- किरण गिते
‘‘चमार’ ही आमच्यासाठी वापरण्यात येणारी शिवी आहे. आम्ही मेलेल्या जनावरांच्या कातड्यापासून चप्पल आणि इतर साहित्य बनवतो म्हणून आमची लोकांना किळस येते. रस्त्यातून जाता-येता ‘चमार आया’ असे लहानपणापासूनच मला हिणवण्यात येत होतं. चमार हा आमचा पेशा आहे, आमची रोजीरोटी आहे, आमचा व्यवसाय आहे.
मग पुढे मुंबईत आलो, शिक्षण घेतले आणि ‘चमार’ हाच शब्द एक ब्रँड कसा बनेल असा विचार करत गेलो आणि त्यातून सुरू झाला ‘चमार स्टुडियो’...’’ उत्तरप्रदेशच्या जौंनपूर येथे राहणाऱ्या सुधीर राजभरने सुरू केलेला हा ‘चमार स्टुडियो’ आज जागतिक स्तरावर फॅशन उद्योगाच्या प्रतिष्ठित वर्तुळात नावाजला जाणारा ब्रँड म्हणून ओळखला जातो. चमार स्टुडिओमध्ये टायरांचा पुनर्वापर करुन हातानं बॅग बनवल्या जातात.
पंजाबची लोकप्रिय पॉप गायिका गिन्नी माहीला शाळेत असताना तिच्या एका मैत्रिणीने विचारले, तू कोणत्या जातीची? गिन्नी म्हणाली, शेड्युल कास्ट... मग पुढचा प्रश्न, म्हणजे कोणती? गिन्नी म्हणाली, चमार... मैत्रिण हबकली आणि म्हणाली, मग तर मला तुझ्यापासून जपून राहावं लागेल, कारण चमार म्हणजे एकदम डेंजर... पुढे मग जाणीवपूर्वक तेच शब्द घेऊन गिन्नी माहीने "डेंजर चमार' हे गाणं तयार केलं. जाती व्यवस्थेच्याविरोधात गाणं हेच प्रमुख शस्त्र घेऊन लढणारी गिन्नी माही आज युट्युब आणि फेसबुकवर अक्षरश: धुमाकूळ घालतेय…
(चमार स्टुडियोचे संचालक सुधीर राजभर)
गिन्नीचं ‘डेंजर चमार’ हे गाणं खूप गाजतंय. त्याविषयी गिन्नी म्हणते, ‘जनावरांच्या कातडीपासून चपला बनविण्याचा या समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे. आता चित्र बदलतंय. त्यामुळे त्यापलीकडे जाऊन चमार समाज मोठा व्हावा, समाजातील काही गृहितकं बदलावीत यासाठी माझा प्रयत्न आहे. ‘चमार’ म्हणजे फक्त एक समाज नव्हे तर 'चमडी, मांस आणि रक्त', ही या शब्दाची खरी व्याख्या.
ती मला लोकांना पोहोचवायची आहे. कारण, या तीन गोष्टींपासूनच माणूस बनला आहे. तरीही माणसा-माणसांत भेदभाव का केला जातो? इतर धर्मातील, जातीतील उच्च लोकांना जसा जगण्याचा अधिकार आहे, तसाच आम्हालाही आहे. ‘चमार’ हे नाव तितक्याच अभिमानाने घेतलं गेलं पाहिजे.
काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेश मधील सहारनपूर जिल्ह्यातील घडकौली गावात लावलेल्या फलकावरून वातावरण तापलं होतं. फलक होता भीम आर्मी आणि या संघटनेचा. ‘द ग्रेट चमार, भीम आर्मी घडकौलीट या आशयाचा हा फलक पाहून गावातील सवर्ण अर्थातच ठाकूर आणि दलित यांच्यात वाद सुरू झाला. इथूनच भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद अर्थातच शोषित आणि दलित समाजाचा चेहरा म्हणून समोर आला. आज या नावासमोर मोठं वलय निर्माण झालेल आहे. त्यांच्या नावापासून ते थेट पिळदार मिशीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर त्यांच्या समर्थक आणि विरोधकांत सुद्धा चर्चा होते.
