- प्रा. आशालता कांबळे
- राजर्षी शाहू महाराजांचं नाव घेतलं की आरक्षण, शिक्षण आणि सामाजिक न्यायाची चळवळ आठवते. पण त्यांच्या विचारांची खरी ताकद त्यांच्या कृतीत दिसते.
- अवघ्या अकराव्या वर्षी विधवा झालेल्या आपल्या सुनेला समाजाच्या रूढी-परंपरांच्या स्वाधीन न करता तिला शिक्षणाची संधी देण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय हा त्या काळात क्रांतिकारक होता.
- इंदुमती राणीसाहेबांचं आयुष्य घडवताना शाहू महाराजांनी स्त्री शिक्षण, मानवी प्रतिष्ठा आणि सामाजिक परिवर्तनाचा जो आदर्श घालून दिला, त्याची ही प्रेरणादायी कहाणी आजच्या राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्ताने…
लोकोत्तर कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत पुष्कळदा असे दिसते की त्याच्या चरित्रातले व्यक्तिगत असे संदर्भही त्यांच्या कार्याच्या संदर्भात बोलके ठरतात, महत्त्वाचे ठरतात आणि मौलिक ही ठरतात.
राजर्षी शाहू छत्रपतींच्या बाबतीत ही गोष्ट त्याच्या सूनबाईच्या संदर्भात लक्षात येते आणि राजर्षीचे स्त्री शिक्षणासंबंधीचे विचार त्यांच्या वास्तव आयुष्याशी असे जोडलेले दिसतात की त्यातून त्याची थोरवी सहज प्रतीत होत राहते.
राजर्षी शाहू प्रवृत्तीन जसे उदार होते, समंजस होते तस ते काळाची पावले ओळखणार द्रष्टे ही होते. शिक्षणाच्या बाबतीत विशेषत: स्त्री शिक्षणाच्या बाबतीत अशा प्रकारचे अनुकूल आणि प्रोत्साहक विचार बाळगणाऱ्या राजांना आपली सून बुद्धिमान असावी असे वाटायचे.
इंदुमती राणीसाहेबांची निवड सून म्हणून केली ती केवळ त्यांच्या रूपामुळे नव्हे तर त्यांच्या हुशारीमुळे, धिटाईमुळे, बुद्धिमत्तेमुळेही. इंदुमती राणीसाहेब राजर्षीच्या घरात सून म्हणून आल्या त्या वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी.
लग्नाआधी ती नऊ वर्षांची जमना जगताप होती. सासवडला शंकरराव जगताप हे शिवरायांच्या सेवेतल्या घराण्याचे वंशज होते. पुरंदर गडाच्या पागेचे काम सांभाळणाच्या जगताप घराण्याला लहानसे इनामही शिवकाळापासून मिळत होते.
सून नव्हे, बुद्धिमान मुलगी शोधणारा राजा
छत्रपतींचे चिरंजीव शिवाजीराजे यांच्यासाठी जमनाची निवड केली, पण ही निवड फक्त मुलगी पाहून, घरदार पाहून नक्कीच नव्हती. त्यांनी कागलच्या खासबागेत दिवाण सर रघुनाथराव सबनीसांकरवी जमनाची वधुपरीक्षा घेतली.
दिवाणबहादुरांनी जमनाला विचारले, 'बोका' चे स्त्रीलिंग काय? जमनाने अचूक उत्तर दिले 'माटी' मग एक साधासा पण चकवणारा प्रश्न तिला विचारला गेला 'चमचा' ची विभक्ती सांग. जमनाने प्रथमा असे उत्तर देऊन तिथेही सर्वांचे समाधान केले.
इंदुमती राणीसाहेब
वडिलांबरोबर कागलला आलेली जमना परत सासवडला परतली ती कोल्हापूरच्या छत्रपतींच्या घरची सून होण्याची निश्चिती होऊनच. जून, १९१७ मध्ये मोठ्या थाटाने राजर्षीच्या घरात ती आली आणि वर्ष उलटून सहाच दिवस झाले तो ती विधवाही झाली. रानडुकराच्या शिकाराला गेलेले शिवाजीराजे घोड्यावरून पडले ते पुन्हा उठलेच नाहीत.
