सागरिका किस्सू
- अंकिता भंडारी रिसेप्शनिस्ट म्हणून उत्तराखंडच्या एका रिसॉर्टमध्ये काम करत होती.
- VIP लोकांसाठी तिला ‘स्पेशल सर्व्हिस’ देण्यास सांगितलं गेलं, पण तिने नकार दिला. त्यामुळे तिची अत्यंत क्रुरपणे हत्या करण्यात आली.
- आता अंकिता भंडारीच्या पालकांचा सीबीआय चौकशीपर्यंत पोहोचण्याचा प्रदीर्घ लढा सुरू आहे.
सोनी देवी आणि वीरेंद्र सिंग भंडारी आता दोन प्रकारचं आयुष्य जगत आहेत… सकाळी शेतकरी आणि दिवसा आंदोलनकर्ते. गेल्या तीन वर्षांपासून १९ वर्षांच्या अंकिता भंडारीचे पालक सकाळी गाईचं दूध काढणे आणि नंतर आपल्या मुलीला न्याय देण्यासाठी लढण्याची दिनचर्या असं आयुष्य जगत आहेत. उत्तराखंडमधील अंकिता भंडारी हत्या प्रकरणाने अख्खा देश ढवळून निघाला होता. १८ सप्टेंबर २०२२ रोजी अंकिताची हत्या करण्यात आली, तिचा मृतदेह २४ सप्टेंबरला सापडला. त्यानंतर तीन वर्ष चार महिन्यांनी मे २०२५ मध्ये कोर्टाने भाजप नेत्याचा मुलगा पुलकित आर्य आणि त्याचे मित्र अंकित गुप्ता, सौरभ भास्कर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कुटुंबाचा आरोप आहे की तिच्यावर लैंगिक अत्याचारही झाला होता.
आता उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्याशी झालेल्या एका भेटीने सोनी देवी आणि वीरेंद्र सिंग भंडारी यांना न्याय आणि तोडगा मिळेल अशी आशा होती. मात्र त्यांचे आयुष्य पुन्हा एकदा उलथापालथे झाले आहे. ७ जानेवारीला बैठकीतून बाहेर पडून रात्रीसाठी सरकारी गेस्ट हाऊसमध्ये पोहोचताच देवींच्या व्हॉट्सअॅपवर सलग मेसेज येऊ लागले; ते वाचून त्या सुन्न झाल्या. एका मेसेजमध्ये लिहिले होते, “आम्ही अंकितासाठी लढा दिला आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटून तडजोड करून आलात.” 
जेवणाची तयारी करत असलेल्या देवींनी ताट बाजूला ठेवले आणि हमसून हमसून रडू लागल्या. रडत त्या म्हणाल्या, “मी मुख्यमंत्र्यांकडे त्याच मागण्या पुन्हा मांडल्या ज्या आम्ही रस्त्यावरून मांडत आलो आहोत. मी कोणतीही तडजोड केलेली नाही. अंकिता माझी मुलगी आहे. पैशांच्या बदल्यात मी तिचा न्याय विकणार नाही. मला माहीत आहे, मी काय गमावले आहे.”
ऋषिकेशच्या वनंतरा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट असलेल्या अंकिताच्या हत्येप्रकरणी उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा आंदोलन भडकले आहे. सहारनपूरच्या अभिनेत्री उर्मिला सनावर, ज्या स्वतःला माजी भाजप आमदार सुरेश राठौर यांची पत्नी असल्याचे सांगतात, त्यांनी त्यांच्याशी झालेल्या संभाषणाची ऑडिओ रेकॉर्डिंग जाहीर केली, ज्यात राजकीयदृष्ट्या जोडलेल्या व्हीआयपी लोकांच्या कथित भूमिकेचा आरोप करण्यात आला. त्यानंतर अंकिताच्या कुटुंबाने विद्यमान सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशी आणि दोषी ठरवण्यात आलेल्या तिघांसह ऑडिओमध्ये नाव आलेल्या व्हीआयपी लोकांच्या कॉल डिटेल्स सार्वजनिक करण्याची मागणी केली. मात्र, राज्य सरकारने अखेर सीबीआय चौकशी मान्य केली असली, तरी अंकिताच्या पालकांसाठी हा विजय अपूर्ण आहे. आदेशात सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीचा समावेश नाही, ज्याची ते मागणी करत होते आणि ज्यामुळे गुन्ह्याशी संबंधित कथित “व्हीआयपी पाहुण्यांचा” खरा चेहरा उघडा पडला असता.
देवींनी कमकुवत पण ठाम आवाजात सांगितले, “हा सोयीचा आदेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी का नाही? सरकार काय लपवू इच्छिते? त्यांना वाटते की आम्ही गावातून आलो आहोत, म्हणून आम्हाला काही कळत नाही.” पण हा आदेश मिळवणेही एक अत्यंत कठीण लढाई होती.