चमार गर्ल… ‘द ग्रेट चमार आणि चमार स्टुडियो…
सेलिब्रिटी बनण्याची अंतर्भूत क्षमता व्यक्तीचे जातवर्ग चरित्र आणि माध्यमं कोणाच्या हातात आहेत, यावर अवलंबून होती. पण आज एकरेषीय माध्यमांमध्येच ही ताकद नाहीये. ग्रामीण आणि निमशहरी भागात इंटरनेटचं प्रमाण वाढत गेलं, तसं अनेक सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर ग्रामीण-निमशहरी, आशय-विषय-शैली-मांडणीचा झपाट्यानं विस्तार झाला. जे विषय कधीही मुख्य माध्यमांमध्ये हिट ठरतील, असे वाटतही नव्हतं अशा अनेक गृहीतकांना आज धक्का बसतोय. सेलिब्रिटी नावाच्या मिथकासाठी लागणारे वलय निर्माण होण्यासाठी आता कुण्या एककेंद्री माध्यम व्यवस्थेची आता गरज उरलेली नाहीये.
(‘डेंजर चमार’ गाण्यातून विद्रोह मांडणारी प्रसिद्ध रॅपर गिन्नी माही)
चमार गर्ल… ‘द ग्रेट चमार’ चंद्रशेखर आझाद रावण… आणि आता चमार स्टुडियो… व्यक्ती वेगळ्या, संस्था वेगळ्या... घटना वेगळ्या, त्याचे प्रकार वेगळे, उद्देश वेगळे, मागण्या वेगळ्या... देशाच्या कानाकोपऱ्यात घडत असलेल्या किंवा घडून गेलेल्या या सगळ्यांमध्ये मात्र एक समान धागा निश्चितच तो म्हणजे, प्रत्येकाला काहीतरी सांगायचंय आणि ते सागण्याची प्रत्येकाची पद्धत अनोखी, कल्पक आणि नावीन्यपूर्ण प्रसंगी आक्रमकही आणि म्हणूनच परिणामकारक देखील...! शोषितावस्थेतून, वंचितावस्थेतून बाहेर पडून मुक्तीदायी समाजाकडे वाटचाल करण्यासाठीचा एक अनोखा प्रकार.
राहुल गांधी धारावीतल्या ‘चमार स्टुडियो’ला भेट देतात तेव्हा?
हे सगळं सांगण्याचं निमित्त म्हणजे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मुंबईच्या धारावीमध्ये ‘चमार स्टुडियो’ला दिलेली भेट. राहुल गांधी भेटायला आल्यानंतर चमार स्टुडिओचे डिझायनर सुधीर राजभर यांनी त्यांना स्टुडिओतील कामासंदर्भात माहिती दिली. चमार स्टुडिओमध्ये टायरांचा पुनर्वापर करुन हातानं बॅग बनवल्या जातात.
चामड्याचं काम करणाऱ्या दलित समाजाच्या परंपरेचं जतन करुन ही कला पुढं नेण्याचं काम याद्वारे केलं जातं. याद्वारे पारंपारिक हस्तकलेला आधुनिक जगातील व्यापाराशी जोडण्यात आले असून त्या माध्यमातून धारावीतील कारागिरांना देखील आर्थिक सक्षम करण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आणि देशभरात या चमार स्टुडियोबद्दल कुतुहल निर्माण झालं.
(‘द ग्रेट चमार, भीम आर्मी’ असा गावातच फलक लावणारे आ. चंद्रशेखर आजाद.)
