठिकाणांची नावे बदलून ती जाणीवपूर्वक इस्लामी करण्यात आली होती. त्यानंतरच्या काळात, म्हणजेच २०१८ ते २०२२ या चार वर्षांच्या दरम्यान जेव्हा इम्रान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून कार्यरत होते, तेव्हा या नावबदलाची किंवा जुनी नावे परत आणण्याची कोणतीही प्रक्रिया पूर्णपणे थांबली होती; परंतु आता अचानक नवाज शरीफ यांच्याच कन्या मरियम नवाज यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारने इतका मोठा आणि धाडसी निर्णय नेमका कोणत्या कारणामुळे घेतला, हा अत्यंत उत्सुकतेचा आणि विचार करायला लावणारा मुख्य प्रश्न आहे.


मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी हा धाडसी निर्णय का घेतला?


या सर्व ऐतिहासिक निर्णयामागे प्रशासनाकडून असा युक्तिवाद सादर करण्यात आला आहे की, लाहोर हे अतिशय प्राचीन आणि समृद्ध संस्कृतीचे ऐतिहासिक शहर आहे, त्यामुळे या शहराची मूळ ऐतिहासिक ओळख कोणत्याही परिस्थितीमध्ये कायम जपणे अत्यंत गरजेचे आहे. उदाहरणार्थ असे सांगण्यात आले की, युरोपमधील देशांमध्ये तिथल्या प्राचीन ऐतिहासिक इमारती, जुन्या प्रथा, परंपरा आणि पौराणिक संदर्भांशी जोडलेली ठिकाणांची नावे कधीही बदलली जात नाहीत, कारण एखादा इतिहास जबरदस्तीने पुसून टाकण्याचा कितीही प्रयत्न केला, तरीही मूळ इतिहास कधीच पूर्णपणे पुसला जाऊ शकत नाही.


नेमक्या याच व्यापक विचारसरणीचा आधार घेऊन मरियम नवाज यांच्या सरकारने हे अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.


या संपूर्ण प्रकरणातील दुसरी अत्यंत महत्त्वाची आणि उल्लेखनीय गोष्ट म्हणजे गेल्या अनेक वर्षांत प्रशासकीय पातळीवर या ठिकाणांची नावे वारंवार बदलली गेली आणि तिथले अधिकृत फलकही बदलण्यात आले, तरीही तिथल्या स्थानिक लोकांच्या दैनंदिन बोलण्यात आणि व्यवहारात आजही 'लक्ष्मी चौक', 'जैन मंदिर चौक' आणि 'कृष्णा नगर' हीच जुनी नावे सातत्याने वापरली जात आहेत; सरकारी कागदपत्रांमध्ये बदल करूनही 'मौलाना जफर चौक' किंवा 'बाबरी मशीद चौक' ही नवीन इस्लामी नावे तिथल्या सामान्य लोकांच्या जिभेवर कधी रूळलीच नाहीत. त्यामुळेच अखेर हतबल होऊन तिथल्या सरकारने सामान्य लोकमानसात आणि जनमानसात आजही जिवंत असलेली ही जुनी मूळ नावे अधिकृतपणे पुन्हा पूर्ववत आणण्याचा अतिशय व्यवहार्य निर्णय घेतला आहे. विशेष नोंदवण्यासारखी गोष्ट म्हणजे पाकिस्तानमधील या मोठ्या निर्णयाला तिथल्या कट्टरांकडून अद्याप तरी कोणताही तीव्र विरोध झालेला पाहायला मिळालेला नाही. 


User Image(पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज)


भविष्यात लाहोरचे पुन्हा 'लवपुर' होणार का?


पत्रकार राजीव रंजन यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर त्यांनी लाहोरमधल्या  इस्लामिक नावे बदलून पुन्हा जुनी हिंदू नावे ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयाचा रोचक आढावा घेतला आहे. आपल्या व्हिडियोमध्ये राजीव रंजन म्हणतात की, ऐतिहासिकदृष्ट्या लाहोर आणि भारताची राजधानी दिल्ली या दोन्ही शहरांमध्ये अनेक सांस्कृतिक साम्यस्थळे पाहायला मिळतात; जसे की, लाहोरच्या प्रसिद्ध किल्ल्यामध्ये भगवान श्रीराम आणि माता सीता यांचे सुपुत्र 'लव' यांचे एक प्राचीन मंदिर असल्याचे सांगितले जाते, आणि अशी मान्यता आहे की 'लव' यांनीच सुरुवातीला 'लवपुर' किंवा 'लवपुरी' नावाचे हे शहर वसविले होते, ज्याचे पुढे काळाच्या ओघात 'लाहोर' मध्ये रूपांतर झाले. याच कारणामुळे, जर आता तिथल्या नऊ ठिकाणांची जुनी नावे पुन्हा बदलली जात असतील, तर भविष्यात लाहोर शहराचे नाव देखील अधिकृतपणे बदलून पुन्हा एकदा 'लवपुर' करण्याचा विचार तिथल्या प्रशासनाकडून केला जाऊ शकतो का ? 


