“ज्या देशाचा युवा वर्ग नैराश्याच्या गर्तेत असतो त्या देशाचे भविष्य अंधकाराच्या दिशेने वाटचाल करत असते.” म्हणून नुकत्याच जाहीर झालेल्या “भारतीय रोजगारी अहवाल (IER) -2024” नुसार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या तरुणांची संख्या दुप्पटीने वाढलेली असतानाही भारतातील बेरोजगारीचे प्रमाण 83% असणे हे जगातल्या सर्वांत तरुण देशाकडे पाहताना ही नैराशश्याची अंधकारमय भीती अजूनच दृढ होतं जाते.
“कुठलंही स्वप्न पाहणं. ते सत्यात उतरवण्यासाठी शेवटपर्यंत झटणं कधीही वाईट नाही.” हे प्रथमतः स्पष्ट केलेलं बरं. पण अलीकडेच स्पर्धापरीक्षेसाठी अनेक वर्ष घालवूनही अपयश पदरी पडलेल्या चंद्रकांत पाटील या नावाच्या एका 34 वर्षांच्या उच्चशिक्षित तरुणाने आत्महत्या केली. स्वतःच्या मृत्यूच कारण लिहीताना “वाढत्या वयासरशी मिळतं गेलेलं अपयश, आपल्या माणसांची स्वप्न पूर्ण नं करू शकल्याचे शल्य आणि अनेक वर्षांपासूनच नैराश्य आणि असमाधाची भावना!” अशा आशयाची स्वतःलाच दबाबदार ठरवणारी “सुसाइड नोट” (मृत्यूपत्र) त्याने लिहून ठेवली. अधिकारी झालेल्या तरुणांच्या झगमगाटापुढे एरवी नेहमीच दुर्लक्षित राहिलेली -स्पर्धा परीक्षा करणाऱ्या किंवा त्यात अपयशी झालेल्या लाखो तरुण विद्यार्थ्यांची ही नैराश्यग्रस्त मानसिकता मात्र अशीच पडद्याआड झाकोळली जाते. अशा बिघडलेल्या सामाजिक स्वास्थ्याबाबत योग्य ती उपाययोजनापर चर्चा होणं खूप महत्वाच आहे.

स्पर्धा परीक्षा करतं असताना सर्व काही सोडून अनेक वर्ष रुक्ष वातावरणात अभ्यास करावा लागतो. कधी आर्थिक कधी मानसिक तर कधी शारीरिक अडचणींना सामोरे जात येवढ्या वर्ष संघर्ष करूनही यश मिळत नाही त्यामुळे सतत नैराश्यात असणं हे नेहमीच होवून जातं. स्वतःच्या सामर्थ्यावरचा विश्वास हळूहळू नाहीसा होत जातो. येवढे वर्ष घालवल्यानंतर इतर क्षेत्रात पुढाकार घेऊन काही करण्याची मानसिकता उरत नाही त्यामुळं अजून काही वर्ष तोच मार्ग चोखाळला जातो.
तश्याच ताणतणावात अभ्यास सुरू असताना चांगल्या प्रकारे भूमिका पार पाडली जात नाही आणि पुन्हा यश हुलकावणी देतं राहिलं तर अजून आपल्यातच काहीतरी कमीपणा आहे किंवा नेहमी आपल्याकडूनच काहीतरी चूका होतं असाव्यात म्हणून पुन्हा स्वतःलाच कोसलं जात. आर्थिक चणचणीवर मात करतं इतकी वर्ष वाया घालवूनही काही साध्य होतं नाही म्हटल्यावर नातेवाईक-समाजाकडूनही टोकलं जात. मैत्रगोतावळा तसेच नातेवाईक यांच्यात असलेल्या संबंधांत दरी निर्माण होऊन एकटेपणाची जाणीव वाढीस लागते. चिखलात रुतून राहिल्याची किंवा कुठल्याशा गर्तेत अडकल्याची भावना ही भावना आतून पोखरून टाकते.