इंदुमती अवघी अकरा वर्षांची होती. लग्नाचा अर्थसुद्धा तिला पुरता कळला नसेल. किती कोवळ वय आयुष्याची नुकतीच कुठे सुरुवात व्हायची होती अशावेळी विधवाच झाली. आणि त्या काळची विधवा म्हणजे अपार दुर्दैवाची धनीण. तिला अपशकुनी समजले जायचे संसारातील कोणतीही सुखे तिच्यासाठी नसायची, अपमान उपेक्षा आणि दुःख हेच तिचे भाग्य.
बालविधवेचं आयुष्य अंधारात जाऊ न देण्याचा निर्धार
अशावेळी शाहूराजांनी मुलाच्या मृत्यूचा शोक आवरून सुनेच्या भविष्याचा विचार केला. ही बालिका जर अडाणी राहिली तर तिला माणसासारखे जगात येणार नाही म्हणून तिला शिक्षण देण्याचा निर्णय राजांनी घेतला.
या निर्णयाला बाहेरून आणि घरातूनही प्रचंड विरोध झाला. शाहूंराजांच्या राणी लक्षुमीबाई म्हणाल्या,"हल्लीच्या शिक्षणाने आमच्या मुली बेताल होतात. त्यांचं वाकडं पाऊल पडायला वेळ लागत नाही. सूनबाईंची या विषयातील जबाबदारी कोण घेणार?" त्यांचा विरोध इतका मोठा होता की,त्या रागावून महाराजांच्या दर्शनासाठीही येईनासा झाल्या.
संपूर्ण राजवाडा असा विरोधात असतानाही महाराजांनी माघार घेतली नाही. त्यांनी इंदूमतीना शिकवण्यासाठी पाच शिक्षक नेमले. त्यातील भार्गवराव कुलकर्णी हे अत्यंत विक्षिप्त होते. ते महाराजांना कधीच मुजरा करायचे नाहीत. इतरांनी जेव्हा महाराजांच्या हे लक्षात आणून दिले तेव्हा महाराज म्हणाले,
"मी शिक्षकांना पगार देतो तो त्यांच्या विद्यादानासाठी.विद्येचे महत्त्व मी जाणतो. ही विद्या जोपर्यंत माझ्या सुनेला ते देत आहेत तोपर्यंत त्यांनी मला मुजरा केला नाही तरी चालेल."
म्हणजे सुनेच्या कल्याणापुढे त्यांनी स्वतःचा मान-अपमान बाजूला ठेवला. कोणत्याही परिस्थितीत त्यांना सुनेला शिक्षण द्यायचेच होते.
घरच्यांच्या विरोधालाही न जुमानता शिक्षणाचा निर्णय
इंदूमतींना राजवाड्यात शिक्षण देणे अशक्यप्राय झाले तेव्हा त्यांनी तिला परिवर्तनाच्या कामाची प्रयोगशाळा म्हणून उभारलेल्या 'सोनतळी कॅम्प'ला हलवले. इथे इंदूमतींच्या बरोबर आणखी चार मुलींची शिक्षणाची सोय महाराजांनी केली. या चार मुलींची नावे होती राधाबाई कोळसे, सुंदराबाई सावंत, आंत्रिका बेकर आणि इंदिरा सबनीस.
महाराजांनी या पाच मुलींना शिकवणाऱ्या शिक्षकांना सोनतळीस आणणे व परत पोचवणे यासाठी खास वाहनाची व्यवस्था केली होती. आपल्या पाठीमागे या सुनेचे हाल होऊ नयेत म्हणूनही त्यांनी तिची व्यवस्था करून ठेवली होती.