लाहोरचा ऐतिहासिक किल्ला आणि दिल्लीचा भव्य लाल किल्ला यांच्या रचनेत कमालीचे साधर्म्य आहे; कारण दिल्लीच्या लाल किल्ल्याला जसा 'लाहोरी गेट' नावाचा दरवाजा आहे, अगदी तसेच लाहोरच्या किल्ल्यातही 'दिल्ली गेट" अस्तित्वात आहे, तसेच दिल्लीत ज्याप्रमाणे 'मॉडेल टाउन' हा परिसर आहे, अगदी तसाच लाहोरमध्येही पूर्वी 'मॉडेल टाउन' नावाचा भाग प्रसिद्ध होता, आणि महत्त्वाचे म्हणजे दिल्लीतील विख्यात 'सर गंगाराम हॉस्पिटल' प्रमाणेच लाहोरमध्येही आजही 'सर गंगाराम हॉस्पिटल' सेवा देत आहे. भारत-पाकिस्तान फाळणीच्या आधीच्या काळाचा विचार केला, तर लाहोरमधील तब्बल ३६% संपत्ती आणि मालमत्ता ही पूर्णपणे हिंदू आणि शीख समुदायाच्या मालकीची होती, तसेच शीख साम्राज्य निर्माते महाराजा रणजित सिंह यांनी लाहोरला आपल्या राज्याची मुख्य राजधानी बनवले असल्यामुळे शीख इतिहासातही लाहोरला अनन्यसाधारण महत्त्व लाभले होते, परंतु खेदाची बाब म्हणजे, याच पराक्रमी महाराजा रणजित सिंह यांच्या जन्मस्थळाचे नंतरच्या एका काळात पाकिस्तानात चक्क पोलीस स्टेशनमध्ये रूपांतर करण्यात आले होते.


लाहोर शहर भारताऐवजी पाकिस्तानात नेमके कसे गेले?


ऐतिहासिकदृष्ट्या लाहोर शहर भारताऐवजी पाकिस्तानात नेमके कसे गेले, हा खरोखरच विचित्र प्रश्न आहे; कारण सर सिरिल रॅडक्लिफ यांनी जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील फाळणीची अधिकृत सरहद्द रेषा आखली, तेव्हा त्यांनी नंतर बीबीसीला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत स्पष्टपणे कबूल केले होते की, त्यांना त्या काळी भारताच्या प्रत्यक्ष भौगोलिक परिस्थितीची किंवा तिथल्या सामाजिक रचनेची कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. त्यांच्या समोर केवळ देशाचा कागदी नकाशा ठेवण्यात आला होता आणि त्यावरूनच त्यांना भारत-पाकिस्तानची सीमा निश्चित करून जमिनीची फाळणी करण्यास सांगितले गेले होते; आणि त्यांनी या मुलाखतीत पुढे असेही नमूद केले होते की, नव्याने निर्माण होणाऱ्या पाकिस्तानच्या वाट्याला किमान एक तरी मोठे आणि प्रगत शहर जावे, केवळ याच एका विचारामुळे त्यांनी लाहोर शहर भारताला न देता पाकिस्तानच्या हद्दीत समाविष्ट केले होते.


User Image


फाळणीची ही दुर्दैवी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, लाहोरमधील लाखो हिंदू आणि शीख बांधवांना आपली घरेदारे सोडून भारतात स्थलांतर करावे लागले, ज्यानंतर त्यांनी मागे सोडलेल्या अनेक भव्य हवेल्या आणि मोठ्या कोठ्यांवर तिथल्या स्थानिक लोकांनी अनधिकृतपणे ताबा मिळवला, आणि नंतरच्या काळात तिथल्या भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लाच घेऊन या मौल्यवान मालमत्तांचे आपापसात वाटप केले. याच लाहोर शहराच्या अगदी जवळ 'शेखूपुरा' नावाचे एक ऐतिहासिक ठिकाण वसलेले आहे, जिथे मुघल सम्राट अकबराचा मुलगा जहांगीर याने आपल्या वडिलांशी झालेल्या मतभेदांमुळे रागे भरत त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी काही काळ वास्तव्य केले होते; या शेखूपुरा परिसरातील अनेक स्थानिक राजपूत समाज बांधव जरी मुस्लीम धर्मात धर्मांतरित झाले असले, तरीही ते आजही आपल्या नावापुढे अत्यंत अभिमानाने 'राजा' ही आपली मूळ पारंपरिक हिंदू उपाधी लावतात.


