प्रसंग पहिला…
सातशे वर्षांचा इतिहास असलेल्या ‘हिमरू’ कलेबद्दल जाणून घेण्यासाठी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे पाय औरंगाबाद शहराला लागले होते. तारिख होती 3 जुलै 1956… अब्दुल रौफ कुरेशी या त्यावेळच्या अत्यंत नावाजलेल्या हिमरू कारागिराने सांगितलेले हिमरूचे कलाकुसर आणि त्याचा इतिहास पाहून डॉ. राजेंद्रप्रसाद अतिशय भारावून गेले होते.
प्रसंग दुसरा…
‘’सलीम तुझे मरने नहीं देगा...और हम अनारकली तुझे जीने नहीं देंगे…’’ मुगल-ए-आजम या अत्यंत गाजलेल्या चित्रपाटाचा हा डायलॉग आठवतोय? या चित्रपटातील सलीमच्या (दिलीप कुमार) राजेशाही पोषाखाची त्याकाळी खुप तारिफ झाली होती. हिमरू ही मुघलकालीन कला असल्याने हातमागावर हिमरू कुठे बनते याचा शोध घेऊन दिग्दर्शक के. आसिफ यांनी स्वतः औरंगाबादच्या हिमरू फॅक्टरीमध्ये येऊन हिमरू कसं बनतं हे बघितलं होतं.
त्यांनी अनेक डिझाईन बघितल्या आणि त्यामधून तीन डिझाईन प्रिन्स सलीमच्या भूमिकेसाठी निवडल्या. हा पोषाख कोणत्या कारागिराने बनवला हे जाणून घेण्याची दिलीप कुमार यांची खुप इच्छा झाली आणि ते दाखल झाले थेट औरंगाबाद शहरात. साल होते 1960… ‘मुगल-ए-आजम’मधील सलीमचा अंगरखा याच शहरात तयार झाला होता आणि तो सगळा पोषाख ‘हिमरू’कलेचा वापर करून तयार करण्यात आला होता.
हिमरूचा इतका गौरवशाली इतिहास असतानाही औरंगाबाद या ऐतिहासिक शहरात ‘जागतिक वारसा’ म्हणून प्रसिद्ध असणारी ‘हिमरू’ विणकाम कला टिकवून ठेवण्यासाठी पाचव्या पिढीची केविलवाणी धडपड सुरू आहे. राजेशाही थाट उपभोगलेल्या या हिमरूच्या वैभवाला आता उतरती कळा लागली असून त्याचा विक्रीवरही मोठा परिणाम झाला आहे. 52 दरवाज्यांचे शहर, दक्खन का ताज अशी औरंगाबाद शहराची ओळख आहे.
औरंगाबादवर मुघलांचे, निजामांचे राज्य होते. काळ बदलत गेला ब्रिटिशांचं राज्य आलं जागतिकीकरणाला चालना मिळाली. भारत स्वतंत्र झाला कालांतराने लोकं विविध व्यवसायाकडे वळायला लागली. पण, मुघलांच्या काळापासून औरंगाबादमध्ये वापरात असलेली हिमरू कला जपण्यासाठी ती पुढे नेण्यासाठी 'मोहम्मद याकूब' यांची पाचवी पिढी म्हणजे इम्रान कुरेशी आजही काम करत आहेत.
औरंगाबादच्या (आताचे छत्रपती संभाजीनगर) नवाबपुरामध्ये एक जुनी हिमरू फॅक्टरी आहे. मुघल काळात त्या ठिकाणी 70हातमाग (लूम्स) होत्या. आता तीनच शिल्लक आहेत. इम्रान कुरेशी आजही हिमरू शॉल बनवण्याचं काम करतात. इम्रान कुरेशी यांच्याकडे करियरच्या अनेक संधी उपलब्ध होत्या पण, त्यांना त्यांची पिढ्यांपिढ्यांपासून चालत आलेली हिमरू कला जिवंत ठेवायची होती म्हणून त्यांनी हिमरू शॉल्स बनवण्याचे काम सुरुच ठेवले.