तश्याच नैराश्याच्या अवस्थेत मग अनेक तरुण काही दूसरे मार्ग अवलंबतातंही पण अधिकारीच होणं किंवा सरकारी नोकरी म्हणजेच काय तो “आयुष्याचा वसंत” ही इतके वर्ष सजवलेली धारणा तशीच राहते. इतर क्षेत्राविषयीचा दृष्टीकोन संकुचित किंवा दुय्यम होतं जातो. पुन्हा त्यातही अपयश आलं तर “पुढे काय?” ही भीतीही स्पर्धा परीक्षेतील सततच्या अपयशामुळे निर्माण होत जाते. तश्यातच निर्माण होणाऱ्या सामाजिक, आर्थिक, मानसिक अडचणींतून पुन्हा नैराश्याची भावना वाढीस लागून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोनच नकारात्मक होतो. हा दृष्टीकोन निर्माण होणं कुठल्याही अपयशापेक्षाही अत्यंत घातक असतो आणि कधी कधी त्यातूनच “आता आपलं काही उरलं नाही किंवा आपण कुणासाठी काहीच करू शकलो नाही.
आपण शून्य उपयोगाचे आहोत!” म्हणून आयुष्य संपवण्यापर्यंतच टोकाचं पाऊल चंद्रकांतसारख्या समंजस अश्या विद्यार्थ्यांकडूनही उचललं जातं. तेंव्हा मग अनेक प्रश्न पडू लागतात. त्यांच्या या अवस्थेसाठी आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय कारणांचे अनेक कंगोरे जबाबदार आहेत.
प्रथमत: शिक्षणपद्धती बाबत बोलायच झालं तर आपल्याकडे भारतात सामान्य शिक्षण पद्धती ही गुणाधारित असल्याकारणाने “हवे तेवढे घोकायचे आणि परीक्षेत जाऊन ओकायचे” यावर अवलंबून आहे. अश्या पद्धतीतून पार पडलेल्या शालांत परीक्षांत उत्तीर्ण झाल्यानंतर गावोगावच्या सामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना आजही सामाजिक प्रतिष्ठा, स्थैर्य असलेल्या “सरकारी नोकरी”नावाच्या यंत्रणेचा सरळ उपलब्ध मार्ग साधा सोप्पा वाटतो. फक्त त्यात शिरण्यापुरतीच काय ती कसरत करावी लागते. नंतर “आमदार झाल्यासारखीच” भावना! त्यात जेवढं उच्च अधिकारी पद मिळवाल तेवढी प्रतिष्ठा, सत्ता, संपत्ती, लग्नपद्धती सर्व काही वरच्या दर्जाच मिळतं असेल तर कुणीही सामान्य-बेरोजगार-पदवीधर पाच-दहा वर्ष त्यासाठी देण्यास तयार असण्याची शक्यताच जास्त.
काही अपवाद वगळता सामान्य घरातल्या लाखो तरुणांना इतर क्षेत्रात असलेली अनिश्चितता, पायाभूत सुविधा, मुख्य म्हणजे आर्थिक भांडवलाचा अभाव, खाजगी क्षेत्रातली छूपी वशिलेबाजी, जातीय उच्च-निच्चतेतून येणारी असुरक्षितता, तसेच कौटुंबिक पार्श्वभूमीनुसार आत्मविश्वासाची असलेली कमतरता, पाठबळ, आर्थिक धोरण बिघडण्याची भीती, इत्यादी उठाठेवी करण्यापेक्षा निमकौशल्याधारीत उच्च शिक्षण घेतलेले विशेषत: ग्रामीण पार्श्वभूमी असलेलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाच गोड वाटायला लागते. त्यात आपल्या गावच्या पंचक्रोशीतला कुणी अथवा नातेवाईक याच मार्गक्रमनाने अधिकारी झाल्यास या स्पर्धेस अजूनच बळकटी प्राप्त होतं जाते. यात प्रामुख्याने ग्रामीण सामाजिक पार्श्वभूमी असलेले उमेदवारच जास्त. त्यात मोबाईल फोनवर सुरू झालेली शिकवणी आणि माहितीचे सहज उपलब्ध भांडार यामुळे गोष्टी सहज पोचत्या झाल्या.