मिंटो पार्कच्या कुस्तीचा आखाडा आणि क्रिकेटचे मैदानही परतणार!


एकदा पाकिस्तानला भेट देणाऱ्या एका अधिकृत भारतीय प्रतिनिधीमंडळामध्ये सहभागी असलेल्या ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांनी पाकिस्तान सरकारकडे एक महत्त्वाची मागणी केली होती; ज्यामध्ये त्यांनी महाराजा रणजित सिंह यांचे ऐतिहासिक जन्मस्थळ पोलिसांच्या ताब्यातून मुक्त करून ते पुन्हा एकदा पुरातत्व विभागाअंतर्गत सुरक्षित आणि संरक्षित स्मारक म्हणून घोषित करावे अशी विनंती केली होती, आणि विशेष म्हणजे त्यांच्या या संवेदनशील मागणीला तत्कालीन पाकिस्तानातील शासकांकडून तत्त्वतः म्हणजेच प्राथमिक मंजुरी देखील देण्यात आली होती. 


User Image

या ऐतिहासिक मोहिमेअंतर्गत केवळ रस्तेच नाही, तर लाहोरचा क्रीडा इतिहासही जिवंत केला जात आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी लाहोरमधील ऐतिहासिक क्रिकेट मैदाने आणि मिंटो पार्क (आताचे ग्रेटर इक्बाल पार्क) येथील जुना कुस्तीचा आखाडा पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. 


फाळणीपूर्वी याच मैदानात भारताचे महान क्रिकेटपटू लाला अमरनाथ आणि पाकिस्तानचे इंझमाम-उल-हक यांसारख्या खेळाडूंनी सराव केला होता. तसेच, याच मैदानावरील आखाड्यात जगज्जेते गामा पैलवान आणि इमाम बख्श यांच्या कुस्तीच्या कडाडणाऱ्या शिट्ट्या घुमल्या होत्या. फाळणीपूर्वी लाहोरमधील हिंदू कुटुंबे याच मिंटो पार्कमध्ये दरवर्षी दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करायचे, त्या आठवणींना आता उजाळा दिला जात आहे.


(संदर्भ - जन-गण-मंगलदायक, https://www.youtube.com/watch?v=DxnYJfXnuWc)















Share this article
लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस
कला / साहित्य / सिनेमा

लोकशाहीचे सजग प्रहरी व संघर्षाचे प्रतीक : जॉर्ज फर्नांडिस

फुटपाथवरच्या संघर्षमय आयुष्यातून देशाच्या संरक्षणमंत्री पदापर्यंत पोहोचलेले जॉर्ज फर्नांडिस हे भारतीय राजकारणातील सर्वात प्रभावी समाजवादी नेत्यांपैकी एक होते. १९७४ च्या ऐतिहासिक रेल्वे संपापासून ते आणीबाणीविरोधातील लढ्यापर्यंत त्यांनी सत्तेविरोधात निर्भीड भूमिका घेत लोकशाही मूल्यांचे रक्षण केले. कामगार नेता, उद्योगमंत्री, रेल्वेमंत्री, संरक्षणमंत्री आणि लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता अशा विविध भूमिकांमधून त्यांनी भारतीय सार्वजनिक जीवनावर अमिट ठसा उमटवला.

9 min read
V
Vikas Meshram
'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?
कला / साहित्य / सिनेमा

'ए मेरे वतन के लोगो'... सुमन कल्याणपूर आणि लता दीदी काय आहे संबंध?

‘ऐ मेरे वतन के लोगो’ गाण्याची संधी ऐनवेळी हातातून निसटली, पण सुमन कल्याणपूर यांनी त्यासाठी कधीही लता मंगेशकरांना दोष दिला नाही. • लता मंगेशकर यांच्या आवाजाशी असलेल्या विलक्षण साम्यामुळे सुमनताईंना काम मिळालं, पण त्याच साम्यामुळे त्यांची स्वतंत्र ओळख अनेकदा झाकोळली गेली. • मराठी आणि हिंदी संगीतविश्वात दर्जेदार गायकीचा ठसा उमटवणाऱ्या सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीत प्रतिभेपेक्षा नियतीनेच अधिक परीक्षा घेतल्याची भावना अनेकदा उमटते.

7 min read
S
Sameer Gaikwad
जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!
कला / साहित्य / सिनेमा

जिथे आठवणी उजळतात, तिथे बशीर बद्र भेटतात…!

