विठ्ठल साबळे
- एकल महिला म्हणजे ‘अगतिक, हतबल आणि उपलब्ध’ ही छबी इथल्या व्यवस्थेने निर्माण केलीये.
- या मानसिकतेला तोडण्याचं काम बुलढाणा जिल्ह्यातील काही गावांनी अलीकडच्या काळात सुरू केलयं.
- बुलढाण्यात ‘मानस’ चळवळीच्या माध्यमातून एकल महिलांच्या आयुष्यात नवा बदल घडत आहे. काही महिलांनी समाजाच्या चौकटी मोडत पुन्हा संसार उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
- 22 वर्षांपासून ते 55 वर्षांपर्यंतच्या 118 पेक्षा अधिक महिलांचे पुर्नविवाह या चळवळीच्या माध्यमातून झाले आहेत.
बुलढाणाची २१ वर्षांची पूजा हरिदास खंडारे सध्या नर्सिंगचं शिक्षण घेतेयं. ती म्हणाली, ‘’ १५ वर्षांची होते मी जेव्हा वडिलांचं छत्र हरपलं, कुटुंबाचा आधारच हरपल्यामुळे पुढं काय करायचं हा मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला. त्या वेळी मला बापाची गरज होती आणि माझ्या आईला आधाराची गरज होती. घरात एक पुरुष असणं किती महत्त्वाचं असतं, हे त्या काळात आम्हाला प्रकर्षाने जाणवलं. मी 19 वर्षांची झाले तेव्हा आईशी स्पष्टपणे बोलले. मी आईला सांगितलं की तुला पतीची गरज आहे आणि मला वडिलांची. त्यामुळे तू पुन्हा लग्न करायला हवे. सुरुवातीला आईने हा विचार नाकारला. समाज काय म्हणेल, लोक काय बोलतील, या भीतीमुळे ती तयार नव्हती. परंतू समुपदेशन आणि संवादाच्या माध्यमातून अखेर आईने पुनर्विवाहाचा निर्णय घेतला. 2025 मध्ये आईचा पुनर्विवाह झाला. आज आम्ही पिंपळगाव सराई येथे आमच्या नव्या कुटुंबासोबत राहतो. माझे बाबा माझा सांभाळ करतात. मला प्रेम देतात आणि आमच्या आयुष्यात पुन्हा स्थिरता आली आहे.’’
बुलढाणाच्या बिरसिंगपूर गावातील मनीषा प्रदीप मुळे सांगतात की, 2015 साली त्यांचं लग्न झालं होतं. संसार सुरू झाला होता, पण काही वर्षांतच परिस्थिती बदलली. 2021 मध्ये त्यांच्या पतीने व्यसनाच्या आहारी जाऊन आत्महत्या केली. त्या वेळी त्यांच्या खांद्यावर तीन लहान मुलांची जबाबदारी आली होती. एक मुलगी आणि दोन मुलं. अचानक आयुष्याचा आधार हरपल्यामुळे पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला. मनीषा सांगतात की, त्या दीड वर्ष एकट्याने संघर्ष करत राहिल्या. मुलांचं शिक्षण, घरखर्च आणि समाजातील प्रश्न यांचा सामना करताना अनेकदा त्यांना निराशा येत होती.
अनेक वेळा लोकांनी सहानुभूती दाखवली, पण पुढे आयुष्य कसं जगायचं याचं उत्तर कोणाकडेच नव्हते. याचदरम्यान पुनर्विवाहाचा एक पर्याय पुढे आला, पण तसा विचार करताना त्यांनाही संकोच वाटत होता. समाज काय म्हणेल, मुलांचे काय होईल, या प्रश्नांनी मनात संभ्रम निर्माण झाला होता. पण समुपदेशन आणि संवादातून त्यांनी हळूहळू हा निर्णय स्वीकारला. अखेर 2025 मध्ये त्यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज मनिषा सांगतात की, हा निर्णय मुलांच्या भविष्यासाठी घेतला आणि आज त्यांचा संसार व्यवस्थित सुरू आहे.
