नीलांबरी
- स्विगी, झोमॅटो, ॲमेझॉन, उबेर अशा ॲप्समुळे आधुनिक जीवन सुसह्य केल्याचा भास होतो. त्यातून आपला वेळ वाचतो.
- पण या डिजिटल जगामागे एक अदृश्य जग आहे. ते तात्पुरत्या, असंघटित कामगारांचं जग जागतिक सत्ताकेंद्रांची दडपशाहीला निमूट बळी पडत चाललेलं आहे.
- यामागच्या कारणांचं उहापोह करणारं पुस्तक बाजारात दाखल झालं आहे,‘ओटीपी प्लीज..’!
ऑनलाइन बाजारपेठेतील चढाओढीत डिलिव्हरी बॉईजच्या जीवाशी खेळणाऱ्या '10 मिनिटांत डिलिव्हरी'च्या (10-Minute Delivery) जाहिरातबाजीला केंद्र सरकारने अखेर लगाम घातला आहे. या संदर्भात केंद्र सरकारने पुढाकार घेत ऑनलाइन कंपन्यांना कडक निर्देश दिले आहेत. या हस्तक्षेपानंतर ब्लिंकिटसह अनेक कंपन्यांनी आपल्या प्लॅटफॉर्मवरून 10 मिनिटांत सामान घरपोच करण्याचे दावे हटविण्यास सुरूवात केली आहे. ३१ डिसेंबरला गिग वर्कर्सनी देशव्यापी संप पुकारला होता. गिग वर्कर्सनी आंदोलनाला सुरूवात केली होती. या गिग वर्करनी केंद्र सरकारला आवाहन केले होते की त्यांनी यामध्ये हस्तक्षेप करावा आणि सामान घरपोच करणाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे.
यामागच्या कारणांचं उहापोह करणारं पुस्तक काही महिन्यांपूर्वी वाचलं होतं. नाव आहे ‘ओटीपी प्लीज..’!
‘ओटीपी प्लीज..’!
समजा, मुंबईतल्या अंधेरी वेस्टमधल्या एका मुलीनं लोखंडवालामधल्या इटालियन रेस्टॉरंटमधून झोमॅटोवर पास्ता मागवला तर अल्गॉरिदम्स त्या भागातला डिलिव्हरी बॉय शोधायला लागतात. समजा राम दयाल, कन्हैय्यालाल, प्रेमकुमार आणि अरबाज अली असे चौघंजण तिथे जवळच आहेत. आता त्या चौघांपैकी कोणाकडे आॉर्डर जाईल हे अनेक गोष्टींवर ठरतं. उदा. कामगाराचं नेमकं ठिकाण, त्याचं रेस्टॉरंटपर्यंतचं नेमकं अंतर, त्याचा डिलीव्हरीचा सर्वसाधारण वेग, तो कामगार किती लवकर वस्तू पोचवतो त्याची हिस्ट्री, कस्टमर्सनी त्याला दिलेलं रेटिंग इ. या आणि अशा गोष्टींचा अभ्यास करुन काही सेकंदात अल्गॉरिदम्स निर्णय घेतात आणि त्यातल्या एकाला मोबाईलवर मेसेज जातो.
दर काही आठवड्यांनंतर मॅनेजर्स या डेटाचा अभ्यास करुन अल्गॉरिदम्सना नवीन नियम शिकवतात. ग्राहकांना चांगल्यात चांगला अनुभव मिळावा यासाठी हे नियम काम करतात. वाहन बुकिंग असो, खाद्यपदार्थांची डिलिव्हरी असो किंवा इ-कॉमर्सचे व्यवहार, ग्राहक हा राजा असतो. काहीवेळा नवीन नियमांमुळे डिलिव्हरीचं काम करणाऱ्या कामगारांच्या वेतनावर परिणाम होतो. मग ते रागावून संप करतात. हे बदल त्यांचं वेतन कमी करण्यासाठी केलेले नसतात. पण कंपनीला तोटा मान्य नसतो आणि ग्राहकांना प्राधान्य असतं. मग “कोणीतरी” त्यासाठी किंमत मोजावीच लागते..“ हे “कोणीतरी” म्हणजे कामगार.
