मराठी भाषा खूपच लवचिक!!! आता ‘तार‘ हा शब्द घ्या ना …किती अर्थ आहेत!!!…. तार काढणे… तार पाठवणे…. तार सुटणे…. तारेचा झटका बसणे… तार तुटणे…. तारा जुळणे… तारा निखळणे… एक ना अनेक. मात्र या सर्वात प्रभावी तार म्हणजे संगीतातील तंतू वाद्यातील तार. अशा तारेपासून सुंदर ध्वनी काढायची कल्पना सर्वात ज्याला कुणाला सुचली तो खरोखरच महान… धातूच्या या निर्जीव तारा पासून एक कारागीर एक वाद्यं तयार करतो पण त्यात प्राण फुकंतो तो पट्टीचा कलाकारच… वारकऱ्याच्या ‘एकतारी’पासून ते ऑर्केस्ट्राच्या भल्यामोठ्या ‘चेलो’पर्यंत, ‘तुणतुण्या’ पासून ते अगडबंबं ‘रूद्रविणे’पर्यंत… भक्तीच्या रसात डुंबणारी एक तारी, चमकदार धीर गंभीर असे सरोद, प्राजक्ताचा सडा पडावा असे संतूर तर हृदयाच्या तारा छेडणारी सतार… या तंतू वाद्याने खरं तर आपले जीवन किती सुंदर केले आहे ना !!!!
उस्ताद अल्लाऊद्दीन खान या मैहर घराण्याचे मूख्य प्रर्वतक असलेल्या उस्तादाचे सर्वात महत्वाचे शिष्य म्हणजे पं. रवीशंकर. सतारीच्या तारावरील त्यांच्या बोटांची हुकूमत तर तुमच्यापैकी प्रत्येकांनी कधी ना कधी अनुभवलीच असेल. संगीताचा एक विशेष दबदबा म्हणून पाश्चात्य जगात त्यांचा चेहरा ओळखला गेला. त्यांच्या घरातच कलेचा सर्वत्र वावर होता. सात भावंडातले सर्वात लहान अर्थात शेंडेफळ म्हणजे रविंद्र शंकर चौधरी.
वडील श्याम शंकर चौधरी म्हणजे प्रतिष्ठीत बॅरीस्टर. तर आई हेमांगीदेवी बनारस जवळच्या गाझीपूर जिल्ह्यातील छोटे खेडे नसरतपूर येथील. हेमांगीदेवीचे वडील त्या गावचे जमीनदार. वडील श्याम शंकर चौधरी वकीली करावयास इंग्लंडला निघून गेले. तिथे त्यांनी दुसरे लग्न केले. आई हेमांगीदेवीने मग रवीचा प्रतिपाळ केला. रवी शंकर आठ वर्षाचे होईपर्यंत त्यांचे वडील त्यानां भेटलेच नव्हते. ज्या वयात मुलानां जन्मदात्यांची अत्याधिक गरज असते किंवा असावी अशी अपेक्षा असते त्या काळात अनेक कलावंताना मानसिक उपेक्षेला सामोरे जावे लागले.

वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी रवी शंकर आपले मोठे बंधू सुप्रसिद्ध नर्तक उदय शंकर यांच्या बॅले पथका बरोबर पॅरीसला गेले. 13व्या वर्षी ते या पथकाचे सभासदही झाले. या पथकाने युरोप ते अमेरीका असा दौरा केला आणि या दरम्यान रवी शंकर फ्रेंच भाषाही शिकले. पाश्चात्य शास्त्रीय संगीत, जाझ संगीत व पाश्चात्य चित्रपटाचा जवळून परिचय या दरम्यान झाला. पुढच्या आयुष्यात आपल्या भारतीय संगीताचा दरवळ जगभर पोहचविण्यात ते कसे यशस्वी झाले याचे मूळ येथे सापडते. मैहेर घराण्याचे संगीतकार उस्ताद अल्लादिन खान यांना पहिल्यांदा 1934 मध्ये त्यांनी ऐकले ते कलकत्ता येथील संगीत सभेत. बंधू उदय शंकर यांनी मग मेहेरचे राजे महाराजा ब्रजनाथसिंग जुदेव यांना साकडे घालून उस्ताद अल्लादिन खान यांना आपल्या 1935 च्या युरोपच्या दौऱ्यात सन्मानाने दाखल केले. या दौऱ्या दरम्यान उस्ताद आणि भावी पंडित यांचे सूर जुळून आले.