मुख्यमंत्री धामींसोबतच्या बैठकीतील आतली गोष्ट
७ जानेवारीच्या दुपारी पौडीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा फोन आला. त्यांनी सोनी देवी आणि वीरेंद्र यांना सांगितले की मुख्यमंत्री धामी त्यांना भेटू इच्छित आहेत. प्रेशर कुकरच्या शिट्टीच्या आवाजात फोन कट झाला. दुपारी १ वाजता, दाम्पत्य जेवायला बसताच पुन्हा एक कॉल आला. पौडीच्या मुख्य रस्त्यावर त्यांच्यासाठी एक कार उभी असल्याचे सांगण्यात आले. वीरेंद्र म्हणाले, “आम्ही जेवण तसंच सोडलं आणि रस्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी तासभर पायी चाललो, मग कार घेतली.”
बैठकीदरम्यान अंकिताच्या पालकांनी दोन मागण्या मांडल्या: सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशी आणि प्रकरणात कथितरीत्या सहभागी असलेल्या व्हीआयपींची ओळख. बैठकीनंतर अधिकाऱ्यांनी त्यांना आधीच लिहिलेले एक निवेदन स्वाक्षरीसाठी दिले; मात्र वीरेंद्र यांनी त्यावर सही करण्यास नकार दिला. ते म्हणाले, “मी सांगितले की मी माझ्या मागण्या स्वतःच्या हाताने लिहीन. त्यांना वाटले की आम्ही अशिक्षित आहोत.” त्यानंतर पालकांनी तिथेच एक पत्र लिहिले, त्यावर स्वाक्षऱ्या केल्या आणि अधिकाऱ्यांकडे दिले. त्या संध्याकाळी ते सरकारी गेस्ट हाऊसमध्ये परतले. बैठकीतून काय साध्य झाले, हे त्यांना माहीत नव्हते; पण दोघांनाही याचे समाधान होते की त्यांनी हार मानली नाही.
बैठकीनंतर लगेचच मुख्यमंत्र्यांचा एक फोटो व्हायरल झाला, ज्यात ते पालकांच्या खांद्यावर शाल घालताना दिसत होते. सोशल मीडियावर आणि पालकांच्या फोनवर टीकेचा पूर आला. कुटुंबाने लढा सोडला आहे आणि सरकारकडून पैसे घेतले आहेत, असे आरोप झाले. ते न्याय मागायला गेले होते; पण परतल्यावर त्यांच्यावर विश्वासघाताचे आरोप होऊ लागले. वीरेंद्र म्हणाले, “आम्हाला लाच देण्याचे प्रयत्न झाले आहेत, सरकारकडूनही आणि आरोपींच्या वतीने आलेल्या दलालांकडूनही. पण मी कधीही झुकलो नाही.”
सोनी देवीही आता एक लढवय्या कार्यकर्त्या बनल्या आहेत. आंदोलन करत, सत्तेशी संवाद साधत आणि आपल्या मुलीसाठी न्यायाची लढाई लढत. त्या शांत स्वरात म्हणाल्या, “मुख्यमंत्री आमचे राजा आहेत आणि आम्ही आमच्या मुलीसाठी न्याय मागायला त्यांच्याकडे गेलो होतो.” तडजोडीच्या आरोपांनी त्यांना खोलवर अस्वस्थ केले आहे. सचिवालयातून फोन आला की सीबीआय चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. त्यानंतर पालकांनी दोन दिवसांनी आपले पहिले भोजन केले. पण देवी म्हणाल्या, “आम्ही आमच्या वकिलांशी बोललो, तेव्हा कळले की हा आदेश अपूर्ण आहे.”
व्हीआयपींचा प्रश्न
सोनी देवी आणि वीरेंद्र यांच्यासाठी गेल्या दोन आठवड्यांचा काळ जणू दीर्घकाळ धगधगत असलेला ज्वालामुखी फुटल्यासारखा आहे. पौडीतील त्यांचे घर, जिथे नीटशी रस्ताही नाही तिथे वेळ जणू थांबल्यासारखा आहे. दररोज मुलगी अंकिता आणि न्यायाच्या लढ्याबद्दलच चर्चा होते. बाहेर, संपूर्ण उत्तराखंड रस्त्यांवर उतरला आहे. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात झालेल्या राज्य आंदोलनानंतर पहिल्यांदाच लोकांमध्ये इतकी अस्वस्थता दिसून येत आहे. राज्य आंदोलनात सहभागी राहिलेले लोकही आता अंकितासाठी आंदोलन करत आहेत.