आपली खरेदी करणं , खाणं, विक्री करणं, दिवसभरातलं वावरणं हे तंत्रज्ञानामुळे आमुलाग्र बदललं आहे. स्विगी, झोमॅटो, अॅमेझॉन, उबेर अशा अॅप्समुळे आधुनिक जीवन सुसह्य केल्याचा भास होतो. त्यातून आपला वेळ वाचतो. अनेकांना रोजगार मिळतो आणि अचानक इच्छा झालेला खाद्यपदार्थ मिळण्यापासून अचानक घरातली संपलेली वस्तू हातात येऊन ग्राहकांना दिलासा मिळतो.
डिजिटल जगामागंचं एक अदृश्य जग
पण या डिजिटल जगामागे एक अदृश्य जग आहे. ते तात्पुरत्या, असंघटित कामगारांचं जग जागतिक सत्ताकेंद्रांची दडपशाहीला निमूट बळी पडत चाललेलं आहे. सुविधांना बळी पडत जाणा-या ग्राहकांना या जगाबद्दल संपूर्ण अज्ञान आहे.
“ओटीपी प्लीज” हे वंदना वासुदेवन यांचं अभ्यासपूर्ण पुस्तक इ-कॉमर्सच्या दुनियेतल्या दक्षिण आशियातल्या अशा गिग वर्कर्सच्या कहाण्या आपल्यासमोर मांडतं. टेक कंपन्यांचा कारभार, त्यांची धोरणं इथपासून कामगारांची मानसिकता इथपर्यंत या जगाचा धांडोळा यात घेतलेला आढळतो.
विशेष म्हणजे काफ्कानं मांडलेल्या तत्वज्ञानाशी सत्ताकेंद्र आणि सामान्य माणूस यातला संघर्ष लेखिकेनं उलगडून दाखवला आहे. लेखिकेच्या शब्दात सांगायचं तर :
“फ्रॅंझ काफ्कानं प्रागमध्ये १९२० च्या सुमारास आपलं लेखन केलं. अस्तित्ववादाच्या तत्वज्ञानावर आधारित त्याचं लिखाण किर्केगार्ड आणि नित्शेच्या विचारानं प्रभावित झालेलं होतं. काफ्काच्या दृष्टिकोनातून प्रत्येकजण आपली उपेक्षा करणा-या आणि सतत आपल्या विरोधात ठाकलेल्या जगात संघर्ष करत असतो. हा संघर्ष कधीच संपत नाही पण तो निराशाजनक विचारांच्या पार्श्वभूमीवर सातत्यानं करत रहायला हवा. त्याच्या उपहासगर्भ शोकांतिका या आधुनिक आौद्योगिक जगात पुराणकथांचं काम करतात. अनियंत्रित सत्ता असलेल्या व्यवस्था आणि त्यात अडकलेल्या व्यक्ती यांच्यातलं नातं त्याच्या कथा दाखवतात.
आज तात्पुरती कामं करणारे कामगार आणि मोबाईलफोनवर असलेली अॅप्स नियंत्रित करणारे अल्गॉरिदम्स यांच्यातलं नातं शंभर वर्षं होऊन गेल्यानंतरही काफ्काच्या कथांमधून सांकेतिकपणे दिसतं. आज या कामगारांच्या प्रत्येक कृतीचं ज्या माणसांना ते पहातही नाहीत त्यांच्याकडून मूल्यमापन केलं जातं. जे मूल्यमापन करण्याचे नियम त्या कामगारांना ठाऊकही नसतात. यातला क्रूर विनोद म्हणजे काफ्का हे खरोखर एका सॉफ्टवेअरचं नाव आहे जे दरक्षणी डेटा गोळा करुन त्यावर प्रक्रिया करतं आणि बिग डेटाचं विश्लेषण करायला कंपन्यांना मदत करतं.
अल्गॉरिदम्स ही गणितातली समस्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्याची पध्दत आहे. स्मार्टफोन्स आणि इंटरनेटच्या युगाआधी हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या पर्शियन विद्वान मुहम्मद इब्न मुसल अल-ख्वारिझ्मी यानं ती शोधली होती. अल्गॉरिदम हा शब्द खरं तर त्याच्या नावातल्या शेवटच्या शब्दांचा लॅटिन अपभ्रंश आहे.
प्लॅटफॉर्म्सच्या दृष्टिकोनातून अल्गॉरिदम्स हे नियम, संकेत आणि डेटा याद्वारे प्लॅटफॉर्म्सच्या कामावर नियंत्रण ठेववतात आणि प्रत्येक टप्प्यावर साधकबाधक निर्णय घेतात. तिथे काम करणा-या टेक्नोक्रॅटसशिवाय त्यात ओतलेलं लॉजिक कोणालाच ठाऊक नसतं.
