विठ्ठल साबळे
- नाशिकच्या दिंडोरी दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही रस्त्यालगतच्या विहिरींचे 'सेफ्टी ऑडिट' रखडलं;माळशिरसमध्ये विहिरीला कठडा नसल्याने पुन्हा ८ भाविकांचा निष्पाप बळी
- अपघात घडताच स्थानिक तरुण इरफानने जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली…
- "वारंवार पत्रव्यवहार करूनही शासन आणि प्रशासकीय यंत्रणा ढिम्मच"; माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला तीव्र संताप.
अलीकडेच 2 महिन्यांपूर्वी नाशिकच्या दिंडोरीत जे घडलं, त्याचीच काळी पुनरावृत्ती सोलापूरच्या माळशिरसमध्ये घडली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या विहिरी महाराष्ट्रासाठी मृत्यूचे सापळे ठरत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात रविवारी सायंकाळी (१४ जून) घडलेल्या अत्यंत भीषण अपघातात 8 भाविकांचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तर सात जणांचा ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे जीव वाचला.... साताऱ्यातील म्हसवड येथील सिद्धनाथाचे दर्शन घेऊन अत्यंत आनंदाने आपल्या गावी परतणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावच्या एकाच कुटुंबातील आणि परिसरातील निष्पापांवर काळाने घाला घातला.
या हृदयद्रावक घटनेची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र, दरवेळेस अपघात झाल्यावर मदत जाहीर करायची आणि मूळ समस्येकडे दुर्लक्ष करायचे, हा सरकारी परिपाठ आता जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे.
अपघात कसा झाला?
पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी अमावस्येच्या निमित्ताने साताऱ्यातील प्रसिद्ध म्हसवड सिद्धनाथ मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते. लहान मुले, महिलांसह एकूण १५ ते १६ जण एका पिकअप गाडीतून (क्रूझर) प्रवास करत होते. दर्शन आटोपून सर्वजण गावी परतत असताना, माळशिरस तालुक्यातील म्हसवड पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. रस्त्याच्या अगदी लागूनच एक खोल विहीर होती, ज्या विहिरीला साधा सुरक्षेचा कठडाही नव्हता.

धावती पिकअप गाडी थेट या विहिरीत कोसळली. विहीर पाण्याने तुडुंब भरलेली असल्याने गाडी पूर्णपणे पाण्यात बुडाली. गाडीच्या आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडायला कोणतीही जागा उरली नाही. क्षणात आरडाओरड आणि किंकाळ्या भीषण शांततेत बदलल्या. नाका तोंडात पाणी गेल्यामुळे तब्बल 8 जणांचा जागीच गुदमरून मृत्यू झाला, तर उर्वरित 7 जणांना गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात यश आले आहे.
नेमके काय आहे हे विहीर सुरक्षा ऑडिट?
माळशिरसच्या या घटनेनंतर विहीर सुरक्षा ऑडिट हा शब्द पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, रस्त्याच्या कडेला आणि रहदारीच्या ठिकाणी असलेल्या खुल्या विहिरींचा सुरक्षा लेखाजोखा तयार करणे म्हणजे सुरक्षा ऑडिट होय. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि स्थानिक प्रशासनाने प्रत्यक्ष रस्त्यांवर जाऊन सर्वेक्षण करणे बंधनकारक असते.
रस्त्यापासून विहीर किती अंतरावर आहे? तिला संरक्षक कठडा आहे की नाही? रात्रीच्या वेळी वाहनचालकांना सावध करण्यासाठी तिथे रिफ्लेक्टर किंवा धोक्याचे फलक लावले आहेत का? याची तपासणी यात केली जाते. ज्या विहिरींना कठडे नाहीत, तिथे तातडीने कंक्रीटच्या भिंती उभारणे किंवा विहिरीचे तोंड मजबूत लोखंडी जाळीने बंद करण्याचे आदेश यात असतात. एखादा निष्पाप जीव जाण्यापूर्वीच हे मृत्यूचे सापळे बंद करणे, हाच या ऑडिटचा खरा हेतू असतो; जो माळशिरसमध्ये पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आला...
