अमोल पालये
- 'देवखेळ' या वेबसिरीजमुळे संकासूराला घेऊन कोकणवासियांच्या भावना का दुखावल्या?
- संकासूर हा तर राक्षस, मग तरीही कोकणात हजारो वर्षापासून त्याला का पुजतात?
- संकासूराने ब्रम्हाचे वेद पळवले नाहीत! मुळात चारही वेद अनार्यांचीच संपत्ती होती, असे कोकणवासीय का मानतात?
Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'देवखेळ' या नावाची एक वेब सीरिज प्रदर्शित झाली आणि कोकणातून निषेधाचा सूर उमटला, वाद सुरू झाले. या वादाचे कारण आहे शिमगोत्सवाच्या काळात कोकणवासीय ज्या संकासूराची (शंकासूर) पूजा करतात त्या संकासूर देवाची केलेली बदनामी. 'देवखेळ' वेब सीरिजमध्ये गुहागर परिसरातील श्रद्धास्थान असलेल्या संकासूर देवाबाबत अपमानास्पद आणि धार्मिक भावना दुखावणारा मजकूर प्रसारित करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हे प्रसंग तात्काळ हटवा अन्यथा Zee5 च्या कार्यालयापर्यंत येऊ, असा इशाराही कोकणातील गुहागरमधील नागरिकांनी दिला आहे. यासंदर्भात गुहागर पोलीस स्थानकात देखील लेखी स्वरूपात तक्रार देऊन कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
(photo credit: NEW)
‘आपलं गुहागर’ या सामाजिक व्यासपीठाच्या वतीनं गुहागर पोलीस ठाण्यात BNS आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार ॲड. संकेत अरुण साळवी, प्रेसिडेंट – गुहागर बार असोसिएशन आणि आपलं गुहागरचे समन्वयक यांनी दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी गुहागर पोलीस निरीक्षकांकडे सादर केली आहे. तक्रारीनुसार, 'देवखेळ' वेब सीरिजमध्ये संकासुर देवाला क्रूर, अमानवी आणि अंधश्रद्धेशी जोडलेला देव म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेषतः "संकासूर शिक्षा करतो, बळी घेतो", "होळीत दरवर्षी खून करण्याची प्रथा आहे", अशा संवादांमुळे भाविक वर्गाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप आहे.
संकासूर हा तर राक्षस, मग तरीही कोकणात हजारो वर्षापासून त्याला का पुजतात?
वास्तविक संकासूर हा अनार्य राजा. म्हणजेच राक्षस कुळातील. तो काही प्रस्थापित देवांसारखा देखणा नाही. त्याच्या हातात ना ढाल, ना तलवार.. दिसायला विद्रुप, काळाकुट्टं.. तरीही हा राक्षस कोकणात गेल्या हजारो वर्षापासून पुजला गेला. भजला गेला. काय आहे हे संकासुराच्या लोकप्रियतेचं गुढ...? खरचं कोण, कुठचा आहे तो..? त्याला कोकणवासियांनीच का आपलं मानलं...? कोकणातल्या शिमगोत्सवात तो कशासाठी येतोय..? काय आहे त्याचं सांगणं..? असे एक ना अनेक प्रश्न.. पण, कोकणवासियांनी या प्रश्नांचा शोध कधी घेतलाच नाही. ते फक्त अविरत प्रेम करत राहिले संकासूरावर... आणि त्यांचं ते प्रेम पाहून मत्स्य पुराणात खलनायक असलेला हा संकासूर कोकणवासियांचा हिरो झाला. अशा या कोकणवासियांच्या काळजात घट्ट बसलेल्या हिरोची.. संकासूराची ही कहाणी..