"चमार स्टुडिओचे सुधीर राजभर यांच्या रुपानं भारतातील लाखो दलित तरुणांच्या जीवनाचं आणि त्यांच्या प्रवासाचं चित्र उभं राहतं. त्यांच्याप्रमाणे प्रतिभावान, कल्पनांनी परिपूर्ण आणि यशस्वी होण्यासाठी धडपडणारे लाखो तरुण आहेत. मात्र, त्यांना त्यांच्या क्षेत्रातील उच्चभ्रू लोकांशी संपर्क साधता येत नाही किंवा तशी संधी मिळत नाही. मात्र, राजभर यांनी वेगळा मार्ग निवडला. त्यामध्ये त्यांना स्वतःचं नेटवर्क तयार करण्याची संधी मिळाली. धारावीमधील कारागिरांचं सुप्त कौशल्याचं महत्त्व उमजून घेतलं आणि जागतिक स्तरावर फॅशन उद्योगात प्रतिष्ठित वर्तुळात नावाजला जाणारा ब्रँड त्यांनी तयार केला. पारंपारिक कारागिरी आणि आधुनिक उद्योजकता एकत्र काम केल्यावर काय घडू शकते याचं उदाहरण चमार स्टुडिओच्या यशातून समोर आलं आहे. कुशल कारागिरांनी त्यांच्या हातांनी बनवलेल्या कलाकृतींना एक वेगळं यश मिळालं आहे. आज धारावीमध्ये सुधीर आणि त्यांच्या टीमसोबत काम करताना, मी विविध क्षेत्रांमधील कुशल कामगारांना उत्तेजन देणाऱ्या समावेशक उत्पादन नेटवर्कचे महत्त्व अधोरेखित झालं." असं राहुल गांधी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
गोवंशहत्याबंदी कायद्यामुळे धारावीच्या चर्मोद्योग व्यवसायाला घरघर
धारावी लेदर मार्केटमधील कारागिरांकडे चामड्याच्या कलाकुसरीची समृद्ध परंपरा आहे, जी पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. हे कुशल कामगार मेलेल्या जनावरांचे कच्चे चामडे घेतात, ते वळवतात, त्यांनतर त्याच्यावर प्रक्रिया करून त्याच्या वस्तू बनवल्या जातात. धारावीचा एक प्रमुख उद्योग म्हणजे चर्मोद्योग. पर्स, वॉलेट, बॅग, शूज अशा चामड्याच्या वस्तूंचे हक्काचे खरेदीचे ठिकाण म्हणून धारावी अनेकांना परिचित आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून… नक्की सांगायचे तर 20 वर्षांपासून हा परिचय काहीसा धूसर होत चालला आहे. कुठेतरी काहीतरी बिघडतेय. 
(धारावीतल्या चमार स्टुडियोला विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी भेट दिली.)
चिनी आणि फॅन्सी वस्तूंची स्पर्धा हे त्याचे मुख्य कारण. त्यात आता आणखी एक भलीथोरली भर पडलीये… महाराष्ट्रात लागू झालेला गोवंशहत्याबंदी कायदा! केवळ धारावीच नव्हे, तर महाराष्ट्रातील अडचणीत असलेल्या चामडेउद्योगाचे कंबरडेच त्यामुळे पुरते मोडणार आहे.धारावीत पूर्वी कच्च्या चामड्यावर प्रक्रिया करण्यापासून ते वस्तू तयार करण्यापर्यंत सर्व कामे होत असत. मात्र, गेल्या 20 वर्षांत उतरती कळा लागलेल्या या व्यवसायातील अनेक प्रक्रियांचे काम येथे बंदच झाले.
कोण आहे सुधीर राजभर आणि त्याने स्टुडियोला ‘चमार’ हे नाव का दिले?