राजकुमारांच्या शिक्षणासाठी जो आयर्विन बंगला त्यांनी बांधला होता त्यात त्यांनी इंदूमतींसाठी व्यवस्था केली आणि त्याला नाव दिले 'इंदूमती हॉल'... महाराजांच्या निधनानंतर इंदूमतीनी याच इंदूमती हॉलमध्ये राहून आपले शिक्षण पूर्ण केले कारण राजगृहात त्यांना कुणी थारा दिला नाही.
1925 मध्ये त्यांनी इथूनच मॅट्रिकची परीक्षा दिली आणि कोल्हापूर केंद्रात दुसरा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाल्या.यानंतर त्यांनी शिक्षणाचा प्रचार-प्रसार करण्यात आपलं आयुष्य घालवलं. इंदूमती हॉलंचं वातावरण शिक्षणमय करून टाकलं.
इंदुमती हॉलपासून समाजकारणापर्यंतचा प्रवास
मे 1953 मध्ये अखिल भारतीय मराठा परिषदेचे सातवे अधिवेशन कोल्हापूर येथे संपन्न झाले त्याच्या त्या स्वागताध्यक्ष होत्या.1954मध्ये त्यांनी 'ललितविहार' या संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत अनेक कामे सुरू केली.
1955 ला महाराष्ट्रातले पाहिले होम सायन्स कॉलेज,मुलींसाठी वसतिगृह अशी शिक्षणाशी संबंधित कामे त्यांनी केली. इंदुमती राणीसाहेब कोल्हापुरातील अनेक संस्थांच्या अध्यक्षपदी होत्या. रेडक्रॉस सोसायटीचे कार्य त्यांनी अनेक वर्षेकेले.
दुसर्या महायुध्दात रेडक्रॉसचे कार्य कोल्हापुरात चालू होते. जखमी सैनिकांना मदत पाठविणे चालू होते. त्याचे बरेचसे नेतृत्व इंदुमती राणीसाहेबांकडे होते. अशा उपयुक्त कार्यात दरमहा आपली मदत देऊन जरूर ते सहाय्य करण्यात त्या पुढाकार घेत.
कोल्हापूर राजघराण्याच्या परंपरेनुसार त्यांच्या घरी कोणालाही भेटण्यास मज्जाव नसे. लहानापासून थोरापर्यंत सार्यांचे येणे- जाणे असे. सुशिक्षित व विद्वानांची जितकी कदर केली जाई, तितकीच एखाद्या साध्या-भोळ्या अशिक्षित शेतकर्यांचीही. इंदुमतीदेवी लहान-थोर, गरीब-श्रीमंत सर्वांशी समानतेने वागत.

अमेरिकन मिशनच्या कार्यकर्त्यापासून नीलगिरीच्या पर्वतराजीत राहणार्या तोडा आदिवासीपर्यंत निरनिराळ्या पातळीवरील माणसांशी त्यांचा संपर्क असे. मानवी समाजाच्या विविध स्तरातील माणसे इंदुमतीदेवींच्या गोतावळ्यात होती. राजघराण्यातील स्त्रीने शिक्षण घेणे, हे त्यावेळी एक दिव्यच होते.
अशा कठीण परिस्थितीत शिक्षण-मनन-चिंतन करून त्या-त्या विषयाचे सखोल ज्ञान त्यांनी संपादन केले होते. कोणत्याही विषयावर त्यातील अधिकारी व्यक्तीशी त्या चर्चा करू शकत. त्यांनी कला, शिक्षण, ज्ञान संपादन करून त्यातच समाधान मानले नाही, तर नवीन पिढीने त्याचा लाभ घ्यावा, अशी त्यांची नेहमी धडपड असे. 30 नोव्हेंबर 1971 रोजी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.
इंदूमतींच्या रूपाने एक प्रगल्भ व्यक्तिमत्त्व घडवण्यात शाहूमहाराजांची दूरदृष्टी, स्त्रियांकडे बघण्याचा मानवतावादी दृष्टिकोन, माणसाचे जीवन दुःखी करणाऱ्या धार्मिक परंपरा-रूढी याच्या विरोधात ठामपणे उभे राहण्याचे धाडस अशा अनेक गोष्टी अधोरेखित होतात.






