अभिजीत तांगडे
- मध्य प्रदेशची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या नर्मदा नदीत चक्क 11,000 लिटर दूध ओतल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
- दीचं संतुलन अत्यंत संवेदनशील असतं आणि अशा प्रकारच्या कृती जलचरांच्या जीवनासाठी धोकादायक ठरू शकतात.
- या घटनेनंतर मध्यप्रदेशात एकीकडे 'नर्मदे हर'चा जयघोष आणि दुसरीकडे कुपोषित बालकांचा टाहो, असे विदारक चित्र मध्य प्रदेशात पाहायला मिळत आहे.
मध्यप्रदेशातील नर्मदा नदीच्या काठावर दोन दिवसांपूर्वी एक वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. नदीच्या पाण्याऐवजी पांढऱ्या रंगाची एक थरथरणारी लाट वाहताना दिसत होती, कारण हजारो लिटर दूध तिच्या प्रवाहात अर्पण करण्यात आलं होतं. काहींसाठी तो श्रद्धेचा उत्कट क्षण होता. पण निसर्गाच्या दृष्टीने पाहिलं, तर हा क्षण अस्वस्थ करणारा होता. कारण तो केवळ ‘अभिषेक’ नव्हता तर तो आपल्या पर्यावरणाबद्दलच्या दुटप्पीपणाचा एक जिवंत पुरावा होता.
तर घडलं असं की, मध्य प्रदेशची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या नर्मदा नदीत चक्क 11,000 लिटर दूध ओतल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. श्रद्धेपोटी केलेल्या या 'महाअभिषेका'मुळे आता समाजमाध्यमांवर दोन गट पडले आहेत. एकीकडे याला धार्मिक परंपरा मानले जात आहे, तर दुसरीकडे संसाधनांची नासाडी आणि पर्यावरणाचे नुकसान म्हणून टीका केली जात आहे.
नर्मदेच्या पात्रात तब्बल ११ हजार लीटर दूध ओतले
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ सीहोर जिल्ह्यातील सतदेव गावातील आहे. येथे श्री दादाजी दरबार पातालेश्वर महादेव मंदिरात चैत्र नवरात्रीनिमित्त 21 दिवसांचे मोठे अनुष्ठान आयोजित करण्यात आले होते. 18 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान चाललेल्या या कार्यक्रमात शिव महापुराण कथा आणि महायज्ञ करण्यात आला. या आयोजनासाठी 5 एकरचा भव्य पंडाल उभारण्यात आला होता. 41 टन पूजन सामग्रीचा वापर करण्यात आला. पण याच ठिकाणी ज्यावेळी नर्मदा नदी अकरा हजार लिटर दूध सोडण्यात आले त्यावेळी सर्वांचेच लक्षा या ठिकाणीकडे गेले.

नदीत हजारो लीटर दूध ओतल्यामुळे पर्यावरणावर काय धोका निर्माण होऊ शकतो यावर ‘बाईमाणूस’ने काही पर्यावरण अभ्यासकांना बोलते केले. जलपरिसंस्था अभ्यासक डॉ. सीमा देशमुख म्हणतात, “दूध हे जरी नैसर्गिक पदार्थ असलं, तरी मोठ्या प्रमाणात ते पाण्यात मिसळलं, तर पाण्यातील ऑक्सिजनची पातळी झपाट्याने कमी होते. याचा थेट परिणाम मासे, सूक्ष्मजीव आणि संपूर्ण जलजीवनावर होतो. दूध नदीत गेल्यावर त्याचं विघटन सुरू होतं. या प्रक्रियेसाठी पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन वापरला जातो. परिणामी, Biochemical Oxygen Demand (BOD) वाढतो आणि जेवढा BOD जास्त, तेवढं पाणी ‘जिवंत’ राहण्याची क्षमता कमी. सोप्या भाषेत सांगायचं, तर नदीतील प्राणवायू आपण नकळत हिसकावून घेतो.
यूट्रोफिकेशनचा सापळा: दुधामुळे हिरवी पडणारी नदी
मुंबईचे वन्यप्राणी अभ्यासक नरेंद्र नायक म्हणतात की, “इतक्या मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थ नदीत टाकले गेले, तर त्यामुळे पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे (Dissolved Oxygen) प्रमाण कमी होऊ शकते. याचा नदीच्या परिसंस्थेवर थेट आणि नकारात्मक परिणाम होतो. नदीचं संतुलन अत्यंत संवेदनशील असतं आणि अशा प्रकारच्या कृती जलचरांच्या जीवनासाठी धोकादायक ठरू शकतात. नर्मदेसारख्या नद्यांवर आसपासच्या गावांतील आणि शहरांतील लोक पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून असतात. अशा परिस्थितीत या प्रकारचं सेंद्रिय प्रदूषण केवळ मासे आणि इतर जलचरांनाच बाधित करत नाही, तर स्थानिक समुदायांच्या आरोग्यावरही परिणाम करू शकतं. त्यांनी असंही सुचवलं की, धार्मिक श्रद्धेशी संबंधित कार्यक्रम पूर्णपणे थांबवण्याची गरज नाही; मात्र ते प्रतीकात्मक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडले गेले पाहिजेत, जेणेकरून निसर्ग आणि श्रद्धा यांच्यात संतुलन राखता येईल.
