Skip to main content

ज्याच्या दुखापतीमुळे सूर्याला संधी मिळाली, आता तोच श्रेयस कर्णधार म्हणून घेतोय सूर्याची जागा

Shantanu Khuje
Today
1 views
ज्याच्या दुखापतीमुळे सूर्याला संधी मिळाली, आता तोच श्रेयस कर्णधार म्हणून घेतोय सूर्याची जागा

शंतनू खुजे 


  • ज्या श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे २०२१ मध्ये सूर्यकुमार यादवला भारतीय टी-२० संघात पदार्पणाची संधी मिळाली, आता त्याच श्रेयसने कर्णधार म्हणून सूर्याची जागा घेतली आहे. 


  • निवड समितीने श्रेयसच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केल्याने, अवघ्या ५ वर्षांत टी-२० क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या सूर्यकुमारच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला जवळपास ब्रेक लागल्याचे मानले जात आहे. 


  • सूर्यकुमारने प्रस्थापित केलेले जागतिक विक्रम आणि त्याच्याच नेतृत्वात भारताने नुकत्याच जिंकलेल्या टी-२० विश्वचषकाच्या ऐतिहासिक कामगिरीचा घेतलेला हा सविस्तर आढावा. 


देशांतर्गत क्रिकेट असो किंवा आयपीएल सूर्यकुमार यादवने २०१० मध्ये पदार्पण केल्यापासून खोऱ्याने धावा काढल्या. या काळात त्याने भारतीय संघाची दारं अनेकदा ठोठावली. पण प्रत्येकवेळी त्याला हुलकावणी मिळाली. अखेर २०२१ मध्ये त्याचं नशीब पालटलं. २०२० च्या अखेरीस श्रेयस अय्यरला दुखापत झाली आणि तो प्रदीर्घ काळासाठी संघाबाहेर गेला. यामुळे राष्ट्रीय टी२० संघात चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीची प्रतिष्ठित जागा मोकळी झाली आणि त्याठिकाणी संधी मिळाली ती सूर्यकुमारला… नंतर त्याने ह्या संधीचं कसं सोनं केलं हे सर्वांनाच ठाऊक आहे.


पण ज्या श्रेयसच्या दुखावपतीमुळे संघात स्थान मिळवत सूर्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली तोच श्रेयस आता टी२० संघाचा कर्णधार म्हणून सूर्याची जागा घेतोय. कर्णधार म्हणून श्रेयस अय्यर सूर्यकुमारची जागा घेईल अशी चर्चा मागील काही दिवसांपासुन सुरु होती. त्यानंतर परवा निवडसमितीने यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलं.


त्यामुळे २०२१ मध्ये पदार्पण केलेल्या सूर्यकुमारची ५ वर्षाची छोटेखानी कारकीर्द जवळपास संपुष्टात आली. या निम्मित्याने त्याने प्रस्थापित केलेले विक्रम, त्याच्या नेतृत्वात भारताने अलीकडेच जिंकलेला टी२० विश्वचषक या आणि अश्या इतरही घडामोडींचा घेतलेला हा आढावा… 


सुरुवातीची कारकीर्द आणि देशांतर्गत क्रिकेट


सूर्याची सुरुवात मुंबईत पारसी जिमखाना आणि दादर युनियनसारख्या संघांसाठी क्लब क्रिकेट खेळण्यापासून झाली. २०१० मध्ये त्याने मुंबईसाठी लिस्ट ए, टी-२० आणि प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २०११-१२ च्या रणजी हंगामात त्याने ७५४ धावा कुटत मुंबईसाठी सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळवला. भारतीय अंडर-22 संघातूनही त्याने चमकदार कामगिरी केली.


User Image


२०१४-१५ मध्ये त्याने काही काळासाठी मुंबई संघाचे कर्णधारपद भूषवले. तो २०१५-१६ ची रणजी ट्रॉफी आणि २०१८-१९ मध्ये विजय हजारे ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई संघाचा महत्त्वाचा भाग होता. सलग तीन हंगामात ६०० पेक्षा जास्त धावा करत त्याने देशांतर्गत क्रिकेट गाजवले. २०१९ ते २०२१ या काळात त्याने पुन्हा मुंबई संघाचे नेतृत्व केले, मात्र संघाला फारसे यश मिळाले नाही. 


देशांतर्गत क्रिकेटसोबतच त्याने क्लब क्रिकेट खेळणे सुरूच ठेवले आणि २०२१ मध्ये २४९ धावांची धडाकेबाज खेळी करून पारसी जिमखान्याला अनेक दशकांनंतर 'पोलीस शील्ड' स्पर्धा जिंकून दिली.