रवी शंकर यांचा सुरेल प्रवास सुरू झाला खरा पण दु:खाची झालरही या प्रवासाला जोडली गेली, परत आले अन् त्यांच्या आई वडीलाचे निधन झाले. उदयश्ंकर यांचे नृत्य पथकही अडचणीत आले कारण दुसऱ्या विश्व युद्धाचे काळे ढग घेंगावत येत होते. गुरू भरभरून देणारा निघाला अन् शिष्यानेही ओंजळ रिती होऊ नाही दिली. सतार, सूर बहार, रागांची ओळख, ख्याल, ध्रुपद, धमार अशा संगीतातील सर्व रत्नांचा खजिना गुरू उस्ताद अल्लादिनखान यांनी भरभरून दिला. उस्ताद अल्लादिनखान यांचे सुपूत्र अली अकबर खान जे पूढे जगप्रसिद्ध सरोद वादक म्हणून ओळखले गेले आणि मुलगी अन्नपूर्णदेवी (रोशनआरा खान) यांच्या सोबतच रवी शंकर यांचा संगीतमय प्रवास सुरू झाला. पूढे त्यांनी अन्नपूर्णादेवी यांच्याशी 1941 मध्ये लग्नही केले. मात्र दूर्देवाने 41 वर्षांच्या दीर्घ सहवासा नंतर ते वेगळे झाले.
अन्नपूर्णा देवी ‘सूरबहार’ या वाद्यात पारंगंत होत्या. घटास्फोटानंतर त्या मुंबईत आल्या. नंतर पुढच्या संपूर्ण आयुष्यात त्यांच्या ‘सूरबहार’मधून कधीच सूर बाहेर पडले नाहीत. त्यांचा ‘सूरबहार’ कायमचा अबोल झाला. सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित हरीप्रसाद चौरसिया त्यानां अम्मा म्हणत, त्या त्यांच्या गुरूही होत्या. क्षेत्र संगीताचे असले म्हणून काय झाले संगीतात करूण रसही निवास करून असतो, तो वाद्याद्वारे जसा बाहेर पडतो तसा आतही पाझरत असतो. बाहेर पडणारा सूर आमचे कान तृप्त करतो पण आतला सूर कलावंताचे मन तप्त करतो. मन वाचता येते का????

पंडित रवी शंकर हे संगीतकार रवी शंकरही होते हे मात्र कदाचित कमी लोकानां ठावूक असावे. चित्रपट संगीतातही देखिल त्यांचे अमूल्य योगदान आहे. ख्वाजा अहमद अब्बास यांची कथा घेऊन 1946 मध्ये ‘नीचा नगर’ आणि ‘धरती के लाल’ हे दोन चित्रपट प्रदर्शीत झाले. वास्तववादी चित्रपटाची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ रोवणारा ‘नीचा नगर’ हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला…. चेतन आनंद यांनी दिग्दर्शीत केलेला हा पहिलाच चित्रपट. तर या दोन्ही चित्रपटाचे संगीतकार होते पंडित रवी शंकर. चित्रपटाचा काळ लक्षात घेता त्यातील गाणी कदाचित आज श्रवणीय वाटणार नाहीत पण कथेच्या आशयात ती महत्वपूर्ण आहेत. ग्रामीण पार्श्वभूमीच्या परिवेषात संपूर्ण चित्रपटभर पार्श्वसंगीतात सतारीचे सूर परीणामकारक वाटतात. पाश्चात्य वादयांचा वापर न करता भारतीय वादय किती परिणाम कारक ठरू शकतात हे त्यांनी सिद्ध केले. खरे तर त्यांनी अगदी मोजक्याच चित्रपट संगीतबद्ध केले.
