ज्या देशात मसालेदार चित्रपट चालत आले आहेत, तिथे पा. रंजिथ यांचा ‘थंगलान’ चित्रपट वास्तवाचं दाहक चित्रण करून आपल्याला चकित करतो. असं जाणवतं की पा. रंजिथ हातात कॅमेरा आणि डोक्यात कोणतीही तडजोड न करण्याची जिद्द घेऊन, भारताच्या भूतकाळात खोल उडी घेऊन एक विलक्षण गोष्ट घेऊन आले आहेत. पण हा चित्रपट यासाठी विलक्षण नाही, कारण तो भूतकाळाला रोमँटीक नजरेनं बघतो, तर सत्याची चमक त्याला विलक्षण बनवते.
चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर आहे, कोलार गोल्ड फिल्ड्स. पण याची सुरूवात एखाद्या धमाकेदार दृश्यानं नाही तर निःशब्द हुंकाराने होते. थंगलान एका दलित पात्राचं नाव आहे. सारे विरोधात असूनही तो जमिनीच्या एका तुकड्यावर आपली मालकी गाजवतो. ही जमीन तशी मौल्यवान नाही, पण ज्या सामाजिक व्यवस्थेत त्याचं अस्तित्वच इतरांना मान्य नाही, तिथे जमिनीचा हा लहानसा तुकडा थंगलानच्या स्वातंत्र्याची युद्धभूमि बनते.
पण हे स्वातंत्र्य अल्पजीवी ठरतं. स्थानिक जमिनदाराला, ज्याला मिरासीदार म्हटलं जातं, हे स्वातंत्र्य खूपतं आणि तो कटकारस्थानं करून थंगलानची जमीन हिसकावून घेतो. थंगलान आणि त्याच्या कुटुंबातील सात लोकांना पन्नैयल व्यवस्थेत काम करायला भाग पाडलं जातं. पन्नैयल ही वेठबिगारीची व्यवस्था आहे, जी नाव वगळता गुलामीपेक्षा भिन्न नाही.
यानंतर रंजिथ जातिय दमन व्यवस्थेची कटू वास्तवता आपल्याला दाखवू लागतात. या व्यक्तिगत संकटाचा उपयोग ते आपल्या देशातील कोट्यवधी लोकांच्या जगण्याची काळी बाजू दाखवण्यासाठी करतात ज्यांना अस्पृश्य म्हणून समाजातील मुख्य प्रवाहापासून, साधनसंपत्तीपासून शेकडो वर्षे वंचित ठेवण्यात आलं आहे. रंजिथ केवळ ही दमनकारी व्यवस्था दाखवत नाहीत तर, इतिहासाच्या त्या दारांनाही उघडतात जी आजवर अनेकांनी उघडण्याचं साहस केलं नाही.

थंगलानच्या गावात लॉर्ड क्लेमेंट नावाचा एक ब्रिटीश अधिकारी येतो आणि लोकांना सोन्याचा शोध घेण्यात मदत मागतो. इथून थंगलानच्या जगण्याला नवं वळण मिळतं. वसाहतवादाच्या आपल्या समजूतीलाही एक नवी दृष्टी यातून मिळते. थंगलानच्या घरचे लोकही अनिच्छेने या शोधात सहभागी होतात कारण त्यांना मिरासीदाराची गुलामी मान्य नाही. स्वातंत्र्य आणि चांगल्या भविष्याच्या आशेपायी ते या सोन्याच्या शोधासाठी होकार देतात. थंगलानच्या जगण्यातील हे परिवर्तन, ब्रिटीश वसाहतवाद आणि दलित इतिहास यांच्या पारंपरिक विश्लेषणालाही आव्हान देतं.
चित्रपटाच्या सर्वांत प्रभावी दृश्यांपैकी एकात थंगलान जेव्हा आपल्या गावी परततो तेव्हा तो पूर्णपणे बदललेला असतो. इंग्रजी शिपायांचा पोषाख करून, हातात बंदूक घेऊन, घोड्यावर स्वार होऊन तो येतो. त्याचं हे रुप दर्शकांना चकित करतं आणि विचार करायला भाग पाडतं की मनु स्मृतिनुसार अस्पृश्य आणि शूद्र यांना शस्त्राधिकार नसतांना, त्यांना जर ती मिळाली असती तर काय घडलं असतं? इंग्रजांना या प्राचीन मान्यतांशी काही देणंघेणं नव्हतं त्यामुळे त्यांनी थंगलानसारख्या दलितांना सत्ता आणि शक्तीची ही प्रतीकं सोपवली जी एरव्ही त्यांना मिळू शकत नव्हती.
थंगलानचं बदललेलं रुप, परिघावरील समुहांवर लादलेल्या प्रतिबंधांना आव्हान देतं, शिवाय वसाहतकाळातील त्यांच्या सशक्तीकरणाकडे नव्या नजरेनं बघायला भाग पाडतं. रंजिथच्या चित्रपटातून हे ऐतिहासिक सत्य बाहेर येतं की इंग्रजांनी अस्पृश्यांना हत्यारं दिली, शस्त्रसज्ज अस्पृश्यांनी भारतात इंग्रजी राज्य स्थापन करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी मोलाची मदत केली.
