संजना खंडारे
- मेळघाटातील अनेक गावांमध्ये आजही वीज, पाणी, रस्ते आणि इंटरनेटसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे उच्च शिक्षणाच्या संधी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात अनेक अडथळे निर्माण होतात.
- अशा परिस्थितीत मेळघाटातील बोदू गावचा गौतम बेठेकर आणि यवतमाळ जिल्ह्यातील मुच्छी पाड्याचा अविनाश मडावी यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देशातील प्रतिष्ठित शिव नादर विद्यापीठापर्यंत मजल मारलीये.
- एका विद्यार्थ्याने वीज, पाणी आणि नेटवर्कच्या अभावात शिक्षणाचा मार्ग शोधला, तर दुसऱ्याने रात्री सुरक्षा रक्षक म्हणून काम करत शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्या यशाची ही कहाणी केवळ दोन विद्यार्थ्यांची नसून, आदिवासी भागातील नव्या पिढीच्या जिद्दीची आणि शिक्षणावरील विश्वासाची आहे...
मेळघाटातील अनेक गावांमध्ये आजही वीजेचे खांब उभे असलेले दिसतात, पण वीज मात्र दिसत नाही. घराघरांत नळ दिसतात, पण त्या नळाला पाणी येत नाही. मोबाईल टॉवर लांबूनच दिसतात, पण नेटवर्क मिळत नाही. खराब रस्ते, अपुरी वाहतूक व्यवस्था, मर्यादित आरोग्य सुविधा, कुपोषण आणि उच्च शिक्षणाबाबत माहितीचा अभाव हे आजही मेळघाटमधील वास्तव आहे. अशा परिस्थितीत वाढणाऱ्या मुलांसाठी शिक्षण हा रोजचा संघर्ष बनलाय.
आदिवासी भागातील अनेक विद्यार्थ्यांचा प्रवास अजूनही आश्रमशाळेच्या वस्तीगृहापासून सुरू होतो. घरापासून दूर राहून शिक्षण घेणं, आर्थिक अडचणींशी झुंज देणं, भाषेच्या अडथळ्यांवर मात करून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी सातत्याने संघर्ष करणं ही त्यांची रोजची कैफियत. अनेकांची स्वप्नं गावाच्या सीमारेषेबाहेर पडण्यापूर्वीच थांबतात. पण काही जिद्दी मुले या सर्व मर्यादांवर मात करून नव्या वाटा तयार करतात.
मेळघाटमधील दुर्गम भागातून अनेक विद्यार्थी आता बाहेर पड्तायेत. त्यातीलच यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम आदिवासी समाजातील अविनाश मडावी आणि मेळघाटातील बोदू गावचा गौतम बेठेकर. एकाने रात्री सुरक्षा रक्षक म्हणून काम करत शिक्षण पूर्ण केलं, तर दुसऱ्याने वीज, पाणी, नेटवर्क आणि वाहतुकीच्या अभावात वाढत उच्च शिक्षणाचा मार्ग शोधला. आज या दोघांची निवड देशातील प्रतिष्ठित ‘शिव नादर’ विद्यापीठात झाली आहे.
‘बाईमाणूस’च्या आजच्या या ग्राऊंड रिपोर्टमध्ये या दोन मुलांच्या संघर्षाची, मेळघाटच्या वास्तवाची, आदिवासी समाजाच्या संघर्षाची, आशेची आणि शिक्षणावरील विश्वासाची एक मोठी कहाणी दडलेली आहे.
(एकलव्य संस्थेत उच्च शिक्षणाची तयारी करण्यासाठी आलेले विद्यार्थी)
आश्रमशाळांपासून विद्यापीठापर्यंत : मेळघाटातील शिक्षणाचा संघर्षमय प्रवास
मेळघाटातील आदिवासी मुलांसाठी शिक्षणाचा प्रवास हा केवळ शाळेत जाण्यापुरता मर्यादित नसतो, तर तो अनेक अडचणींवर मात करत स्वतःचे भविष्य घडवण्याचा संघर्ष असतो. सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या अनेक गावांमध्ये आजही माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना लहान वयातच घरापासून दूर असलेल्या आश्रमशाळांमध्ये जावे लागते. अनेकांसाठी आश्रमशाळा ही केवळ शिक्षणाची जागा नसून बाहेरच्या जगाशी जोडणारा पहिला दुवा असतो.