माहितीचा प्रसार होणं आणि ती शेवटच्या घटकापर्यंत पोहचण ही अत्यंत स्तुत्य गोष्ट! पण सरतेशेवटी शे-पाचशे इतक्या तटपुंज्या जागांसाठी दहा-वीस लाख उमेदवारांची तिकडेच रिघ लागणे ही कुठल्याही समतोलास धरून नाही. त्यामुळेच “लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा”(Demographic Dividend) होलही बिघडत जातोय. ऐन उमेदीच्या काळात राष्ट्राच्या प्रगतीस हातभार लावण्याऐवजी ही तरुणाई स्पर्धा परीक्षांत अडकून बसलेली. यातल्या 99 टक्के लोकांसाठी ही स्वप्ने म्हणजे फक्त मृगजळच! ही त्यातही स्विकारण्यायोग्य सत्यता. त्यात “निवडणूकांचा हंगाम तेवढा सरकारी नोकऱ्यांच्या भरतीचा हंगाम.
बाकी सगळा शिमग्याचाच काळ” ही पद्धती रुजवण्यात भारतीय लोकप्रतिनिधिंचा मोठा हातभार आहे. उलटं ती जितकी जास्त रुजत जाईल तितका त्यांचा राजकीय स्वार्थ. निवडणूकांच्या तोंडावर मग नुसत्याच गलेलठ्ठ आकड्यांची भरती केली म्हणून जाहीरनामे मिरवायचे. आरक्षणासाठी जाती-जातींत भांडणे लावून प्रलोभने तेवढी द्यायची पण त्या उरलेल्या 99 टक्के युवकांच्या हाताला रोजगार मिळवण्यासाठी आधुनिक कौशल्यपूर्ण पायाभूत शिक्षण मिळवण्यासाठी काहीही प्रयत्न करायचे नाहीत. इतर देशांप्रमाणे आपल्या आवडीच्या कुठल्याही क्षेत्रात उतरताना भारतीयांना हजार वेळा विचार करावा लागतो यामागे इथली ही राजकीय उदासिनताही तेवढीच कारणीभूत आहे.
जर या तरुणांकडे आजच्या जगतास आवश्यक चार-दोन कौशल्य असतील तर त्यांना कुढत बसत आयुष्याची उमेदीची वर्ष स्पर्धा परीक्षेसारख्या अनिश्चित क्षेत्रात वाया घालवावी लागणार नाहीत.औद्योगिक किंवा सेवा क्षेत्रातले बाकीचे पर्याय उपलब्ध झाल्यास किंवा तिकडे जास्त चांगल्या संधी निर्माण केल्यास स्पर्धा परीक्षेतील “लोकसंख्याशास्त्रीय लाभांशा”चा समतोल राखला जावू शकेल.
सर्व क्षेत्रात आर्थिक संधी आणि समान प्रतिष्ठा प्राप्त होण्यासाठी सामाजिक स्तरावरूनही काही पुढाकार घेण्यात यायला हवेत. पालकांनीही आपला दृष्टीकोन बदलायला हवा. तरुणांनी स्पर्धा परीक्षेतील अपयशाला जास्त मनावर नं घेता एखाद स्वतःला ओळखून आणि वेळेची एक विशिष्ट सीमारेषा आखूनच नियोजन करावे. तसेच सर्व क्षेत्राबाबत लवचिक भूमिका बाळगायला हवी. परंतू “हेच काय ते जीवन!” असं मानण्याची गरज नाही आणि उद्या अपयश पदरी पडलं तरीही खिलाडू वृत्तीने इतर क्षेत्रात प्रवेश करावा.
स्पर्धा परीक्षेत अगदी अंतिम टप्प्यात पोचलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित खाजगी क्षेत्रात त्यांच्यातील असलेल्या कौशल्याधारीत नोकरीची व्यवस्था करण्यासाठी सरकारनेही ठोस पाऊले उचलावीत. नैराश्य, एकटेपणा, रोजगाराच्या नवीन संधी यांसारख्या सामाजिक विषयांवर वारंवार सखोल चर्चा व्हावी यात प्रामुख्याने सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावेत. अशा प्रकारे आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक उपाययोजना करून लाखो तरुणांना नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढून शाश्वत सुखी समृद्ध समाज निर्माण करून सर्वात तरुण देशाची वाटचाल विकसित राष्ट्राकडे करावी!