“पितृसत्ताक मानसिकतेला बुलढाण्यातून दिलेले आव्हान”
भारतीय समाजव्यवस्थेत लिंगाधारित शोषण प्रक्रिया आजही सुरूच आहे. भलेही स्वरूप बदललेले असेल, पण आजही बाई शोषितच आहे. इथल्या पितृसत्ताक पद्धतीप्रमाणे पुरुष जोडीदार नसेल तर स्त्रीची सामाजिक ओळख उरत नाही वा जी असते ती समाज स्वत:च्या सोयीने ठरवतो. पती निधनामुळे महिलांच्या आयुष्यातील जगण्याचा आधारस्तंभ कोसळलेला असतो. त्यात सासर-माहेरचे, इतर नातलग, समाजही त्यांना समजून घेत नाही. महिलेलाच दोषी ठरवतो.
ज्या काळात महिलेला आधार आणि सन्मानजनक वागणूक मिळण्याची निकड असते, तेव्हाच तिचे मानसिक खच्चीकरण केले जाते. एकल बाई म्हणजे ‘अगतिक, हतबल आणि उपलब्ध’ ही जी छबी या व्यवस्थेने निर्माण केलीय, तीच मुळात इतकी चुकीची आहे, की एखाद्या बाईला या अव्यवस्थेविरोधात ठाम उभं राहायचं असलं, तरी समाजाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दडपण तिच्यावर असतं. विधुर वा एकल पुरुष असेल तर त्याच्याबाबतीत समाजाला फारसं देणंघेणं आणि रस नसतो, पण ‘एकल महिला’ म्हटलं म्हणजे समाज ‘स्वयंघोषित न्यायदेवता’ होतो. ही मानसिकता इथे वर्षानुवर्षे पोसली गेलीय.
(बुलढाण्यात आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिला.(स्त्रोत: डी. एस.लहाने))
या मानसिकतेला तोडण्याचं काम बुलढाणा जिल्ह्यातील काही गावांनी अलीकडच्या काळात सुरू केलयं. अशा प्रतिकूल परिस्थितीविरोधात या परिसरातील एकल महिला अलीकडे उभ्या राहू लागल्या आहेत. स्वत्व, अस्तित्व, आत्मभान, स्वाभिमान या मूल्यांची जाण येऊन एकल महिला बंडखोरी करत आहेत. कारण त्यांचा संसार, मुले, त्यांची भाकरी, गरजा यासाठी समाज पुढे येत नसतो, तर त्या स्त्रीलाच कंबर कसून उभे राहावे लागते. म्हणूनच बुलढाणा जिल्ह्यातील काही गावांमध्ये अलीकडच्या काळात एक वेगळं परंतू आशादायी दृश्य दिसू लागलंय.
ग्रामीण भागात पतीच्या मृत्यूनंतर समाजाने आयुष्याच्या चौकटीत अडकवलेल्या महिलाच आता पुन्हा कुंकू लावतात, मंगळसूत्र घालतात आणि नव्या आयुष्याची सुरुवात करतात. गावातील लोकांमध्ये या बदलाबद्दल चर्चा सुरू आहे. काही जण आश्चर्य व्यक्त करतात, काही जण कौतुक करतात, तर काही अजूनही प्रश्न विचारतात. पण या सर्व चर्चांच्या केंद्रस्थानी आहे बुलढाण्यात सुरू झालेली ‘मानस’ चळवळ. ही चळवळ केवळ पुनर्विवाहाची मोहीम नाही, तर समाजातील दीर्घकाळ टिकून राहिलेल्या विचारांना दिलेले एक शांत पण ठाम आव्हान आहे.
परंपरांना प्रश्न विचारणारी चळवळ
या चळवळीचा परिणाम प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी ‘टीम बाई माणूस’ने बुलढाणा जिल्ह्यातील काही गावांना भेट दिली. बुलढाण्यात सुरू झालेल्या या चळवळीने याच मानसिकतेला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला आहे. आणि कदाचित म्हणूनच या चळवळीची चर्चा केवळ एका जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता संपूर्ण राज्यात होऊ लागली आहे.