काळीज चिरून टाकणारी दृश्ये आणि विहिरीतून काढलेले मृतदेह
अपघाताचा मोठा आवाज होताच तांदूळवाडी येथील स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची बाजी लावून विहिरीकडे धाव घेतली. विहिरीचे पाणी खोल आणि गाडी आत अडकल्याने सुरुवातीला कोणाचाच अंदाज लागत नव्हता. तात्काळ पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाला बोलवण्यात आले. तीन क्रेन आणि स्थानिक जीवरक्षकांच्या मदतीने विहिरीतून गाडी आणि एकामागून एक मृतदेह बाहेर काढण्यात आले.

सध्या सोशल मीडियावर विहिरीतून मृतदेह बाहेर काढतानाचे जे व्हिडिओ समोर येत आहेत, ते अत्यंत विदारक आहेत. क्रेनच्या साहाय्याने जेव्हा ती पिकअप गाडी वर येत होती आणि त्यातून निष्पाप चिमुरड्यांचे, महिलांचे मृतदेह बाहेर काढले जात होते, तेव्हा घटनास्थळावरील प्रत्येकाचा कंठ दाटून आला होता. मृतांमध्ये बहुतांश एकाच कुटुंबातील सुरवसे आणि चौगुले परिवारातील सदस्य आहेत. एकाच गावातील 8 जणांचे मृतदेह जेव्हा रांजणी गावात पोहोचतील, तेव्हा त्या गावातील आक्रोशाची कल्पनाही करवत नाही.
इरफानने स्वतःचा जीव धोक्यात घालून मृत्यूच्या जबड्यातून ओढून काढले ७ जण
जेव्हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या इरफान मुझावर नावाच्या एका स्थानिक तरुणाने जे धाडस दाखवले, ते कौतुकस्पद आहे.. गाडी विहिरीत कोसळल्याचा भीषण आवाज आणि त्यानंतर विहिरीतून येणारा किंकाळ्यांचा आवाज ऐकताच इरफानने एका सेकंदाचाही विचार न करता थेट विहिरीच्या खोल आणि गडद पाण्यात उडी घेतली. विहीर पाण्याने काठोकाठ भरलेली असल्याने आणि वाहनाचे दरवाजे लॉक असल्याने आत अडकलेल्या प्रवाशांचा श्वास गुदमरत होता.
अशा अत्यंत कठीण परिस्थितीत इरफानने पाण्याच्या आत जाऊन मोठ्या हिमतीने गाडीचा मागील दरवाजा आणि खिडकी उघडण्यात यश मिळवले. विहिरीबाहेर उभ्या असलेल्या इतर ग्रामस्थांच्या मदतीने त्याने एकामागून एक करत तब्बल 5 जणांना मृत्यूच्या दारातून अक्षरशः ओढून बाहेर काढले. इरफानने स्वतःचा जीव धोक्यात घालून वेळेवर दाखवलेल्या या धैर्यामुळेच आज 5 निष्पापांचे प्राण वाचू शकले आहेत, अन्यथा मृतांचा आकडा आणखी भीषण झाला असता.
इरफान आणि तांदूळवाडीच्या ग्रामस्थांनी विहिरीतून बाहेर काढलेल्या 5 जखमींना तात्काळ माळशिरस येथील उपजिल्हा रुग्णालयात आणि काही जणांना खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले आहे., या जखमींच्या नाका तोंडात मोठ्या प्रमाणात विहिरीचे दूषित पाणी गेले होते, मात्र वेळेत प्रथमोपचार मिळाल्यामुळे आता या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. प्रशासकीय यंत्रणा पोहोचण्यापूर्वी इरफानसारखा सामान्य तरुण तिथे देवदूत बनून धावला, म्हणूनच या 5 जणांना आज नवीन आयुष्य मिळाले आहे.
माळशिरसची ही घटना निव्वळ अपघात नाही, तर तो सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक प्रशासन आणि रस्ते विकास महामंडळाच्या बेजबाबदारपणाचा प्रशासकीय बळी आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. कारण, महाराष्ट्राला अशाच प्रकारच्या भीषण अपघाताचा दणका अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी बसला होता.
