‘भाषा मरता देशही मरतो
संस्कृतीचाही दिवा विझे’
असे कुसुमाग्रजांनी लिहून ठेवले आहे. ‘आपण नेहमी असे म्हणतो की, भाषा ही सामाजिक संस्था आहे. भाषेद्वारा माणसे एकमेकांशी संपर्क साधतात, म्हणजेच माहिती, ज्ञान, विचार, अनुभव, भावना यांची देवाण-घेवाण करतात. म्हणजेच मानवाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज काळ वेगाने बदलतोय. बहुसंख्य पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवीत आहेत. मराठी शाळा बंद पडत आहेत; हे वास्तव आहे.
माहिती तंत्रज्ञान, जागतिकीकरण, प्रसार माध्यमांचा वाढता प्रभाव यामुळे मातृभाषेकडे दुर्लक्ष झाले आहे, मात्र त्यासाठी व्यवस्थेला दोष देण्याचे कारण नाही. अंतिमत: ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे,’ असे विचार ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ आणि भाषाशास्त्राच्या अभ्यासक यास्मिन शेख नेहमीच व्यक्त करत असतात. शेख यांनी भाषेच्या विकासाचा प्रवास व्याकरणातील सोप्या संकल्पनेतून आनंददायी केला.
आज हे ज्ञानव्रती ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व शंभरीत पदार्पण करीत आहे. त्यांची ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ आणि ‘मराठी शब्द लेखनकोश’ ही दोन पुस्तके व्याकरण क्षेत्रात प्रमाण मानली जातात. त्यांनी निवृत्तीनंतर भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांना दहा वर्षे व्याकरण आणि भाषाशास्त्र शिकवले. आजही वयाच्या 99व्या वर्षीही देशातील, परदेशातील अनेक लोकांच्या मनातील भाषेविषयीच्या प्रश्नांना त्या उत्तरे देत असतात. त्यामुळे त्यांना मराठीतील ‘व्याकरण सल्लागार’ म्हणून लोकप्रियता मिळाली.

शास्त्रशुद्ध विचारांची बैठक
प्रा.यास्मिन शेख यांना मराठी भाषेच्या जिव्हाळ्याबरोबर शास्त्रशुद्ध विचारांची बैठक लाभली ती त्यांच्या शालेय जीवनातच. नाव यास्मिन अझीझ अहमद शेख. पूर्वाश्रमीच्या जेरुशा जॉन रूबेन. जन्माने ज्यू असलेल्या जेरुशा रूबेन यांनी अझीझ अहमद शेख यांच्याशी लग्न केले. हे लग्न जमविण्यात मराठीतील ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर यांनी पुढाकार घेतला होता. प्रा. शेख यांची मराठी भाषेची आवड पंढरपूरच्या आपटे प्रशालेत चळेकर सरांनी वृद्धिंगत केली आणि सर परशुराम महाविद्यालयात शिकत असताना प्रा. श्री. म. माटे यांनी मराठी भाषेच्या व्याकरणाची गोडी लावली.
घरात आई-वडील मराठीत बोलायचे, दोघांनाही मराठी पुस्तके वाचनाची आवड होती. किर्लोस्कर, स्त्री, सत्यकथा, यशवंत अशी अनेक मराठी मासिके घरी येत असत. बी. ए.ला त्या सर्व विषयांत, सर्व विद्यार्थ्यांत सर्वप्रथम आल्या. त्यांना फेलोशिप मिळाली. याचा प्रा. माटे यांना इतका आनंद झाला की, ते म्हणाले, ‘‘जेरुशा, मला जर मोठा मुलगा असता, तर मी तुला माझी सून करून घेतली असती.’’ हे सांगताना 98व्या वर्षीही त्यांचा गोरापान चेहरा अधिकच गुलाबी होतो.
