‘नागकिन्नरी’ ही किशोर तरवडे यांची कादंबरी. लिंगभेदाच्या पलीकडील माणूस ओळखणाऱ्या आपल्या आईला त्यांनी ही कादंबरी अर्पित केली आहे! आणि ही कादंबरी आहे देखील तशीच! त्यायोगे लिंगभेदाच्या पलीकडचा माणूस आपण पाहू शकतो, नि स्वतःला नव्याने ओळखू शकतो! या कादंबरीविषयी अधिक सांगण्याआधी एक महत्वाची नोंद इथे द्यावी वाटते. आजही समाजाला वाटते की सकल किन्नर जन्मजात देहदोष घेऊन येतात. वास्तवात हे गैरसमज आहेत. प्रत्यक्षात ती त्यांची अंतःकरणीय भावना असते. सद्यकालच्या विमनस्क सामाजिक परिस्थितीमुळे गोंधळून जाऊन स्त्रीत्वाकडे झुकलेले किंवा स्त्रीसदृश वर्तनाची ओढ असणारे तरुण मोठ्या प्रमाणात स्वतःला किन्नरांच्या जत्थ्यात सामील करून घेताना दिसतात.
किन्नरांचा इतिहास रंजक आहे असे म्हणणे म्हणजे त्यांच्या तपस्येची अवहेलना होईल! त्यांचा इतिहास टोकदार वेदनेचा आहे ज्याची परिणती तृप्ततेत होते असं म्हणणं उचित ठरेल. त्यांच्या अनेक प्रथा परंपरांची ‘चविष्ट’ चघळण आपल्याकडे सतत सुरु असते! त्यांचा देहअभिनिवेश जाणून घ्यायचा असेल तर केवळ विवाह परंपरेचा उल्लेखही पुरेसा ठरेल. किन्नरांचा आयुष्यात एकदा विवाहही होतो! मात्र हे लग्न एक दिवसाचे असते. या विवाहाची कथा महाभारताशी संबंधित आहे.
या कथेनुसार गंगा नदीतील जलसर्पांचा राजा कौरव्य याच्या उलूपी ह्या नागकन्येशी वनवासात असणाऱ्या अर्जुनाचा विवाह झाला आणि त्याच्यापासून जन्मलेला पुत्र इरावन होय. (इरावन हा किन्नरांचा देव! ही उलूपी अर्जुन सदेह स्वर्गाच्या मार्गावर जाईपर्यंत त्याच्या सोबत होती) महाभारतानुसार कुरुक्षेत्रात अठरा दिवस चाललेल्या पांडव – कौरव युद्धात पांडवांचा विजय व्हावा म्हणून इरावनने स्वतःला कालीमातेस अर्पण केले, आपले अंगदान केले. शिवाय आपले शिर धडापासून अलग केले. त्याच्या या निश्चयामुळे कृष्णाने त्याला जीवदान दिले. मात्र इरावनने ते नाकारत मरण्याआधी विवाहाची इच्छा व्यक्त केली.

पांडवांकडून लढणाऱ्या एकाही व्यक्तीने आपल्या कुळातील स्त्री त्याच्यासाठी देऊ केली नाही शेवटी त्याच्या या इच्छेला कृष्णाने होकार दिला. इरावनच्या इच्छापूर्तीसाठी श्रीकृष्णाने जे स्त्रीरूप धारण केले ते म्हणजेच मोहिनी ! (कृष्णाने धारण केलेले हे स्त्रीरूप इतके देखणे होते की आजही मोहिनी या शब्दाचा अर्थ एखाद्यावर गारुड होणे असा घेतला जातो) धडावेगळे शिर झालेल्या जखमी अवस्थेतील इरावनास कृष्णाने आणखी एक वरदान देत अशी दिव्य दृष्टी दिली होती की ज्यायोगे त्याला कुरूक्षेत्रातील घटना डोळ्यासमोर दिसत होत्या. जसजसे युद्ध पुढे गेले तसतसे त्याच्या निखळून पडलेल्या डोक्याचे भेंडोळे मोठे होत गेले आणि अठराव्या दिवशी पांडवांच्या विजयानंतर जखमी अवस्थेतील इरावनचा मृत्यू झाला.
इरावनचे मस्तक आजही दक्षिणेकडील अनेक देवळात दर्शनी भागात लावलेले आढळते. त्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर संकटे कमी होतात आणि संततीप्राप्ती होते असे दक्षिण भारतात मानले जाते. इरावनने स्वतःच्या सत्वाचा त्याग करून सत्याच्या विजयासाठी देह पणाला लावला आणि देवाच्या सांगण्यावरून स्त्री देह धारण केला, त्या नंतर साक्षात कृष्णाने त्याच्याशी विवाह केला या आख्यायिकेमुळे इरावन हा किन्नरांचा देव आहे. ते स्वतःला त्याची पत्नी मानून त्याच्याशी लग्न करतात. आजही तामिळनाडूमधील कुवागम या गावामध्ये तमिळ नववर्षाच्या पहिल्या पौर्णिमेपासून अठरा दिवसाचा हा सोहळा चालतो ज्यात किन्नर इरावनशी विवाहबद्ध होतात. महाभारतात अर्जुनाने घेतलेले बृहन्नडेचे रूप आणि स्त्री असूनही पुरुषाप्रमाणे वाढलेला शिखंडी ही उदाहरणे किन्नर नेहमीच देतात.
