ज्याला प्रचंड लोकप्रियता आणि लोकाश्रय मिळाला, असे दोन फड महाराष्ट्रात आहेत. पहिला फड आहे वारकऱ्यांचा, तर दुसरा फड आहे तमासगिरांचा अर्थात तमाशाचा. 'वारी आणि बारी' म्हणजेच 'संत आणि तंत' ही महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आहे.
नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावू जगी।।
हेच संतांच्या जीवनाचे उद्दिष्ट्य असल्याचे संत नामदेव महाराज यांनी सांगितले. तर, तमाशा म्हणजे तमातून आशेकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग, असे सांगितले गेले आहे. दोन्हीही लोककला लोकजागरण करणाऱ्या. सुगी संपल्यानंतर उन्हाळ्याच्या यात्रा-उरूसांमध्ये तमाशाचे फड लागतात.
शाहिरी, लावणीमध्ये तमासगीर लोकांचे रंजन करता-करता जीवनाचा बोध सांगतात. तर, मशागत होऊन पेरण्या झाल्या, की वारकरी आषाढी वारीसाठी पंढरीच्या वाटेला लागतात. उन्हाळ्यात यात्रेमध्ये तंबूत तमाशा सादर करणारे तमासगीर, पावसाळ्याच्या तोंडाशी पंढरीच्या वाटेवरील दिंडीत वारकरी बनून सामील होतात.
तमाशातील ढोलकीपटू दिंडीत पखावजवादक बनतात. तमाशात तुणतुणे घेणाऱ्या हातात वारीच्या वाटेवर वीणा असतो. स्टेजवर कडे वाजविणाऱ्या गळ्यात वाटेवर टाळ येतो. गण-गवळण गाणारे वारीच्या वाटेवर तल्लीन होऊन संतांचे अभंग गाऊ लागतात. आणि तमाशात शाहिराला साथ देणारे झीलकरी कीर्तनकाराला साथ देणारे टाळकरी होतात.
सोळा हजारात देखणी
चांद दिसे जणू दर्पणी
मीच एक राधा गवळ्याची
सखे साजणी गं मीच एक राधा गवळ्याची
ही शाहीर पठ्ठे बापूराव यांची तमाशात सादर होणारी एक रचना. तर,
राधे तुझा रंग पाहुनी। कृष्ण दंग झाला।
वेणी फणी करुनी चांग। काजळ कुंकू ल्याली भांग।
अंगामध्ये चोळी तंग पदर सावरीला।।
ही संत साहित्यातील एक गवळण. आश्चर्य म्हणजे ‘सोळा हजारात देखणी’ आणि ‘राधे तुझा रंग पाहुनी’ या दोन्ही गवळणींची चाल एकच असते. भजनात सादर होणारी संतांची गवळण आणि ढोलकी फडाच्या तमाशा आणि संगीत बारीत सादर होणारी पठ्ठे बापूराव यांची गवळण या दोघींची जातकुळी एकच. संत आणि तंतांच्या या दोन्ही गवळणी म्हणजे जणू सख्ख्या बहिणीच.
संत साहित्यातील गवळणी, विराण्या आणि तंत साहित्यातील गवळणी या दोहोंमध्येही भक्ती आणि शृंगार या दोन्ही रसांचा प्रत्यय येतो. हे टाळ आणि चाळाचे नाते पिढ्यान् पिढ्यांचे आहे. थेट कान्होपात्रेच्या अभंगांपासून अथवा त्याही मागच्या काळात जायचे म्हटले तर, भगवान शंकराचा अनुनय करणाऱ्या पार्वती मातेच्या लास्य नृत्यापर्यंत.
तांडव नृत्य आणि पार्वतीचे लास्य नृत्य म्हणजे जणू शिवशक्ती समावेशन, प्रकृती-पुरुष समावेशन. भक्ती आणि शृंगाराच्या या दुहेरी छटांच्या मागे भारतीय संस्कृतीतील पुरुष प्रकृती द्वंद्व आणि नंतरची समरसता यांचे रहस्य दडले आहे.
