- दरवर्षी , काजवे पाहण्यासाठी हजारो पर्यटक भंडारदरा आणि आसपासच्या भागांना भेट देतात
- महाराष्ट्रातील भंडारदरा- कळसुबाई भागात काजवे पाहण्यासाठी मे- जून महिन्यांत विविध संस्थांतर्फे भेटी आयोजित केल्या जातात.
- मात्र अनियंत्रित पर्यटनामुळे काजव्यांच्या मीलनाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ लागला आहे.
मे महिन्याच्या शेवटी महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा भागात पश्चिमेकडून सुखद वाऱ्याची झुळूक यायला लागते आणि रणरणत्या उन्हाळ्याला काहीसे शीतल करते. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला हा भाग हिरव्यागार जंगलांनी नटलेला आहे. संध्याकाळ सरून जशीजशी रात्र व्हायला लागते, हा भाग अक्षरशः रोषणाई केल्यासारखा झगमगून उठतो. ही रोषणाई विजेची नसून, प्रत्यक्षात ते प्रकाशाचे किडे-अर्थात काजवे असतात.
काजवे ह्या कीटकांसाठी सरता मे- आणि जून हा मीलनाचा काळ असतो. नजरबंदी करणारा हा प्रकाश काजवे आपल्या प्रजननादरम्यान निर्माण करतात. जसजसा मोसमी पाऊस स्थिरावेल, तशीतशी काजव्याची संख्या हळूहळू कमी होते.
मात्र गेल्या काही वर्षांत यात कमालीचा बदल झालेला आहे. पर्यावरण तज्ज्ञ तसेच भंडारदरा- घाटघर परिसरातील स्थानिकांच्या मते, हे असेच चालत राहिलं, तर काजव्याचं अस्तित्वच धोक्यात येऊ शकतं. त्यांच्या निरीक्षणानुसार पर्यटकांची प्रचंड वेगाने वाढणारी संख्या आणि वातावरणातील बदल यामुळे काजव्यावर विपरीत परिणाम होतो आहे. त्यामुळे काजव्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
२५ मे आणि १५ जूनच्या दरम्यान ह्या भागात अनेक काजवा महोत्सवांचं आयोजन केलं जातं. बऱ्याच खाजगी पर्यटन संस्था तसेच ट्रेकिंग करणारे गट इथे पर्यटकांना काजवे पाहायला घेऊन येतात. नेमक्या ह्याच काळात काजव्याचा प्रजननकाल असतो.
राजमाची, पुरुषवाडी, प्रबळवाडी, भीमाशंकर हरिश्चंद्रगड, माळशेज घाट इ. इतर काही ठिकाणी देखील हे महोत्सव होतात. ह्या महोत्सवांना मुंबई पुणे आणि इतर शहरातून पर्यटक येतात.
मात्र यातला कोणताही 'महोत्सव हा सरकार आयोजित करत नाही. तसेच यातल्या बऱ्याच संस्था ह्या शहरात चालवल्या जातात, आणि त्यामद्ये स्थानिकांचा सहभाग नगण्य असतो. त्यामुळे नेमक्या किती संस्था किती पर्यटकांना या भागात आणत आहेत याबाबत सध्या कोणतीही खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही.
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार सुमारे दोन लाख पर्यटक ह्या भागात दरवर्षी काजवे बघण्यासाठी येतात. दरवर्षी या महोत्सवाची लोकप्रियता वाढत चालली आहे आणि त्याचसोबत पर्यटकांची संख्या देखील. मात्र आता बऱ्याच पर्यावरण अभ्यासकांनी अशी मागणी केली आहे की हे महोत्सव भरवणं बंद केलं जावं.
काजवे, एक संवेदनशील प्रजाती
काजवे ही प्रजाती lampyride वर्गामध्ये मोडते. ह्या वर्गातील कीटक हे नरम कातडीचे असून त्यातील बरेच जण प्रकाश उत्सर्जित करणारे असतात. त्यांच्या शरीरात होणाऱ्या एका विशिष्ट रासायनिक प्रक्रियेमुळे त्यांच्या शरीरातून प्रकाशाची निर्मिती होते. नर काजवा हा मादीला आकर्षित करून घेण्यासाठी स्वतःच्या पोटाकडील भागातून प्रकाश उत्पन्न करतो, "कीटकतज्ज्ञ डॉ राहुल खोत सांगतात. लुसीफरेस नावाचे द्रव्य काजव्याच्या पोटामध्ये उत्पन्न होते. प्राणवायू अर्थात ऑक्सिजनचा जेव्हा लुसीफरेस शी संयोग होईल, तेव्हा प्रकाशाची निर्मिती होते. ह्यालाच आपण काजव्याचे 'चमकणे' म्हणातो."