पण, त्यांची पुढची पिढी काही हिमरू कलेला पुढे नेणार नाही हे लक्षात आल्यावर ही कला जिवंत राहावी म्हणून छ. संभाजी नगर शहरातील 25 एकल महिलांना इम्रान यांनी हिमरू चे प्रशिक्षण दिले.
मुहम्मद तुघलकपासून मलिक अंबरपर्यंत…
मुघल बादशाह मुहम्मद -बिन -तुघलकने 1327 मध्ये त्याची राजधानी दिल्लीवरून दौलताबादला हलवली. त्यावेळीस मुहम्मद-बिन-तुघलक सोबत काही हस्तकलाकारही दौलताबादला आले. काही दिवसांनी तुघलकने पुन्हा त्याची राजधानी दिल्लीला हलवली पण जे हस्तकलाकार मुहम्मद -बिन -तुघलक सोबत आले होते ते दिल्लीला गेलेच नाहीत. त्यातील एक होते 'मोहम्मद याकूब'... जे त्या काळच्या राजे-महाराजांसाठी साठी हातमागावर (लूम्स) कापड बनवायचे.
त्या कापडावर एक विशिष्ट प्रकारची मांडणी असायची ज्याला 'हिमरू' (किम खाबची प्रतिकृती) म्हणून ओळखले जायचे. असं म्हणतात की, निजामकाळात नवरदेवाला फक्त हिमरू कपड्यापासून बनवलेली शेरवानीच लागायची. मानाची समजली जाणारी हिमरूची शेरवानी नसेल तर लग्नच व्हायची नसतं…
हिमरू हा शब्द ‘हम’ म्हणजे हमशकल आणि ‘रूह’ म्हणजे आत्मा अशा पर्शियन शब्दापासून आला आहे. ‘हिमरू’ विणकाम कला ही मुळात इराणमधील ‘किनख्वाबी’ या पर्शियन विणकाम कलेतून उगम पावलेली आहे. तिकडे सोन्या-चांदीची जर वापरून किनख्वाबी कापडाचे विणकाम केले जात असे. बाराव्या शतकात या सोनेरी जरीपासून तयार होणाऱ्या कापडांची वस्त्रे तिकडे इराणी आणि तुर्की अमीर-उमराव आणि सरदार लोक वापरत असत.
चौदाव्या शतकात महंमद तुघलकाच्या राजवटीत इराणहून आलेले कित्येक विणकर दिल्लीत किनख्वाबी विणकाम करीत असत. महंमद तुघलक 1327 ते 1334 अशी आठ वर्षे औरंगाबादनजीकच्या दौलताबाद किल्ल्यात राहिला. त्या काळात खुल्दाबाद, खडकी (औरंगाबाद), जालना अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे विणकर हाताने किनख्वाबी वस्त्रे विणण्याची कामे करू लागले.

आपल्याकडे त्या वस्त्रांना ‘किनखापाची वस्त्रे’ म्हणत. मात्र, इथे त्यासाठी सोने-चांदी वापरण्याऐवजी रेशीम आणि कापूस यांचे धागे वापरून त्या मिश्र धाग्यांचे ‘हिमरू’ कापड विणण्यास त्यांनी सुरुवात केली. त्याकाळी या विशिष्ट मांडणीचे कापड फक्त राजे महाराजेच वापरत असत कारण, ते कापड बनवतांना शुद्ध रेशीम आणि सोने- चांदीच्या जरीच्या ताराचा वापर होत असे.