(मानस’ चळवळीचे संस्थापक दत्तात्रय उर्फ डी. एस. लहाने.(photo credit Avinash gavli))
या ‘मानस फाउंडेशन’च्या मागे उभं असलेलं नाव म्हणजे दत्तात्रय उर्फ डी एस लहाने. शिक्षक म्हणून समाजात काम केलेले आणि 2017 मध्ये देऊळघाट जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आलेले लहाने यांनी ग्रामीण भागातील सामाजिक वास्तव जवळून अनुभवले. गावागावात काम करताना त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, एकल महिलांचं आयुष्य समाजाच्या नियमांनी बांधलेल आहे. लग्न झाल्यावर स्त्रीला देवी मानून घरात आणलं जात, पण पतीचा मृत्यू झाला की तीच स्त्री अचानक अपवित्र ठरते. तिच कुंकू पुसलंं जात, मंगळसूत्र काढल जात आणि तिच्या आयुष्याभोवती अनेक अदृश्य भिंती उभ्या केल्या जातात.
‘बाईमाणूस’शी बोलताना दत्तात्रय लहाने सांगतात की,
समाजातील ही मानसिकता पाहून त्यांना अस्वस्थ वाटत होतं. विशेषतः ग्रामीण भागात तरुण वयात एकल महिलांची परिस्थिती अधिक कठीण असते. लहान मुलांचा सांभाळ, आर्थिक जबाबदारी आणि समाजाच्या अपेक्षा या सर्वांचा भार त्या महिलांवर पडतो. अनेक महिलांना पुढे काय करायचं हेच समजत नाही. अशा वेळी समाजाने त्यांना आधार देण्याऐवजी अनेकदा त्यांच्यावर मर्यादा लादण्याचा प्रयत्न केला जातो. या परिस्थितीत बदल घडवण्याची गरज आहे, असा विचार त्यांच्या मनात आकार घेऊ लागला.
रक्षाबंधनातून सुरू झालेला बदलाचा प्रयोग
या विचारातून बुलढाण्यात रक्षाबंधनाचा एक वेगळा प्रयोग करण्यात आला. लहाने यांनी प्रत्येक गावातून एकल महिलांना बोलावलं. त्याचबरोबर त्या गावातील पुरुषांनाही कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आलं. या कार्यक्रमात महिलांनी त्या पुरुषांना राखी बांधली. या कृतीचा उद्देश साधा होता, समाजात एक आपुलकीचं नातं निर्माण करणं. या कार्यक्रमातून समाजात एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला की एकल महिलाही समाजाचा एक भाग आहेत, त्यांच्याशी सन्मानाने वागण ही समाजाची जबाबदारी आहे.
(मानस’ उपक्रमात महिलांनी पुरुषांना राखी बांधत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.(स्त्रोत: डी. एस.लहाने))
‘’या कार्यक्रमाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला,’’ लहाने सांगतात. अनेक महिलांनी आपल्या आयुष्याबद्दल खुलेपणानं बोलायला सुरुवात केली. काही महिलांनी आपल्या अडचणी मांडल्या, काहींनी आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता व्यक्त केली. या संवादातून एक गोष्ट स्पष्ट झाली की अनेक महिलांना पुन्हा संसार उभारण्याची इच्छा आहे, पण समाजाच्या भीतीमुळे त्या बोलू शकत नाहीत. या संवादातूनच पुढे एका मोठ्या सामाजिक उपक्रमाची बीजं रोवली गेली.
एकल महिलांच्या प्रश्नांतून जन्मलेली ‘मानस’ चळवळ
कोविड काळानंतर ही समस्या आणखी गंभीर झाली. अनेक कुटुंबांनी आपले कर्ते पुरुष गमावले. काही महिलांचे पती आजारामुळे मृत्यूमुखी पडले, तर काही प्रकरणांमध्ये व्यसनाधीनतेमुळे कुटुंबे उद्ध्वस्त झाली. अनेक महिलांवर अचानक मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आली. अशा महिलांच्या आयुष्यात पुढे काय हा प्रश्न अधिक तीव्र झाला. या परिस्थितीत समाजाने काहीतरी सकारात्मक पाऊल उचलण्याची गरज असल्याचे लहाने यांना वाटले.
‘बाईमाणूस’ने महिलांशी संवाद साधताना काही प्रश्न वारंवार समोर येत होते. माझ्या मुलांचा सांभाळ कोण करणार. माझ्या आयुष्याचा आधार कोण होणार आणि मी नसताना माझ्या मुलांचं काय होईल. या प्रश्नांनीच मानस चळवळीचा पाया तयार झाला. लहाने सांगतात की, आम्हाला फक्त त्या महिलांचं लग्न लावून द्यायचं नव्हतं. आम्हाला त्या मुलांना बाप द्यायचा होता. या एका विचारातून पुढे संपूर्ण चळवळ उभी राहिली.