रंजिथच्या चित्रपटात उल्लेख नसला तरीही, भीमा-कोरेगाव युद्धाची या संदर्भात आठवण येते. इथे महार शिपायांनी ईस्ट इंडिया कंपनीकडून लढताना, ब्राह्मण पेशवा दुसरा बाजीराव याचा पराभव केला होता. 1857 चा पहिला स्वातंत्र्य विद्रोह शमवण्यात महार आणि परिया रेजिमेंट्स यांची प्रमुख भूमिका होती. रंजिथ ऐतिहासिक गुंतागूंतीपासून पळ काढत नाही पण त्याचवेळी ते प्रेक्षकांना सत्ता आणि प्रतिकार यांच्या क्लिष्ट जाळ्यावर विचार करायला भाग पाडतात.
हे ऐतिहासिक संदर्भ दोन उद्देश पूर्ण करतात. यातील भारतीय इतिहासाच्या त्या भागावर प्रकाशझोत पडतो ज्याला मुख्यप्रवाहातील कथांमधून वगळलं जातं आणि ब्रिटीश वसाहतवाद आणि दलित इतिहास यांच्याविषयीची आपली समज वाढवण्याचं काम करतं. रंजिथच्या चित्रपटात ब्रिटीश हे खलनायकही नाहीत की मुक्तिदाताही नाहीत. ते केवळ संधीसाधू आहेत. ज्यांनी भारतावर वर्चस्व मिळवण्याच्या प्रक्रियेत नकळत इथल्या जातिय व्यवस्थेलाही तडे दिले.
याची नोंद एका प्रसंगातून दिसून येते ज्यात लॉर्ड क्लेमेंट दलित मजूरांशी संधी आणि चांगली मजूरी याविषयी बोलत असताना, त्याचा दुभाषक, जो सवर्ण आहे, मुद्दाम चुकीचं भाषांतर करतो. यातून भारताच्या शोषण व्यवस्थेची पातळी दिसून येते आणि अस्पृश्य कोणत्या परिस्थितीत फसले होते तेही समजून येतं. एकीकडे शोषक तरीही योग्य लोकांना सन्मानाने वागवणारी ब्रिटीश सत्ता होती आणि दुसरीकडे पारंपरिक जातियतेच्या बेड्या होत्या.

थंगलानची कथा पुढे व्यक्तिगत मुक्तीकडून स्वतःला ओळखण्याच्या प्रवासाकडे जाते. सोन्याचा शोध एक रुपक बनतं, जी त्याच्या इतिहासाची आणि वारशाची शोध घेण्याची यात्रा होते. इथे रंजिथ सोन्याच्या वैयक्तिक शोधाला संस्कृतिच्या व्यापक शोधाशी जोडून घेतात. ‘थंगलान’मधील प्रतीकात्मकता समृद्ध आणि बहुविध आहे. डोकं तुटलेली बुद्धाची मुर्ती ही भारतातील बौद्ध धर्माच्या दमनाचं प्रतीक आहे.
या रुपकाला नवीन अर्थ मिळतो जेव्हा थंगलानचा मुलगा, ज्याचं नाव महान बौद्ध सम्राट अशोक याच्या नावावरून अशोकन ठेवण्यात आलं आहे, तुटलेलं डोकं पुन्हा जोडतो. यातून देशातील बौद्ध धर्माच्या पुनर्स्थापनेच्या शक्यतेसोबतच, एका तात्विक व्यवस्थेच्या पुनरुत्थानाचंही प्रतीक आहे, ज्यानं एकेकाळी इथल्या जातिय व्यवस्थेला आव्हान दिलं होतं. सोन्याच्या खाणींची रक्षा करणारा काळा बिबट्या, ब्लॅक पँथर पार्टी तसेच दलित पँथर पार्टीची आठवण करून देतो.
भारतातील दलितांचा संघर्ष अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या संघर्षाशी इथं रंजिथ जोडतातच शिवाय महाराष्ट्रातील दलित पँथर आणि तामिळनाडूतील विदुथलाई चिरूथिगल काची किंवा वीसीके या आंदोलनांशी जोडतात, ज्यांनी काळ्या बिबट्याला आपल्या संघर्षाचं प्रतीक म्हणून निवडलं आहे. यातून दिसतं की शोषणाच्या विरोधातील संघर्ष ही वैश्विक घटना असते आणि विभिन्न संदर्भात संघर्षाच्या समान प्रवृत्तीला ती प्रकाशित करते.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘थंगलान’ मध्ये भारतातील परिघावरील समुदायांच्या एकत्रित वारशाचीही पडताळणी केली गेलीय. जेव्हा थंगलानला आपली नागवंशीय ओळख पटते तेव्हा चित्रपट, बहुजन विचारधारेच्या राजकीय तत्वज्ञानाकडे घेऊन जाते, ज्यानुसार देशातील एससी, एसटी तसेच ओबीसी यांचा वारसा एकच आहे. ही तपासणी सध्याच्या काळात खूप महत्त्वाची आहे कारण, सध्या इतिहासावरून प्रचंड मारामारी सुरू आहे.
