अभिजीत तांगडे
- नुकत्याच जाहीर झालेल्या 10 वी च्या निकालात तब्बल 94 हजारांहून अधिक विद्यार्थी मराठी विषयात नापास झाल्याचे समोर आले आहे.
- द्वितीय आणि तृतीय भाषा म्हणून गुजराती भाषेची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी सर्व म्हणजे 100 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. संस्कृत ही द्वितीय आणि तृतीय भाषा निवडणाऱ्या 96 हजार 331 विद्यार्थ्यांपैकी 95 हजार 571 म्हणजे 99.21 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत.
- मराठीत जेमतेम पस्तीस गुणही मिळवता येत नाहीत, हे नेमकं कसं घडतं? काय आहेत कारणं…?
केंद्राने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. राज्यात बारावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य झाला. राज्य शासनाने मराठी भाषा धोरण जाहीर केले. राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्यात आली. मात्र शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांना मराठी भाषेची आवड नसल्याचे दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे नुकत्याच जाहीर झालेल्या 10 वी च्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकालात तब्बल 94 हजारांहून अधिक विद्यार्थी मराठी विषयात नापास झाल्याचे समोर आले आहे.
गेल्या शुक्रवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2026 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. राज्यात जवळपास 16 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले. या परीक्षेत 92 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मात्र, मराठी विषय निवडणाऱ्यांपैकी तब्बल 94 हजार 544 विद्यार्थी मराठी विषयात नापास झाले आहेत.
मराठीत नापास, मात्र गुजराती आणि संस्कृतमध्ये निकाल ९९ टक्क्यांपेक्षा अधिक
दहावीच्या परीक्षेत द्वितीय आणि तृतीय भाषा म्हणून गुजराती भाषेची निवड करणाऱ्या 302 विद्यार्थ्यांपैकी सर्व म्हणजे 100 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. संस्कृत ही द्वितीय आणि तृतीय भाषा निवडणाऱ्या 96 हजार 331 विद्यार्थ्यांपैकी 95 हजार 571 म्हणजे 99.21 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. अरेबिक भाषा विषयाचा निकाल 99.59 टक्के लागला आहे. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल 92.09 टक्के लागला असून राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. कोकण विभागात 97.62 विद्यार्थी पास झाले आहेत.
परीक्षेच्या आकडेवारीनुसार, मराठी प्रथम भाषा विषयासाठी 10,98,623 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 10,06,896 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकालाची टक्केवारी 92.57 टक्के इतकी आहे. मात्र, 94 हजार 544 विद्यार्थी या विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत. मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा असल्याने या आकडेवारीमुळे शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि भाषा तज्ज्ञांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. अनेकांच्या मते ही समस्या शिक्षण व्यवस्थेतील मोठ्या त्रुटी दर्शवते.

इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत किंवा इतर विषयांच्या तुलनेत मराठी माध्यमाचा निकाल मराठी विषयातच अपेक्षेपेक्षा कमी लागला आहे. महाराष्ट्रात मराठी मातृभाषा असूनही या विषयाचा निकाल कमी हा चिंतेचा विषय असला तरी याची अनेक कारणं आहेत. शिक्षणतज्ज्ञांच्या मते शुद्धलेखनातील चुका आणि वाचनाचा अभाव यामुळे मराठी भाषेतील अनुत्तीर्णांची संख्या वाढली आहे. याशिवाय मराठी माध्यमांत शिक्षण घेणारे विद्यार्थी पुढील शिक्षणात मागे पडतात. त्यामुळे मुलांना शिक्षण देण्यासाठी पालकांचा कल हा केजी पासूनच इंग्रजीकडे आहे.
मराठीत जेमतेम पस्तीस गुणही मिळवता येत नाहीत? - पी. विठ्ठल
या संदर्भात कवी आणि शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक पी. विठ्ठल यांनी चिंता व्यक्त केली आहे. मातृभाषेत जर लाखभर विद्यार्थी नापास होत असतील तर ही बाब प्रचंड चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.
दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय सरासरी १५ ते १६ वर्ष असते. या वयात विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास नक्कीच झालेला असतो, असे आपण गृहीत धरू. एवढेच नाही तर भाषिकदृष्ट्याही तो काहीअंशी का होईना परिपूर्ण झालेला असतो. या वयापर्यंत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची समाजातंर्गत व्यवहारातून बऱ्यापैकी जडणघडणदेखील झालेली असते. त्याचा मातृभाषेशी, ज्ञानक्षेत्राशी किमान परिचय झालेला असतोच. (अर्थात विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडीनुसार, वर्तनव्यवहारानुसार आणि अभ्यासानुसार त्याचे आकलन कमी-अधिक असू शकते. शिवाय आजच्या काळात उपलब्ध असलेल्या डिजिटल साधनांचा परिणामही त्याच्या व्यक्तिमत्त्वावर होऊ शकतो.) आणि तरीही त्याला मराठी विषयात जेमतेम पस्तीस गुणही मिळवता येत नाहीत, हे नेमकं कसं घडतं? असा सवाल पी. विठ्ठल यांनी उपस्थित केला आहे.
विद्यार्थी मराठी विषयात एवढ्या मोठ्या संख्येने नापास का होतात? या प्रश्नाकडे खूप गांभीर्याने बघण्याची गरज आहे. 'विद्यार्थ्यांना मराठीविषयी आस्था नाही' किंवा 'विद्यार्थी अभ्यास करत नाहीत' एवढ्या मर्यादित अर्थाने या घटनेकडे पाहून चालणार नाही. तर आपली एकूण शिक्षणव्यवस्था भाषिक- सांस्कृतिक वातावरण, वेगाने बदलत चाललेला भोवताल- या सगळ्या गोष्टीच्या एकत्रित परिणामाचा विचार करावा लागेल. अगदी मूल्यमापन पद्धतीचा देखील.
‘मराठी भाषेचे आणि महाराष्ट्राचे हे दुर्दैव - श्रीपाल सबनीस
याबाबत साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस म्हणाले, “मराठी भाषेचे आणि महाराष्ट्राचे हे दुर्दैव आहे. इतका वाईट निकाल मी आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. मातृभाषा मराठी असताना हजारो विद्यार्थी नापास होत असतील, तर त्याला पालक, शिक्षक आणि समाज जबाबदार आहे. सरकारचे प्रयत्न प्रामाणिकपणे सुरू असले तरी समाजाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. इंग्रजीच्या वाढत्या प्रभावाच्या काळात मराठीची गळचेपी परवडणारी नाही. मराठी भाषा आणि संस्कृती भविष्यात टिकेल का, अशी शंका आता निर्माण होत आहे.

केंद्र सरकारनं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्याबद्दल अभिनंदन. मात्र, भाषाविकासासाठी निधी दिलेला नाही. केंद्र आणि राज्य सरकार दोन्हीही यासाठी जबाबदार आहेत. मराठीचा आग्रह धरताना मध्येच हिंदीला आणलं जात आहे. सरकारच डोकं ठिकाणावर आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. “उद्याचा महाराष्ट्र जर मराठी विषयात एवढ्या मोठ्या प्रमाणात नापास होत असेल, तर नव्या पिढीचं भवितव्य काय असेल?”
शिक्षकांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये दर्जेदार लेखकांचे साहित्य समाविष्ट झालं पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नापास होत असतील, तर शिक्षकांनी विशेष मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. बंद पडणाऱ्या मराठी शाळा पुन्हा सुरू करून त्यांना अनुदान मिळालं पाहिजे. सध्या फक्त गोरगरीब वर्ग हा मराठीशी जोडलेला आहे. इतर समाजघटक मराठीपासून दूर जात आहेत, अशा परिस्थितीत मराठीला जगवणार कोण? मराठी भाषा जगली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.” असे सबनीस म्हणाले.