समस्त कोकणवासिय आणि चाकरमानी यांच्या जगण्याचे टॉनिक म्हणजे शिमगोत्सव! बारावाड्यांच्या गावदेवाला फुल लागलं, रुपं चढलं की कोकणात पालख्यांचे ढोल वाजू लागतात. गावभोवनीच्या देवांबरोबर गावभोवनीचे खेळे सजतात आणि घरोघरी फिरू लागतात. असा हा कोकणातला शिमगोत्सव अनेकप्रकारे वैशिष्ठपूर्ण आहे. त्यातील एक वैशिष्ठ म्हणजे, हिंदू धर्मात भक्ताने देवालयात जावे, आणि देवाचे दर्शन घ्यावे, असा नियम आहे. कोकणातला शिमगोत्सव मात्र हा नियम दूर ठेवतो. येथे चक्क ग्रामदेव भक्ताघरी उंबरठा ओलांडून घरात येतात. येतात ते येतात, ढोल-ताशांचा शाही गोतावळा घेऊन येतात.
दुसरं वैशिष्ट्य म्हणजे, पालखीतले देव पौराणिक नाहीत. ब्रम्हा, विष्णू, महेश, राम-लक्ष्मण, कृष्ण असे प्रस्थापित देव नाहीत. पालखीतून गावभेटीला निघणारे देव हे पुराणाबाहेरचे आहेत. त्यांच्याकाही अवतार लिलाही माहित नाहीत, तरीही गेली हजारो वर्षे त्यांनी कोणतंही स्वत:च मार्केटिंग नसताना कोकणवासियांच्या मनावर गारूड केलं आहे.
तिसरं विशेष म्हणजे, कोकणातल्या पालख्या पाहिल्या तर त्यात कमीत कमी तीन, जास्तीत जास्त पाच-सहा देव असतात. यातही सर्वाधिक असतात त्या स्त्री देवता. एखादाच पुरूष देव असतो. हे विशेषत्व खूप काही सांगून जाते, आणि ते अभ्यासकांना मातृसत्ताक कुटुंबपध्दतीकडे निर्देश करते.
कोकणवासियांच्या काळजात घट्ट बसलेल्या हिरोची, संकासूराची ही कहाणी..
पालखीतले देव जरी अपौराणिक असले, तरी या पालखीसोबत एक पौराणिक पात्र गावभोवनी करत असते. हे पात्र जरी पौराणिक असले, तरी ते देव या गटातील नाही. तर ते आहे राक्षस या गटातले. कोकणातल्या शिमगोत्सवाची हीच खरी गंमत आहे. एक राक्षस कुळातील राजा शिमगोत्सवात गावभोवनी घेतो. त्याचं आदरतिथ्य होतं. त्याला मान मिळतो. या राक्षसाच्या वेठीचा मार खाणं, हे आशीर्वाद समजंल जातं. भाग्याचं समजलं जातं..? असा हा राक्षस म्हणजे कोकणवासियांनी गेली हजारो वर्षे काळजात जपून ठेवलेला संकासूर!
शिमगोत्सव सुरू झाला की, कोकणात हाकारे देत संकासुराचे, गोमुचे आगमन आजही होते. नमन/खेळ्यात जसा संकासूर येतो, तसाच तो दशावतारातही येतो. पुर्ण काळा वेश. डोक्यात शंकू आकाराचा मुखवटा. कपाळावर, दंडावर, अंगावर पांढर्या भस्माचे पट्टे. लांबलचक पांढरी दाढी, आणि त्यातून लोंबणारी लाल जीभ. कमरेला घुंगराचा चाळ.
गावाची वेस बदलत गेलं की, संकासूराच्या रुपड्यात किंचित किंचित फरक जाणवतो, पण संकासूर पहावा तो गुहागरचाच! त्याच्या कमरेच्या घुंगराचा चाळच चार किलो वजनाचा असतो. हातातली वेठी, आणि त्याचा नाच टक लावून पाहत रहावे असा. मानेला आणि कमरेला लचके देत तो दुडक्या चालीवर मागेपुढे करत नाचतो, ते पाहत राहण्यासारखे असते. आपली सखी गोमूसोबत तो नाचत असतो, कधी गोमूभोवती अक्षरश: तीच्याभोवती गोल गोल पिंगा घालतो. असा हा संकासूर लहानग्या पोरांपासून म्हातार्या-कोतार्यापर्यंत सार्यांनाच जीवाभावाचा वाटत आलेला आहे.
