मुकुंद कुळे
- कोकणातल्या ग्रामीण भागात छोट्या होळ्या पेटायला केव्हाच सुरुवात झालीय आणि देवाला कौल लावून देवादिकांच्या पालख्याही केव्हाच आपल्या मानाच्या जागा घ्यायला बाहेर पडल्यात.
- आता पालखीच्या हरेक मुक्कामावर पालख्या नाचवल्या जात असतील, नमनाचे खेळ रंगत असतील आणि नमनातल्या संकासुर, राधा, गोमू, कृष्ण-पेंद्या या पात्रांमध्ये गावोगावचे रसिकजन हरवून जात असतील.
‘पयलं नमान माजं नवखंड प्रिथ्वीला
दुसरं नमान माजं चांद वो सूर्याला
तिसरं नमान माजं पारबती वो महादेवाला
चवथं नमान माजं माय वो बापाला...’
... ज्याचं ज्यांचं म्हणून आपण देणं लागतो, त्या साऱ्यांना पहिल्याच फटक्यात असं नमन म्हणजे वंदन करून 'नमन-खेळे' या कोकणातील कलाप्रकाराला सुरुवात होते. मग गावाबाहेर काढलेल्या पालखीतल्या देवाला जागवत नमनाचा खेळ उत्तरोत्तर असा काही रंगतो की, दिवसभर पालखी नाचवून दमलेल्या खेळ्यांना आपल्या श्रमांचंही भान राहत नाही. नमन बघता बघता रात्र सरते आणि पहाटेचं कोंबडं आरवताच पुन्हा देवाला बाहेर काढण्यासाठी खेळ्यांची धांदल उडते.
हुताशनी पौणिर्मेला पेटणाऱ्या मोठ्या होमाला अवकाश असला, तरी कोकणातल्या ग्रामीण भागात छोट्या होळ्या पेटायला केव्हाच सुरुवात झालीय आणि देवाला कौल लावून देवादिकांच्या पालख्याही केव्हाच आपल्या मानाच्या जागा घ्यायला बाहेर पडल्यात. आता पालखीच्या हरेक मुक्कामावर पालख्या नाचवल्या जात असतील, नमनाचे खेळ रंगत असतील आणि नमनातल्या संकासुर, राधा, गोमू, कृष्ण-पेंद्या या पात्रांमध्ये गावोगावचे रसिकजन हरवून जात असतील.

नमन-खेळे…कुठल्याही नेपथ्याशिवाय सादर होणारा नृत्याविष्कार
नमन हा आंगणीय म्हणजे अंगणात सादर होणारा लोककलाप्रकार. एखाद्या अंगणात किंवा देवळाच्या प्रांगणात कुठल्याही नेपथ्याशिवाय सादर होणारा. नमनाचा खेळ कधी सुरू होणार म्हणता म्हणता पंधरा-वीस जणाची टोळी येऊन एका रांगेत आडवी उभी राहते. त्यांच्यातच टाळ आणि मृदुंगकरी असतात. यांचा वेशही साधासाच. म्हणजे गावातला रोजचाच.
ही वीसजणांची फळी टाळ-मृदुंगाच्या संथ लयीवर एकदा डावीकडे, एकदा उजवीकडे झुलत राहते. सुरुवातीला पृथ्वीला-देवतांना-मातापित्यांना अशा सृष्टीतील तेरा गोष्टींना वंदन केलं जातं आणि मग पायघोळ अंगरखा घातलेला नायक आणि त्याच्यासोबत डोक्यावरून पदर घेतलेला स्त्रीवेशधारी पुरुष येतो. या स्त्रीपात्राला कधी राधा, कधी गोमू, तर कधी कोळीण म्हणूनही संबोधलं जातं. नायक आणि या गोमूच्या संवादातून-नाचातून हे नमन रंगत जातं.
