- प्रभाकर तमिलरासु
सहा वर्षांपूर्वी जेव्हा जिया कुमारी, बिहारमधील आपल्या जन्मगावी गेली होती तेव्हा तिची अस्खलित तामिळी भाषा इतर नातेवाईकांच्या ईर्षेचं कारण बनली होती. त्यांना वाटलं की जिया आणि तिच्या बहिणी मुद्दामच त्यांना चिडवण्यासाठी अशा तमिळ भाषेत बोलत आहेत जी त्यांना समजत नाही.
चेन्नईच्या बाहेरील भागात, पल्लवरम् इथं आपल्या घरात बसलेल्या जियाच्या मोठ्या बहिणीनं, रियानं सांगितलं की त्या तामिळ भाषा सहजपणे शिकल्या. 17 वर्षांपूर्वी बिहार मधून स्थलांतर केलेल्या रोजंदार मजूराच्या मुलीनं, जियानं दहावीत तामिळ भाषेत सर्वांधिक गुण मिळवून खळबळ उडवून दिली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भारतीय भाषा समर कँपमध्ये जियाचं कौतुक केलं. जियाला तामिळ भाषेत 100 पैकी 93 गुण मिळाले होते. त्यांनी भारतीय भाषा कार्यक्रम जियाला समर्पित केला.
बिहारी असूनही तमिळ भाषेत सर्वाधिक गुण
तामिळनाडूतील डीएमके सरकार राष्ट्रीय शिक्षण नितीतील काही गोष्टी लागू करण्यास तयार नसताना, राज्य व केंद्र सरकार यांच्यात वाद सुरू असताना प्रधान यांनी असं वक्तव्य केलं. राज्याला त्रैभाषिक धोरण हे हिंदी लादण्याचा प्रयत्न वाटत आहे. 16 वर्षांची जिया आपल्या घराच्या दारावर गर्वानं उभी आहे. त्यावर पारंपरिक कोलम नक्षी काढलेली आहे. ती तिनं काढलेली आहे. जिया व रिया दोघीही हिंदी लादण्याच्या विरोधात आहेत. सुप्रिया म्हणते, “इथल्या लोकांकडून अशी अपेक्षा करणं व्यर्थ आहे की त्यांनी आमच्यासोबत बोलण्यासाठी हिंदी शिकावं. जसं की तामिळनाडूतील कोणताही माणूस उत्तर भारतात गेल्यावर तिथले लोक त्याच्याशी तामिळ बोलतील अशी अपेक्षा नाही ठेवू शकत.”
जियाचे वडील धनंजय तिवारी व आई रिना देवी यांची मुळ भाषा भोजपूरी आहे. बांधकाम मजूर म्हणून ते बिहारच्या सिवान भागातून चेन्नईत आले होते. जियानं दहावीत 500 पैकी 467 गुण मिळवले आहेत. तिची मोठी बहिण रिया आता बारावीत आहे. तिनंही आपली दुसरी भाषा म्हणून तामिळ घेत दहावी उत्तीर्ण केली होती. रिया सांगते, “मी तामिळ शिकत आहे. दहावीत मला तामिळ मध्ये 80 गुण मिळाले होते. पण जियाला सारेच ओळखू लागले आहेत. तामिळ शिकण्यासाठी आम्हाला ओळखलं जात आहे याचा आम्हाला आनंद आहे.” 
स्थलांतर करणाऱ्यांसाठी तामिळ ही एक भाषा नाही तर चांगल्या संधींची शक्यता
सुप्रिया सर्वांत लहान आहे व तीही तामिळ बोलते. रिना देवीही भोजपूरी ढंगात तामिळ बोलतात. रियाला इंजिनियरींग करायचं आहे तर जियाला मेडिकलला जायचं आहे. रिना देवी सांगतात, “मी सतरा वर्षांपूर्वी आले होते. तेव्हापासून मला कधीही बाहेरची व्यक्ती म्हणून कोणी पाहिलं नाही. सुरूवातीला मला तामिळ बोलण्यात अडचण यायची. पण शेजारीपाजारी माझी मदत करायचे. इथले बाकीचे लोकही मला समजून घ्यायचे. त्यांच्यामुळे मी तामिळ बोलायला शिकले.”
धनंजय तिवारींना तामिळ समजतं पण बोलताना त्रास होतो. ते 700 रुपये रोजंदारीवर वेल्डर म्हणून काम करतात. ते सांगतात, “घरी आणि कामाच्या ठिकाणीही मला तामिळीत बोलणं गरजेचं नव्हतं कारण मालकांना हिंदी यायची. माझ्यासोबत काम करणारे बाकी लोकही उत्तर भारतातले होते. त्यामुळे मी तामिळीविषयी फार विचार केला नाही पण मला ती समजते.”
बिहारमध्ये मुली सुरक्षित नाहीत
या स्थलांतरीत लोकांसाठी तामिळ ही केवळ एक भाषा नाही तर चांगल्या संधींची शक्यताही आहे ज्या त्यांना बिहारमध्ये मिळत नाहीत. रिना देवी सांगतात, “माझ्या मुली बिहारमध्ये असत्या तर मला नाही वाटत की त्या इतक्या शिकू शकल्या असत्या.” धनंजय सांगतात, “बिहारमध्ये मुली सुरक्षित नाहीत. तिथल्या गावांमध्ये शाळा नाहीत. प्री-स्कूल, प्रायमरी स्कूल असतात पण हायस्कूलसाठी गावापासून 10-15 किमी जावं लागतं. कॉलेजसाठी शहरात जावं लागलं असतं. मुलींना तिथं एकटं पाठवणं धोकादायक आहे.”
रिना देवी तामिळनाडू सरकारच्या मिड-डे मिल योजना, निःशुल्क पोषाख, जोडे, पुस्तकं यांच्यासाठी सरकारला धन्यवाद देतात. त्या सांगतात, “पण आता आमची काळजी वाढली आहे कारण या योजना आठवी पर्यंतच असतात. पण सरकारी शाळा नसत्या तर आमच्या मुली इतकंही शिकू शकल्या नसत्या. आमच्या दोघांच्या तुटपुंज्या कमाईत त्यांना शिकवणं कठीण गेलं असतं.”
सर्वांत लहान सुप्रिया तामिळमध्येच नाहीतर चेन्नईच्या बोलीभाषेतही बोलू शकते त्यामुळे ती बिहारी आहे हे समजून येत नाही. तिचा जन्मच इथला असल्यामुळे हे शक्य झालं असं रिना देवी सांगतात. कुटुंबानं आडनाव न लावण्याची इथली प्रथाही उचलली आहे. रिना देवी सांगतात, “इथं कोणीच आपलं आडनाव लावत नाही. आमचं आडनाव तिवारी आहे. इथले लोक आडनाव का लावत नाही ते मला समजत नाही. पण आम्हीही आता तसंच करतोय. लग्नानंतर मुलींना वाटलं तर त्या नवऱ्याचं आडनाव लावतील.” त्यांना द्रविड आंदोलनाची माहिती नाही ज्यात लोकांना आडनाव न लावण्यासाठी प्रेरित केलं गेलं होतं. त्याऐवजी ते आपल्या गावाचं नाव आपल्या नावासमोर लावतात.






