‘’पंडित जवाहरलाल नेहरुंनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिलं त्याचा निषेध करण्याची तुमच्यात हिम्मत आहे का?’’
महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या खास आक्रमक शैलीत बुधवारी विरोधकांना असा प्रश्न केला. निमित्त होते, समजावादी पार्टीचे आमदार अबू आजमी यांनी औरंगजेबाची स्तुती केल्याचे. विधान परिषदेत अबू आजमींच्या वक्तव्यावरुन महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये गदारोळ पहायला मिळाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिलेक्टीव्ह निषेधाच्या मुद्यावरुन विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि आक्रमकपणे आपले मुद्दे मांडताना ते म्हणाले की, “अबू आजमीला 100 टक्के जेलमध्ये टाकू. तुम्ही थोडी नीट माहिती घेतली पाहिजे. त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की, पंडित जवाहरलाल नेहरुंनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिलं त्याचा निषेध करण्याची तुमच्यात हिम्मत आहे का?. आम्ही खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन करणार नाही. ‘देश, धर्म पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी एकही शंभूराजा था’ त्यामुळे या ठिकाणी पंडित नेहरु यांचा धिक्कार झाला पाहिजे” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
नेहरूंनी खरंच शिवाजी महाराजांचा अपमान केला होता का?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी खरचं शिवाजी महाराजांच्या विरोधात लिहिलं आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा विषय नवीन नाही यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्यावर टीका करतान.
पंडित जवाहरलाल नेहरूंचा प्रश्न निर्माण केला होता. हा वाद निर्माण झाल्यानंतर काँग्रेसने स्पष्टीकरण दिले होते की, नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया लिहिताना तुरुंगात होते आणि त्यांच्याकडे कोणतेही संदर्भ नव्हते. पुढील आवृत्तीत त्यांनी सुधारणा केल्या होत्या, असे काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा त्यावेळी म्हणाले होते. काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा म्हणाले होते, "हे तेच नेहरू आहेत ज्यांनी 1962 मध्ये प्रसिद्ध शिल्पकार नानासाहेब करमरकर यांना पद्मश्री दिली होती. करमरकर यांनी शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा घडवला होता, जो आजही पुण्यात आहे."
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटं बोलत आहेत…
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ‘द डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठ्या आदराने वर्णन करण्यात आले आहे, तसेच मुघल सम्राट औरंगजेबावर टीका करण्यात आली आहे.
नेहरूंच्या 'भारताचा शोध' या पुस्तकात त्यांनी शिवाजी राजांबद्दल असे म्हटले आहे की, "औरंगजेबाच्या साम्राज्याला कलह आणि बंडाचे ग्रहण लागले असताना तिकडे पश्चिम भारतात मराठ्यांची सत्ता वाढू लागली होती, स्वतःला एकसंध करू लागली होती. 1630 साली जन्मलेले छत्रपती शिवाजी महाराज हे डोंगराळ भागातील काटक मावळ्यांचे गनिमी काव्याने लढणारे आदर्श नेते होते, त्यांच्या घोडदळाने खूप दूर जात सुरत शहर लुटले होते. त्या ठिकाणी इंग्रजांची वखार होती, तिथे जाऊन त्यांनी मुघलांच्या मालकीच्या दूरवरच्या भागातील लोकांना चौथाई कर द्यायला लावला. शिवाजी महाराज हे पुनरुत्थान झालेल्या हिंदू राष्ट्रवादाचे प्रतीक होते, त्यांना जुन्या महाकाव्यातून प्रेरणा मिळाली होती. ते अतिशय धाडसी असून त्यांच्याकडे उच्च दर्जाचे नेतृत्व गुण होते. त्यांनी मराठी लोकांचा एक मजबूत आणि एकजूट झालेला असा लढवय्या गट तयार केला, त्यास राष्ट्रवादी पार्श्वभूमी दिली आणि त्यांचे रूपांतर अशा एका उग्र शक्तीत केले, जिने मुघल साम्राज्याला मोडून टाकले. शिवाजी महाराज 1680 साली वारले, परंतु मराठी सत्ता वाढतच राहिली आणि तिने भारतावर वर्चस्व गाजवले." 
मराठ्यांविषयी नेहरूंचे मत
"1784 मध्ये वॉरेन हेस्टिंग्जने लिहिले होते की, 'मराठे संपूर्ण हिंदुस्तान आणि दख्खनमध्ये एकमेव असे लोक होते, ज्यांच्यात राष्ट्रीय एकात्मतेची भावना होती. ही भावना त्यांच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात ठसलेली होती आणि कोणताही धोका उद्भवल्यास हे सरदार एकत्र येऊन संघटित लढा देतील.' ही राष्ट्रीय भावना मुख्यतः मराठी भाषिक भागापुरतीच मर्यादित होती, असे मानले जाते. मात्र, मराठे त्यांच्या राजकीय आणि लष्करी व्यवस्थेत तसेच दैनंदिन जीवनशैलीत समावेशक होते. त्यांच्या व्यवस्थेत एकप्रकारची अंतर्गत लोकशाही होती आणि यामुळेच ते अधिक शक्तिशाली बनले. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाशी संघर्ष केला असला तरी त्यांनी मुस्लिमांना देखील मोठ्या प्रमाणावर सैन्यात स्थान दिले."