‘राज्यासाठी लाजिरवाणी बाब - डॉ. अ. ल. देशमुख
शिक्षणतज्ञ डॉ. अ. ल. देशमुख म्हणाले, “मराठी विषयाचा हा निकाल राज्यासाठी लाजिरवाणा आहे. ही परिस्थिती अचानक निर्माण झालेली नाही. गेल्या तीन वर्षांपासून मराठी विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत आहे.” ते पुढे म्हणाले, “शासनाचं मराठी शाळांकडं दुर्लक्ष होत आहे. नवीन मराठी शाळांना परवानगी दिली जात नाही. शिक्षणातील दोन मूलभूत क्षमता म्हणजे वाचन आणि लेखन. मात्र प्राथमिक स्तरापासूनच विद्यार्थ्यांचे वाचन आणि लेखन कमकुवत आहे. 70 ते 75 टक्के विद्यार्थी लेखनात कच्चे आहेत. उत्तरपत्रिकेत नीट लिहिता आलं नाही, तर गुण मिळणार नाहीत. त्याचेच प्रतिबिंब निकालात दिसत आहे.
दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मराठी शाळेकडून दुर्लक्ष केलं जात आहे. इंग्रजी शाळांकडं पूर्णपणे लक्ष दिलं जात आहे. इंग्रजी शाळांमधील मुलांचं मराठी खराब बोलणं हे स्टेट्स झालंय. हा सर्वात मोठा समाजाकडून शिक्षण प्रक्रियेचा पराभव होत आहे. मातृभाषेतून शिक्षण द्यावं जगानं मान्य केलंय, पण पालक हे इंग्रजी माध्यमांमध्ये आकर्षित होत चालले आहेत. आज मराठी साहित्य संमेलन घेतली जात आहेत. मात्र, साहित्य परिषदेच्या माध्यमातून शाळांमध्ये जाऊन मराठी विकासासाठी प्रक्रिया केली जात नाही. आज अनेक लेखक हे मराठी शाळांमध्ये जात नाहीत. मराठी शाळेची काय परिस्थिती आहे, हे तपासत नाहीत. मराठीची गळचेपी सुरू असून आत्ता संबंध समाजानं एकत्र येत दबावगट तयार केला पाहिजे, "असं यावेळी देशमुख म्हणाले.
भाषा बोलता तर येते; पण भाषेची योग्य समज विकसित होऊ शकली नाही
विद्यार्थ्यांचं दैनंदिन जगणं आरपार बदलले आहे. त्यांच्या संभाषणात हिंदी, इंग्रजीचे प्रमाण वाढले आहे. शिवाय मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडियाचा खूप परिणाम झाला आहे. शाळा/ अभ्यासक्रमबाह्य वाचनाचा अभाव असल्यामुळे विद्यार्थ्यांची लेखन/ आकलनशक्ती कमी पडते. त्यामुळे भाषा बोलता तर येते; पण भाषेची योग्य समज विकसित होऊ शकत नाही. त्यामुळे कथा, कविता, निबंध, उतारे यातील प्रतिमा आणि आशय समजून घेता येत नाही. केवळ पाठांतराधारित कृत्रिम अभ्यासामुळे आणि क्लासेसवरील अवलंबित्वामुळे व्याकरणही समजून घेता येत नाही. गाईड, युट्युबमुळे उत्तरे लिहिण्याला प्रचंड मर्यादा येतात याशिवाय शिक्षकांच्या अध्यापनातील मर्यादा हाही एक मुद्दा आहेच!, असे पी. विठ्ठल स्पष्ट करतात.
भाषा शिक्षणासाठी आवश्यक असलेले उपक्रम आता जवळपास बंद झाले आहेत. जे आहेत ते केवळ तांत्रिक पूर्ततेसाठी. 'मराठी विषय सोपा आहे', म्हणून विद्यार्थी गाफिल राहतात. त्यामुळे त्यांचे आकलन जसे अपुरे राहते, तसेच लेखनगतीही कमी पडते. वेळेचे व्यवस्थापनही नीट जमत नाही. त्यामुळे विद्यार्थी प्रश्न समजून घेऊ शकत नाहीत. प्रश्नच नीट समजले नाही तर उत्तरेही नीट लिहिता येत नाहीत. याचा परिणाम अर्थातच विद्यार्थ्यांच्या गुणांवर होतो. दहावीत लाखभर विद्यार्थी नापास झाले, ही घटना केवळ निकालाशी संबंधित नाही. ती भाषिक संस्कृतीशीदेखील निगडित आहे. विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती, विचारशक्ती आणि भाषिक आत्मविश्वास असाच कमी होत गेला तर त्याचा मराठी भाषेवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे.