ते पुढे असेही सांगतात की हा प्रकाशाचा खेळ ही एका प्रकारची संदेशवहन प्रणाली आहे. ह्या प्रकाशाचा अर्थ कधी मीलनाची साद असू शकतो तर कधी आसपास असणाऱ्या धोक्याचा इशारा असू शकतो. मात्र बहुतेक वेळा नर काजव्याचे चमकणे हे मादीला आकर्षित करण्यासाठी असते. जितका जास्त झगमगीत प्रकाश पडेल तितके मादी आकर्षित होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे त्यांच्यामधल्या ह्या प्रकाशाबाबत नर काजव्यामध्ये कायम चढाओढ असते. मादी काजवे देखील ह्या प्रकाशाला पाहून त्यातील त्यांना योग्य असा, त्यांच्या विशिष्ट उपप्रजातीतील नर निवडतात. मीलनासाठी काजव्याची निवड ही नेहमी मादीच्या हातात असते.
गेल्या काही काळात मात्र काजव्यांच्या ह्या मीलनकाळाचं बऱ्यापैकी बाजारीकरण झालं आहे. काजवा महोत्सवाच्या नावाखाली अनेक व्यावसायिक पर्यटन संस्था भरमसाठ पर्यटक घेऊन ह्या भागात येताहेत. ह्या भेटींमध्ये पर्यटक स्थानिक अन्न, संगीत आणि आदिवासी जीवनाचा अनुभव घेतात. गेल्या काही काळात वाढलेली पर्यटकांची संख्या ही रोजगार निर्मितीच्या दृष्टीने उपयुक्त असली, तरी त्याचा परिणाम म्ह्णून काजवे कमी होत आहेत.
विशेषतः पर्यटकांच्या काही कृत्यांमुळे काजव्यांच्या मीलनावर तीव्र परिणाम होतो. डॉ खोत सांगतात की काजव्याचा माग काढत अनेक पर्यटक रात्री जंगलात टॉर्च घेऊन फिरतात, तर अनेक जण जंगलामध्ये वाहने नेऊन त्याचे प्रखर दिवे चालू ठेवून काजव्याचा शोध घेतात. " ह्यामुळे नर काजव्याच्या प्रकाश उत्सर्जित करण्याच्या प्रक्रियेत कमालीचे अडथळे निर्माण होतात. ह्या प्रकाशाच्या प्रदूषणामुळे काजव्यांच्या संदेशवहनात बाधा येते. आणि त्यामुळे त्यांचे मीलन होऊ शकत नाही. आणि महत्वाचं म्हणजे केवळ नर काजवे उडू शकतात. मादी काजवे जमिनीवरच असतात. आणि जंगलामध्ये संचार करणाऱ्या ह्या हजारो पर्यटकांच्या पायाखाली मादी काजवे तुडवले जातात.
जगभरात सर्वच ठिकाणी, विशेषतः गेल्या दशकामध्ये हे दिसून आलं आहे, की काजव्याची संख्या कमी होते आहे." डॉ. खोत सांगतात. 
पर्यटन: एक दुधारी तलवार
काजव्यांच्या कमी होणाऱ्या संख्येबद्दल नेमका तपशील जरी उपलब्ध नसला, तरी या भागात वर्षानुवर्षे राहणाऱ्या लोकांशी बोलल्यावर लक्षात येतं, की त्यांना देखील काजवे कमी झाल्याचं जाणवत आहे.
मी शाळकरी पोर होते ना, तेव्हा तर आमच्या घरात पण काजवे यायचे. ४५ वर्षीय ठकुबाई रोंगटे मोंगाबे प्रतिनिधींशी बोलताना सांगत होत्या. एका काळोख्या रात्री, काजवे पाहताना आम्हाला ठकुबाई भेटल्या. पाऊस नुकताच पडून गेला होता आणि जोरदार वारे वहात होते. त्यांनी मोठ्या आपुलकीने आम्हाला चहा देऊ केला आणि चहा घेता घेता आपली कहाणी देखील सांगितली.
