टीम बाईमाणूस
- पेपरफुटी करणाऱ्यांवरील कारवाईची प्रतीक्षा अजूनही सुरू आहे. पण पेपरफुटीविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक शहरांमध्ये पोलिसी कारवाईला सामोरं जावं लागल्याचे आरोप आहेत.
- मुंबईतील पोलिस कर्मचाऱ्याची '५० ग्रॅम पावडर'ची धमकी, दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेल्या जखमा, महिला आंदोलकाशी गैरवर्तनाचे आरोप आणि लाठीचार्जाचे व्हिडिओ यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाभोवती नवा वाद निर्माण झाला आहे.
- आंतरराष्ट्रीय मानवी हक्कांच्या निकषांनुसार पोलिसांची ही कारवाई कायदेशीर, आवश्यक आणि योग्य होती का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पेपरफुटी करणाऱ्यांच्या मुसक्या अजूनही आवळलेल्या नाहीत, पण पेपरफुटीचा निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनगटांवर मात्र बेड्या चढू लागल्या आहेत. लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या गुन्हेगारांविरोधातील तपास वर्षानुवर्षे रेंगाळतो, अनेक आरोपी जामिनावर बाहेर फिरतात पण न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांना लाठ्या, अश्रुधूर, अटक आणि पोलिसी दडपशाहीला सामोरं जावं लागतं.
‘नीट’ पेपरफुटी प्रकरणानंतर जंतर-मंतरपासून बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि देशातील विविध शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून एकच प्रश्न विचारला, 'आमच्या भविष्याची जबाबदारी कोण घेणार?' पण या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी अनेक ठिकाणी त्यांना पोलिसांच्या लाठ्या, बॅरिकेड्स, ताब्यात घेण्याच्या कारवाया आणि बळाचा सामना करावा लागल्याचे आरोप झाले. काही ठिकाणी विद्यार्थी जखमी झाले, काहींना रुग्णालयात दाखल करावं लागलं, तर काही घटनांमध्ये पोलिसांच्या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले.
50 ग्रॅम पावडर खिशात टाकून आयुष्य तुरुंगात घालवेन!
आंदोलक विद्यार्थ्यांना ५० ग्रॅम पावडर खिशात टाकून आयुष्य तुरुंगात घालवेन अशी खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची धमकी देणाऱ्या मुंबई पोलीस कर्मचाऱ्याला अखेर निलंबित करण्यात आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर, मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित कर्मचाऱ्यावर तत्परतेने ही कारवाई केली. धमकी देणाऱ्या पोलिसाचे नाव पवन सांगळे असं असून, तो सायन पोलीस ठाण्यात चालक म्हणून कार्यरत आहे.

नीट पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाची धग देशभर पसरत आहे. मुंबईतील शिवाजी पार्क, चेंबूर आणि आझाद मैदान भागातही विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. या दरम्यान पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या गाडीमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना या पोलीस कर्मचाऱ्याने विद्यार्थ्यांना धमकावले.
‘’पुन्हा आंदोलनात दिसलात तर 50 ग्रॅम पावडर खिशात टाकेल, मग संपूर्ण आयुष्य वाया जाईल, जामीनही मिळणार नाही.अशी धमकी दिली. तसेच माझ्यासारखा वाईट कोणी नाही. तुमच्यामुळे आम्हाला त्रास होत आहे,’’
असेही धमकीत पोलिसांनी म्हटले आहे. हा संपूर्ण प्रकार एका विद्यार्थ्याने कॅमेऱ्यात कैद केला होता. मुंबई काँग्रेसने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट करत पोलिसांच्या या हुकूमशाही वृत्तीवर कडाडून टीका केली आणि उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चैकशीची मागणी केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या व्हिडिओचा उल्लेख करत गंभीर प्रश्न उपस्थित केले. 50 ग्रॅमची पावडर टाकेन असं म्हणणारा पोलीस स्वतः ड्रग्ज सप्लायर आहे का? पोलिसांकडे अशी पावडर येते कुठून? असा थेट सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला.
