विठ्ठल साबळे
- वेरूळ येथे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुरेश बोरसे यांनी शासकीय वर्दी आणि आयकार्ड मागण्याचा 'गुन्हा' केला म्हणून वैजापूर पोलिसांच्या देखत वाळूमाफियांच्या टोळीने त्यांचा अमानुष मारहाण करून जीव घेतला, ज्याने संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्हा हादरला आहे.
- गुन्ह्याचे गांभीर्य दडपून आरोपींना पाठीशी घालण्यासाठी पोलिसांनी फिर्यादीत जाणीवपूर्वक 'अज्ञात' असा उल्लेख केला, ज्यामुळे मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या वाळूमाफियांना सौम्य कलमांमुळे अवघ्या काही तासांतच खुलताबाद न्यायालयातून सकाळी तात्काळ जामीन मिळाला.
- अधिकृत तपासाचे नाव सांगून वैजापूरचे पोलीस अधिकारी चक्क एका सराईत वाळूमाफियाच्या खाजगी स्कार्पिओ गाडीत गुंडांचा ताफा घेऊन फिरत होते;
- पोलिस स्टेशन डायरीतील हीच ऑन रेकॉर्ड नोंद आणि आरोपीला पेढे भरवतानाचा व्हायरल फोटो व पोलिसांचे गुन्हेगारांशी असलेले साठेलोठे चव्हाट्यावर आणत आहे..
कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करणारी खाकी वर्दी जेव्हा वाळूमाफिया आणि गुंडांच्या टोळीशी हातमिळवणी करते, तेव्हा सर्वसामान्यांच्या नशिबी केवळ अन्याय आणि मृत्यू येतो, याचाच एक अत्यंत संतापजनक आणि थरकाप उडवणारा प्रकार वेरूळ (ता. खुलताबाद) येथे समोर आला आहे. वैजापूर पोलिसांचे पथक आणि त्यांच्यासोबत आलेल्या वाळूमाफियांच्या टोळीने केलेल्या अमानुष मारहाणीत एका निष्पाप आणि प्रतिष्ठित शिक्षकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. सुरेश रूपचंद बोरसे (वय ५२, रा. कौशिकी गल्ली, वेरूळ) असे या दुर्दैवी मृत शिक्षकाचे नाव असून, ते जिल्हा परिषद शाळेत कार्यरत होते.
बुधवारी (दि. १० जून) रात्री घडलेल्या या भयानक थरारानंतर संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. संतापलेल्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी माजी विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांच्यासह वेरूळ येथील कन्नड महामार्गावर तब्बल चार तास रस्ता रोको आंदोलन करत तीव्र आक्रोश व्यक्त केला. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, या गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) आणि स्थानिक पोलिसांनी जी काही भूमिका घेतली, तिने संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा मलिन केली आहे.
खतरनाक गुंडांना वाचवण्यासाठी पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री घाईघाईने अटक दाखवली आणि गुन्हा दाखल करताना कलमे जाणीवपूर्वक इतकी सौम्य लावली की, अवघ्या काही तासांत, म्हणजे शुक्रवारी (दि. १२ जून) सकाळीच खुलताबाद न्यायालयाने सर्व आरोपींना तात्काळ जामीन मंजूर केला. पोलिसांच्या या संशयास्पद आशीर्वादामुळे आणि मूक संमतीमुळे मुख्य आरोपी अवघ्या काही तासांत मोकाट सुटले असून, नागरिकांमध्ये कायद्याच्या चिंधड्या उडाल्याची तीव्र भावना निर्माण झाली आहे.
आईस्क्रीम आणण्याचा प्रसंग आणि वाद नेमका कशामुळे झाला?
मृत शिक्षकाची पत्नी अनिता सुरेश बोरसे यांनी पोलिसांत दिलेल्या अधिकृत फिर्यादीनुसार, घटनेच्या रात्री म्हणजेच बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास शिक्षक सुरेश बोरसे आणि त्यांचा १२ वर्षांचा भाचा वरद हे दोघे जण घराजवळ आईस्क्रीम आणण्यासाठी गेले होते...