1960 मध्ये आलेल्या हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘अनुराधा’मधील सर्वच गाणी पंडितजीनी अविस्मरणीय केली आहेत. अवीट आहेत…. कैसे दिन बिते… कैसी बिती रतिया, जाने कैसे सपनो मे खो गयी आंखिया, सांवरे सावंरे काहे मोसे, हाय रे वो दिन क्यूँ ना आए (लता दीदी)… ही सर्वच् गाणी म्हणजे हिरेजडीत रत्नहारच आहेत…. यातील साँवरे… हे माझे अत्यंत आवडते…सतारीचा इतका अप्रतिम वापर क्वचितच आढळतो.. यातील लता दीदीचा आवाज जितक्या आवेगाने वरखाली होतो तितक्याच तन्मयतेने सतारीच्या तारा मध्य आणि तार सप्तकात लिलया फिरतात.. अगदी बागडतातच म्हणा ना…आजही हे गाणे ऐकताना रोंमाच उभे राहतात.
1963 मध्ये मुन्शी प्रेमचंद यांच्या कथेवर आधारीत चित्रपट आला होता ‘गोदान’. राजकुमार, कामिनी कौशल, मेहमूद, शोभा खोटे यांच्या सहज सुंदर अभिनयाने नटलेला हा चित्रपट म्हणजे समस्त भारतीय शेतकऱ्यांची व्यथा टिपणारा टिपकागद.. प्रेमचंद म्हणजे अस्सल भारतीय मातीच्या वेदना सहजसोप्या शब्दात सांगणारा तत्वज्ञानी. गायीच्या सभोवती अत्यंत तरलतेने रचलेले शेतकऱ्याचं हे महाकाव्यच आहे.
तेव्हाच्या शेतकऱ्याच्या आयुष्यतील जीवंत गाय आज मात्र राजकारणातील गोमता होऊन निर्जीव प्राणीमात्र झाली आहे. या चित्रपटात रफीसाहबने गायलेले एक नितांत सुंदर गाणे आहे जे मेहमूदवर चित्रीत केले आहे. मेहमूदने यातील गोबर या राजकुमारच्या लहान भावाची भूमिका केली आहे. दारिद्र्यात जगणाऱ्या माणसांची नावेही वेदनादायकच असावी ना!!. गोबर हे व्यक्तीचे नाव असू शकते?… तर हे गाणे अंजान (गीतकार समीर यांचे पिता) यांनी भोजपूरी भाषेत लिहले आहे. खूप सुंदर गाणे आहे.. रवि शंकर स्वत: ज्या गावाचे वर्णन यात आहे तिथे दिग्दर्शका बरोबर जावून आले होते. तेथील लोकसंगीताचा व्यवस्थित अभ्यास करून या गाण्याची चाल बांधलेली आहे. गाण्याचे बोल आहेत-
पिपरा के पतवा सरीखे डोले मनवा, कि हियरा में उठत हिलोर ।
पुरवा के झोंकवा में आयो रे संदेसवा की चल आज देसवा की ओर
युट्यूबवर हे गाणे व चित्रपट उपलब्ध आहे.

1979 मध्ये गुलजार यांनी ‘मीरा’ साठी रवी शंकर यानां आमंत्रित केले. यातील मीरेच्या भजनानां पंडितजी शिवाय कोण न्याय देणार? चित्रपट प्रेक्षकानां फारसा भावला नाही. ओशो मीरे विषयी बोलताना म्हणतात-‘मुझे मौका दो कि मैं तुम्हारे हृदय की वीणा को थोड़ा बजा सकूं। तो ही तुम समझ पाओगे।‘ मीरा समजणे अवघड असू शकते मात्र मीरेची भक्ती रसातली भजने आजही तन्मयतेने गायली जातात. मांझ-खमाज, तिलक-कामोद, जन-सम्मोहिनी, जयजयवन्ती, मल्हार, गुर्जरी तोड़ी, देस, भैरवी अशा रागांवर आधारीत चाली पंडितजीनी बांधल्या. त्या आजही तितक्याच सुमधूर वाटतात जितक्या त्या काळात. बंगालीतही त्यांनी मोजक्याच चित्रपटानां संगीत दिले. विशेषत: सत्यजीत रॉय यांच्या चित्रपटातून. रिचर्ड अटेनबरोचा ‘गांधी’ देखिल त्यांच्या सुरावटीनी सजला होता.