१८ सप्टेंबर २०२२ रोजी अंकिताची हत्या करण्यात आली होती आणि सहा दिवसांनी तिचा मृतदेह एका कालव्यात सापडला होता. पुरावे नष्ट करण्यासाठी रिसॉर्टचा एक भागही पाडण्यात आला होता. उत्तराखंड उच्च न्यायालयात दाखल एका याचिकेत, ज्यात जेसीबी चालक दीपक यांचे निवेदन समाविष्ट आहे. असे म्हटले आहे की भाजप आमदार रेणू बिष्ट यांनी ही तोडफोड करण्याचे आदेश दिले होते.
मे २०२५ मध्ये कोटद्वारच्या सत्र न्यायालयाने तीन आरोपींना, रिसॉर्टचे मालक आणि माजी भाजप मंत्री विनोद आर्य यांचा मुलगा पुलकित आर्य, रिसॉर्टचे मॅनेजर सौरभ भास्कर आणि असिस्टंट मॅनेजर अंकित गुप्ता यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या निकालाने हे प्रकरण संपल्यासारखे वाटत होते. डिसेंबरमध्ये सनावर यांनी राठौर यांच्याशी झालेल्या कथित संभाषणाची ऑडिओ रेकॉर्डिंग जाहीर करेपर्यंत प्रकरण शांत झाले होते. या रेकॉर्डिंगमध्ये सनावर यांचा दावा आहे की राठौर यांनी त्यांना सांगितले होते की अंकिताची हत्या यासाठी करण्यात आली कारण तिने दोन व्हीआयपी भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि उत्तराखंड प्रभारी दुष्यंत कुमार गौतम आणि भाजप उत्तराखंड महासचिव (संघटन) अजय कुमार यांना “अतिरिक्त सेवा” देण्यास नकार दिला होता.
विरोधकांनी यानंतर भाजपवर हल्ला चढवला. मुख्यमंत्री धामी यांनी सांगितले की अंकिताच्या हत्येच्या वेळी गौतम उत्तराखंडमध्ये उपस्थित नव्हते. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या दरम्यान, अंकिताचे कुटुंब आणि उत्तराखंडमधील लोक सरकारविरोधात रस्त्यांवर उतरले. देवी म्हणाल्या, “मला राजकारणाशी काही देणेघेणे नाही. सुरुवातीपासूनच आम्ही सीबीआय चौकशी आणि व्हीआयपींची नावे सार्वजनिक करण्याची मागणी करत आलो आहोत. जन्मठेपेच्या शिक्षेनंतरही आम्ही म्हणत होतो की आणखी लोक यात सहभागी आहेत. ही ऑडिओ लीक होईपर्यंत कुणीही आमचे ऐकले नाही.”
राज्य सरकारने व्हीआयपींची नावे घेण्यास नकार दिला असला, तरी अंकिताच्या पालकांनी गप्प बसण्यास नकार दिला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण लढ्यामुळे अखेर धामी यांना त्यांची भेट घ्यावी लागली, पण ती बैठक एका नव्या लढ्याची सुरुवात ठरली.
नुकसानीसोबत जगणे
अंकिताच्या हत्येमुळे आलेल्या उलथापालथीनंतर आणि त्यानंतर तडजोडीच्या आरोपांनंतर, सोनी देवी यांना त्यांच्या राधा या गायीमध्ये एक वेगळाच आधार मिळाला. रात्री असह्य होत असत, जेव्हा १९ वर्षांच्या आपल्या मुलीने काय-काय सहन केले असेल, या विचारांनी त्यांना झोप येत नसे, तेव्हा देवी गोठ्याकडे धाव घेत आणि गायीशी बोलत बसत. देवींनी सांगितले, “राधानेही अंकितासाठी लढा दिला आहे. मी तासन्तास तिच्यासोबत बसत असे आणि तेच मला पुढे लढत राहण्याची ताकद देत असे.” 
मुख्यमंत्र्यांना भेटून घरी परतल्यानंतर त्या थेट आपल्या गायीपाशी गेल्या आणि रडू लागल्या. त्या म्हणाल्या, “मी आवर न राहून रडले. हळूहळू सगळं काही तिच्या कानात सांगितलं,” असे म्हणत त्या आपल्या बोटांकडे पाहत राहिल्या. जणू आपल्या भावना शब्दांत गुंफणं कठीण जात होतं.
