सुकेशनी नाईकवाडे
- वयाच्या पंधराव्या वर्षी घर सोडलेला प्रकाश ३२ वर्षांनंतर पुन्हा आपल्या आई-वडिलांसमोर उभा राहिला.
- स्मृतीभ्रंशामुळे स्वतःची ओळख हरवलेल्या या तरुणाने तांड्यावरून युरोपपर्यंतचा प्रवास केला.
- अखेर एका पत्राने तुटलेली नाती जोडली आणि जाधव कुटुंबाची तीन दशकांची वेदनादायी प्रतीक्षा संपली.
नियतीचे कोडे कधी आणि कसे उलगडेल, हे कुणालाच सांगता येत नाही. तब्बल ३२ वर्षांपूर्वी घरातून हरवलेला मुलगा अचानक परत येतो आणि संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यात पुन्हा प्रकाश फुलतो, अशी अविश्वसनीय पण खरी घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील केकत पांगरी येथे घडली आहे. प्रकाश जनार्दन जाधव हा १९९३ साली बेपत्ता झाला होता. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी तो पुन्हा आपल्या तांड्यावर परतला आणि तीन दशकांची प्रतीक्षा अखेर संपली.
जाधव कुटुंब मूळचे हरीलाल नाईक तांड्याचे. १९७६ साली उदरनिर्वाहासाठी ते नाशिक येथे स्थलांतरित झाले. वडील जनार्दन जाधव खासगी कंपनीत काम करत होते; मात्र कंपनी बंद पडल्यानंतर त्यांनी किराणा दुकान सुरू करून संसाराचा गाडा पुढे नेला. प्रकाश हा त्यांचा एकुलता एक मुलगा आणि चार बहिणींचा भाऊ. घरातील परिस्थिती हलाखीची होती. प्रकाशचे शिक्षण नववीपर्यंत झाले; परंतु आर्थिक अडचणीमुळे त्याला लहान वयातच जबाबदारीची जाणीव झाली.
हरवलेला मुलगा आणि थांबलेली प्रतीक्षा
वयाच्या पंधराव्या वर्षी, १९९३ मध्ये, तो घरातून न सांगता बाहेर पडला. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला; नातेवाईकांकडे चौकशी केली, मात्र काहीच शोध लागला नाही. काळ पुढे सरकत गेला. आई-वडील वृद्ध होत गेले, बहिणींची लग्ने झाली; पण प्रकाश परतला नाही.

नाशिक सोडल्यानंतर त्याचा प्रवास अनेक चढउतारांनी भरलेला होता. गोवा आणि पुणे येथे काही काळ काम केल्यानंतर तो दिल्लीकडे निघाला. १९९७ च्या सुमारास रेल्वे प्रवासादरम्यान त्याच्यासोबत गंभीर प्रकार घडला. प्रवासात त्याचे पैसे आणि सर्व साहित्य चोरीला गेले. या घटनेचा त्याला प्रचंड मानसिक धक्का बसला. काही वेळातच त्याची प्रकृती बिघडली आणि तो बेशुद्ध अवस्थेत दिल्लीला पोहोचला. या धक्क्यानंतर त्याची स्मृती हरपली. स्वतःचे नाव, गाव, आई-वडील आयुष्यातील सर्व ओळखी जणू क्षणार्धात पुसल्या गेल्या.
टीम बाई माणूस शी बोलताना स्वतः प्रकाश जाधव सांगताता की
“मी खास करून १० १२ दिवसांची सुटी काढून कुटुंबाला भेटण्यासाठी आलो आहे. इथे येऊन मला खूप आनंद झाला, मन भरून आलं. आता सुट्टीचे आठ दिवस झालेत आणि उद्या परत जायचं आहे. मन सांगतं की जाऊ नको, इथेच राहावं; पण नोकरीची जबाबदारी आहे, त्यामुळे परतणं भाग आहे. उद्याची माझी फ्लाईट आहे. हा आनंदाचा क्षण असा कायम राहावा, अशी इच्छा आहे. सगळे मला थांबायला सांगतात; पण परिस्थितीपुढे हात बांधलेले आहेत. मात्र दिवाळीत एक महिन्याची सुटी घेऊन पुन्हा येणार आहे आणि पत्नीला देखील सोबत आणणार आहे. माझी प्रकृती अजून पूर्णपणे सुधारलेली नाही. ब्रेन स्ट्रोकनंतर हळूहळू रिकव्हरी सुरू आहे. अजूनही बोलताना, चालताना थोडी अडचण जाणवते आणि चेहऱ्यावरचे हावभावही पूर्वीसारखे स्पष्ट नाहीत; तरीही मी धीराने सगळं सांभाळतो आहे.”