आतून कीर्तन वरून तमाशा…
आषाढी एकादशीला पंढरीला निघालेल्या पालख्या पुणे-सोलापूर रोडवरून जाताना ‘चौफुल्या’ला थांबतात. चौफुल्याच्या न्यू आंबिका कला केंद्रावर भक्ती आणि शृंगाराचा जणू गोपाळकाला होतो. या गोपाळकाल्यात अभंग आणि लावणी दुधातील खडीसाखरेप्रमाणे विरघळत जातात.
अवघा रंग एक होतो. न्यू आंबिका कला केंद्राचे मालक अशोक जाधव आणि त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांनी वारकऱ्यांना अन्नदान करण्याची परंपरा वर्षानुवर्षे सांभाळलेली आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने वारकऱ्यांसाठी पायघड्या टाकल्या जातात. रांगोळ्या काढल्या जातात. त्यांना ओवाळले जाते आणि त्यांच्यासाठी लावणीचा कार्यक्रम आयोजित केला जातो.
विशेष म्हणजे या लावण्या भक्तीपर असतात. त्या संतांच्या आणि तंतांच्या म्हणजे शाहिरांच्या असतात. ‘वारीयाने कुंडल हाले डोळे मोडीत राधा चाले’ किंवा गोकुळाला बाई गोकुळाला
लावी वेड तुझा कान्हा
घरोघरी घाली बाई धिंगाणा
किंवा त्याही पुढे जाऊन
पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ बांधूनी
गाठ बाय कोणाला सुटेना यशोदे बाळा तुझा कान्हा
या अशा संतांच्या गवळणी म्हणजे, संत साहित्य आणि लोकसाहित्य यांचा भीमा-भामा संगम होय. आषाढी वारीतील संगीत बारी याच गोष्टीचे प्रत्यंतर देते.
संतविचारांचा प्रसार करणारे तमाशा कलावंत
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील विठाबाई नारायणगावकर यांचे नारायणगाव म्हणजे, चाळ आणि टाळ यांचा सुरेख संगम. या परिसरातून आषाढी वारीसाठी दिंड्या निघतात. पुढे शिमग्यानंतर ढोलकी फडाच्या तमाशाच्या राहुट्या सजतात.
माझा व्यक्तिगत अनुभव सांगतो, पंढरपूरच्या विठ्ठल मुक्तीच्या लढ्यात जे सहभागी झाले, ते थोर वारकरी कीर्तनकार हरिभक्त परायण रामदास बाबा मनसुख माझ्या वडिलांना नेहमी म्हणायचे, ''सहाद दादा तुमचा प्रकाश भंजाळला आहे. एका बाजूला माझी मुलाखत घेतो आणि दुसऱ्या बाजूला विठाबाईकडे जाऊन तिची मुलाखत घेतो.''
माझे वडील हसून रामदास बाबांना म्हणत, ''तो त्याचा अभ्यासाचा विषय आहे.'' पुणे जिल्ह्यातील नारायणगावसारख्या अनेक गावांमध्ये ढोलकी फडाच्या तमाशाची घराणी होती आणि आजही आहेत. ज्यामध्ये भाऊ बापू नारायणगावकर, दगडू बाबा साळी, दत्तोबा तांबे शिरोलीकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, दत्ता महाडिक, तुकाराम खेडकर अशा अनेक ढोलकी फडाच्या तमाशांचा समावेश आहे. यातील बहुतांश कलावंत हे माळकरी होते. पंढरीचे वारकरी होते.
जुन्नर, नारायणगाव ही पंढरीची वारी करणाऱ्यांची भूमी, तशीच बारी अर्थात तमाशा कलावंतांची भूमी. संत तुकाराम महाराजांचे गुरू श्री चैतन्य महाराजांची पालखी सुरू करणारे ह.भ.प. सहादूबाबा वायकर हे वारकरी सत्पुरुष या भागात होऊन गेले. सहादूबाबांनी अनेक लोककलाकार आणि तमाशा कलावंतांना वारकरी संप्रदायात सामावून घेतले.