मुंबई काँग्रेसने एक्सवर यासंदर्भात पोस्ट करत या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. काँग्रेसने म्हटले आहे की जर व्हायरल व्हिडीओतील दावा खरा असेल, तर ही केवळ विद्यार्थ्यांना घाबरवण्याची बाब नसून लोकशाहीतील नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर थेट हल्ला आहे. स्वतःचा आवाज उठवणे हा गुन्हा नाही. असे काँग्रेसने म्हटले आहे.
मुंबई पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची सखोल अंतर्गत चैकशी सुरू करण्यात आली असून, चैकशीचा अंतिम अहवाल आल्यानंतर संबंधित कर्मचार्यावर पुढील कायदेशीर व शिस्तभंगाची कारवाई केली जाईल..
पोलिसांकडून पॅलेट गन्सचा वापर?
कॉक्रोच जनता पक्षाने २० जुलै रोजी संसदेवर काढलेल्या मोर्चाला रोखण्यासाठी पोलिसांकडून पॅलेट गन्सचा वापर केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. दिल्ली पोलीस किंवा शीघ्र कृती दलाने ही बाब नाकारली असली तरी डोळ्यात आणि शरीरावर छर्ऱ्याच्या जखमा असलेले काही रुग्ण रुग्णालयात दिसत आहेत. एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार घेणारा १९ वर्षीय साहिल लोचाब यापैकीच एक आहे. ज्याची उजव्या डोळ्याची दृष्टी कदाचित परत कधीच येणार नाही.
‘द इंडियन एक्सप्रेस’च्या प्रतिनिधींनी साहिल लोचाबशी संवाद साधला. त्याच्या उजव्या डोळ्यावर पांढरी पट्टी बांधलेली आहे. तर चेहऱ्याच्या उजव्या बाजूला अनेक काळे डाग दिसत आहेत. डॉक्टरांच्या मते, एखादी लहान वस्तू त्याच्या डोळ्यावर जोरदार आदळल्यामुळे या जखमा झाल्या आहेत.

साहिल लोचाबने सांगितले की, २० जुलै रोजी संसदेच्या दिशेने निघालेल्या मोर्चात तो सामील झाला होता. यावेळी त्याच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर छर्रे लागले. एम्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला. त्यांनी म्हटले, साहिलच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला गोळी लागल्याच्या जखमा झाल्या आहेत. त्याची प्रकृती स्थिर असून त्याला वेदनाशामक औषधे दिली जात आहेत.
साहिलने सांगितले की, तो दिल्ली विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओपन लर्निंगचा विद्यार्थी आहे. २०२४ मध्ये त्याने दिल्ली पोलीस भरतीची परीक्षा दिली होती. त्याला पोलीस दलात भरती व्हायचे होते. मात्र पेपरफुटीमुळे ही परीक्षा रद्द झाली, त्यानंतर तो निराश झाला होता. यातूनच त्याने या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
साहिलने सांगितले की,
‘’दुपारी साडेतीनच्या सुमारास जंतर-मंतर आणि संसद परिसरात आंदोलनात गोंधळ सुरू झाला. मी तेव्हा कनॉट प्लेसच्या परिसरात होतो. तेव्हा सीजेपी किंवा मोर्चाचे नेतृत्व करणारे कुणीही तिथे उपस्थित नव्हते. सुरक्षा दल आमच्या दिशेने धावत येत असताना मी हात जोडून उभा राहिलो. मग अचानक माझ्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला काहीतरी आदळले आणि मी खाली पडलो. त्यानंतरचे मला काही आठवत नाही. लेडी हार्डिंग रुग्णालयात मला शुद्ध आली. तिथे मला समजले की, छर्ऱ्यामुळे इर्शाद शेख नावाचा आणखी एक तरुण जखमी झाला आहे. तिथून मला सफदरजंग आणि नंतर एम्सच्या आरपी सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. पण जखम गंभीर असल्यामुळे आता एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.’’
आंदोलक महिलेसोबत गैरवर्तन? अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याची मागणी
नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत विद्याथ्र्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे लोण आता मुंबईतही पोहोचले आहे. मुंबईतील दादर येथे नीट पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान सिव्हिल ड्रेसमधील एका पोलिसाने आंदोलक विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा प्रकार दादरमधील शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याचे समोर आले आहे.
दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईतील दादर येथे सीजेपी आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. यावेळी गर्दी पांगवण्यासाठी आणि आंदोलन सोडवण्यासाठी गेलेल्या सिव्हिल ड्रेसमधील दीपक बल्लाळ नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने एका विद्यार्थिनीला अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने पकडल्याचा आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून आणि राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

विरोधी पक्षातील अनेक प्रमुख नेत्यांनी हा व्हिडीओ शेअर करत राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. आमदार रोहित पवार, खासदार वर्षा गायकवाड, आमदार जितेंद्र आव्हाड आणि हर्षवर्धन सपकाळ या नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. महिला आंदोलकासोबत अशा प्रकारे गैरवर्तन करणार्या संबंधित पोलीस अधिकार्याला तात्काळ निलंबित करून थेट सेवेतून बडतर्फ करण्यात यावे, अशी आग्रही मागणी विरोधकांनी केली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट करत कारवाईची मागणी केली आहे. ‘हा व्हिडिओ बघून डोक्याची तिडीक उठली. कोण आहे हा नराधम? याच्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत हा किती किळसवाणं कृत्य करतोय. हा पोलीस असेल तर पहिलं याला निलंबित नाही तर पोलीस दलातून बडतर्फ करा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा. एक वेगळी प्रतिष्ठा असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाला लागलेली ही कीड आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या घटनेचा व्हिडिओ ट्विट करत सरकारवर निशाणा साधला हा पोलिसांचा अतिरेक सरकारच्या अंगाशी येईल, आवरा यांना! अशी संतप्त पोस्ट त्यांनी लिहिली आहे. याशिवाय काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी एका तरुण महिला आंदोलकाची पुरुष पोलिसाकडून धक्काबुक्की आणि विनयभंग झाल्याचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला. पोलीस अशा पद्धतीने कारवाई करू शकतात का? असा सवाल विचारत त्यांनी अशा कर्मचार्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली.
पोलिसांना मिळाले ‘एनएसए’ लागू करण्याचे अधिकार
पेपरफुटी विरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) लागू करण्याचे अधिकार दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहेत. दिल्ली सरकारने 19 जुलै रोजी पोलिसांना ही परवानगी दिली. हा अधिकार 19 जुलैपासून तीन महिन्यांसाठी लागू राहील. मात्र दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे की हा आदेश एक नियमित प्रक्रिया असून त्याचा विद्यार्थी आणि कार्यकर्ता गटाकडून सुरू असलेल्या आंदोलनाशी काहीही संबंध नाही.
दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे की त्यांना अशी माहिती मिळाली आहे की आंदोलनादरम्यान दिल्ली पोलीस आयुक्तांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत ताब्यात घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, असा दावा करणारी दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियावर पसरवली जात आहे. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की, राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अधिकारांचे नूतनीकरण दर तीन महिन्यांनी होते, जी एक सामान्य प्रशासकीय प्रक्रिया आहे.
अधिकृत निवेदनात पुढे म्हटले आहे की सध्याचा नूतनीकरणाचा आदेश सीजेपी आंदोलनाच्या खूप आधी, 7 जुलै 2026 रोजी जारी करण्यात आला होता, ज्याची वैधता 19 जुलै 2026 ते 18 आॅक्टोबर 2026 अशी आहे. अलीकडील आंदोलनांसंदर्भात कोणताही विशिष्ट अर्ज किंवा आदेश जारी करण्यात आलेला नाही. नूतनीकरण ही एक सामान्य प्रशासकीय प्रक्रिया आहे. काही सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर या अधिसूचनेचा चुकीचा अर्थ लावला जात आहे, ज्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. नागरिकांनी कोणत्याही पडताळणी न झालेल्या माहितीवर विश्वास ठेवू नये आणि पडताळणीसाठी अधिकृत स्रोतांशी संपर्क साधावा, असे म्हटले आहे.

15 जुलै रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या कलम 3(2) अंतर्गत दिल्ली पोलिसांना अशा व्यक्तींना प्रतिबंधात्मक ताब्यात घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, ज्यांच्या कारवायांमुळे भारताच्या सुरक्षेला किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार, एखाद्या व्यक्तीला तीन महिन्यांपासून ते जास्तीत जास्त 12 महिन्यांपर्यंतच्या कालावधीसाठी ताब्यात ठेवले जाऊ शकते.
राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत केल्या जाणार्या कारवाई या सामान्य अटक नसून, त्या प्रतिबंधात्मक अटक आहेत. या कायद्यानुसार, संभाव्य धोक्याच्या आधारावर एखाद्या व्यक्तीला आगाऊ ताब्यात घेतले जाऊ शकते. अशा प्रकरणांमध्ये, अटकेतील व्यक्तीला तात्काळ न्यायालयात हजर करणे बंधनकारक नाही.
हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा विद्यार्थ्यांचे नीट परीक्षांमधील अनियमिततेच्या निषेधार्थ जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे.
पोलीस कारवाईचे अनेक व्हीडिओ व्हायरल
जंतर मंतर, जनपथ, कनॉट प्लेस आणि आसपासच्या भागात जे काही घडलं, त्याचे व्हीडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या व्हीडिओ आणि फोटोंमधील दृश्यांमुळे पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा मारा करण्यात आला तसेच सुरक्षा कर्मचारी त्यांच्यावर लाठीचार्ज करतानाही दिसत आहेत. अनेक व्हीडिओंमध्ये पोलीस आणि रॅपिड अॅक्शन फोर्सच्या निळ्या गणवेशातील सुरक्षा कर्मचारी आंदोलकांना लाठ्यांनी मारत पळवून लावताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर असेही अनेक व्हीडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यात पोलिसांसोबत साध्या कपड्यांतील काही जण लाठ्या चालवताना दिसत आहेत. याबाबत त्यांना प्रश्न विचारल्यावर ते आक्रमकपणे लोकांना मारहाण करताना दिसतात. जंतर मंतरवरील पोलीस कारवाईत अतिप्रमाणात बळाचा वापर झाल्याचे आरोप करण्यात येत आहेत. आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी केवळ लाठीचार्जच केला नाही, तर पळणाऱ्या आंदोलकांवरही बळाचा वापर केल्याचा आरोप आहे.
याशिवाय अनेकांच्या डोक्याला, डोळ्यांना आणि छातीला दुखापती झाल्या आहेत. मात्र, मार्गदर्शक तत्त्वांनुसार लाठीचार्ज करताना कंबरेखाली प्रहार करण्याची सूचना असते, जेणेकरून दुखापत कमी होईल.
21 वर्षांची एक तरुणी दिल्लीतील आरएमएल रुग्णालयात दाखल असून ती गंभीर जखमी आहे. अनेक माध्यमांच्या वृत्तांमध्ये तिची प्रकृती इतकी गंभीर होती की तिला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं, असा दावा करण्यात आला आहे. आता त्या तरुणीची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.

अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने पोलिसांच्या वर्तनाची दखल घेतली
दिल्लीतील आंदोलकांवर झालेल्या कारवाईची दखल अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने घेतली आहे. पोलिसांची ही कारवाई मानवी हक्कांचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियाचे बोर्ड अध्यक्ष आकार पटेल ‘बीबीसी’शी बोलताना म्हणाले, "जंतर मंतरवरील आंदोलनातील फोटो आणि अहवालांमधून शांततापूर्ण आंदोलन कसं दडपलं जातं हे दिसून आलं. दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे गंभीर प्रश्न निर्माण होतात. आंतरराष्ट्रीय मानवी हक्कांच्या निकषांनुसार ही कारवाई कायदेशीर, आवश्यक आणि योग्य होती का, हा प्रश्न उपस्थित होतो. आम्ही दिल्ली पोलिसांना संयम बाळगण्याचं आणि शांततापूर्ण आंदोलकांविरोधात बेकायदेशीर बळाचा वापर तत्काळ थांबवण्याचं आवाहन करतो."
"बेकायदेशीर वर्तनाच्या सर्व आरोपांची तातडीने, स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी होईल, याची अधिकाऱ्यांनी खात्री करावी. या आरोपांमध्ये पोलिसांनी लाठी, अश्रुधुराचे गोळे आणि दगडांचा अतिप्रमाणात वापर केल्याचाही समावेश आहे," असं आकार पटेल यांनी म्हटले.