नापासांची भाषा आणि 'लांडगा आला रे आला..!'
द्वितीय भाषेच्या प्रश्नपत्रिकेत 'कथालेखन' असा एक घटक आहे. ज्यात काही मुद्द्यांच्या आधारे कथा लिहायची असते. या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेत 'एक खोडकर मुलगा- गुरे राखण्यास रानात जाणे- अनेक खोड्या- एक दिवस लांडगा आला रे आला- असे ओरडणे...' असे मुद्दे दिले आहेत. ज्या मुद्द्यांच्या आधारे तीस-पस्तीस वर्षांपूर्वी माझ्या पिढीनेही कथा लिहिली आहे. तीच कथा आजही विचारली जात असेल तर आपल्या ज्ञानव्यवस्थेचा खरंच विस्तार झाला आहे का? याचा विचार करण्याची गरज आहे, असे मत पी. विठ्ठल यांनी व्यक्त केले आहे.

मुळात कौशल्याधारित घटकांचा अधिकाधिक समावेश अभ्यासक्रमात असल्यामुळे 'साहित्य' ही नावालाच उरलेली गोष्ट आहे. तरीपण 'काळाशी सुसंगत शिक्षण देणे' ही आपली जबाबदारी असायला हवी. आजच्या डिजिटल काळातही 'लांडगा आला रे आला' हेच आपण शिकवणार असू तर आपला 'निकाल' असाच असणार आहे. म्हणजे मुलांना 'हे' शिकवू- सांगू नये, असे अजिबात नाही. उलट हे सांगायलाच हवे ; पण त्यासाठी मुलांचे सामाजिक- सांस्कृतिक भान समकाळाच्या पार्श्वभूमीवर विकसित करायला हवे. कारण कोणतीही 'बोधकथा' समजून घ्यायची असेल तर विचार करण्याची, अर्थ शोधण्याची प्रक्रिया गतिमान करावी लागेल.
जी प्रक्रिया आजच्या काळात पूर्णपणे थांबली आहे. घटना किंवा तपशिल नव्हे; तर विद्यार्थ्यांना 'मूल्यांची' जाणीव व्हायला हवी. त्यांच्यातील नैतिक विचारशक्ती वाढायला हवी. त्याला भाषेतील प्रतीके/ रूपके कळायला हवीत. बोधकथा केवळ नैतिक धडा देत नाही, तर ती आपल्याला संवेदनशील आणि विचारी माणूस बनवते. पण दुर्दैवाने आपण मराठी विषयाचे गांभीर्यच हरवून बसलो आहोत.
'गणित- विज्ञान- इंग्रजी' (आणि आता AI वगैरे) हे विषय करिअर ओरिएंटेड झाल्यामुळे मराठीकडे होणाऱ्या दुर्लक्षाची 'परिणती' या निकालात दिसते आहे. इंग्रजी विरुद्ध मराठी या संघर्षात आपण मराठी भाषेचा मूळ गाभा गमावून बसलो आहोत. अर्थात भाषा केवळ परीक्षेमुळे जगत नाही. ती व्यवहार आणि संस्कृतीमुळे जगते. पण 'नापास' झालेल्यांच्या मनात जर असे 'भाषाभय' कायम राहिले तर नव्या पिढीचे भाषेशी भावनिक नाते कमकुवत होत जाईल. म्हणून विद्यार्थ्यांचा भाषिक आत्मविश्वास वाढवण्यासाठी व्यापक स्तरावर सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे, असा सल्ला पी. विठ्ठल यांनी दिला आहे.