(एकल महिलांचे पुनर्विवाह आणि महिलांच्या सन्मानासाठी दिलेला सामाजिक संदेश(photo credit Avinash gavli))
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांपासूनही या चळवळीला प्रेरणा मिळाली. फुले यांनी समाजातील अन्यायकारक परंपरांविरुद्ध आवाज उठवला होता. त्यांनी एकल महिलांच्या विवाहाला समर्थन दिले होते आणि एका विधवेचे मूल दत्तक घेतले होते. समाजात बदल घडवण्याचा हा विचार लहाने यांना प्रेरणा देणारा ठरला. त्यांना वाटलं की आजही समाजात अनेक महिलांना अशाच आधाराची गरज आहे. या विचारातून एकल महिलाा आणि घटस्फोटित महिलांसाठी परिचय आणि समुपदेशन मेळावे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. 11 एप्रिल 2023 रोजी अशाच एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महिलांना आपल्या आयुष्याबद्दल बोलण्याची संधी मिळाली. त्यांचं समुपदेशन करण्यात आलं आणि पुनर्विवाहाबद्दल सकारात्मक चर्चा सुरू झाली. या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला आणि पुढे मानस फाउंडेशनची स्थापना करण्यात आली.
सामूहिक विवाहातून अनेक महिलांना नवी सुरुवात
मानस फाउंडेशनच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यात अनेक सामूहिक विवाह सोहळे आयोजित करण्यात आले. या उपक्रमातून तरुण तसेच मध्यम वयोगटातील महिलांना नव्या आयुष्याची संधी मिळाली. 22 वर्षांपासून ते 55 वर्षांपर्यंतच्या महिलांचे विवाह या चळवळीच्या माध्यमातून झाले आहेत. लहाने यांच्या मते आतापर्यंत 118 पेक्षा अधिक महिलांचे पुर्नविवाह या चळवळीच्या माध्यमातून झाले आहेत. या विवाहांमुळे अनेक कुटुंबांना नव्याने आयुष्य जगण्याची संधी मिळाली आहे.
या चळवळीचा परिणाम केवळ विवाहांपुरता मर्यादित राहिला नाही. तर समाजातील अनेक परंपरांमध्ये बदल घडताना दिसू लागले. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये एकल महिलांनी पुन्हा कुंकू लावायला सुरुवात केली आहे. त्या मंगळसूत्र घालतात, जोडवे घालतात आणि आत्मविश्वासाने समाजात वावरतात. काही वर्षांपूर्वी अशा गोष्टींचा विचारही अशक्य वाटत होता, पण आज समाजात हळूहळू बदल होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
गावातील अनेक विवाहांचा प्रवास ऐकताना एक गोष्ट अशी समोर येते जी केवळ पुनर्विवाहाची नाही, तर बदलत्या सामाजिक विचारांची साक्ष देणारी आहे. हा प्रवास आहे पूजा हरिदास खंडारेचा. वय वर्ष 21 जी आता सध्या नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. अनेकदा समाजात मुलं आईवडिलांच्या निर्णयांवर अवलंबून असतात. पण बुलढाणा जिल्ह्यातील या तरुणीने उलट निर्णय घेतला. तिने स्वतःच्या आईला पुन्हा संसार उभारण्याची प्रेरणा दिली. हे उदाहरण केवळ एका कुटुंबाच नाही, तर संकटातून उभं राहणाऱ्या मानवी जिद्दीची ही कथा आहे.