"आजकाल तर ते (काजवे) शेतात सुद्धा दिसत नाहीत. चांगले काजवे बघण्यासाठी पार जंगलाच्या आत जावं लागतं”. भंडारदरा भागात मुतखेल गावामध्ये ठकुबाईंची चहाची टपरी आहे.
"माझा जन्म इकडलाच आणि मी कायम इकडेच राहिले आहे, त्यामुळे मी तुम्हाला माझ्या लहानपणच्या खूप कहाण्या सांगू शकते." ठकुबाई सांगतात. "पूर्वी काजवे खूप होते. पण तेव्हा जंगल पण जास्त घनदाट होतं आणि पाऊस पण भरपूर होता. आता पाऊस पण कमी झाला आणि झाडं पण. प्रदूषण पण वाढलं. त्यामुळे या भागातले काजवे कमी झालेले असण्याची शक्यता आहे. "
करवंदाची विक्री करणाऱ्या, कोलथेंबे गावातल्या भाऊ भांडकुल्यांना जेव्हा आम्ही भेटलो, तेव्हा तेदेखील असंच म्हणाले.
साधारण निरीक्षणाच्या आधारे ते असं सांगतात, की "काजवे संख्येने कमी झाले आहेत. निसर्गाचं काहीतरी बिघडलं आहे. सगळी घडी विस्कटली आहे."
भाऊ गेली ६५ वर्षं इथे राहतात, त्यांनी ६५ पावसाळे पाहिले आहेत. त्यांना वातावरणात झालेला बदल निश्चितपणे जाणवतो. नेमकं काय बिघडलं आहे, ह्याचं उत्तर ते देऊ शकत नाहीत, आणि त्याबद्दल त्यांना असहाय्य वाटतं.
भंडारदऱ्यामधील अजून एक रहिवासी सुभाष इडे हे पर्यटकांसाठी निवासाची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करतात. "पूर्वी पर्यटक कमी होते, आणि काजवे भरपूर!" ते सांगतात. "आता नेमकी उलटी परिस्थिती आहे. आणि असेच काजवे कमी होत राहिले तर इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या पण कमी होईल."
सुभाष इडे यांच्या ह्या बोलण्यातून त्यांच्या डोक्यावर लटकणारी पर्यटनरूपी दुधारी तलवार सामोरी येते. पर्यटनाने स्थानिकांना रोजगार नक्की मिळतो, पण त्याच पर्यटनामुळे काजवे नामशेष होऊ लागले आहेत. काजवे कमी झाले तर अर्थातच पर्यटक कमी होणार, आणि त्याचा परिणाम स्थानिकांच्या उत्पन्नावर होणार हे नक्की.
भंडारदरा भागात बहुतेक वस्ती ही महादेव कोळी आणि ठाकर ह्या दोन आदिवासी जमातींची आहे. भातशेती हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय. पण पावसाळ्यातल्या पर्यटनामुळे त्यांच्या कमाईला हातभार लागला आहे. काजवे पाहण्यासोबतच खळाळते धबधबे आणि अनेक गड किल्ले पाहण्यासाठी पर्यटक ह्या भागात येतात. ह्या पर्यटकांसाठी निवास आणि भोजनाची व्यवस्था करून, तसेच करवंदांसारखा स्थानिक मेवा विकून अनेक जण आपलं पोट भरतात.

“पण हे (काजवे कमी होणं) असंच चालू राहिलं, तर साहजिकच पर्यटक कमी होणार आणि मग आमच्या पोटावर पाय तर येणारच!" ठकुबाई म्हणतात.
सणासुदीच्या काळात पर्यटकांसाठी तंबूत राहण्याची तसेच खाण्यापिण्याची सोय करणाऱ्यांना साधारण साठ ते ऐंशी हजार रुपये उत्पन्न मिळतं. तर करवंदं, इतर रानमेवा, किंवा चहा- खाणं पर्यटकांना विकून आदिवासी महिलांना सहा ते आठ हजार रुपये मिळतात.
जबाबदार पर्यटनासाठी सरकारने नियम घालून दिले आहेत. पण प्रत्यक्षात ते नियम कागदावर राहतात आणि त्याचं पालन कोणीच करत नाही, असं स्थानिकांचं आणि पर्यावरणतज्ञांचं म्हणणं आहे.