मुंबई इंडियन्स पासून सुरु झाली आयपीएल कारकीर्द


सूर्याची आयपीएल कारकीर्द २०१२ मध्ये मुंबई इंडियन्सपासून सुरू झाली, मात्र तेव्हा त्याला फक्त एकच सामना खेळायला मिळाला. २०१४ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने त्याला विकत घेतले. पहिल्याच हंगामात त्याने संघाच्या विजेतेपदात योगदान दिले. केकेआरसोबतच्या चार हंगामात त्याने ५४ सामने खेळून ६०८ धावा केल्या.


२०१८ च्या लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला पुन्हा संघात घेतले. त्यानंतर तो मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणारा प्रमुख फलंदाज बनला. २०१८ ते २०२० या सलग तीन हंगामात त्याने १४०० पेक्षा जास्त धावा केल्या आणि २०१९ व २०२० मध्ये मुंबईला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. 


सातत्यपूर्ण कामगिरीमुळे २०२३ च्या हंगामात त्याला उपकर्णधार बनवण्यात आले. हा हंगाम त्याच्यासाठी सर्वोत्तम ठरला; यात त्याने १६ सामन्यांत ६०५ धावा कुटल्या आणि गुजरात टायटन्सविरुद्ध आपले पहिले आयपीएल शतक झळकावले. २०२४ च्या हंगामात दुखापतीमुळे सुरुवातीचे सामने मुकल्यानंतरही, त्याने दमदार पुनरागमन करत ११ सामन्यांत ३४५ धावा केल्या, ज्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या त्याच्या दुसऱ्या आयपीएल शतकाचा समावेश होता.


User Image


….आणि श्रेयसच्या दुखापतीमुळे सूर्यासाठी मार्ग खुला झाला… 


२०२० च्या अखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यादरम्यान श्रेयस अय्यरच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आणि नंतर २०२१ मध्ये त्याला पुन्हा तोच त्रास झाला, तेव्हा तो दीर्घ काळासाठी संघाबाहेर गेला. यामुळे राष्ट्रीय टी२० संघात चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीची प्रतिष्ठित जागा मोकळी झाली.


२०२० च्या शानदार आयपीएल हंगामाच्या जोरावर निवडकर्त्यांनी पहिल्यांदाच सूर्याला संधी दिली. त्याने मार्च २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले. पण त्याला पहिल्या सामन्यात फलंदाजीची संधी मिळाली नाही नंतर या मालिकेतील चौथ्या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली आणि त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला लगवलेला तो फटका जो नंतर त्याचा ट्रेडमार्कचं बनला. 


या सामन्यात त्याने ३१ चेंडूंमध्ये ५७ धावा केल्या आणि आपल्या पहिल्याच सामन्यात सामनावीर पुरस्कार देखील मिळवला. उशीरा का होईना पण शेवटी संधी मिळाल्यानंतर सूर्याने मागे वळून बघितले नाही. 


५ वर्षाची छोटेखानी पण यशस्वी कारकीर्द… 


सूर्यकुमार यादवने मार्च २०२१ मध्ये भारतीय टी-२० संघात पदार्पण केले आणि अवघ्या काही वर्षांतच या फॉरमॅटचा जगातील सर्वात धोकादायक फलंदाज म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. मैदानाभोवती कोणत्याही कोपऱ्यात षटकार ठोकण्याच्या अद्भूत क्षमतेमुळे त्याला क्रिकेट जगताने 'मिस्टर ३६० अंश'  ही पदवी दिली. त्याने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अनेक शतके आणि अर्धशतके झळकावून जागतिक क्रमवारीत सलग बरीच वर्षे अव्वल स्थान राखले. 


२०२४ च्या टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघात त्याचा मोठा वाटा होता, विशेषतः अंतिम सामन्यात सीमारेषेवर त्याने घेतलेला डेव्हिड मिलरचा तो ऐतिहासिक झेल भारताला विश्वविजेता बनवणारा ठरला. या उल्लेखनीय योगदानानंतर आणि रोहित शर्माने निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याच्याकडे भारतीय टी-२० संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली.


कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची कारकीर्द खऱ्या अर्थाने सुवर्णमय ठरली. नेतृत्वाची जबाबदारी सांभाळताना त्याच्या आक्रमक फलंदाजीला एक परिपक्वता आली आणि त्याने संघाला अतिशय उत्तमरीत्या बांधून ठेवले. या प्रवासातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक क्षण म्हणजे २०२६ चा टी-२० विश्वचषक. स्वतःच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकून देत त्याने जागतिक क्रिकेटमध्ये एक नवा अध्याय सुरू केला. या विजयाने सूर्यकुमार यादव हा केवळ एक धडाकेबाज फलंदाजच राहिला नाही, तर तो एका विश्वविजेत्या संघाचा यशस्वी आणि चॅम्पियन कर्णधार म्हणून क्रिकेटच्या इतिहासात कायमचा कोरला गेला.


User Image


एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमधील अपयश


टी-२० क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणारा सूर्यकुमार यादव दुर्दैवाने एकदिवसीय आणि कसोटी यांसारख्या मोठ्या फॉरमॅटमध्ये आपली तीच जादू दाखवू शकला नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याला अनेक संधी देण्यात आल्या, मात्र ५० षटकांच्या खेळात आवश्यक असणारा संयम आणि डावाची संथ उभारणी करण्यात तो अपयशी ठरला. 


त्याने खेळलेल्या ३७ एकदिवसीय सामन्यांमध्ये अवघ्या २५.७७ च्या सामान्य सरासरीने केवळ ७७३ धावा केल्या, ज्यात फक्त चार अर्धशतकांचा समावेश आहे. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात सलग तीन सामन्यांत तो शून्यावर बाद झाला, ज्यामुळे त्याच्या तंत्रावर आणि मोठ्या फॉरमॅटमधील मानसिकतेवर बरीच टीका झाली. 


दुसरीकडे, कसोटी क्रिकेटमध्ये तर त्याला केवळ एकच सामना खेळण्याची संधी मिळाली, ज्यात त्याला अवघ्या ८ धावा करता आल्या. कसोटीसाठी लागणारी भक्कम बचावात्मक शैली आणि तासनतास खेळपट्टीवर टिकून राहण्याचे कसब सूर्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर आत्मसात करता आले नाही. 


थोडक्यात सांगायचे तर, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील आक्रमकता ५० षटके आणि ५ दिवसांच्या क्रिकेटमध्ये त्याच्यासाठी अडथळा ठरली, ज्यामुळे तो एका फॉरमॅटचा राजा असूनही, इतर दोन फॉरमॅटमध्ये आपली छाप सोडू शकला नाही.


सूर्यकुमारला डावलून श्रेयस अय्यरला कर्णधार का बनवले गेले ?


टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या सूर्यकुमार यादवला अचानक कर्णधारपदावरून हटवून संघाबाहेर का काढले, यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. आगरकर यांच्या मते, विश्वचषक जिंकल्यानंतरही प्रत्येक संघाला भविष्याचा वेध घेत पुढील वाटचालीचे नियोजन करावे लागते. पुढील दोन वर्षांचे, म्हणजेच २०२८ च्या टी-२० विश्वचषक आणि ऑलिम्पिकपर्यंतचे चक्र डोळ्यासमोर ठेवून हा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


सूर्याला वगळण्यामागील सर्वात मुख्य कारण त्याचा घसरलेला वैयक्तिक फॉर्म हे होते. जुलै २०२४ मध्ये पूर्णवेळ कर्णधार झाल्यापासून त्याच्या फलंदाजीची सरासरी ४३.६० वरून २५.८८ पर्यंत खाली आली होती, आणि त्याचा स्ट्राईक रेटही १६८.७५ वरून १५२.०३ पर्यंत घसरला होता. आगरकर यांनी मान्य केले की विश्वचषक विजेत्या कर्णधाराला वगळण्याचा निर्णय घेणे अजिबात सोपे नव्हते, परंतु संघाच्या भविष्यातील हितासाठी आणि नव्या पर्वाची सुरुवात करण्यासाठी हा कठीण निर्णय घेणे आवश्यक होते.


User Image


सूर्यकुमारच्या जागी श्रेयस अय्यरची निवड करण्यामागे श्रेयसचा आयपीएलमधील नेतृत्वाचा उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण अनुभव कामी आला आहे. आगरकर यांनी स्पष्ट केले की श्रेयस हा कर्णधारपदासाठी सर्वात योग्य उमेदवार होता. त्याने आयपीएलमध्ये वेगवेगळ्या फ्रँचायझींचे यशस्वी नेतृत्व करत २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला विजेतेपद मिळवून दिले आणि त्यानंतर २०२५ मध्ये एका आव्हानात्मक हंगामात पंजाब किंग्सला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले. 