कुवागम येथे होणाऱ्या लग्नविधीस जगभरातून किन्नर येतात. अठरा दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात पहिले सोळा दिवस नाचगाणे चालते. त्यात गोल रिंगण बनवून सगळे किन्नर ठेक्यात टाळ्या वाजवत यात सामील होतात. आनंदाने नाचगाणे करत करत लग्नाची तयारी केली जाते. या काळात हसतमुखाने विविध चित्कार करून आपल्या मनातील ख़ुशी ते प्रकट करतात. सतराव्या दिवशी किन्नराचे इरावनच्या मूर्तीशी मंदिराचे पुजारी किन्नराच्या गळ्यात पिवळ्या धाग्याचे मंगळसूत्र बांधून, इरावनास नारळ चढवून किन्नराचे विधिवत लग्न लागते. अठराव्या दिवशी इरावनच्या मूर्तीला गावातून मिरवले जाते. गावभर मिरवल्यानंतर आधी मूर्तीच्या गळ्यातले हार शोकगृहापाशी उभ्या असलेल्या किन्नरांकडे भिरकावले जातात. इरावनने स्वतःच्या हाताने शिर कापून फेकावे तसे हे हार किन्नरांकडे झेपावतात. त्या हारांना पाहून ते देखील विलक्षण आत्मीय प्रेमाने शोकात बुडून जातात! नंतर पुजाऱ्यांकडून इरावनच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते! त्यानंतर इरावनची पत्नी झालेले किन्नर आपले मंगळसूत्र त्या हारांवर अर्पण करतात.

त्यांच्या चेहऱ्यावरचा सर्व शृंगार इतर किन्नरांकडून पुसला जातो. त्यांना पांढरी वस्त्रे परिधान करायला लावली जातात. यावेळी सर्व किन्नर इतके शोकाकुल झालेले असतात की छाती बडवून जोर जोराने हमसून हमसून रडायला लागतात. काळीज हेलावून जाईल असा शोकविलाप करतात. त्यांच्या स्वतःच्या आयुष्यभराच्या अपमानाच्या – अवहेलनेच्या वेदना यात एकजीव होत असाव्यात. ज्यामुळे आधी नाटकी वाटणारे रडणे नंतर हृदयाला पीळ पाडून जाते. पुढच्या वर्षी पुन्हा भेटीगाठी घेण्याच्या आणाभाका घेऊन दुसऱ्या दिवशी ते सगळेजण आपआपल्या ठिय्याकडे परतीच्या प्रवासाला निघतात. पण हा सर्व सोहळा विधी करायला लाखोंचा खर्च येतो. दक्षिण भारतातील किन्नरास गुरुपद हवे असेल तर त्याने कुवगमला विवाहविधी करणे क्रमप्राप्त ठरते अन्यथा आयुष्यभर तो एक सामान्य किन्नर बनून राहतो. या सर्व घटनाक्रमाला या कादंबरीमध्ये अत्यंत चपखलपणे नाटकीय स्वरूपात गुंफले आहे.
किन्नरांच्या जीवनात संघर्ष, त्यांची अवहेलना, त्यांना समाजाकडून स्वीकारले न जाणे आणि त्यांच्याविषयी केला जाणारा पक्षपात हे सर्व अगदी ‘नागकिन्नरी’मध्ये टोकदारपणे समोर येत राहते. दुःख, विवंचना, प्रतारणा आणि क्लेशासह शापित आयुष्याचे शल्य घेऊन मुक्तीच्या शोधात निघालेले नायक नायिका एका अभूतपूर्व दुनियेचा प्रवास घडवून आणतात. हा प्रवास दाखवण्यासाठी लेखकाने दोन वेगवेगळ्या कालखंडातले पट वापरलेले आहेत. एक म्हणजे पाताळ आणि दुसरी म्हणजे सद्यकालीन भूलोक! दोन्ही लोकात घडणारी ही कथा अत्यंत रहस्यमय पद्धतीने सादर केलेली आहे. पूर्वजन्माचे गुपित उलगडतानाच त्या कालखंडामध्ये असणारे आदिबंध अगदी वेधकतेने समोर येतात. भूतकाळ आणि वर्तमान काळाच्या असाधारण संयोगातून प्रेमभावनेचे प्राणतत्व विलक्षण पद्धतीने साकारलेले आहे.