हा चित्रपट बौद्धिक खाद्यासोबतच मनोरंजनही करतो. यात एक्शन आहे, इतिहास आहे, चर्चा-विचार करण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. थंगलानचं एका अस्पृश्य वेठबिगारापासून आपली स्वतंत्र ओळख गवसलेल्या एका व्यक्तीमधील रुपांतरण प्रभावीपणे उतरलं आहे. यातील सहाय्यक कलाकारांच्या भूमिकाही महत्वाच्या आहेत. विशेषतः इंग्रजी पात्रांच्या.
विदेशी पात्रांना कार्टुनिस्ट बनवण्याच्या जाळ्यात रंजिथ सापडत नाहीत. ते अशी पात्रं उभारतात जी समजुतदार, शहाणी आहेत पण वसाहतवादी व्यवस्थेची तीही शिकार आहेत. यातील सवर्ण पात्रांचीही अशीच स्थिती आहे. ते अशा समाजात जगत आहेत जो बदलत आहे, त्याची सत्ता बदलत आहे, त्यांची पारंपरिक स्थिती ढासळत आहे.
भारतीय चित्रपट उद्योगांकडून ही अपेक्षा नेहमीच केली जाते की त्यांनी अधिक वैविध्यपूर्ण आणि वैचारिक चित्रपट तयार करावेत. ‘थंगलान’ या अपेक्षा पूर्ण करतो. मोठ्या बजेटचा चित्रपट असूनही तो कटू व अस्वस्थ करणारं सत्यचित्रण करण्यास घाबरत नाही. ही एक ऐतिहासिक कलाकृती आहे जी वर्तमानाशी सुसंगत आहे.

परिघावरील समुहाला केंद्रावर ठेवून निर्मित झालेला हा चित्रपट, भारताचा भूतकाळ व वर्तमान यांची सांगड घालण्याचा व त्याला समजण्याचा प्रयत्न करतो. ‘थंगलान’चा प्रभाव चित्रपटगृहांपूरता मर्यादित राहत नाही. शक्यता आहे की या चित्रपटामुळे इतिहासकार, वसाहतकाळातील दलितांच्या भूमिकेविषयी नव्यानं विचार व अभ्यास करतील. सामाजिक कार्यकर्ते जातिगत भेदभावावर बोलतील. हा चित्रपट भारतीय चित्रपट जगातील, देशाचा इतिहास व सामाजिक उतरंड यांच्या अप्रिय सत्यावर प्रकाश टाकण्याच्या नव्या दिशेकडे घेऊन जातो.
त्याहीपेक्षा हा चित्रपट आम्हाला इतिहासाची गुंतागूंत समजण्यास मदत करतो आणि आपल्या दृढ विचारसरणीला आव्हान देत, गप्प बसवण्यात आलेल्या लोकांची हाक बनतो. ज्या काळात लोक महाकाव्यातील एकांगी आणि सामान्य करण्यात आलेल्या कथनात गुंग आहेत, त्या काळात हा चित्रपट त्यातील कच्चे दुवे शोधतो आणि तुटलेल्या साखळ्या सांधतो.
‘थंगलान’च्या शेवटास प्रेक्षकांकडे प्रश्न जास्त आणि उत्तरं कमी उरतात. हीच या चित्रपटाची यशस्विता आहे. तो आम्हाला आपला भूतकाळ, आपली ओळख आणि आपल्या भविष्याविषयी अनेक प्रश्न विचारतो. हा चित्रपट बघून काही प्रेक्षकांच्या समजूतीत नवी भर पडेल तर काही यातील संदेश समजून घेण्याचा प्रयत्न करतील. पण या चित्रपटाने पा. रंजिथ यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की ते अशा शेतीची मशागत करायला तयार आहे जिथे पाय टाकायलाही अन्य लोक तयार नाहीत.
‘थंगलान’ केवळ इतिहासाचं पुनर्लेखन करत नाही तर हेही सांगतो की भारतीय चित्रपट काय करू शकतो, त्याच्यात काय क्षमता आहेत. हा चित्रपट इतिहास आहे, संघर्ष आहे आणि अनेक प्रश्न उपस्थित करणाराही आहे. एका अशा काळात जिथे सामान्य लोकांना आनंदी आणि अच्छे दिनांची स्वप्ने दाखवणाऱ्या मीथकांची रेलचेल आहे, रंजिथ आम्हाला आपल्या एकत्रित वारशाची आणि त्यातील गुंतागूंतीच्या दुःखद सत्यांची जाणीव करून देतात. हा सत्याचा साक्षात्कार होणं हे कोणत्याही सोन्याच्या खाणीच्या शोधापेक्षा मोलाची घटना आहे.
(अनुवाद - प्रतिक पुरी)