तांड्यावरून युरोपपर्यंतचा प्रवास
स्मृतीभ्रंश असूनही त्याने आयुष्याशी झुंज देणे थांबवले नाही. काही काळ नेपाळमध्ये राहिल्यानंतर तो पुन्हा दिल्लीला आला आणि जवळपास २० वर्षे विविध ठिकाणी काम करत राहिला. पुढे रोजगाराच्या निमित्ताने त्याने परदेश गाठला. सिंगापूरमध्ये दीड वर्ष, रशियात दोन वर्षे, त्यानंतर दुबई, अबुधाबी, आणि थायलंड येथे वास्तव्य केले...
युरोपमधील माल्टा येथे त्याने सुमारे पाच वर्षे हॉटेल व्यवस्थापक म्हणून काम केल्याचे सांगितले जाते. परदेशात पैसा, प्रतिष्ठा आणि स्थैर्य लाभले; मात्र आपल्या मातीची ओढ अंतर्मनात दडलेलीच राहिली.
ब्रेन स्ट्रोकने उघडले स्मृतीचे दार
डिसेंबर २०२४ मध्ये त्याला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला. उपचारादरम्यान त्याची हरवलेली स्मृती हळूहळू परत येऊ लागली. बालपणातील आठवणी, गावाचे नाव, कुटुंबीयांचे चेहरे पुन्हा मनात उमटू लागले. स्मृती परतल्यानंतर त्याने सामाजिक माध्यमांच्या मदतीने आपल्या मूळ गावाचा शोध सुरू केला.

१६ एप्रिल २०२५ रोजी केकत पांगरी येथे त्याच्या काका छगन जाधव यांच्या नावाने एक पत्र पोहोचले. त्या पत्राच्या आधारे कुटुंबीयांशी दूरध्वनीद्वारे संपर्क झाला. व्हॉट्सअॅपवर आई-वडिलांना पाहताच दोन्ही बाजूंनी अश्रूंना वाट मोकळी झाली.
३२ वर्षांनंतर तांड्यावर जल्लोष
२२ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रकाश प्रत्यक्ष गावी परतला. तांड्यावर जल्लोषाचे वातावरण होते. आतिशबाजी, पुष्पहार आणि आनंदाश्रूंनी वातावरण भारावून गेले. ३२ वर्षांनंतर हरवलेला मुलगा परत आल्याने कुटुंबाचे विश्व पुन्हा उजळले.
यावेळी टीम बाई माणूस शी बोलताना प्रकाशचे वडील जनार्दन जाधव यांनी सांगितले की,
“आता आम्हाला खूप आनंद वाटतो. माझे वय ७३ वर्षांचे झाले आहे. या ७३ वर्षांच्या आयुष्यात असा क्षण पुन्हा येईल, असे कधी वाटले नव्हते. ३२ वर्षे आम्ही त्याची वाट पाहिली. आता आमचा मुलगाच आमचा आधार आणि कमावणारा झाला आहे. देवाने आमची प्रार्थना ऐकली.”
भाषेचा विसर, पण मातीची ओढ कायम
दीर्घकाळ परदेशात राहिल्यामुळे प्रकाशला बंजारा भाषेचा विसर पडला आहे; मात्र जर्मन, माल्टी, मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांवर त्याने प्रभुत्व मिळवले आहे. आयुष्यात सुख-दुःखाचे अनेक टप्पे आले. परदेशात संसारही उभारला; मात्र मुलाच्या निधनाचे दुःख त्याच्या मनात खोलवर आहे.
आज जाधव कुटुंबासाठी हा केवळ पुनर्मिलनाचा क्षण नाही, तर आशा आणि संयमाच्या शक्तीचा पुरावा आहे. नियतीने जरी त्याला दूर नेले, तरी रक्ताच्या नात्यांची ओढ अखेर त्याला पुन्हा आपल्या मातीशी जोडून गेली. अंधारात हरवलेला ‘प्रकाश’ अखेर आपल्या घरात परतला आणि ३२ वर्षांची प्रतीक्षा समाधानात परिवर्तित झाली.