पर्यटकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे काजव्यांच्या प्रजनन प्रक्रियेत अडथळा येऊ नये यासाठी राज्य वन विभागाने अनेक नियम घालून दिले आहेत. वन विभागाचे अनेक अधिकारी तसेच पोलीस अधिकारी हे वेळोवेळी सांगत असतात की पर्यटकांची वाहने ही पार्किंगसाठी नेमून दिलेल्या जागेतच उभी केली जावीत. काजवे असलेल्या झाडापासून किमान ५० मीटर अंतर ठेवावे. मोबाईलचा टॉर्च, विजेऱ्या किंवा LED दिव्याचे प्रखर झोत ह्या झाडांवर मारले जाऊ नयेत. तसेच मोठ्या आवाजात गाणी वाजवणे अथवा जोरात हॉर्न वाजवणे यावर बंदी, असे अनेक नियम केलेले आहेत. हे नियम धुडकावून लावणाऱ्यांवर योग्य ती कठोर कारवाई केली जाईल असं विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
सुनील थोरात महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाचे अधिकृत गाईड आहेत. ते २०१३ पासून ह्या भागात काजवे पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन येतात. ते सांगतात: "मी एका वेळी जास्तीत जास्त ३० ते ४० पर्यटकांना घेऊन इकडे येतो आणि माझ्यासोबत नेहमीच एखादी स्थानिक व्यक्ती असते. मी पर्यटकांना जबाबदारीने कसं वागावं याबद्दल सूचना देखील देतो. मात्र अनेक जण आजकाल शंभर दीडशे जणांचे गट घेऊन येतात. गावोगावी नवीन टूरिंग कंपन्या निघाल्या आहेत. एखाद दोन ट्रेक केले कि लोक लगेच सहली आयोजित करायला लागतात. ह्या नवशिक्या टूर ऑपरेटरना जबाबदार पर्यटनाच्या सूचनेशी काहीही घेणंदेणं नसतं, त्याने शेवटी पर्यावरणाचं नुकसान होतं . शिवाय एका वेळी किती पर्यटक या भागात येऊ शकतात ह्यावर वन विभागाने कोणतीही मर्यादा घातलेली नाही.
भाऊराव चासकर हे स्थानिक शाळेत शिक्षक आहेत. काजव्याच्या जीवनसाखळीचा ते साधारण गेली दोन दशकं अभ्यास करून त्यावर स्थानिक वर्तमानपत्रांतून लेख लिहीत असतात. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचे ते रहिवासी आहेत. ते सांगतात, "पूर्वी पर्यटक एका ठिकाणी त्यांची गाडी लावून काजवे शोधात पायी हिंडायचे. पण काजव्याची ह्या झगमगत्या दुनियेला अतिउत्साही पर्यटकांचं ग्रहण लागलं आहे. पर्यटक रात्री बेरात्री जंगलातून फिरतात, जोरजोरात हॉर्न वाजवतात, मोठ्या आवाजात गाणी लावतात, टॉर्चचे झोत झाडांवर मारतात."
पर्यटकांचा वाढता ओघ जसा काजव्यासाठी धोकादायक ठरतो आहे, त्याचप्रमाणे आसपासच्या भवतालात होणारे बदल तसेच वातावरण बदल हेदेखील त्यांची संख्या कमी करायला कारणीभूत ठरत आहेत.
खोत असं सांगतात की काजवे ही अतिशय संवेदनशील प्रजाती आहे आणि त्यांच्या अधिवास क्षेत्रात किंवा वातावरणात अचानक बदल घडले तर त्यांच्यासाठी ते भयंकर घातक ठरतात. " हे कीटक सामान्यतः उडून दुसरीकडे जात नाहीत. ते साधारण १०० मीटरच्या परीघातच वास्तव्य करतात. हिरडा किंवा बेहडा अशा काही विशिष्ट झाडांवर काजवे वस्ती करतात. या झाडांची विशिष्ट ठेवण काजव्यांना उपयुक्त ठरते. ही झाडं एकतर तोडली जाताहेत किंवा हळूहळू वातावरण बदलामुळे नष्ट होत आहेत. ह्यांच्यामुळे काजव्याचे प्रजनन नीट होऊ शकत नाही आणि त्याचा परिणाम त्यांची संख्या कमी होण्यावर होतो. "
वातावरण बदलांचा काजव्यावर नेमका किती आणि कसा परिणाम होतो आहे, यावर महाराष्ट्राचा संदर्भात फारसं संशोधन झालं नसलं, तरी जगातील इतर ठिकाणांचं संशोधन असं सांगतं की वातावरण बदलांचा, विशेषतः अधिवास क्षेत्रात होणाऱ्या बदलांचा परिणाम काजव्यांच्यावर नक्कीच होतो.