नमन झाल्यावर काही नमनात गणपती येतो आणि नाचून जातो. तो गेल्यावर नटवा येतो आणि म्हणतो- ‘गणपती आला नि नाचून गेला, नटवा बाई मागे राहिला.’ त्यानंतर हा नटवा काही थट्टा-विनोद करतो आणि जातो. तो गेल्यावर गवळणी (स्त्री-वेशधारी पुरुष) येतात. मग गवळणी म्हटल्या जातात. नंतर कृष्ण-सुदामा येतो, त्यांची वाट अडवतो. त्यांच्याकडून दूध-दही वसूल केल्यावरच त्यांना मथुरेच्या बाजाराला जायची परवानगी देतो. एवढं होईस्तोवर मध्यंतर होतं. आणि मग उत्तररंगातील आख्यानाला सुरुवात होते. हे आख्यान अर्थातच रामायण-महाभारत नि पुराणातील कथांवर आधारलेलं असतं.
मात्र हे सारं सादर होताना मागची कलावंतांची आडवी भिंत कायम असते. कारण ही माणसांची भिंतच आधुनिक रंगभूमीवरील विंगेची भूमिका निभावत असते. सर्व पात्रांची वेशभूषा या भिंतीच्या मागेच चालते. त्यामुळे पात्र या भिंतीतून येतात आणि काम झाल्यावर भिंतीच्या मागेच गडप होतात. प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांना 'घाशीराम कोतवाल'च्या फॉर्मची प्रेरणा नमन आणि नमनातील माणसांच्या भिंतीतूनच मिळालेली आहे.
कुणबी समाजाचं लोकनृत्य…
असे हे 'नमन-खेळे' म्हणजे खास रत्नागिरी जिल्ह्यातील लोककलाप्रकार. जसा सिंधुदुर्गात दशावतार, तसंच रत्नागिरीत नमन-खेळे. विशेष म्हणजे बाल्यानृत्य (मूळ जाखडी नृत्य) ज्याप्रमाणे मुख्यत: कुणबी समाजाचं लोकनृत्य, त्याप्रमाणेच 'नमन-खेळे' हादेखील कुणबी समाजाचाच लोककलाप्रकार. साधारणपणे शिमग्यापासून नमनाच्या खेळांना सुरुवात होते आणि गुढीपाडव्यापर्यंत हे खेळ सुरू राहतात.

केवळ शिमगा-पाडवाच नाही, तर कुणाच्या घरचं लग्नकार्य, बारसं अशा विशिष्ट प्रसंगीही कुलदेवाचं-गावदेवाचं स्मरण म्हणून नमन घालण्याची प्रथा आहे. पण नमनाचा खरा मान शिमग्यातच. कारण देवाच्या पालखीबरोबर बाहेर पडलेल्या खेळ्यांनी तो सादर करायचा म्हणून 'नमन-खेळे.' हा लोककलाप्रकार आता जरी 'नमन-खेळे' या नावाने ओळखला जात असला, तरी त्याचं मूळ नाव 'नमन'च आहे.
देवाची पालखी निघाली की पालखीबरोबर जाणाऱ्यांना 'खेळी', तर पालखी निघाल्यापासून परत देवळात देव मुक्कामाला येईपर्यंत तिच्यासोबत असणाऱ्यांना 'मूळ खेळी' म्हणण्याची पद्धत कोकणात आजही आहे. नुस्ते खेळी असतील, तर त्यांना अर्ध्या प्रवासातून मागे फिरण्याची मुभा असते. पण 'मूळ खेळीं'ना पालखीची साथ अर्ध्यावर सोडता येत नाही. पालखीबरोबर असणारे हे खेळीच पूर्वी पालखीच्या वस्तीच्या ठिकाणी नमन खेळायचे, म्हणजे सादर करायचे. आणि म्हणूनच गावात त्यांचं आगमन झालं की 'नमन-खेळे' आले, असं म्हटलं जायचं आणि त्यातूनच या लोककलाप्रकाराला 'नमन-खेळे' हेच नाव पडून गेलं.