संकासूराची छडी पाठीवर पडणे हे भाग्याचे का समजले जाते?
त्याची वेठी पाठीवर पडणे, हे भाग्याचे मानले जाते, आणि ती वेठी पाठीवर पडण्यासाठी चाकरमानी आसुसलेले असतात. ही वेठी कापडाच्या चिंध्यापासून तयार केलेली असते. ती संकासुराच्या कायम हातात असते, ती घेवूनच तो अख्खी गावभोवनी करत असतो. शिमग्याचे खेळे बाहेर पडतात. ग्रामदेवासमोर, सानेवर, गावातील घराघरात नाचतात. या बाहेर पडणार्या शिमग्याच्या खेळयांना गावभोवनीचे खेळे म्हणतात, किंवा गावभोवनीचा संकासूर.
नमनातल्या संकासुराबाबत दशमुखी रावणाप्रमाणे प्रेक्षकांच्या मनात शंका येतात. यातील मुख्य शंका म्हणजे, संकासूर हा एक असूर.. त्याने ब्रम्हाचे वेद पळविले, आणि विष्णूने त्याचा मत्स्य अवतार धारण करून वध केला, अशी कथा पुराणात वाचायला मिळते. मात्र नमनात ही कथा कधीच सादर होत नाही, आणि कधी कुणी करणारही नाही, कारण नमनात आणि कोकणच्या जीवनात संकासूर हा खलनायक नव्हे, तर तो हिरो आहे.. आणि धकाधकीच्या जीवनात अडकलेल्या चाकरमान्यांचं तर तो जगण्याचं टॉनिकच आहे.

.. अनेकांना प्रश्न पडतो, पुराणात खलनायक असलेला संकासूर नमन/खेळ्यात पुजनीय कसा काय ठरला..? नमनात तर त्याचे स्थान गणपती आख्यानाआधी आले आहे. अग्रक्रम त्याला मिळाला आहे. गणपतीच्या आधी तो नाच करून जातो. हे कोडे काय..? याबाबत कोकणातले नमन रंगकर्मी एक मार्मिक स्पष्टीकरण देतात, ते अभ्यासकांना विचार करायला लावणारे आहे.
संकासूराने ब्रम्हाचे वेद पळवले नाहीत! मुळात चारही वेद अनार्यांचीच संपत्ती होती…
रंगकर्मीच्या मतानुसार, संकासूराने ब्रम्हाचे वेद पळविले नाहीच! मुळात चारही वेद अनार्यांचीच संपत्ती होती. ते अनार्यांचा राजा संकासुराचेच होते, आणि ते ब्रम्हानेच आपले वर्चस्व प्रस्थापित करत आपल्या ताब्यात ठेवले होते. ते संकासुराला पुन्हा मिळवायचे होते. म्हणून त्याने ते मिळविलेे. येथे संघर्ष निर्माण झाला, आणि या संघर्षात संकासूराचा पराभव झाला. नेहमीप्रमाणे इतिहास हा जेत्याच्या बाजूने लिहला जातो, त्यामुळे पराभूताची बाजू दुर्लक्षित होते. येथेही संकासूराच्या बाबतीत तेच झाले असावे.