कृष्ण आणि मोहिनी
कादंबरीमध्ये एक कच्चा दुवा असा आहे की ज्यांचा पुनर्जन्म कर्मकांडे व होमहवने यांच्यावर विश्वास नाही त्यांना यातील काही भाग पटणार नाही, पण तो भाग पटला नाही तरी देखील मूळ कथा व तिच्या परिघाचे आकलन बदलत नाही कारण ती एकाच वेळेस समांतर प्रतलावरती समोर येते. किन्नरांच्या जीवनामध्ये हजारो वर्षांपासून जे घडत आलेले आहे ते मांडण्यासाठी लेखकाला हा पट स्वीकारणे बहुधा अपरिहार्य वाटले असावे. ही केवळ नागसेन आणि नागनंदा यांच्या मिलनाची गोष्ट नाही तर किन्नर यांच्या विफल आयुष्याची व्याकुळकथा आहे. सामाजिक दृष्ट्या निषिद्ध मानला गेलेला समलैंगिक व्यवहार इथे नितळ पद्धतीने समोर येतो. किन्नरांच्या जीवनातील व्यथा, विवंचना आणि प्रेमव्यापी काव्य जाणून घेण्यात कादंबरी प्रभावी ठरते. सद्यकालीन पात्रे आणि हजारो वर्षांपूर्वीची काल्पनिक पाताळ लोकातील पात्रे यांची सांगड घालताना लेखक कमी पडलेला नाही हे महत्त्वाचं! एलजीबीटीक्यू समुदायातील पारलिंगी व्यक्तींची कैफियत लेखकाने अनोख्या पद्धतीने मांडली आहे त्यासाठी त्याचे अभिनंदन!
लेखक कवी पी. विठ्ठल यांनी लिहिलेले ब्लर्ब अगदी बोलके आहे. आपल्या ब्लर्बमध्ये पी. विठ्ठल लिहितात की, कोणताही लेखक जगण्याच्या असाधारण तत्त्वाशी संघर्ष करत असतो. या अस्वस्थतेतूनच तो अपरिचित, अविश्वसनीय अशा सामाजिक आदिमतेचा, धारणांचा शोध घेत असतो. लेखकाचे अनुभवक्षेत्र आणि लोकमानसातील त्याचा वावर जितका व्यापक असेल तितकीच त्याची निर्मिती आत्यंतिक प्रभावी आणि जिवंत ठरते. किशोर तरवडे यांची ‘नागकिन्नरी’ ही कादंबरी वाचकांना केवळ अशा जिवंतपणाचाच नव्हे ; तर गूढ, गहन आणि रहस्यमय अशा अनुभवाचा थरारक अनुभव देते. भयचकित करणारी ही एक विस्मयकारक कहाणी आहे. या कादंबरीत जे घडतं, ते वाचून आपण अक्षरशः थक्क होतो. दु:ख, विवंचना, प्रतारणा आणि क्लेशासह शापित आयुष्याचे शल्य घेवून मुक्तिच्या शोधात निघालेले नायक-नायिका एका अभूतपूर्व दुनियेचा प्रवास घडवून आणतात.

इरावण
ही केवळ ‘नागसेन’ आणि ‘नागनंदा’ यांच्या मिलनाची गोष्ट नाही; तर किन्नरांच्या विफल, वांझ आयुष्याची ही व्याकूळकथा आहे. लिंगभेदावरून केला जाणारा पक्षपात असो की, सामाजिकदृष्ट्या निषिद्ध (टॅब्यू) समजला जाणारा समलैंगिक व्यवहार असो, अथवा पुरुषसत्ताक प्रवृत्तीने बहिष्कृत केलेला आणि आत्मनाशाच्या उंबरठ्यावर उभा असलेला एलजीबीटीक्यू समाज असो – सामुहिक अभिशाप घेवून जगणाऱ्या समूहाची वेदना लेखकाने आगळ्या-वेगळ्या कल्पनाबंधातून साकारली आहे. ‘पाताळ आणि पृथ्वी’ अशा दोन्ही लोकात घडणारी आणि पूर्वजन्माचे गुपित रहस्यमयरित्या उलगडून दाखवणारी ही कथा काळ आणि प्रवृत्तीच्या प्राचीन आदिबंधाचे वेधक दर्शन घडवते. भूतकाळ आणि वर्तमानकाळाच्या असाधारण संयोगातून प्रेमभावनेचे प्राणतत्त्व विलक्षण पद्धतीने लेखक साकारतो. शरीर मनाच्या आदिम भाषेचा एक अपूर्व असा सांकेतिक अनुभव देणारी ही कादंबरी समकाळातील एक लक्षणीय कलाकृती आहे.
मैत्री पब्लिकेशनने वेगळ्या वाटा चोखाळणारी पुस्तके प्रकाशित करण्याच्या आपल्या परंपरेस साजेसे असे हे पुस्तक प्रकाशित केले आहे त्यासाठी त्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे!
कादंबरी : नागकिन्नरी
लेखक : किशोर तरवडे
पृष्ठ संख्या – 224, मूल्य 350 रु.
प्रकाशक – मैत्री पब्लिकेशन