गण-गवळण, वग-आख्यान
सर्वसाधारणपणे प्रयोगात्म लोककलांचे पूर्वरंग आणि उत्तररंग असे दोन भाग पडतात. पैकी पूर्वरंगात गण-गवळण, भक्तिपदं यांचा समावेश असतो, तर उत्तररंगात वग किंवा आख्यान लावलं जातं. नमनही याला अपवाद नाही. तरीही गावोगावचं नमन वेगळं असतं, त्याची सादरीकरणाची पद्धत वेगळी असते. उदाहरणार्थ रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर परिसरातील नमन-खेळे प्रसिद्ध आहेत. मात्र लोकप्रियता लाभल्यामुळे तिथल्या नमनाचा आता साचा होऊन गेलाय. तर दापोलीकडच्या नमनांत काही ठिकाणी अस्सल गावरानपणा अजून टिकून आहे. उदाहरणार्थ नमनात प्रत्येक ठिकाणी गण-गवळण, वग-आख्यान असा फॉर्म वापरला जातोच असं नाही. उलट त्याऐवजी काही ठिकाणी विविध सोंगं आणली जातात. उदाहरणार्थ म्हातारीचं सोंग आणून म्हटलं जातं-
‘म्हातारी चालं वाऱ्यान बोंगा हालं
सुख-दु:खाच्या आयाबहिनी
बोंग्याची पाळत कर ग वयनी...’

याप्रमाणेच विविध सोंगं आणताना कधी राक्षस, तर कधी कोकणात प्रसिद्ध असलेल्या ल्हाव या मुलं खाणाऱ्या महिलाभुताचं सोंग आणून नमन बघायला आलेल्या मुलांना घाबरवलं जातं. लोककला प्रवाही कशा असतात, त्याचंही उदाहरण नमनात पाहायला मिळतं. म्हणजे केवळ देवदेवतांचे मुखवटे न नाचवता, पूर्वी दापोली तालुक्यातल्या इळणे गावी होणाऱ्या नमनात हबशी-फिरंग्यांचे मुखवटेही नाचवले जायचे. ते नाचवताना बोलीभाषेत 'हबशी झुजं की फिरंगा झुजं' असं म्हटलं जायचं. एवढंच नाही तर पूर्वीच्या नमनाच्या या खेळात आपला गाव कसा श्रेष्ठ आहे, याचंही गाण्यातून वर्णन केलं जायचं. उदाहरणार्थ इळणे गावच्या नमनात पूर्वी म्हटलं जायचं-
‘चटकचांदणी बावलंकरनी
डागन पळाल्या त्या वाघिणकरनी
पाण्याचा पाट नि नेसण्याच्या थाट त्या इळणंकरनी...’
...म्हणजे अशा पद्धतीने नमन हा कलाप्रकार पूर्वी लवचीक होता. तो स्थानिक वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्यावर बेतलेला असायचा. आज मात्र नमन-खेळ्यांचं नाटक झालेलं आहे. त्यात वेशभूषेपासून पात्रांच्या भाषेपर्यंत चकचकीकतपणा आणि सफाई येऊन त्यातला उत्स्फूर्तपणाच हरवत चालला आहे.
तरीही शिमग्याच्या सणाला अजून कुठकुठे पालखीच्या वस्तीवर नमनाचे पारंपरिक खेळ रंगतात. एकीकडे होळी धडधडत असताना दुसरीकडे नमनाच्या खेळाची तयारी सुरू असते. काळोख दाट झाला की, नमनाचा खेळ सुरू होतो आणि नमन रंगत आलेलं असतानाच जमलेल्यांच्या ध्यानीमनी नसताना प्रेक्षकांच्या मागून कभिन्नकाळा पोशाख केलेला शंकासुर धावत येतो, मग जमलेले भीतीने जे सैरावैरा धावतात, त्याला तोड नाही!