असो.. जगाच्या दृष्टीने खलनायक असलेला संकासूर नमनात मात्र तसा नाही, एवढे पक्के. नमन/खेळ्यांनी संकासूराला आपला हिरो केला, आणि नमनात नाचवला. नमनात तो इतका मुरला, की तो एक पुराणिक व्यक्तिमत्व आहे, हेच सारे विसरून गेले. संकासूर काय, किंवा रावण काय.. या जगाच्या दृष्टीने खलनायक ठरलेल्या राजांना नमन/खेळ्यांनी एक विशेष आदराचं स्थान दिलं आहे. या पात्रांबाबतची ही आपुलकी या लोककलेत कशी रुजली..? याबाबत सखोल अभ्यासाची गरज आहे.
नमन/खेळ्यात गणपतीआधी रंग भरणार्या संकासूराबाबत कोकणातील रंगकर्मी अंत्यत सुरेख माहिती देतात. ते म्हणतात, संकासूर हा राजा होता. वेद ही संपत्ती शंकासूराचीच होती. ती त्याने बहुजन वर्गात वाटली. काल, आज आणि उद्या असं तिन्ही त्रिकाळ पवित्र असणारं ज्ञानदानाचं कार्य वेदांच्या माध्यमातून संकासूराने केलं, तेही बहुजन वर्गात! म्हणून त्याला पुजले जाते.
कोकणात संकासूराला जो तो आपापल्या श्रध्देनुसार पुजतो. तो बाळ-गोपाळात रमतो. त्यांच्या पाठीशी लागतो. त्यांचे मनोरंजन करतो. त्यांना घाबरवतो, म्हणून काहीजण त्याला श्रीकृष्णाचा अवतारही समजात. काहीजण त्याला ग्रामदेवीचा दूत असेही म्हणतात. तर काही त्याला गावाचा रक्षक असेही म्हणतात. या सार्या भावनांमागे संकासूर हा चांगलाच आहे, असे म्हटले आहे. त्याच्याविषयी कुठेही नकारात्मकता नाही. गावाचा रक्षक ही त्याच्यामागची उपाधी खूपच सुचक आहे, कारण कोकणात संकासुराचा दराराही तितकाच जबरदस्त आहे. गाव ही त्याची जबाबदारी आहे, ती तो इमानेइतबारे हजारो वर्षे पार पाडत आला आहे. त्या जबाबदारीपायीच तो शिमग्याच्या सणाला अख्खी गावभोवनी करतो, घराघरात-दारादारात जातो. पोरं-बाळं, म्हातारी-कोतारी या सार्यांकडे जातो, त्यांच्या पाठीवर प्रेमाने वेठी मारतो. एक खलनायक.. हे सारं कसं काय करू शकेल? हे एक रक्षकच करू शकेल. त्यामुळे तो खरोखरच रक्षक (अपभ्रंश: राक्षस) आहे.

अशा संकासूराला कोकणात नवसही बोलला जातोे. यावर्षीच्या शिमग्यात बोललेला नवस पुर्ण झाला, तर पुढल्या वर्षीच्या शिमग्यात ज्यावेळी फिरते/भोवनीचे खेळे दारी येतात तेव्हा तो यथाशक्ती फेडला जातो. यात सर्वाधिक नवस असतात ते चाकरमान्यांचे. नोकरी-धंद्यातील यश, संततीप्राप्ती, लग्नाची जुळवणूक यासंदर्भातील हे नवस गुळ-खोबरे या परतफेडीपासून संकासूराच्या कमरेचा चाळ, हातातली वेठी, नारळाचं तोरण, आणि जास्तीत जास्त तर संकासूरासहित येणार्या खेळ्याचं जेवण.. अशा स्वरूपाचेही असतात.
संकासुराची वेशभूषा अशी का आहे?