या प्रकरणामागचे मूळ कारण वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथील वाळूमाफिया आवारे यांच्या भावकीतील जुन्या वादाशी जोडलेली आहेत. महिनाभरापूर्वी तिथे जीवघेण्या मारहाणीवरून दोन्ही गटांच्या परस्परविरोधी तक्रारी वैजापूर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. या गुन्ह्यातील एका संशयित आरोपीचे लोकेशन वेरूळ येथे असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर वैजापूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे आणि अंमलदार वाल्मिक बनगे हे दोघे जण शासकीय वाहनाचा वापर सोडून, थेट वाळूमाफिया आवारे यांच्या ३०२ नंबरच्या खाजगी काळ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडीत आणि इतर दोन वाहनांत ८ ते १० स्थानिक गुंडांना सोबत घेऊन खाजगी वरातीसारखे वेरूळला आले होते.

हे सर्व जण तिथे रात्रीच्या वेळी बेकायदेशीरपणे लोकांच्या घरात शिरून आरोपीचा शोध घेऊ लागले. घराजवळ सुरू असलेला हा मोठा गोंधळ, शिवीगाळ आणि अनोळखी लोकांचा त्रास पाहून शेजारीच राहणारे शिक्षक सुरेश बोरसे हे केवळ परिस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी आणि सुजाण नागरिक म्हणून मध्यस्थी करण्यासाठी घराबाहेर आले. त्यांनी अत्यंत साधेपणाने तिथे असलेल्या लोकांना विचारणा केली की, "नेमके काय झाले आहे? तुम्ही लोग कोण आहात आणि इथे रात्रीच्या वेळी काय चालले आहे?"
शिक्षकाचे कायदेशीर प्रश्न आणि खाकी वर्दीचा माजलेला 'अहंकार'
शिक्षक सुरेश बोरसे यांनी शांततेत विचारणा केल्यावर तिथे हजर असलेल्या उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे यांनी रुबाबात सांगितले की, "आम्ही पोलीस आहोत"... त्यावर एक सुशिक्षित नागरिक म्हणून शिक्षक बोरसे यांनी अत्यंत रास्त आणि कायदेशीर प्रश्न उपस्थित केले. बोरसे यांनी पोलिसांना विचारले, "तुम्ही पोलीस आहात तर तुमची शासकीय वर्दी कुठे आहे? तुमच्याकडे तुमचे ओळखपत्र (आयकार्ड) नाही, पोलिसांची अधिकृत गाडी नाही... मग तुम्ही पोलीस आहात यावर आम्ही सर्वसामान्य नागरिकांनी कसा विश्वास ठेवायचा?"
एका सामान्य शिक्षकाने खाजगी गाडीतून गुंडांना घेऊन आलेल्या पोलिसांना वर्दी आणि अधिकृत आयकार्डबद्दल विचारलेले हे कायदेशीर प्रश्न पोलिसांच्या आणि त्यांच्यासोबत आलेल्या वाळूमाफियांच्या अहंकाराला थेट घाव घालणारे ठरले... "तुम्ही आम्हाला जाब विचारणारे कोण?" असे म्हणत चिडलेल्या गुंडांच्या टोळीने आणि पोलिसांनी मिळून शिक्षक सुरेश बोरसे यांच्यावर थेट अमानुष हल्ला चढवला आणि त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
गाडीत डांबण्याचा प्रयत्न आणि लेकीला मिळालेली पोलीस धमकी
ही टोळी एवढ्यावरच थांबली नाही. अमानुष मारहाण करून गंभीर जखमी झालेल्या शिक्षक बोरसे यांना त्यांनी समोर नंबर प्लेट नसलेल्या पण मागे ३०२ नंबर असलेल्या त्याच काळ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडीमध्ये जबरदस्तीने डांबले आणि त्यांना पळवून नेण्याचा कट रचला. बोरसे हे गाडीतूनच "मला वाचवा, मला मारू नका" अशी आर्त हाक मारत होते. हे पाहून त्यांचा १२ वर्षांचा भाचा वरद प्रचंड घाबरला आणि धावत घरी जाऊन त्याने मामीला माहिती दिली.
हा धक्कादायक निरोप मिळताच अनिता बोरसे आणि त्यांच्या मुलीने तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. आपल्या वडिलांना गाडीत टाकून पळवून नेत असल्याचे पाहून बोरसे यांच्या मुलीने अत्यंत धैर्याने गाडीसमोर आडवे होऊन गाडी रोखण्याचा प्रयत्न केला आणि "माझ्या वडिलांना कुठे घेऊन जाता? त्यांनी काय केले आहे?" अशी विचारणा केली.