त्यांना विठ्ठलभक्तीचा कानमंत्र दिला. त्यांना सोबत घेऊन पंढरपूरच्या वाऱ्या केल्या. सर्वांना सामावून घेणाऱ्या समचरण विठोबाचे दर्शन घडविले. राष्ट्रपतीपदक विजेते सुप्रसिद्ध तमासगीर भाऊ बापू नारायणगांवकर हे बाबांचे अनुयायी झाले. ते नित्यनेमाने देहूची वारी करत.
भाऊंच्या मुलीचा पंढरपूरच्या यात्रेत जन्म झाला, म्हणून त्यांनी तिचे नाव विठाबाई ठेवले. विठाबाई पुढे विख्यात तमाशा कलावंत म्हणून त्या देशभर प्रसिद्ध पावल्या.
सांगलीच्या वाळवा तालक्यातील गुल मोहम्मद अर्थात गुलाबराव बोरगावकर हे तमाशातील विनोदसम्राट म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकरसह विनोदसम्राट गुलाबराव बोरगावकर तमाशा मंडळ या मंडळांची स्थापना केली.
त्यातून त्यांनी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माउली यांच्या साकारलेल्या भूमिका फार गाजल्या. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नेतवड या गावचे बाळ आल्हाट नेतवडकर यांनीही तमाशातून संत तुकाराम महाराज, संत कान्होपात्रा, वाल्ह्या कोळी आदी वग सादर केले. त्यांचे वडील वामन भागूजी आल्हाट एकतारी भजन गाणारे नामवंत वारकरी भजनी होते.
चंद्रकांत ढवळपुरीकर हेही तमाशा क्षेत्रातील एक बुजुर्ग कलावंत. त्यांनी दत्ता महाडिक पुणेकर यांच्याबरोबर तमाशा सुरू केला. ʽवगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकरसह दत्ता महाडिक पुणेकर’ या नावाने हा तमाशा सुपरिचित झाला. याच तमाशात ढवळपुरीकरांनी ʽसंत तुकाराम' हा धार्मिक वग बसविला. या वगाने त्यांना खूप प्रसिद्धी मिळवून दिली. तमाशा मंडळही आर्थिकदृष्ट्या सबळ झाले.
ʽसंत तुकाराम' या वगाची प्रसिद्धी केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित राहिली नाही तर, गुजरातमध्येही या वगाचे प्रयोग झाले. 'ज्ञानेश्वर माझी माउली', 'भक्त पुंडलिक यांसारखी धार्मिक वगनाट्येही ढवळपुरीकरांच्या तमाशाने दिली.
आजही अनेक तमासगीर हे वारकरी संप्रदायातील माळकरी, टाळकरी आहेत. यामध्ये तमाशा फडमालक रघुवीर खेडकर, दत्तोबा मोडक तळेगावकर, हनुमंत सरड अण्णापूरकर, जगन्नाथ शिंगवेकर, एकनाथबुवा टाकळीकर, गंगारामबुवा कवठेकर, सदाशिव साठे अशा अनेक तमाशा कलावंतांचा समावेश आहे. ‘डोईचा पदर आला खांद्यावरी’ ही प्रचिती देणाऱ्या संत जनाबाईंचे वग अनेक तमाशांमध्ये सादर होत होते.
संत ज्ञानेश्वर माउली, तुका झालासे कळस, संत गोरोबा कुंभार, संत कान्होपात्रा अशा अनेक संतांचे वग आळंदी, पंढरीच्या यात्रेत सादर होत होते, आजही सादर होतात. कविवर्य रामदास फुटाणे नेहमी म्हणतात, ''हा महाराष्ट्र तमाशाने बिघडला नाही आणि कीर्तनाने सुधारला नाही.'' तमाशाने बिघडला नाही हे खरे आहे, पण कीर्तनाने मात्र तो निश्चितच सुधारला आहे.
आणि महत्त्वाचे म्हणजे, संत तुकाराम महाराज आणि अन्य संतांचे समता-बंधुभावाचे विचार तमाशाने खेडोपाड्यांतील जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवले आहेत.
(‘ज्ञानबातुकाराम’ 2024 या वार्षिक अंकातून साभार)