रत्नागिरीचा संकासुर आणि गुहागरी संकासुर यांच्या वेषभुषेत थोडा फेरफार आहे. गुहागरी संकासुराची पांढरी दाढी ही भरगच्च असते. ती घोड्यांच्या केसांपासून तयार केलेली असते. किंवा नॉयलॉनचीही असते. त्यामुळे तो संकासूर दिसायला रुबाबदार दिसतो. तर रत्नागिरीकडील संकासुराची दाढी ही धाग्यांची असते. ती एका वर्षानंतर बहुधा झिरपते, आणि नावाची दाढी उरते. संकासुराची ही वेषभुषा मुंबईसारख्या मोठ्या शहरात ऐतिहासिक कपडेपट वाल्यांकडेच मिळते, तीची कमीत कमी किंमत पाच हजारापासून सुरू होते. ही झाली पोशाखाची किंमत, गुहागरी संकासूर कमीतकमी चार किलोचे चाळ कमरेला बांधतो, त्याची किंमत वेगळी. तीही हजारातच..
आधुनिकतेमुळे सकासूराची रंगत कमी
काळाच्या ओघात रत्नागिरीतली नमनं फार फार बदलली. व्यावसायिक नमन हा प्रकार कोकणात फार मातला. या मातलेपणात संकासूर पेटार्यात पुर्णत: बंदिस्त झाला. आज रत्नागिरीतल्या एकाही व्यावसायिक नमनात संकासूर पहायला मिळत नाही. काही व्यावसायिक मंडळे मिशीला कोकम लावल्यागत आम्ही संकासूर आणतो.. नाचवतो.. असे सांगत असतात, मात्र तो संकासूर येतो, आणि नाचून जातो. ते संकासूराचे येणे म्हणजे हसावे की रडावे..? असे असते. संकासूराचे येणे म्हणजे समोर बसलेल्या लहानग्याचे अख्खे अंथरूण ओले होणे, अशी क्रिया लहानग्याबाबत घडत असे. इतका संकासूर भयंकर, आणि तितकाच विनोदी असे. आताचा संकासूर म्हणजे अळवावरचे पाणी. खरा संकासूर तोच, जो बतावण्या मारतो!
नमनातल्या संकासूराची खरी ओळख होती ती त्याची बतावणी. आज ही ओळख व्यावसायिक नमनातून पुर्णत: पुसली आहेच, पण गुहागरसारख्या ग्रामीण आणि पारंपारिक नमनाचे क्षेत्र असलेल्या भागातही संकासूर बतावण्या मारताना दिसत नाही. हे असे का झाले असावे..? त्याला कारण एकच, नमन-खेळ्यांची म्हण्णी, बतावणी नव्या पिढीने, त्यातील नव्या कलाकारांनी आत्मसात केली नाही. ती कधी जाणून घेतली नाही. आज अशी अनेक दुर्मिळ म्हण्णी वा बतावणी, आणि आख्याने केवळ लिहलेली नसल्याने नष्ट होत चालली आहेत.
रत्नागिरीतील नमनातील जेष्ठ रंगकर्मी कै.पु.ल.माने यांनी साकारलेल्या संकासुराच्या बतावणीचे संकलन पुढे दिले आहे. ते अतिशय दुर्मिळ आहे. या बतावणीतून संकासूर सकाळी उटल्यापासून ते जेवण्यापर्यंतची जी दैनंदिन कामे आहे, ती कशी करतो, ते विनोदी पध्दतीने सांगतो. त्याच्या जोडीला असतो नमनाचा म्हण्णीवाला. म्हण्णीवाला हाच नमनाचा म्होरक्या. त्याला संकासूर नायको (नायक) असे संबोधतो. नायको आणि संकासूर असा दोघांचा संवाद आणि नाच चालू असतो. याहून विशेष म्हणजे हा सारा संवाद पुर्णत: तिलोरी-संगमेश्वरी बोलीतून होत असतो. पुढील बतावणीत असे अनेक अत्यंत जुने तिलोरी-संगमेश्वरी बोलीतील शब्द आले आहेत, की ज्यांचा नेमका अर्थ आज लावणे कठीण झाले आहे, इतके हे शब्दवैभव जुने आहे.
(सौजन्य - amolpalye.blogspot.com)