मात्र, गुंडांना रोखण्याऐवजी तिथे उपस्थित असलेल्या आणि पांढरा शर्ट घातलेल्या एका पोलीस अंमलदाराने मृत बोरसे यांच्या मुलीलाच अत्यंत उद्धटपणे आणि जोराने बाजूला ढकलले. "तुमच्या वडिलांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे, जर तुम्ही मध्ये आलात तर तुमच्यावरच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करू आणि आत टाकू," अशी थेट धमकी या बेजबाबदार पोलिसाने त्या असहाय्य मुलीला दिली. या झटापटीत आणि झालेल्या अमानुष मारहाणीमुळे शिक्षक बोरसे यांना श्वास घेण्यास प्रचंड त्रास होऊ लागला. त्यांची प्रकृती खालावल्याचे पाहून शेवटी कुटुंबाने आणि गावकऱ्यांनी त्यांना गाडीबाहेर काढले. मात्र, त्यांना तातडीने वेरूळ आणि नंतर घाटी रुग्णालयात उपचारीसाठी नेत असताना वाटेतच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
यावर छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी सांगतात कि, "शिक्षक सुरेश बोरसे यांच्या मृत्यू प्रकरणाची व्याप्ती पाहता, आरोपींविरुद्ध तात्काळ खुनाचा (Section 302) गुन्हा दाखल करण्यात येत आहे. या प्रकरणातील चार मुख्य संशयितांना आपण ताब्यात घेतले आहे. वैजापूर ठाण्याचे पोलीस ज्या खाजगी वाहनाने आरोपींच्या शोधासाठी तिथे गेले होते, त्यांची या प्रकरणातील नेमकी भूमिका काय होती, याची अत्यंत सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली जाईल. तपासात किंचितही हलगर्जीपणा किंवा गुन्हेगारांना मदत केल्याचे सिद्ध झाल्यास, संबंधित पोलिसांवर कठोर खातेनिहाय चौकशी करून तात्काळ बडतर्फीचे आदेश दिले जातील."
स्टेशन डायरीतील नोंदीमुळे पोलिसांचे बिंग फुटले...
शिक्षक सुरेश बोरसे यांचा मृत्यू झाल्यानंतर स्वतःचा बचाव आणि आपल्यासोबत असलेल्या लाडक्या वाळूमाफियांना वाचवण्यासाठी वैजापूरच्या पोलिसांनी अत्यंत चलाखीने सूत्रे हलवली. घटना घडली तेव्हा उपनिरीक्षक नागरगोजे आणि अंमलदार बनगे हे स्वतः तिथे हजर होते आणि मारहाण करणारे मुख्य आरोपी मोबाइलच्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे कैद झाले होते. वैजापूर पोलीस स्टेशनच्या अधिकृत स्टेशन डायरीतही उपनिरीक्षक नागरगोजे आणि वाल्मिक बनगे हे दोघे खाजगी वाहनाने तपासासाठी गेल्याची स्पष्ट नोंद होती.
असे सर्व पुरावे समोर असतानाही, गुन्हा दाखल करताना खुलताबाद पोलिसांनी मुख्य आरोपींची नावे जाणीवपूर्वक दडपली आणि कलम १०६ (१) आणि १३९ नुसार ७ अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला. शिक्षकाला पोलिसांच्या समोर बेदम मारहाण झाली असतानाही, ते 'पोलिसांना पाहून घाबरून पळून जाताना पडले' आणि त्यांना 'हृदयविकाराचा झटका' आला, असा अत्यंत खोटा आणि दिशाभूल करणारा बनाव वैजापूरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी रचला. पोलिसांच्या या जाणीवपूर्वक ठेवलेल्या कायदेशीर त्रुटींमुळे आरोपींना मोकळे रान मिळाले. स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी (११ जून) मध्यरात्री घाईघाईने अटक केलेल्या चार मुख्य वाळूमाफियांना (रवींद्र आव्हाड, ओंकार चौधरी, बाळू डमाळे आणि सोपान चोथे) अवघ्या काही तासांत शुक्रवारी कोर्टातून सहज जामीन मिळाला, तर उर्वरित तीन आरोपी अजूनही पोलिसांच्या वरदहस्तामुळे फरार आहेत.