श्रेयसने कर्णधार म्हणून येऊ शकणाऱ्या सर्व प्रकारच्या दबावाचा यशस्वीपणे सामना केला असून त्याचा स्वतःचा वैयक्तिक फॉर्मदेखील उत्कृष्ट राहिला आहे. जरी श्रेयसने डिसेंबर २०२३ पासून भारतासाठी कोणताही आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळलेला नसला तरी, त्याच्याकडे या फॉरमॅटमध्ये नेतृत्व करण्याचा पुरेसा आणि सिद्ध झालेला अनुभव आहे. तो नुकत्याच झालेल्या विश्वचषक संघात स्थान मिळवण्याच्या अगदी जवळ होता, त्यामुळे आगामी मालिकांसाठी तोच सर्वोत्तम आणि अत्यंत पात्र पर्याय असल्याचे निवड समितीने स्पष्ट केले.


मला त्याच्यासाठी खूप, खूप, खूप आनंद झाला - सूर्या 


भारताच्या नवीन टी-२० कर्णधारपदी श्रेयस अय्यरची नियुक्ती झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने खेळाडूवृत्ती दाखवत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. आपला जुना मुंबईचा संघसहकारी या पदावर पोहोचल्याचा आपल्याला खूप आनंद झाल्याचे तो म्हणाला. सूर्यकुमारने त्यांच्या एकत्र खेळलेल्या क्रिकेट प्रवासाची आठवण करून दिली. तसेच, श्रेयसची ही प्रगती मुंबई क्रिकेटसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगत, शहरातील आणखी एक खेळाडू आता भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व करणार असल्याचे त्याने नमूद केले.


"सध्या अनेक गोष्टी घडत आहेत, पण अर्थातच श्रेयस भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व करणार असल्याने मला त्याच्यासाठी खूप, खूप, खूप आनंद झाला आहे. आम्ही मुंबईत एकत्र खूप क्रिकेट खेळलो आहोत. मला सर्वात महत्त्वाची गोष्ट ही वाटते की, सलग तीन मुंबईकर कर्णधारांनी भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व केले आहे. मला वाटते हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे आणि सर्वांनी तो साजरा करायला हवा," अशी प्रतिक्रिया सूर्यकुमारने 'टी-२० मुंबई २०२६' मधील सामन्याच्या नाणेफेकीदरम्यान बोलताना दिली.





Share this article
सर्वोच्च न्यायालय म्हणते, लग्नाआधीचे सहमतीने ठेवलेले संबंध हा चारित्र्यावरील डाग नाही…
ताज्या घडामोडी

सर्वोच्च न्यायालय म्हणते, लग्नाआधीचे सहमतीने ठेवलेले संबंध हा चारित्र्यावरील डाग नाही…

लग्नाआधीचे सहमतीने प्रस्थापित केलेले संबंध हा एखाद्या व्यक्तीच्या चारित्र्यावरील डाग मानला जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. बदलत्या सामाजिक नियमांबाबत अधिकाऱ्यांनी संवेदनशील असणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. खंडपीठाने म्हटले की, विवाहपूर्व संबंधांच्या संदर्भात अधिकाऱ्यांना बदलत्या काळाची संवेदनशीलता समजून घ्यावी लागेल.

3 min read
T
Team BaiManus
लोकशाहीच्या टेबलावर निम्म्या जगाची खुर्ची रिकामी…!
ताज्या घडामोडी

लोकशाहीच्या टेबलावर निम्म्या जगाची खुर्ची रिकामी…!

जगभरातील संसदांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व २७.५ टक्क्यांवर पोहोचले असले तरी वाढीचा वेग गेल्या दशकातील सर्वात मंद आहे. संसदीय नेतृत्वाच्या पदांवर महिलांची उपस्थिती उलट घसरत असून २०२६ मध्ये केवळ १९.९ टक्के संसदाध्यक्ष महिला आहेत. ज्या देशांमध्ये महिला आरक्षण किंवा कोटा व्यवस्था आहे, तिथे प्रतिनिधित्व लक्षणीयरीत्या जास्त असल्याचे आयपीयूच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग ४४.४ टक्के असताना संसदेत तो केवळ १४.७२ टक्के आहे. राजकीय प्रतिनिधित्व, शिक्षण, रोजगार आणि निर्णय प्रक्रियेत महिलांना अजूनही संरचनात्मक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

7 min read
V
Vikas Meshram
फुटबॉलच्या प्रेमासाठी जिथे लाटा होत्या, तिथेच त्यांनी गोलपोस्ट उभारले अन् जन्माला आली जगाला प्रेरणा देणारी ‘पान्यी’ची कहाणी...
ताज्या घडामोडी

फुटबॉलच्या प्रेमासाठी जिथे लाटा होत्या, तिथेच त्यांनी गोलपोस्ट उभारले अन् जन्माला आली जगाला प्रेरणा देणारी ‘पान्यी’ची कहाणी...