नाशिकच्या दिंडोरीतील 'तो' काळजाचा थरकाप..
३ एप्रिल २०२६ रोजी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील शिवाजीनगर भागात एका खाजगी क्लासचे स्नेहसंमेलन आटोपून परतणाऱ्या कुटुंबाची अर्टिगा कार रस्त्याच्या मधोमध असलेल्या विहिरीत कोसळली होती. त्या अपघातात ६ निष्पाप चिमुरड्यांसह एकाच कुटुंबातील ९ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्या विहिरीलाही कठडा नव्हता आणि ती रस्त्याच्या अगदी जवळ, धोकादायक स्थितीत होती.
दिंडोरीच्या त्या भीषण अपघातानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना तीव्र संताप आणि दुःख व्यक्त केले होते. त्यांनी तात्काळ संपूर्ण राज्यातील "रस्त्यालगतच्या, रहदारीच्या ठिकाणच्या सर्व विहिरींचे 'सेफ्टी ऑडिट' (सुरक्षा ऑडिट) करा" असे कडक आदेश प्रशासनाला दिले होते.

जिथे कठडे नाहीत तिथे संरक्षक भिंती बांधणे किंवा विहिरी जाळीने झाकणे या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, नाशिकच्या घटनेला अडीच महिने उलटत नाहीत तोच सोलापूरच्या माळशिरसमध्ये विहिरीला कठडा नसल्यामुळेच 8 जणांचा बळी गेला. जर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सोलापूर प्रशासनाने, सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या हद्दीतील रस्त्यांचे ऑडिट केले असते, तर तांदूळवाडीच्या त्या विहिरीला संरक्षक भिंत दिसली असती आणि आज आठ निष्पापांचे प्राण वाचले असते.
खासदार धैर्यशील मोहिते पाटलांकडून संताप
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) खासदार धैर्यशील मोहिते सांगतात की, या भागात अनेक ठिकाणी असे धोकादायक स्पॉट आहेत, चार चार वर्षे झाले तरीही कामं होत नाहीत. आम्ही अनेक पत्रव्यवहार केले, बैठका घेतल्या तरीही कुठलीही प्रगती दिसून येत नाही. सुरक्षेच्या ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे त्या कुठल्याही करण्यात आल्या नाहीत. दरमहिन्याला एक अपघात होतो, वारंवार पत्रव्यवहार करुनही शासन दुर्लक्ष करतं. आम्ही मंत्रालयीन स्तरावर, प्रशासकीय स्तरावर फॉलोअप घेतालय, पण लोकांचे जीव गेले तरीही कुणालाच काही फरक पडत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली.
जनतेने काही सवाल उपस्थित केले...
१. मुख्यमंत्र्यांनी नाशिक दुर्घटनेनंतर दिलेल्या 'विहीर सुरक्षा ऑडिट'च्या आदेशांचे फाईल नक्की कोणत्या टेबलाखाली धूळ खात पडून आहे?
२. रस्त्यालगत शेत विहिरी खणताना किंवा रस्ते रुंदीकरण करताना विहिरींना संरक्षक भिंत घालणे बंधनकारक का केले जात नाही?
३. दोषी अधिकाऱ्यांवर आणि निष्काळजी कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे कधी दाखल होणार?
माळशिरसच्या तांदूळवाडी गावाजवळ विहिरीबाहेर पडलेले ८ मृतदेह हे केवळ एका अपघाताचे बळी नाहीत, तर ते सरकारच्या ढिसाळ अंमलबजावणीचे आणि प्रशासनाच्या डोळेझाकपणाचे जिवंत पुरावे आहेत. आता तरी सरकारने केवळ कागदी घोषणा न करता, राज्यातील प्रत्येक रस्त्याशेजारील विहिरीला विळखा घालणारे मृत्यूचे हे सापळे कायमचे बंद करावेत, हीच या मृतांना खरी श्रद्धांजली ठरेल.