आमदार अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप आणि फोटो ट्वीट
या प्रकरणाला विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी वाचा फोडली असून त्यांनी थेट पोलीस निरीक्षकासोबत मुख्य आरोपीचा पेढे भरवतानाचा फोटो ट्वीट करून पोलीस माफिया युती चव्हाट्यावर आणली.
आ. दानवे यांनी सवाल उपस्तिथ केलाय "शिक्षक बोरसे यांना मारहाण करणाऱ्या गुंडाला पोलीस अधिकारी पेढे भरवत आहेत. हा गुंड परिसरात एक नंबरचा वाळूमाफिया असून त्याच्यावर आधीच एका गंभीर खुनाचा गुन्हा दाखल आहे. गुन्हेगार पोलिसांया डोळ्यांसमोर फिरत आहेत, तरीही पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या नावावर गुन्हा दाखल का केला? पोलीस कोणाला वाचवत आहेत?"

पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलीस निरीक्षकांनी स्पष्टीकरण दिले की, 'तो' फोटो वर्षभरापूर्वीचा आहे... एक वर्षापूर्वी मी पोलिस ठाण्यात नव्याने रुजू झालो तेव्हाचा फोट आहे. त्यावेळी विविध क्षेत्रांतील अनेक व्यक्ती भेटण्यासाठी आले होते. त्यामध्ये संबंधित व्यक्तीचाही समावेश होता. त्यावेळेस आणि आताही संबंधित व्यक्तीवर कुठलाही अवैध वाळू वाहतूक संदर्भातला गुन्हा नोंद नाही. तसेच सदर व्यक्ती आरोपी असल्याची कोणतीही माहिती त्यावेळी मला नव्हती. त्यामुळे त्या भेटीचा कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक किंवा अन्य संबंधाशी संबंध ओडणे योग्य ठरणार नाही. या संपूर्ण प्रकरणाबाबत मी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थितीची माहिती दिली आहे, त्यांनीही आमची तुमच्या विरोधात कुठली तक्रार नाही याबाबत पोलिस अधीक्षकांना मी सांगितले आहे.
यंत्रणेला हादरवणारे ४ अनुत्तरित प्रश्न
- वैजापूर पोलिसांचे अधिकृत पथक तपास करत असताना शासकीय वाहन सोडून वाळूमाफियांच्या ३०२ नंबरच्या खाजगी स्कार्पिओ गाडीत गुंडांना सोबत घेऊन रात्रीच्या वेळी का फिरत होते?
- मृत शिक्षकाच्या पत्नीने आणि मुलीने प्रत्यक्ष पुराव्यांसह उपनिरीक्षक नागरगोजे आणि अंमलदार बनगे यांच्यावर गंभीर आरोप केले असतानाही, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि वरिष्ठ पातळीवरून त्यांना तात्काळ निलंबित का करण्यात आले नाही?
- आरोपींवर सुरुवातीलाच खुनाचा गुन्हा दाखल न करता केवळ 'अज्ञात' दाखवून सौम्य कलमे का लावली गेली, ज्याच्या जोरावर खतरनाक गुंडांना अवघ्या काही तासांत तात्काळ जामीन मिळाला?
- घटनेला इतका वेळ उलटून गेल्यानंतरही, या प्रकरणातील फरार असलेले उर्वरित तीन मुख्य आरोपी पोलिसांना अजून का सापडलेले नाहीत की त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला जात नाहीये?
वेरूळच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी केवळ वाळूमाफियांना तुरुंगात पाठवणे पुरेसे नाही. स्वतःच्या अधिकृत कर्तव्याचा विसर पाडून गुंडांच्या गाडीत बसून निष्पाप नागरिकांवर दहशत माजवणारे आणि वर्दी व आयकार्ड मागणाऱ्या शिक्षकावर हल्ला करणाऱ्या गुंडांना पाठीशी घालणाऱ्या 'खाकी' वर्दीतील गुन्हेगारांवरही खुनाचा सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. जर या प्रकरणात गृह विभागाकडून वरिष्ठ पातळीवरून निष्पक्ष चौकशी झाली नाही, तर ग्रामीण भागातील जनतेचा पोलिसांवरून असलेला उरलासुरला विश्वासही पूर्णपणे उडून जाईल, यात शंका नाही.