मुलीने आईला दिली नव्या आयुष्याची संधी
‘बाईमाणूस’शी बोलताना पूजा सांगते की,
22 नोव्हेंबर 2018 हा दिवस त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस होता. त्या वेळी ती अवघ्या 15 वर्षांची होती. तिच्या वडिलांचं आजारामुळे निधन झालं. कावीळ आणि इतर आरोग्याच्या समस्यांमुळे वडिलांचा मृत्यू झाला. त्या घटनेनंतर तिच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली. कुटुंबाचा आधार हरपल्यानंतर पुढे काय करायच हा मोठा प्रश्न समोर उभा राहिला. वडिलांच्या मृत्यूनंतर काही काळ ती नातेवाईकांकडे राहिली. कधी मामाकडे, कधी मावशीकडे राहून तिने आयुष्य पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण हा तात्पुरता आधार होता. पुढे आईच आयुष्य कसं जाईल, हा प्रश्न पूजाच्या मनात सतत होता. पूजा सांगते की, त्या वेळी मला बापाची गरज होती आणि माझ्या आईला आधाराची गरज होती. घरात एक पुरुष असणं किती महत्त्वाचं असतं, हे त्या काळात आम्हाला प्रकर्षाने जाणवलं. हळूहळू पूजा मोठी होत गेली आणि परिस्थितीकडे वेगळ्या नजरेने पाहू लागलली.
‘’ मी 19 वर्षांची झाले तेव्हा आईशी स्पष्टपणे बोलले. मी आईला सांगितलं की तुला पतीची गरज आहे आणि मला वडिलांची. आयुष्याच्या शेवटपर्यंत नवरा बायको एकमेकांच्या आधाराने जगतात. त्यामुळे तू पुन्हा लग्न करायला हवं. सुरुवातीला आईने हा विचार नाकारला. समाज काय म्हणेल, लोक काय बोलतील, या भीतीमुळे ती तयार नव्हती.’’
(आईच्या पुनर्विवाहासाठी पुढाकार घेणारी पूजा खंडारे.(photo credit Avinash gavli))
पूजा म्हणते, आईला तयार करणं सोपं नव्हत. नातेवाईकांनाही हा विचार मान्य नव्हता. पण त्यांनी धैर्य दाखवले. त्यांनी आईला समजावलं, परिस्थिती स्पष्ट केली आणि पुढे आयुष्य कसं असू शकत याचा विचार करायला भाग पाडल. या प्रक्रियेत त्यांनाही मानस फाउंडेशनबद्दल माहिती मिळाली. त्यांनी डी एस लहाने यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर परिस्थिती बदलू लागली. समुपदेशन आणि संवादाच्या माध्यमातून अखेर तिच्या आईने पुनर्विवाहाचा निर्णय घेतला. 2025 मध्ये रमा हरिभाऊ धुरंदर यांचा पुनर्विवाह झाला. आज त्या पिंपळगाव सराई येथे आपल्या नव्या कुटुंबासोबत राहतात. पूजा सांगते की, आज माझे बाबा माझा सांभाळ करतात. मला प्रेम देतात आणि आमच्या आयुष्यात पुन्हा स्थिरता आली आहे.
पूजाची आई रमा धुरंदरने सागितल की,
मी स्वतः होमगार्ड म्हणून करते. पतीच्या मृत्यूनंतर आयुष्य खूप कठीण झालं होतं. नातेवाईकांकडून फारसा आधार मिळाला नाही. समाजात अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. पण माझ्या मुलीने मला धीर दिला. तिच्या शब्दांनी मला पुन्हा आयुष्याकडे पाहण्याची ताकद दिली. आज मी आनंदाने जगते आहे आणि आयुष्याला नवा अर्थ मिळाला आहे.
ग्राउंडवर दिसले बदलाचे खरे चेहरे
मानस चळवळ नेमकी कशी काम करते, महिलांच्या आयुष्यात या उपक्रमामुळे काय बदल झाला आणि समाजात या बदलाची प्रतिक्रिया कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘बाईमाणूस’ने बुलढाणा जिल्ह्यातील काही गावांना भेट दिली. या भेटीत समोर आलेल्या काही कहाण्या केवळ सामाजिक बदलाची उदाहरण नव्हती, तर आयुष्य पुन्हा उभं करण्याच्या मानवी जिद्दीच्या त्या कहाण्या होत्या. 'मानस' चळवळीच्या माध्यमातून अनेक महिलांच्या आयुष्यात नवा अध्याय सुरू झाला आहे. कागदावर लिहिलेली आकडेवारी किंवा कार्यक्रमांच्या बातम्यांपेक्षा या चळवळीचा खरा अर्थ त्या महिलांच्या आयुष्यात दिसतो ज्यांनी पुन्हा संसार उभारण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागे भीती होती, समाजाचा विरोध होता, पण त्याहून मोठी होती ती म्हणजे मुलांच्या भविष्यासाठी जगण्याची जिद्द.