महान शायर बशीर बद्र गेले, काळजात कळ उठली. पिकलं पान गळून पडलं. खरं तर ते गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनीक जीवनापासून दूर असले तरी त्यांचे काव्य हे असंख्य रसिकांच्या मनाला कायम भुरळ घालत राहिले आहे. बशीरजींच्या गेल्यानंतर त्यांच्या कार्याला प्रचंड प्रमाणात दिला जाणारा उजाळा हा त्यांच्या महत्तेची ग्वाही देणारा ठरला आहे.

7 min read
S
shekhar patil
महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष
कला / साहित्य / सिनेमा

महात्मा बसवेश्वर : ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारून देणारा महापुरुष

ज्याकाळात आधुनिकता ह्या शब्दाचा मागमूस देखील नव्हता. जेव्हा स्त्रिया सोडाच पण माणसालाच माणूस म्हणून वागवलं जात नव्हतं. अशा काळात एका महात्म्याने मासिक पाळीला विटाळ म्हणण्यास कडकडून विरोध केला होता. महात्मा बसवेश्वर यांनी जनन, मरण, जात, रजस्व आणि उच्छिष्ट हे पंचसूतक नाकारलंय. त्यापैकी जन्म आणि रजस्व ही दोन्ही सुतकं थेट स्त्रीत्वाशी नातं सांगतात. त्यामुळे मासिक पाळीतला विटाळ पाळणं, स्पर्श केल्यास अपवित्र झाल्याचं मानणं, हे बसवण्णांच्या विचारांच्या विरोधात आहे.

4 min read
C
Channveer Bhadreshwarmath
 ‘’जेव्हा फाळणीने क्रिकेटच्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…’’
कला / साहित्य / सिनेमा

‘’जेव्हा फाळणीने क्रिकेटच्या दोन जिवलग मित्रांना मैदानावर प्रतिस्पर्धी बनवलं…’’

भारत-पाकिस्तान क्रिकेटचा इतिहास आपण अनेकदा युद्ध, राष्ट्रवाद आणि तणावाच्या चौकटीत पाहतो. पण या वैराच्या मुळाशी एक अशी कहाणी दडलेली आहे, जिथे दोन क्रिकेटपटू एकाच शहरात वाढले, एकाच मैदानावर खेळले आणि एकमेकांना मित्र मानत मोठे झाले. फाळणीने त्यांना दोन देशांच्या विरुद्ध बाजूंवर उभं केलं; पण त्यांच्या मैत्रीच्या आठवणी सीमारेषाही पुसू शकल्या नाहीत. ही केवळ दोन क्रिकेटपटूंची गोष्ट नाही; ती फाळणीने जखमी झालेल्या उपखंडाची, तुटलेल्या नात्यांची आणि तरीही माणुसकी जिवंत राहू शकते, या आशेची कहाणी आहे. आता आशुतोष गोवारीकर आणि आमिर खान फाळणीच्या पार्श्वभूमीवर याच घटनेवर आधारित चित्रपटाची तयारी करत असल्याची चर्चा सुरू आहे.

10 min read
A
Akshay Ramesh
अजिंठ्याची पारू : प्रेम, उपेक्षा आणि इतिहासाचा अंधार…दीडशे वर्षांनंतरही रॉबर्ट स्मरणात राहिला, पण पारूची ओळख धूसरच!
कला / साहित्य / सिनेमा

अजिंठ्याची पारू : प्रेम, उपेक्षा आणि इतिहासाचा अंधार…दीडशे वर्षांनंतरही रॉबर्ट स्मरणात राहिला, पण पारूची ओळख धूसरच!

अजिंठ्याच्या संशोधकाला शिल्पकहाणीची गाथा उघडल्यावर, एक कहाणी विलक्षण लक्ष वेधून घेते, ती कहाणी म्हणजे रॉबर्ट गिल आणि पारूची प्रेमकथा. जी अजिंठ्याच्या शिल्परांगेत एक जिवंत शिल्प बनून उभी आहे. अमर पावली आहे... अजिंठ्याच्या पारू आणि रॉबर्ट गिलची प्रेमकथा गेली दीडशेहून अधिक वर्ष जगाने ऐकली आहे. भेदाच्या भारतीय समाज मानसाने अजिंठ्याच्या पारूच्या प्रेमकथेला नावे ठेवली, विपर्यस्त करून सांगितले. जिच्या प्रेमकथेने अजिंठ्याच्या कातळालाही भावनांनी ओलावून टाकले, त्या पारूची समाधी आज मात्र उपेक्षा, दुर्लक्ष आणि विस्मृतीच्या सावलीत उभी आहे. आज २३ मे हा पारूचा स्मृतीदिवस त्यानिमित्ताने एका ‘सैराट’ कथेची झालेली ही आठवण.

6 min read
V
Vira Rathod

Comments

Comments are currently disabled or loading...