दूध हा लवकर खराब होणारा पदार्थ आहे. नदीत मिसळल्यानंतर त्यामध्ये जीवाणू (बॅक्टेरिया) झपाट्याने वाढू लागतात, ज्यामुळे पाण्याची गुणवत्ता अधिकच खालावते. हा परिणाम केवळ जलचरांपुरता मर्यादित राहत नाही, तर आसपासच्या भागात राहणाऱ्या लोकांसाठीही तो धोकादायक ठरू शकतो. दूषित पाण्यामुळे डास आणि इतर कीटकांची वाढ होते, ज्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो.

मोठ्या प्रमाणात दूध पाण्यात मिसळल्यास ते हळूहळू कुजत जातं आणि बॅक्टेरियांसाठी अन्न बनतं. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता झपाट्याने खालावू लागते. एक-दोन दिवसांत दूध आंबू लागते आणि बॅक्टेरियांची वाढ वेगाने होते, ज्यामुळे पाण्यातील ऑक्सिजन कमी होऊ लागतो. तीन ते पाच दिवसांनंतर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मासे पाण्याच्या पृष्ठभागावर येऊ लागतात आणि काहींचा मृत्यूही होऊ शकतो. याच काळात पाण्याला दुर्गंधी येऊ लागते. साधारणपणे एका आठवड्यात पाणी पूर्णपणे दूषित होतं, त्यात डास आणि किड्यांची वाढ होते आणि ते वापरण्यायोग्य राहत नाही.
ही समस्या केवळ वैज्ञानिक नाही, ती तितकीच सामाजिकही आहे. कारण एका बाजूला देशात अजूनही हजारो कुटुंबांना रोजचं दूध परवडत नाही, बालकांमध्ये कुपोषणाचं प्रमाण चिंताजनक आहे; आणि दुसऱ्या बाजूला हजारो लिटर दूध नदीत वाहून दिलं जातं. श्रद्धा आणि वास्तव यांच्यातली ही दरी खूप मोठी आहे.
एकीकडे 'नर्मदे हर'चा जयघोष आणि दुसरीकडे कुपोषित बालकांचा टाहो
या घटनेनंतर मध्यप्रदेशात एकीकडे 'नर्मदे हर'चा जयघोष आणि दुसरीकडे कुपोषित बालकांचा टाहो, असे विदारक चित्र मध्य प्रदेशात पाहायला मिळत आहे. सीहोरमध्ये महाअभिषेकासाठी 11,000 लिटर दूध थेट नदीत ओतण्यात आले. याचे व्हिडिओ व्हायरल होताच सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त होत आहे. "हेच दूध गरिबांना दिले असते तर देवाचा आशीर्वाद मिळाला नसता का?" असा सवाल नेटकरी विचारत आहेत. भक्ती आणि सामाजिक जबाबदारी यातील संघर्षाने आता उग्र रूप धारण केले आहे.
भक्तांच्या मते, ही त्यांची वैयक्तिक श्रद्धा असून त्यांनी स्वतःच्या संसाधनातून हे अर्पण केले आहे. दररोज 151 लिटर आणि एका विशेष दिवशी 11,000 लिटर दुधाने नर्मदा मैय्येचे पूजन करण्यात आले. भाविकांच्या मते, नर्मदा ही त्यांची माता असून अशा अनुष्ठानांना तर्काच्या चौकटीत पाहणे चुकीचे आहे. त्यामुळे त्यांनी केलेले कृत्य योग्य आहे. त्याचे समर्थन भक्त करत आहेत. पण त्याच वेळी याच राज्यात कुपोषणाचे प्रमाण मोठे आहे याचा त्यांना विसर पडला आहे का असा प्रश्न ही या निमित्ताने उपस्थित होत आहे.
दुसरीकडे, मध्य प्रदेशातील कुपोषणाची आकडेवारी पाहता या घटनेवर तीव्र संताप व्यक्त होत आहे. हायकोर्टात सादर केलेल्या एका याचिकेनुसार, राज्यात 10 लाखाहून अधिक मुले कुपोषित आहेत. अशा परिस्थितीत इतक्या मोठ्या प्रमाणात दूध नदीत वाहून घालण्याऐवजी ते गरीब मुलांना दिले असते, तर ती खरी सेवा ठरली असती, असे मत पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडले आहे.
प्रत्यक्षात, पर्यावरणासाठी पवित्र किंवा अपवित्र असं काही नसतं. अतिरिक्त आणि असंतुलित हस्तक्षेप हाच प्रदूषणाचा मूळ अर्थ आहे.नदी ही एक जिवंत परिसंस्था आहे. तिचं स्वतःचं संतुलन असतं. पाण्याचा वेग, त्यातील जीवसृष्टी, पोषक घटकांचा समतोल. आपण जेव्हा मोठ्या प्रमाणात बाह्य घटक त्यात टाकतो, तेव्हा हा समतोल ढासळतो. म्हणूनच पर्यावरण क्षेत्रात आता ‘सस्टेनेबल श्रद्धा’ (Sustainable Faith Practices) ही संकल्पना पुढे येत आहे. श्रद्धा नाकारायची नाही, पण ती निसर्गाशी सुसंगत ठेवायची.
मध्यप्रदेशातील नर्मदा नदी मध्ये ओतले गेलेले ११ हजार लिटर दूध ही केवळ एक घटना नाही तर ती आपल्या सामूहिक विचारसरणीचं प्रतिबिंब आहे. श्रद्धा आणि पर्यावरण यांच्यात संघर्ष नाही, पण समतोल नक्कीच हवा. आणि तो समतोल साधण्याची जबाबदारी आपलीच आहे. निसर्गाची पूजा करण्याची सर्वात खरी पद्धत म्हणजे, त्याला ‘अर्पण’ करण्याऐवजी, त्याला ‘जपणं’.