(तीन मुलांच्या भविष्यासाठी मनीषा मुळे यांनी पुनर्विवाहाचा निर्णय घेतला.(photo credit Avinash gavli))
बुलढाणा तालुक्यातील बिरसिंगपूर गावातील मनीषा प्रदीप मुळे ‘बाईमाणूस’ शी बोलताना सांगतात की
2015 साली त्यांचं लग्न झालं होते. संसार सुरू झाला होता, पण काही वर्षांतच परिस्थिती बदलली. 2021 मध्ये त्यांच्या पतीने व्यसनाच्या आहारी जाऊन आत्महत्या केली. त्या वेळी त्यांच्या खांद्यावर तीन लहान मुलांची जबाबदारी आली होती. एक मुलगी आणि दोन मुलं. अचानक आयुष्याचा आधार हरपल्यामुळे पुढे काय करायचे हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला.
मनीषा सांगतात की, त्या दीड वर्ष एकट्याने संघर्ष करत राहिल्या. मुलांचे शिक्षण, घरखर्च आणि समाजातील प्रश्न यांचा सामना करताना अनेकदा त्यांना निराशा येत होती. अनेक वेळा लोकांनी सहानुभूती दाखवली, पण पुढे आयुष्य कसं जगायचं याचं उत्तर कोणाकडेच नव्हते. या काळात त्यांनी अनेक कठीण दिवस पाहिले. पण मुलांच्या भविष्याचा विचार करून त्यांनी स्वतःला सावरले. या काळात त्यांना मानस फाउंडेशनबद्दल माहिती मिळाली. सुरुवातीला पुनर्विवाहाचा विचार करताना त्यांनाही संकोच वाटत होता. समाज काय म्हणेल, मुलांचे काय होईल, या प्रश्नांनी मनात संभ्रम निर्माण झाला होता. पण समुपदेशन आणि संवादातून त्यांनी हळूहळू हा निर्णय स्वीकारला. अखेर 2025 मध्ये त्यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज त्या सांगतात की हा निर्णय मुलांच्या भविष्यासाठी घेतला आणि आज त्यांचा संसार व्यवस्थित सुरू आहे.
विवाह नव्हे, तर एका कुटुंबाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय
मनीषा यांच्या नवऱ्याचे नाव प्रदीप जगन्नाथ मुळे. वय वर्ष 26. ते सांगतात की, मी या निर्णयाकडे केवळ विवाह म्हणून पाहिले नाही, तर एका कुटुंबाला आधार देण्याची ही जबाबदारी आहे असं मला वाटलं... या विवाहाचा निर्णय आम्ही दोन्ही कुटुंबांनी मिळून घेतला. मनीषाच्या आधीच्या संसारातील तीन मुलांचा स्वीकार करण्याचा निर्णय त्यांनी सुरुवातीपासून घेतला. त्यांच्या मते हा केवळ विवाह नव्हता, तर एका कुटुंबाला आधार देण्याचा निर्णय होता.
प्रदीप सांगतात की आम्ही एक ठरवलं आहे,. आम्हाला पुढे अपत्य नको. आम्ही या तीन मुलांचाच सांभाळ करणार आहोत. या मुलांसाठी मी बाप म्हणून उभा राहणार आहे. कुटुंबातील सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आणि आज आमचा परिवार आनंदाने जगतो आहे. मुलांच्या चेहऱ्यावरच समाधान हेच या निर्णयाचं खरं समाधान आहे.
या विवाहामागे कुटुंबाचा आधारही महत्त्वाचा ठरला. मनीषा यांच्या सासऱ्यांचे नाव जगन्नाथ श्रीराम मुळे. ‘बाईमाणूस’शी बोलताना त्यांनी सांगितलं की,
मनीषा आमच्या गावातलीच मुलगी होती. तिचा नवरा दारू पित असे आणि नंतर त्याने आत्महत्या केली. आम्ही तिची परिस्थिती जवळून पाहिली होती. आम्हाला आमच्या मुलाचं लग्न करायचं होते आणि मुलीचा स्वभाव आम्हाला आवडला होता. या निर्णयाला समाजातून विरोध झाला. काही नातेवाईकांनीही टीका केली, अनेकांनी वेगवेगळे सल्ले दिले. पण आम्ही कोणाचं ऐकलं नाही. आम्हाला वाटलं की या मुलीला आणि तिच्या मुलांना आधार मिळायला हवा. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. आज आमच्या घरात सर्वजण आनंदाने राहतात आणि मुलांचाही सांभाळ व्यवस्थित होत आहे.