अन्नपूर्णादेवी पासून पंडितजीना शुभेन्द्रा शंकर नावाच मुलगा झाला. जो पुढे शुभो शंकर या नावाने प्रसिद्ध झाला. ते ग्राफीक डिझाईनर आणि संगीतकार होते. 1990 मध्ये शुभो शंकर व पंडितजी पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात आले होते. अन्नपूर्णादेवी पासून वेगळे झाल्या नंतर रवी शंकर प्रसिद्ध नृत्यागंना कमला शास्त्री बरोबर 1967 ते 70 या काळात रिलेशनशिप मध्ये होते. नतंर ते न्यूयॉर्कच्या सू जोन्स बरोबर संपर्कात आले. सू जोन्स या संगीत समारोहाचे आयोजन करीत, 1979 मध्ये सू जोन्स यानां रवी शंकर पासून जे कन्यारत्न प्राप्त झाले ते म्हणजे नोरा जोन्स. त्या जगप्रसिद्ध गायीका व पियानो वादक आहेत. नंतर सुकन्या राजन यांच्या बरोबरच्या संबंधातून त्यानां 1981 मध्ये पुन्हा कन्यारत्न प्राप्ती झाली. त्या म्हणजे जगप्रसिद्ध सतारवादक अनुष्का शंकर. पूढे रवी शंकर यांनी हैद्राबदच्या चिकलूर बालाजी मंदीरात 1989 मध्ये सुकन्या राजन यांच्या बरोबर विवाह केला.
जगातील जवळपास बहूतांश वलयाकिंत व्यक्तींच्या जीवनात डोकवतानां एक गोष्ट लक्षात येते की त्यांच्या वैयक्तिक वा कौटुंबिक आयुष्यातील नाते संबंध सहसा अबाधित राहतात. ज्याला आम्ही सर्वसामान्यांची कुटूंब व्यवस्था म्हणतो त्यांच्यापेक्षा अशा व्यक्तींची कुटूंबसंस्था निश्चीतच वेगळी असते. याला रवी शंकरही अपवाद नव्हते. त्यांची पहिली पत्नी अन्नपूर्णा देवी वगळता इतरांनी आपापसतले नाते वैरभाव न जपता कायम ठेवले. त्यांचा पहिला मुलगा त्यांच्या सोबत होता. वडीलांचा सल्ला ऐकून त्या प्रमाणे आपली दिशा ठरवित असे. 1992 मध्ये त्यांचे निधन झाले. आजही अनुष्का शंकर व नोरा जोन्स जगभरातून एकत्रीत संगीत कॉन्सर्ट करतात. दोघीही आपापल्या क्षेत्रात आपला आब व बहिणी म्हणून पत राखून आहेत.

आपण त्रयस्थपणे जेव्हा अशा व्यक्तींच्या प्रवासाकडे बघतो तेव्हा त्यांच्या कर्तृत्वाच्या छायेने पूर्णपणे झाकोळून जातो. त्यांनी मिळवलेल्या उत्तूंग यशाच्या झंझावातात धर्म, जात, वय, देशांच्या सीमा पालापाचोळ्या गत उडून जातात. नितीअनिती यांचे कोष गळून पडतात बाकी शिल्लक उरते ते फक्त कर्म. सामान्य माणसानां मात्र आखलेल्या व्यवस्थे बाहेर पावूल टाकतानां विचार करावा लागतो.
पंडितजी दीर्घायुषी होते. शेवटच्या काळात ते झेपेल अशा सतारीने वादन करीत असत. आयुष्यभर आपल्या पत्नीपेक्षाही सतार त्यांनी अधिक जपली. त्यांची सतारदेखील त्यांच्या इतकीच आकर्षक दिसे. अगदी ऐकमेकास पूरक व जीवंत. कार्यक्रम सुरू करताना सतार लावून झाली की ते आपल्या जादूई बोटांनी तारा छेडत आणि आसमंत भारून जाई… आजही त्या मंजूळ तारा लाखो रसिकांच्या कानात गुजंन करत असतात.