काजवा, शेतकऱ्यांसाठी वरदान
कमी होणाऱ्या काजव्यांच्या संख्येचा शेतीवर अदृश्य, पण तीव्र परिणाम होतो. काजवे हे नैसर्गिक अन्नसाखळीत मोलाची भूमिका पार पाडतात, कारण पिकांना उपद्रव देणारे किडे हे त्यांचं खाद्य आहे. मऊ पृष्ठभाग असणारे किडे, उदा. गोगलगाय, अळी, गांडूळ -ज्यांना स्लग्स म्हणतात, ते काजव्यांच्या अळ्यांचे खाद्य आहे. यामुळे काजवे शेतकऱ्यांसाठी ‘मित्रकीटक’ ठरतात. पण काजव्यांच्या कमी होणाऱ्या संख्येमुळे उपद्रवी किड्यांची संख्या वाढते.
पूर्वी अनेक आदिवासी शेतीमध्ये कीटकनाशकांचा वापर करत नसत. काजवे भरपूर प्रमाणात होते. आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. कीड आणि वातावरण बदलामुळे शेतीमधील उत्पन्न कमी होत चालल्याने, चांगले पीक येण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करताहेत. ह्यांच्यामुळे काजव्यांच्या संख्येवर परिणाम होतोय, आणि अंतिमतः पुन्हा शेतीवरच परिणाम होतो आहे. 'इथे सरकारने, वन्यजीव अभ्यासकांनी आणि पर्यावरण प्रेमींनी ताबडतोब दखल द्यायची गरज आहे. आता तरी वन विभागाने पर्यावरणीय आणीबाणीची दखल घेऊन या प्रदेशातील जैवविविधता" जपण्याची आणि संवर्धित करण्याची गरज आहे. "
वृक्षतोड आणि ह्याने काजव्याना होणारा अपाय ह्या गोष्टीकडे चासकर लक्ष वेधतात. जंगलातील हिरडा, बेहडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा मोजक्या झाडांवर काजवे ठाण मांडून असतात. या झाडांची विशिष्ट ठेवण काजव्यांना प्रजननासाठी उपयुक्त ठरते. पण झाडे तोडण्याच्या प्रकारांवर अजूनही आळा घालता आलेला नाही. या वृक्षतोडीमध्ये काजव्यांचा अधिवास असलेली झाडेदेखील समाविष्ट असल्याने याचा थेट फटका काजव्यांना आणि सोबत इतर कीटकांना बसतो. अंडी-अळी-कोष-कीटक हे असं काजव्यांचं जीवनचक्र आहे. योग्य वातावरण झालं की कीटक आपल्या कोषातून बाहेर येतो. पण झाडे आधीच तोडली गेली तर साहजिकच काजवे मरून जातात.
या भागात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या शेत जाळण्याच्या प्रकाराकडे देखील ते लक्ष वेधतात. अनेक ठिकाणी संबंध डोंगर पेटवून दिले जातात. हिरवं लुसलुशीत गवत यावं म्हणून हे केलं जातं. यामुळे दोन गोष्टी घडतात. जमिनीवर जे वेगवेगळ्या झाडांचं नवीन बियाणं पडलेलं असतं किंवा जी झाडं नुकतीच वर आलेली असतात ती जळून जातात! आणि दुसरी गोष्ट म्हणजे या आगीत हजारो कीटक होरपळून निघतात.
हि स्टोरी इंग्लिश मध्ये वाचण्यासाठी येथे - Click Here
Video Report -
(असर आणि बाईमाणूस यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘प्रोजेक्ट धरित्री’ उपक्रमांतर्गत ‘पर्यावरण बदल आणि लिंगभाव’ (Climate & Gender) या विषयावरची ही एक विशेष मालिका आहे.)






