टीम बाईमाणूस
- शहरातील अभयनगर येथील भरवस्तीमध्ये घरात घुसून गोळीबार करत एका 14 वर्षीय चिमुरड्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
- वेदांत बंडगर असं ठार झालेल्या चिमुरड्याचं नाव आहे. वेदांत हा माथाडी नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू होता.
- व्यावसायिक वादातून हल्लेखोरांनी बंडगर यांच्या घरामध्ये घुसून हा हल्ला केल्याचं प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
सांगलीत दिवसाढवळ्या घरात घुसून १४ वर्षांच्या निष्पाप वेदांत बंडगरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. टोळीयुद्धाच्या खुनशी वादात एका बालकाचा झालेला हा बळी महाराष्ट्रातील ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेचा जिवंत पुरावा आहे. तडीपार गुंड शहरात उजळ माथ्याने फिरतातच कसे? पोलिसांचा सुस्तावलेला कारभार आणि गुन्हेगारांवरून सुटलेला सरकारचा वचक यामुळे आज पुरोगामी महाराष्ट्र रक्ताळलेल्या गुंडशाहीच्या उंबरठ्यावर उभा आहे.
सांगली शहरातलं अभयनगर तसं शांत परिसर. तिथल्या एसटी कॉलनीत १४ वर्षांचा वेदांत बंडगर आपल्या घराच्या अंगणात आरामात मोबाईलवर गेम खेळत बसला होता. पण काहीच वेळात त्याच्यासोबत एवढा भयानक प्रकार घडेल, असं वाटलं नव्हतं. हमाल पंचायतीचे नेते आणि सांगली बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब बंडगर यांना संपवायच्या उद्देशाने कुख्यात गुंड निलेश गडदे आपल्या टोळीसह तिथे आला. घरात आजोबा सापडले नाहीत, म्हणून या नराधमांचा संताप अनावर झाला. त्यांनी समोरच घरात बसलेल्या निष्पाप वेदांतच्या डोक्यावर थेट पिस्तूल रोखलं आणि गोळी झाडली. अवघ्या १४ वर्षांचा वेदांत तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. ही फक्त सांगलीतली घटना नव्हे तर, अख्ख्या महाराष्ट्रात कायद्याचा धाक उरलाय की नाही, असा प्रश्न पाडणारी काळजाचा थरकाप उडवणारी घटना आहे. रेल्वे मालधक्क्याच्या ठेक्यावरून झालेल्या या वादात एका लहान मुलाचा बळी गेला, ज्याचा या गुन्हेगारी जगताशी काहीच संबंध नव्हता.

या प्रकरणी पोलीस अधीक्षक तुषार दोषी म्हणाले, "अभयनगर या ठिकाणी राहणाऱ्या बाळासाहेब बंडगर यांच्या घरामध्ये सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास चार ते पाच अज्ञात हल्लेखोर दाखल झाले. त्यानंतर त्यांनी हवेत गोळीबार केला आणि त्या ठिकाणी असणाऱ्या बंडगर यांच्या नातूच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेची सर्व माहिती घेण्यात आली आहे. संशयित हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं देखील तातडीने रवाना करण्यात आली असून, जिल्ह्यामध्ये नाकेबंदी देखील करण्यात आली आहे. प्राथमिक तपासामध्ये बंडगर व हल्लेखोरांमधील व्यावसायिक वादातून ही घटना घडल्याचं समोर आलं आहे."
एनसीआरबी आकडेवारी...
आजकाल महाराष्ट्रात गुन्हेगारांना पोलिसांची कसलीच भीती उरली नाही, हेच खरं वास्तव आहे. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो’ची (२०२४-२५) ताजी आकडेवारी पाहिली, तर महाराष्ट्रात गुन्हेगारी किती वाढलीये, हे बघून धक्का बसतो. संपूर्ण देशात लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या आणि गुन्ह्यांच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. राज्यात एका वर्षात तब्बल २४,१७१ गुन्हे बालकांच्या विरोधात नोंदवले गेले आहेत, जे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशपेक्षाही जास्त आहेत. यामध्ये प्रामुख्याने अपहरण, लैंगिक अत्याचार (पोक्सो) आणि हिंसाचाराच्या घटनांचा समावेश आहे.