फिफा वर्ल्ड कपचा थरार अनुभवण्यासाठी सबंध जग सज्ज झालयं. भव्य स्टेडियम्स, लख्ख प्रकाशात न्हाऊन निघालेले हिरवेगार मखमली गवत, सुपर ह्युमन भासणारे वलयांकीत खेळाडू आणि हजारो प्रेक्षकांचा तो कानठळ्या बसवणारा जल्लोष… मात्र जिथे जमिनीचा एक तुकडाही नाही, फक्त अथांग निळा समुद्र आणि चुनखडीचे अक्राळविक्राळ सुळके हीच जीवनाची सीमा आहे. अशा एका ठिकाणी, कुणी फुटबॉल खेळू शकेल का ? शाच एका दुर्गम भागात सागराच्या लाटांवर, मानवी जिद्दीचे एक विलक्षण महाकाव्य लिहिले गेले आहे आणि यातूनच फुटबॉलचे वैश्वीक गारूड विलक्षण परिणामकारक पध्दतीत समोर आले आहे. ही कथा आहे थायलंडमधील पान्ये फुटबॉल क्लबच्या जन्मासह आजवरच्या वाटचालीची !

9 min read
S
shekhar patil
मोटार पंप चोरीच्या संशयावरून दलित युवकावर अमानुष अत्याचार; विहिरीत उलटे टांगून मारहाण
ताज्या घडामोडी

मोटार पंप चोरीच्या संशयावरून दलित युवकावर अमानुष अत्याचार; विहिरीत उलटे टांगून मारहाण

हरियाणातील हांसी जिल्ह्यात मोटार पंप चोरीच्या संशयावरून एका दलित युवकावर अमानुष अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी युवकाला बेदम मारहाण करून विहिरीत उलटे टांगल्याचा आरोप आहे. या प्रकरणी हत्या प्रयत्न, धमकी आणि एससी-एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

3 min read
T
Team BaiManus
 सव्वाशे कर्मचाऱ्यांना दीड कोटींचा पगार आणि १५ लाख कोटींचा बोगस महसूल! 'राजेश एक्सपोर्ट्स'वर सेबीची बंदी
ताज्या घडामोडी

सव्वाशे कर्मचाऱ्यांना दीड कोटींचा पगार आणि १५ लाख कोटींचा बोगस महसूल! 'राजेश एक्सपोर्ट्स'वर सेबीची बंदी

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) राजेश एक्सपोर्ट या कंपनीवर गेल्या पाच वर्षांत तब्बल १५.१५ लाख कोटी रुपयांचा महसूल फुगवून दाखवल्याचा आरोप केल्याने कंपनी अडचणीत आली आहे. सेबीने आपला तपास पूर्ण होईपर्यंत कंपनी आणि तिचे अध्यक्ष राजेश मेहता यांना शेअर बाजारात व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. जर हे आरोप सिद्ध झाले, तर हा भारतीय कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठा अकाउंटिंग घोटाळा ठरू शकतो.

7 min read
S
Shantanu Khuje
 ‘उष्णतेची चिंता ही एक चैन आहे, गरिबांना ते स्वांतत्र्य नसतं...’
ताज्या घडामोडी

‘उष्णतेची चिंता ही एक चैन आहे, गरिबांना ते स्वांतत्र्य नसतं...’

जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना भारतातील अनेक भाग ४५ ते ४८ अंश सेल्सिअस तापमानाचा सामना करत आहेत. उष्णतेची लाट ही केवळ हवामानाची समस्या राहिलेली नसून ती आरोग्य, रोजगार, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा प्रश्न बनली आहे. वातानुकूलित खोल्यांतील लोक आणि उन्हात काम करणारे मजूर यांच्यातील दरी वाढत्या तापमानामुळे अधिक स्पष्ट होत आहे. हवामान बदलाचा सर्वाधिक फटका बालकं, शेतमजूर, बांधकाम कामगार, फेरीवाले आणि स्थलांतरित कुटुंबांना बसत आहे. तापती शहरं थंड करण्यासाठी हरित क्षेत्रं, शीत छतं आणि लोककेंद्रित नगररचना यांची गरज पूर्वीपेक्षा अधिक तीव्र झाली आहे.

9 min read
A
Atul Deulgaonkar

Comments

Comments are currently disabled or loading...