आंतरजातीय विवाहातूनही बदलाची नवी दिशा
मानस चळवळीमुळे केवळ एकल महिलांचे पुनर्विवाहच नव्हे तर आंतरजातीय विवाहांनाही चालना मिळत आहे. बुलढाणा तालुक्यातील हातडी गावातील विश्रांती झाल्टे यांची कहाणी त्याचं उदाहरण आहे. पहिल्या विवाहानंतर त्यांचा घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर त्यांनी दोन वर्षे एकट्याने आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला. पण पुढे आयुष्य कसं घालवायचं हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला. या काळात त्यांनाही मानस फाउंडेशनबद्दल माहिती मिळाली. सुरुवातीला त्यांनी माहिती घेण्यासाठी संपर्क साधला आणि डी एस लहाने यांच्या संवादातून त्यांनी पुन्हा संसार उभारण्याचा विचार केला. अखेर त्यांनी पुनर्विवाहाचा निर्णय घेतला.
(समाजाचा विरोध झुगारून आंतरजातीय विवाहातून उभा राहिलेला नवा संसार. (photo credit Avinash gavli))
हा विवाह आंतरजातीय होता. त्यामुळे सुरुवातीला दोन्ही बाजूंनी विरोधही झाला. घरच्यांचा विरोध अजूनही पूर्णपणे संपलेला नाही. पण त्यांनी स्वतःचा निर्णय घेतला. त्यांना वाटलं की आयुष्य पुन्हा उभं करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आज त्या सांगतात की आम्ही आमच्या आयुष्यात आनंदी आहोत आणि आमच्या संसारात समाधान आहे.
विश्रांतीचे पती शिवाजी झाल्टे म्हणतात, ‘’हे माझं पहिलचं लग्न आहे. घरच्यांना सुरुवातीला हा निर्णय मान्य नव्हता. आजही माझे घरचे आई-वडील आमच्याशी बोलत नाहीत. पण आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत. तिचा स्वभाव चांगला आहे आणि आम्ही एकमेकांना समजून घेतलं आहे. आज आमच्या आयुष्यात स्थैर्य आहे आणि आम्हाला एक मुलगाही आहे.
समुपदेशनातून घेतलेला पुनर्विवाहाचा विचारपूर्वक निर्णय
या कहाण्या म्हणजे फक्त काही उदाहरणं आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अशा अनेक कथा ऐकायला मिळतात. काही महिलांनी मुलांच्या भविष्यासाठी हा निर्णय घेतला, तर काहींनी आयुष्याला पुन्हा एक संधी देण्याचा विचार केला. या सर्व कहाण्यांमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे समाजाच्या दबावावर मात करून नव्याने जगण्याची इच्छा.
मानस फाउंडेशनच्या माध्यमातून होणारे विवाह केवळ कार्यक्रमापुरते मर्यादित नसतात. त्याआधी समुपदेशनाची प्रक्रिया असते. महिलांना आणि पुरुषांना त्यांच्या निर्णयाबद्दल विचार करण्याची संधी दिली जाते. कुटुंबांनाही या प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाते. त्यामुळे अनेक वेळा समाजातील विरोध कमी होण्यास मदत होते. या चळवळीमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांच्या विचारांमध्येही बदल होत असल्याचे दिसून येतं. पूर्वीपासून अशा विवाहांना विरोध करणारे लोक आज सकारात्मकपणे
विचार करू लागले आहेत. मुलांच्या भविष्यासाठी आणि महिलांच्या आयुष्यासाठी पुनर्विवाह हा एक पर्याय असू शकतो, हा विचार हळूहळू समाजात रुजू लागला आहे.