गंभीर गुन्हे आणि खुनाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या पाच राज्यांमध्ये येतोय. महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना तर दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. आधी युपी-बिहारमध्ये जसे गावोगावी कट्टे आणि पिस्तुलं मिळायची, तशीच परिस्थिती आता महाराष्ट्रात झाली. गल्लीबोळात मुलांच्याही हातात हत्यारं दिसायला लागलीत आणि किरकोळ वादातूनही गोळीबार व्हायला लागला. जेलमधून जामिनावर किंवा पॅरोलवर सुटलेले गुंड बाहेर येऊन पुन्हा टोळ्या बनवून दहशत माजवत आहेत, आणि यावर कोणाचंच नियंत्रण राहिलेलं नाही.
प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न
या घटनेमुळे थेट पोलीस प्रशासनाच्या आणि त्यांच्या गुप्तचर यंत्रणेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहे. खरंतर याआधी गुन्हे केलेला एक आरोपी असा चार-पाच गाड्यांचा ताफा घेऊन, हातात बेकायदा पिस्तूल मिरवत सांगलीत फिरतो, जतमध्ये जाऊन लोकांना धमकावतो आणि नंतर अभयनगरमध्ये येऊन गेम खेळणाऱ्या मुलावर गोळीबार करतो; तरीही स्थानिक पोलिसांना याची साधी खबर हि लागत नाही. यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट दुसरी कोणती असू शकते? पोलिसांचा गुंडांवर वचक राहिलाय की नाही, असा थेट सवाल आता सामान्य जनता विचारू लागली आहे.

गुन्हेगारांवर सरकारचा कसलाच वचक राहिलेला नाही, असे समोर दिसते. पोलिसांच्या बदल्या आणि पोस्टिंगमध्ये होणाऱ्या प्रचंड राजकीय हस्तक्षेपामुळे प्रामाणिक आणि कडक अधिकाऱ्यांऐवजी नेत्यांचे लाडके अधिकारी चांगल्या जागांवर येऊन बसतात. मग साहजिकच स्थानिक गुंडांची हिंमत वाढते. अनेक छोटे-मोठे भाई आणि गुंड कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या नेत्याच्या आडोशाला बसलेले असतात, त्यामुळे पोलिसांचे हातही आपोआप बांधले जातात. मोक्का किंवा तडीपारीसारख्या कडक कायद्यांना आता गुंड घाबरत नाहीत. जामिनावर सुटलेले गुन्हेगार उजळ माथ्याने समाजात फिरतात, दहशत निर्माण करतात आणि प्रशासन फक्त हात बांधून बघत राहतं.
सांगली गुन्हेगारांचा अड्डा?
पश्चिम महाराष्ट्रातलं शांत आणि सुजाण शहर म्हणून ओळखली जाणारी सांगली आता गुन्हेगारांचा अड्डा बनत चालली आहे. रेल्वे मालधक्क्याची ठेकेदारी, सांगली बाजार समितीमधली टेंडरं, वाळूची तस्करी आणि माथाडी कामगारांच्या नावाखाली चालणारी भाईगिरी आणि खंडणी, यामुळे इथे एक वेगळंच गुंडराज सुरू आहे. या पैशांच्या आणि सत्तेच्या खेळातूनच इथे टोळीयुद्ध पेटलं आहे. आजोबांना मारण्यासाठी आलेले गुंड निष्पाप नातवाला संपवून सहज निघून जातात, ही घटना सांगलीतली गुंडशाही किती नराधम पातळीवर पोहोचली आहे, हे दाखवून देते.
वेदांत बंडगरच्या हत्येने फक्त बंडगर कुटुंबाचा दिवा विझवला नाही, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक आई-बापाच्या मनात भीती निर्माण केली आहे. घरात सुरक्षित बसून मोबाईल खेळणाऱ्या मुलाच्या डोळ्यात जर भरदिवसा गोळ्या झाडल्या जाणार असतील, तर मग या राज्यात सुरक्षित तरी कोण आहे? सरकारने आणि पोलिसांनी आता फक्त विशेष पथक नेमून किंवा कागदोपत्री नाकेबंदी करून उपयोग नाही. जोपर्यंत या गुंडांना मिळणारा राजकीय आश्रय कायमचा बंद होत नाही आणि पोलिसांना या गुन्हेगारांना कडक भाषेत अद्दल घडवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळत नाही, तोपर्यंत हे गुंडराज संपणार नाही. गृहखात्याने आतातरी जागे व्हावे, नाहीतर महाराष्ट्राचा ‘बिहार’ व्हायला वेळ लागणार नाही. निष्पाप वेदांतच्या रक्ताने माखलेली सांगली आज न्यायाची वाट पाहतेय.