कामगारांच्या बाबतीत अल्गॉरिदमचं प्रमुख काम हे हवी असलेली सर्व्हिस उत्कृष्टपणे कोण काम पार पाडू शकेल असा कामगार शोधणं हे असतं. रेस्टॉरंट किंवा किराणा मालाची ग्राहकाची आॉर्डर कमीत कमी वेळेत उचलून पोचवू शकणारा सर्वात जवळ असलेला कामगार कोणता ते अल्गॉरिदम्स शोधतात. “अल्गॉरिदम्सच्या दृष्टिकोनातून - पोचवायची वस्तू स्वीकारुन ग्राहकापर्यंत पोचवण्यात पहिला आणि शेवटचा असे दोन टप्पे असतात.
पहिल्या टप्प्यात, डिलीव्हरी करणारा एखाद्या रेस्टॉरंटमधून किंवा दुकानातून पॅकेज घेण्याची आॉर्डर स्वीकारतो. रेस्टॉरंटमध्ये पोचायचे त्याला पैसे मिळत नाहीत. त्यानं आॉर्डर असलेली वस्तू स्वीकारल्यानंतर ग्राहकाकडे निघाल्यानंतर त्याला किती पैसे मिळणार याचं गणित सुरु होतं. अल्गॉरिदम्स हे त्या कामगाराच्या मार्गातला पहिला मैल हा शेवटच्या मैलापेक्षा छोटा असेल याची काळजी घेणारे बनवलेले असतात. म्हणजे रेस्टॉरंटच्या सर्वात जवळ असलेला डिलिव्हरी करणारा माणूस निवडला जाईल अशी ती रचना असते. मात्र गर्दीच्या वेळात जर डिलीव्हरी करणारा कामगार जवळपास सापडत नसेल तर अॅप जरा दूरवर असलेला कामगार शोधतात.
वयस्कर कामगारांबाबत ॲप्स भेदभाव करतात
स्विगी आणि झोमॅटोत काम केलेल्या राजेश सिंग यांनी या ॲपचं लॉजिक काय आहे हे शोधायचा प्रयत्न केला आणि ही अॅप्स वयस्कर कामगारांबाबत भेदभाव करतात हे दिसून आलं. हे उदाहरण या पुस्तकात आहे.
राजेश सिंग म्हणतात, “सुरुवातीच्या काळात कंपनी तुम्हाला खूप पळायला लावते. तुम्हाला खूप आॉर्डर्स मिळतात. आजूबाजूला पन्नासजण असतील तर नवीन कामगाराचाच फोन वाजतो. मग तुम्हाला छान वाटतं. तुम्ही बारा, तेरा, चौदा तास काम करतात. आॉर्डर्स घेत रहाता.. रेस्टॉरंटसमागून ग्राहकांपर्यंत वाहन चालवत रहाता. त्यातून प्रकृतीवर अर्थातच परिणाम होतो. माझं वजन या प्रकारात खूप घटलं. पण मग नंतर काही काळानंतर तितकेच किंवा त्यापेक्षा जास्त तास काम करुन आठवड्याला पैसे मात्र कमी मिळायला लागल्याचं लक्षात आलं. त्याला आधीइतक्या आॉर्डर्स मिळत नव्हत्या.
राजेश सिंगसारख्या असंख्य गिग वर्कर्सची समस्या हीच आहे, ती म्हणजे त्यांच्या रोजच्या जगण्यात त्यांना समजतही नाही असं खूप जास्त काहीतरी घडत असतं. सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सर्वशक्तिमान असलेला अल्गॉरिदम अदृश्य असला तरी अंतर्यामी म्हणजे सर्व जाणणारा असतो. कामगारांना या डिजिटल अंतर्यामी अॅप्सचं कामकाज कसं चालतं ते माहितीही नसतं.
ग्राहक म्हणून या कामगारांच्या दुनियेचा विचार आपण केलेला नसतोच. पण जागतिक पातळीवरही असंघटित कामगारांच्या समस्यांमध्ये ही अजून एक दुर्लक्षित, उपेक्षित बाजू आहे.
(साभार - निलांबरी जोशी यांच्या फेसबुक पेजवरून)