एकल महिलांचा प्रश्न आणि बदलती सामाजिक वास्तव
महाराष्ट्रात एकल महिलांची संख्या मोठी आहे. 2011 च्या जनगणनेनुसार राज्यात सुमारे 45 लाखांहून अधिक एकल महिला आहेत. यामध्ये एकल महिला, घटस्फोटित आणि पतीने सोडून दिलेल्या महिलेचा समावेश आहे. सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केलेल्या अभ्यासानुसार ग्रामीण भागात एकल महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या मते केवळ काही जिल्ह्यांच्या सर्वेक्षणातच लाखोंच्या संख्येने एकल महिला असल्याचे दिसून आले आहे. उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात सुमारे 2 लाखांहून अधिक एकल महिला असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.
(एकल महिलांच्या सर्वेक्षणाची आकडेवारी. स्रोत: हेरंब कुलकर्णी.)
सातारा जिल्ह्यातही जवळपास 2 लाखांपेक्षा अधिक महिलांची नोंद झाली आहे. सांगली जिल्ह्यात सुमारे 1 लाखांपेक्षा जास्त महिलांची संख्या समोर आली आहे. या आकडेवारीतून एक गोष्ट स्पष्ट होते की, एकल महिलांचा प्रश्न हा केवळ काही कुटुंबांपुरता मर्यादित नाही. तो मोठ्या सामाजिक वास्तवाचा भाग आहे. अनेक महिलांना आर्थिक, सामाजिक आणि मानसिक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः ग्रामीण भागात या समस्या अधिक तीव्र असतात.
शासनाच्या धोरणाची गरज आणि समाजाची जबाबदारी
राज्य सरकारनेही या प्रश्नाची दखल घ्यायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच राज्याच्या अर्थसंकल्पात एकल महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याची घोषणा केली आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. या धोरणाच्या माध्यमातून एकल महिलांना सामाजिक आणि आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या महिलांसाठी केवळ आर्थिक मदत पुरेशी नाही, तर सामाजिक आधारही आवश्यक आहे. मानस फाउंडेशनचे संचालक दत्तात्रय लहाने यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहे..
- पतीच्या मृत्यूनंतर महिलांना वारसा हक्क मिळवण्यासाठी अनेक अडचणी येतात. त्यामुळे वारसा हक्क मिळण्याची प्रक्रिया सुलभ करावी.
- पतीच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांच्या आत महिलांना त्यांच्या हक्कांचे संरक्षण मिळाले पाहिजे.
- एकल महिलांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासनाने स्वतंत्र योजना तयार कराव्यात.
- अशा कुटुंबातील मुलांच्या संगोपनासाठी सरकारकडून आर्थिक व सामाजिक आधार मिळाला पाहिजे.
- समाजानेही या महिलांकडे सहानुभूतीने पाहण्याऐवजी त्यांना सन्मानाने जगण्याची संधी दिली पाहिजे.
बुलढाण्यात सुरू झालेली मानस चळवळ या दिशेने एक छोटा पण महत्त्वाचा प्रयत्न आहे. या चळवळीमुळे अनेक महिलांना पुन्हा संसार उभारण्याची संधी मिळाली आहे. काही महिलांना आधार मिळाला, काही मुलांना बाप मिळाला आणि काही कुटुंबांना पुन्हा आयुष्य जगण्याची संधी मिळाली. समाजातील परंपरा बदलणं सोपे नसतं. पण एखादा विचार सातत्याने मांडला गेला तर बदल घडतो. बुलढाण्यातील या चळवळीने तेच दाखवून दिले आहे. एकला महिलांना पुन्हा जगण्याचा अधिकार आहे, हा साधा पण महत्त्वाचा संदेश या चळवळीने समाजासमोर ठेवला ...
आजही अनेक गावांमध्ये या चळवळीबद्दल चर्चा सुरू आहे. काही जण या उपक्रमाचे कौतुक करतात, काही जण अजूनही शंका व्यक्त करतात. पण एक गोष्ट निश्चित आहे. या चळवळीने अनेक महिलांच्या आयुष्यात नवा प्रकाश आणला आहे आणि कदाचित म्हणूनच बुलढाण्यातील हा उपक्रम केवळ एका जिल्ह्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर बदलत्या समाजाचे एक महत्त्वाचे उदाहरण ठरत आहे.