या सगळ्या वस्तूंसाठी बैलाच्या चामड्याचा वापर केला जातो. इतर अनेक वस्तू घडवण्यासाठी म्हैस, मेंढी, बकरीच्या कातड्याचाही वापर होतो. हाती असलेल्या सामग्रीच्या जोरावर आजच्या स्पर्धेच्या काळातही हे कारागीर विश्वासाच्या बळावर आपले अस्तित्व टिकवून होते. मात्र राज्य सरकारच्या गोवंश हत्याबंदीकायद्याने हे अस्तित्व टिकून राहील की नाही, असे प्रश्चचिन्ह निर्माण झाला. अशावेळी सुधीर राजभरसारखा एक उद्यमशील तरूण आपल्या वेगवेगळ्या कल्पना घेऊन या धारावीत येतो आणि गोवंश हत्याबंदी कायद्यावर मार्ग काढत रबरी टायरच्या सहाय्याने त्याच वस्तू बनवतो आणि त्याला नाव देतो चमार स्टुडियो… 
(विश्वविख्यात पॉप सिंगर रिहाना चमार स्टुडियोच्या प्रेमात पडली.)
चमार स्टुडियोमध्ये फॅशनेबल बॅग, पर्स, कापडी थैली आणि बेल्ट तयार केले जातात. सुधीर राजभरच्या या नव्या धाटणीच्या प्रयोगामुळे शेकडो कारागिरांना जीवनदान मिळालं आहे ज्यात अनेक दलित आणि मुस्लिम कारागिरांचा समावेश आहे. सुधीर म्हणतो, सुरुवातीला मी कापडी बॅग तयार करून त्यावर वेगवेगळ्या भाषेमध्ये ‘चमार’ हा शब्द लिहून त्याचे ब्रँडिग करण्याचा प्रयोग केला. ‘चमार’ या शब्दाला समाजात स्थान मिळवून देणं आणि हा आमचा फक्त पेशा आहे हे ठासून सांगणं यासाठीचा तो खटाटोप होता.
पॉप सिंगर रिहाना चमार स्टुडियोच्या प्रेमात पडते तेव्हा
चमार स्टुडियोत तयार झालेल्या बॅग्ज आज बाजारात दीड हजार रुपयांपासून सहा हजारापर्यंत विकल्या जातात. आता तर या ब्रॅन्डने आंतरराष्ट्रीय स्तरावरील फॅशन बाजारात स्थान मिळवले आहे. प्रख्यात पॉप सिंगर रिहानाला याचे श्रेय जातं. मध्यंतरी चमार स्टुडियोने तयार केलेल्या दहा लाख रुपये किमतीच्या एका खुर्चीवर बसून रिहानाने फोटो शुट केलं होतं. ही खुर्ची चमार स्टुडियोच्या टायरपासून बनवलेल्या चामड्याची होती. रिहानाचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आणि त्याबरोबर चमार स्टुडियोची नावदेखील… 
(चमार स्टुडियोचे वेगवेगळे ब्रँड्स…)
समाजात सतत वेगवेगळ्या पातळ्यांवर बदल होत असतात. त्यात सतत ट्रेंडच्या नावाने जे वारे वाहतात त्याकडे आपण फॅशन म्हणून बघतो. कोणताही ट्रेंड हा कायस्वरुपी राहत नाही, ट्रेंड हे सतत बदलत जातात. काही ट्रेंड हे तात्कालिक स्वरुपात अस्तित्वात येतात तर काही ट्रेंड हे समाजात रुजत जातात, त्यांचा शिरकाव हा पंरपरेत होतो आणि कळत नकळत आपल्या जगण्याचा एक भाग बनून जातो. आत्तापर्यंत जर या ट्रेंडकडे आपण पाहिले तर ट्रेंड हे वरच्या स्तरापासून खालच्या स्तरांवर रुजवले गेले आहेत.
ट्रेंडचा प्रवास हा खालून वर असा कधीच जात नाही. पण अलिकडच्या काळात हा ट्रेंड आता खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत नेण्याला सुरूवात झाली आहे. प्रस्थापित ट्रेंडची परिभाषा मोडीत काढत वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करत बाबासाहेबांच्या विचार रुजवण्यासाठी आंबेडकरी, बहुजन ट्रेंड सुरु करण्याचा यशस्वी प्रयत्न सध्याची तरुण पिढी करतेय. यात सामाजिक माध्यमांचा अभिनव वापर त्यांनी केला आहे. कारण ही माध्यमे तशी जातीनिरपेक्ष आहेत.