देवींसाठी त्यांची गाय आणि त्यांचं कुटुंब हेच त्यांचं संपूर्ण विश्व होतं. त्यांची स्वप्नं फार साधी होती: आपल्या मुलांना मोठं होताना पाहणं आणि त्यांनी कमावू लागणं, जेणेकरून त्या एक दिवस काम करणं थांबवू शकतील. राजकारण आणि सत्तेच्या जगापासून खूप दूर असलेल्या या गावातील स्त्रीला, मुलीच्या मृत्यूने एका अनोळखी जगात ढकललं; पण त्याच वेळी तिच्या आत अशी ताकदही उलगडून दाखवली, जिची तिलाही कल्पना नव्हती, एक शांत, ठाम दृढता. देवींनी स्पष्टपणे दुबळ्या दिसणाऱ्या आपल्या पतीचा हात धरत म्हटलं, “माझ्या आणि माझ्या पतीच्या आत आमच्या मुलीसाठी न्याय मिळवण्याची आग आहे. त्याच्यामुळेच आम्ही जिवंत आहोत; त्याशिवाय आम्ही केव्हाच मेलो असतो.”
त्यांचं आयुष्य पुढे सरकलं नाही. त्यांच्या मोठ्या मुलाचं लग्नाचं वय उलटून जात आहे पण त्यानं लग्न केलं नाही. रोजच्या संभाषणाचं केंद्र अंकिताच असते. देवी अनेकदा बोलता-बोलता थांबतात, भावना दाटून येतात आणि त्यांना चक्कर येऊ लागते. तीन वर्षांपासून त्या पोटात दगडासारख्या वेदनांसह जगत आहेत, पण उपचार करून घेतलेले नाहीत. त्यांचे पती जवळजवळ दररोज आजारी असतात. त्यांची राहणीमानाची स्थिती इतकी वाईट आहे की मुख्यमंत्र्यांना भेटून परतताना वाटेत वीरेंद्र यांच्यावर एका अस्वलाने हल्ला केला. वीरेंद्र म्हणाले, “आमच्या मुलीच्या मृत्यूने आमचं आयुष्य पूर्णपणे उलथवून टाकलं आहे. पुन्हा सामान्य कसं व्हायचं, हेच आम्हाला माहीत नाही.”
शेवटचा संदेश
अंकिताने आपल्या एका मित्राला पाठवलेला शेवटचा संदेश आजही तिच्या वडिलांना भयभीत करतो: “मी गरीब आहे, पण १०,००० रुपयांसाठी स्वतःला विकणार नाही.” हा संदेश तिने एका “व्हीआयपी”कडून मागितल्या गेलेल्या “अतिरिक्त सेवां”च्या विरोधात लिहिला होता. तेव्हापासून ‘व्हीआयपी’ हा शब्द केवळ अंकिताच्या वैयक्तिक वेदनेचाच नव्हे, तर संपूर्ण उत्तराखंडमध्ये उसळलेल्या संतापाचंही प्रतीक बनला आहे. संपूर्ण राज्यात “व्हीआयपींना वाचवणं बंद करा” अशा घोषणांसह आंदोलनं सुरू झाली आहेत. देहरादूनच्या सामाजिक कार्यकर्त्या भावना पांडे, ज्या राज्य आंदोलनाच्या काळातही पुढे होत्या, म्हणतात की हे आंदोलन आता केवळ अंकितापुरते मर्यादित राहिलेले नाही. पर्वतरांगांतून येणाऱ्या त्या सर्व मुलींना वाचवण्याची ही लढाई बनली आहे, ज्यांना पैशांच्या बदल्यात “अतिरिक्त सेवा” देण्यास भाग पाडलं जातं.
पांडे म्हणाल्या, “या मुली गरीब असतात. रोजीरोटी कमावण्यासाठी आणि कुटुंबाचा आधार बनण्यासाठी त्या डोंगरातून येतात, पण हे व्हीआयपी (श्रीमंत-ताकतवर लोक) त्यांच्या मजबुरीचा फायदा आपल्या स्वार्थासाठी घेतात.” यानंतर पेपरमध्ये मथळे झळकले: “अंकिता हत्याकांडातील व्हीआयपी थिअरी काय आहे?” आणि “तो व्हीआयपी कोण आहे?”
देवी सांगतात की अंकिता एक होतकरू विद्यार्थिनी होती. तिने बारावीच्या परीक्षेत ८८ टक्के गुण मिळवले होते. तिच्या शिक्षणाचा खर्च वडिलांच्या शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून आणि कुटुंबाने विकलेल्या दुधातून भागवला जात होता. देवी म्हणाल्या, “ती खूप समजूतदार होती आणि काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न पाहत होती—एक दिवस मैदानी भागात स्वतःचं घर असावं, असं तिचं स्वप्न होतं.” अंकिताचे वडील वीरेंद्र अनेकदा भिंतीकडे पाहत बसतात. विचारात हरवलेले आणि कधी कधी ती शांतता तोडत पुटपुटतात. “माझ्या मुलीने सांगितलं होतं की यात एखादा व्हीआयपी सामील आहे. जोपर्यंत त्या व्हीआयपीची ओळख पटत नाही, तोपर्यंत मला चैन मिळणार नाही.”
(सौजन्य - द प्रिंट, अनुवाद प्रतिक पुरी)