नंतर इथे काही काळ अहमदनगरची आदिलशाही राजवट राबली. त्या काळात खडकी (औरंगाबाद) येथे आदिलशाहचा हुशार वजीर मलिक अंबर याने हे विणकाम करणाऱ्या हिमरू विणकरांना चांगलेच प्रोत्साहन दिले. त्या काळी हे संपूर्ण विणकाम केवळ हातांनी केले जाई. परंतु विसाव्या शतकाच्या प्रारंभी तऱ्हेतऱ्हेचे सुंदर नक्षीकाम असलेल्या हिमरू वस्त्रांच्या विणकामासाठी हातमागांचा वापर सुरू झाला. कालांतराने राजे-महाराजे यांचा काळ संपुष्टात आला आणि दौलताबादचे कलाकार औरंगाबाद शहरात स्थायिक झाले.
कुरेशींची पाचवी पिढी
ब्रिटिशांचा काळ आला. रेशीम आणि सोन-चांदीच्या जरीच्या तारांचे कापड कोण घेणार म्हणून, अनेक जण हिमरू कलेला सोडून दुसऱ्या व्यवसायाकडे वळले. पण, मोहम्मद याकूब यांच्या दुसऱ्या पिढीने म्हणजेच हाजी गुलाम अहमद यांनी ती कला पुढे नेण्याचे ठरवले. त्यांनी रेशीमच्या जागी कॉटन आणि जरीच्या ऐवजी रेशीम वापरायला सुरवात केली.
हाजी गुलाम अहमद नंतर अब्दुल हमीद कुरेशी, पुढे अहमद सईद कुरेशी आणि आता मोहम्मद याकूब यांची पाचवी पिढी म्हणजेच इम्रान कुरेशी यांनी आजही हिमरू कलेला जिवंत ठेवले आहे. एकेकाळी औरंगाबादमध्ये हिमरू बनवणाऱ्या 70 लूम्स होत्या पण आता त्या तीनच आहेत, पण आजतागायत इम्रान कुरेशी यांनी त्यामध्ये कोणत्याही मशीनरीचा वापर केलेला नाही हे विशेष…
मुघल, निजाम आणि ब्रिटिशांच्या काळात कुरेशी परिवाराला हिमरू कलेसाठी अनेक पदकं देखील मिळाली होती. त्यांच्या पहिल्या पिढीपासून हिमरूवर जे नक्षे ते वापरले गेले ते सगळे नक्षे आणि पदकं आजही इम्रान कुरेशी यांची जपून ठेवले आहेत. तेव्हा पासून तर आतापर्यंत त्यांच्याकडे असे हिमरू कलेचे 500 नक्षे आहेत.
हातमागांवर तयार होणाऱ्या हिमरू पद्धतीच्या शाली, साड्या, चादरी आणि इतर वस्त्रे ही उत्पादने चांगल्या दर्जामुळे आणि मोहक नक्षीकामांमुळे अत्यंत लोकप्रिय ठरली आहेत. शहरात येणाऱ्या पर्यटकांना या उत्पादनांचे मोठे आकर्षण असते. त्यामुळेच तब्बल सातशे वर्षांची परंपरा असणारे हिमरू विणकाम हे औरंगाबाद शहराचे एक ऐतिहासिक वैशिष्टय़ बनलेले आहे.
हिमरूच्या नावाखाली फसवेगिरी..
इम्रान कुरेशी सांगतात, मुघल काळापासून हिमरू हे हातमागावर (लूम्स) बनवले जाते. पण हिमरूचे कापड बनवण्यासाठी जास्त कालावधी लागतो. एक मीटर हिमरूचे कापड बनवायला एक आठवडा तरी लागतो आणि त्या एक मीटर कापडाची किंमत 4 हजार रुपये असते.
आता हिमरूची शॉल्स आणि स्टोल्सच बनवले जातात. एका हिमरू शॉलची किंमत 7 ते 8 हजार तर एका स्टोल्ची किंमत सहा हजार रुपये. अनेक पर्यटक औरंगाबादच्या नवाबपुरामध्ये हिमरू बघण्यासाठी येत असतात.