यास्मिन यांनी मुंबईला शीव येथे एस. आय. ई. एस. महाविद्यालयात 25 वर्षे मराठी भाषेचे अध्यापन केले; तत्पूर्वी औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात दोन वर्षे मराठी भाषेचे अध्यापन केले होते; तेथे त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरीतील काही अध्याय शिकवले. संपादक भानू काळे यांच्या ‘अंतर्नाद’ या मराठीतील लोकप्रिय मासिकाचे व्याकरण-सल्लागार म्हणून 26-27 वर्षे काम केले. त्या म्हणतात, ‘भाषेला धर्म नसतो. तुम्ही ज्या राष्ट्रात जन्माला येता, वाढता, त्या राष्ट्राची भाषा तुमची मातृभाषा असते. मराठी भाषा माझी मातृभाषा आहे. माझे मराठीवर नितांत प्रेम आहे. मराठी भाषेचे जतन, संशोधन आणि संवर्धन करणे मला आवडते. वयाच्या 98व्या वर्षीही मी आनंदाने मराठीची सेवा करते आणि करत राहीन.’
संवेदनशील व्यक्तिमत्त्व
मराठी भाषेचे व्याकरण आणि भाषाशास्त्र समृद्ध होण्यात प्रा. श्री.म. माटे यांचा मोलाचा वाटा आहे, असे त्या कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतात. त्यांची कन्या डॉ. शमा भागवत यांच्या बाणेरच्या ‘रिव्हिरेसा’ सोसायटीतील घरात आमची गप्पांची मैफल रंगते. त्यांचा फोन येतो. आयुष्यातील छान आठवणी, वेगवेगळे प्रसंग सांगायचे असतात. ‘मराठी शब्दलेखन कोश’ या पुस्तकासाठी त्यांना 2008 चा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. डॉ. अशोक केळकर यांच्या नावाने दिला जाणारा एक लाखांचा ‘भाषाभ्यास पुरस्कार’ही मिळाला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. प्रा. यास्मिन शेख यांचे व्यक्तिमत्त्व साधे, शालीन आणि सात्त्विक आहे. आपण भाषाशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक आहोत, व्याकरणतज्ज्ञ आहोत याचा किंचितही अभिमान किंवा गर्व नाही. अतिशय संवेदनशील असे व्यक्तिमत्त्व आहे.

सामान्य माणसांना, मुलांना कार्यात्मक व्याकरण सहजपणे कळावे, अशी काळजी घेऊन त्यांनी लेखन केले. भरपूर शब्दसंपत्ती, अनेक प्रकारची वाक्यरचना, विविध विषयांची मांडणी मुलांच्या कानावर पडली पाहिजे, डोळ्यांना दिसली पाहिजे आणि मुलांना स्वत:च्या बोलण्यात आणि लिहिण्यात ती भाषा वापरण्याची संधी मिळाली पाहिजे, ही त्यांची भाषा शिकवताना भूमिका होती. बोलीभाषेचे महत्त्व त्यांना मान्य आहे. त्यामुळे भाषेत एक सच्चेपणा, जिवंतपणा येतो; पण निवेदन करताना, वैचारिक लेखन करताना सर्वांना समजेल अशी प्रमाणभाषाच वापरली पाहिजे, याबाबत त्या आग्रही आहेत. त्यांची ही भूमिका समजून घेण्यासाठी ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ या त्यांच्या पुस्तकाचे प्रास्ताविक वाचावे.
माझ्याशी त्यांना ‘भाषा आणि भाषिक व्यवहार’ याविषयी खूप बोलायचे असते. एकदा मला माझे तीनशे पानांचे पुस्तक मुद्रित-शोधनाला द्यायचे होते. मी विचार करत होतो की, वयाच्या 98व्या वर्षी त्यांना कशाला त्रास द्यावा? मी नम्रपणे त्यांना हे सांगितले, तर त्या म्हणाल्या, ‘‘दिलीप, मी तुला वयोवृद्ध वाटते? बोलताना मी काही विसरते? माझा बोलताना एखादा शब्द चुकतो का? मग तू असं का विचारतोस?’’ मी यावर काय बोलणार! गेली अनेक दशकं ज्यांनी मराठी भाषेच्या व्याकरणाचा नंदादीप सदैव तेवत ठेवला, त्या आपल्या बोलण्याने आणि वागण्याने वयाचे व ज्ञानाचे अंतर संपवून टाकतात. या ऋषितुल्य ज्ञानव्रतीसमोर वाकून नमस्कार करताना त्या माझ्या डोक्यावर हात ठेवतात, तेव्हा काळजावर अमृताची धार पडल्यासारखे वाटते. अशा प्रा. यास्मिन शेख यांच्या शंभराव्या वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य लाभावे हीच प्रार्थना.
(सौजन्य: दै. सकाळ)