औरंगजेबावर नेहरूंची टीका
"औरंगजेब भूतकाळ समजण्यास देखील अक्षम होता. तो गतकाळाच्या तुलनेत अधिक कट्टरवादी आणि प्रतिक्रियावादी होता. त्याच्या अपार कर्तृत्व आणि गंभीरतेसह, त्याने आपले पूर्वज जे साध्य करून गेले होते ते मागे फिरवण्याचा प्रयत्न केला. तो कट्टर धार्मिक होता, कला व साहित्याचा प्रेमी नव्हता. हिंदूंवर जिझिया कर लादून आणि त्यांची मंदिरे पाडून त्याने आपल्या बहुतांश प्रजेला संतप्त केले. त्याने राजपूतांचा अवमान केला, जे मुघल साम्राज्याच्या आधारस्तंभांपैकी एक होते. उत्तरेत त्याने शीख समुदायाला विरोध केला, जो आधी हिंदू आणि इस्लामच्या संमिश्र तत्त्वज्ञानावर चालणारा शांतताप्रिय गट होता. मात्र, औरंगजेबाच्या अत्याचारांमुळे ते एक लढाऊ संघटनेत परिवर्तित झाले. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर त्याने मराठ्यांना चिथावले, जे प्राचीन राष्ट्रकूटांचे वंशज होते आणि त्याच वेळी त्यांच्या नेतृत्वाखाली एक अत्यंत कुशल सेनानी उभा राहिला."
भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक काय म्हणाले होते?
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राम नाईक हे वाजपेयी सरकारचे केंद्रीय मंत्री राहीले आहेत. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राहीले आहेत. राम नाईक यांनी देवेंद्र फडणवीस यांचा आरोप 2018 साली खोडून काढला आहे. तेव्हा राम नाईक उत्तर प्रदेशचे राज्यपाल होते. उत्तर प्रदेश मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रकाराच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात राम नाईक अध्यक्ष होते.
या कार्यक्रमात बोलताना राम नाईकांनी सांगितले की, "माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया या त्यांच्या पुस्तकात चुकून छत्रपतींना 'दिशाभूल करणारा देशभक्त' म्हटले होते. यावर संपूर्ण महाराष्ट्राने तीव्र आक्षेप घेतला. नेहरुंनी मोठ्या मनाने आपली चूक कबूल केली. नम्रपणे संपूर्ण देशाची माफी मागितली. सर्व पुस्तके परत मागवण्यात आली आणि ही चुकीची ओळ पुस्तकातून हटवली."
प्रतापगडावरचा छ. शिवाजी महाराजांचा पुतळा आणि पंडीत नेहरू
प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सुंदर, चित्ताकर्षक पुतळा आहे त्याचे उद्घाटन स्वत: पंडीत नेहरूंनी केले होते. फलटणचे श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांना सतत एका गोष्टीची खंत होती की छत्रपतींच्या शौर्याची, पराक्रमाची साक्ष देत उभ्या असलेल्या प्रतापगडावर शिवरायांचं स्मारक नाही ! त्यांनी ही खंत त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना बोलून दाखवली.
यशवंतरावांना हे मनोमन पटलं. तातडीने हालचाली करून राजभवनात मिटींग घेऊन प्लॅन ठरला. पं. नेहरूंचीही तात्काळ मान्यता मिळाली. त्यावेळी गडावर जाण्यासाठी रस्ते नव्हते. प्रचंड मेहनत घेऊन, अनेक अडचणींवर मात करून, तब्बल दोन वर्ष युद्धपातळीवर हालचाली करून हे स्मारक उभं राहिलं. पंडितजी स्वत: उद्घाटनाला आले. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती.
आंदोलनं निदर्शनं सुरू होती. पंडित नेहरू स्वत:चा मार्ग बदलून कास पठारमार्गे प्रतापगडावर आले. उद्घाटन केलं. नेहरू संवेदनशील होते. कोडगे नव्हते. त्या स्मारकाच्या उद्घाटनाला येताना मोठ्या प्रमाणावर चाललेले आंदोलन पाहून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या आग्रहामागची मराठी माणसाची भावना पंडितजींच्या लक्षात आली. त्यामुळं पंडित नेहरूंचं मनपरिवर्तन होऊ लागलं आणि संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचं मराठी माणसाचं स्वप्न साकार झालं.