पर्यटकांचा ओढा हिमरूकडे जास्त आहे हे लक्षात आल्यावर शहरातल्या काही लोकांनी वाराणसी वरून हिमरू सारखेच दिसणारे कापड आणायला सुरुवात केली जे कापड पॉवर लूम्सवर बनवले जातात. आणि ते हिमरू म्हणून कमी किमतीत विकायला सुरवात केली. अनेकजण जेकक्वार्ड मशीन आणि पॉवर लूम्स वर हिमरू बनवून लोकांना विकत आहेत.
इम्रान कुरैशी म्हणतात, "सच में अगर कुछ घटे,या कुछ बड़े तो वो सच सच नहीं रेहता.. "
…आणि नवाबपुऱ्यात पुन्हा हिमरूचे वैभव सुरू झाले
कोरोनाच्याकाळात इम्रान यांचे वडील वारले. जे कोणी हिमरूचे कलाकार उरले होते ते ही वयस्करच होते. कोणी स्वतःच्या गावी परतले तर कोणी वारले. राहिले होते फक्त इम्रान कुरैशी. हिमरूचे लूम्स कोरोनानंतर पूर्णपणे बंद पडले होते.
इम्रान कुरैशी सांगतात, "माझ्याकडे काही कामानिमित्त शेख यासिन यांचा मुलगा आलेला होता. (शेख यासिन इम्रान यांच्या वडिलांसोबत हिमरूचे काम करायचे. नंतर ते पॉवर लूम्सवर काम करायला गेले होते) त्याने सांगितले की, बाबा आता घरीच असतात. मला एक आशेचा किरण मिळाला आणि मी म्हणालो उद्याच्या उद्या यासिन साहेबांना सोबत घेऊन ये.
दुसऱ्या दिवशी ते माझ्या घरी आले आणि त्यांना मी म्हणलं आपल्याला पुन्हा हिमरू शॉल बनवणे सुरु करायचे आहे. त्यांनी विचारलं कोण करेल…? मी म्हणालो, सध्या तर फक्त मी आणि तुम्ही… नंतरच बघू.. असं म्हणत पुन्हा लूम्स बनवण्याचं सामान आणले. लूम बनवली आणि सुरु केलं..

काही दिवसांनी इम्रान यांच्या मनात एक विचार आला की, ही हिमरू कला अशा महिलांना शिकवली तर…? ज्या एकल महिला आहेत, ज्यांना पैशांची गरज आहे. लगेच त्यांनी वर्तमानपत्रात हिमरू प्रशिक्षणाची जाहिरात दिली. इम्रान म्हणतात, माझ्याकडे हिमरू शिकण्यासाठी महिला यायला लागल्या त्यांना मी हिमरू कला काय आहे? हातमागावर काम कसे करतात? हे दहा दिवस फक्त बघायला सांगितलं त्यानंतर त्यांना शिकवायला सुरवात केली.
त्यांना मी स्टायपेंड ही दिले. जवळजवळ 25 महिलांना मी हिमरूचे प्रशिक्षण दिले. तो दिवस आता दूर नाही जेव्हा त्यांना हिमरूचे हस्तकलाकार म्हणून ओळखलं जाईल..
औरंगाबादेत लयास जाऊ पाहणाऱ्या हातमाग उद्योगास आणि ऐतिहासिक हिमरू शालींच्या उत्पादनास नवी उभारी देण्याचा इम्रान कुरेशी यांचा प्रयत्न कौतुकास पात्र आहे. हिमरू-मशरू शाली आणि इतर वस्त्रे आजही हातांनी किंवा हातमागांवरच विणली जावीत, त्यासाठी यंत्रांचा वापर होऊ नये असे त्यांचे ठाम मत आहे.
हाताने किंवा हातमागावर विणकाम झाले तरच या प्राचीन हिमरू विणकाम कलेचे सत्त्व आणि त्यातील सृजनशीलता टिकून राहील अशी त्यांची धारणा आहे. इम्रान यांना फक्त एकच खंत वाटते की ज्या शहराला हिमरू च्या नावाने ओळखलं जायचं त्याच शहरात आता हिमरू कलेला कोणी ओळखत नाही..