मेळघाटातील बहुतांश विद्यार्थी आश्रमशाळांमधूनच दहावी किंवा बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करतात. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांना अमरावती, अकोला, नागपूर, पुणे किंवा इतर मोठ्या शहरांकडे वळावे लागते. मात्र, या प्रवासात आर्थिक अडचणी, भाषेचे प्रश्न आणि सामाजिक-सांस्कृतिक बदलांची आव्हाने त्यांच्यासमोर उभी राहतात. अनेक कुटुंबांचे उत्पन्न शेती किंवा मजुरीवर अवलंबून असल्याने मुलांना शहरात पाठवणे हे पालकांसाठी मोठे आव्हान ठरते. परिणामी अनेक विद्यार्थी क्षमता असूनही उच्च शिक्षणापासून वंचित राहतात.
या सर्व अडचणींमध्ये माहितीचा अभाव ही आणखी एक गंभीर समस्या आहे. अनेक गावांमध्ये मोबाईल नेटवर्क अत्यंत कमकुवत आहे. इंटरनेटची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा, विद्यापीठे आणि विविध शैक्षणिक संधींबाबत वेळेवर माहिती मिळत नाही. त्यामुळे अनेकदा विद्यार्थी उपलब्ध संधींचा लाभ घेऊ शकत नाहीत.
‘आमच्या गावात अजूनही वीज, पाणी आणि चांगले रस्ते नाहीत’ - गौतम बेठेकर
मेळघाटातील धारणी तालुक्यातील बोदू हे गाव आजही अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. गावात वीजेचे खांब आहेत, पाण्याची टाकी आहे, घराघरात नळजोडणीही करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात वीज नियमित मिळत नाही आणि नळांना पाणीही येत नाही. मोबाईल टॉवर उभारण्यात आला असला तरी नेटवर्कची समस्या कायम आहे. गावाला जोडणारे रस्ते खराब असल्याने वाहतुकीच्याही अनेक अडचणी आहेत.
‘बाईमाणूस’शी बोलताना गौतम बेठेकर आपल्या गावाचं वास्तव सांगतो,
“आमच्या गावात वीजेचे खांब आहेत, पाण्याची टाकी आहे, नळही आहेत. पण प्रत्यक्षात वीज आणि पाणी नियमित मिळत नाही. मोबाईल टॉवर आहे, पण नेटवर्क कधी असतं तर कधी पूर्णपणे गायब होतं.”
या परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम विद्यार्थ्यांवर होत असल्याचंही तो नमूद करतो.
गौतमचं बालपण आणि शिक्षण मेळघाटातच झालं. आश्रमशाळेतून शिक्षण पूर्ण करत असताना पुढे शिकायचं हे त्याने ठरवलं होतं. मात्र बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी गावाबाहेर पडणं हे त्याच्यासाठी सोपं नव्हतं. तो सांगतो, “घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. पुण्यात जाऊन शिकायचं होतं, पण त्यासाठी लागणारा खर्च कसा उभा राहणार, हा मोठा प्रश्न होता. याच काळात त्याला ‘एकलव्य इंडिया फाऊंडेशन’ विषयी माहिती मिळाली. संस्थेने शिक्षण, राहण्याची व्यवस्था आणि इतर आवश्यक खर्चांसाठी मदत केली. त्या मदतीमुळेच मी पुण्यात जाऊन शिकू शकलो. नाहीतर पुढचं शिक्षण घेणं कठीण झालं असतं,”.
(बोदू गावचा किशोर बेठेकर हा त्याच्या पाड्यातील पहिलाच मुलगा आहे जो उच्चशिक्षण घेतोय.)
मेळघाटातून थेट पुण्यासारख्या मोठ्या शहरात गेल्यानंतर त्याच्यासमोर अनेक नवी आव्हानं उभी राहिली. विशेषतः भाषेची अडचण त्याला सुरुवातीला खूप जाणवली. या अनुभवाविषयी बोलताना गौतम म्हणतो,
“माझी मातृभाषा कोरकू आहे. घरी आम्ही हिंदी बोलतो आणि शिक्षण मराठीत झालं. पुण्यात गेल्यावर लोकांशी संवाद साधताना सुरुवातीला खूप भीती वाटायची. आपण योग्य बोलतोय का, लोक काय म्हणतील, असे प्रश्न मनात यायचे. मात्र सोबतचे विद्यार्थी, शिक्षक आणि मित्रांच्या पाठिंब्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढत गेला. “लोकांनी मला समजून घेतलं. माझ्या भाषेच्या अडचणींवर कोणी हसलं नाही. त्यामुळे हळूहळू लोकांशी बोलण्याची भीती कमी झाली,”.
गौतमच्या मते, मेळघाटातील विद्यार्थ्यांसाठी माहितीचा अभाव ही मोठी समस्या आहे. तो सांगतो, “शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रिया किंवा चांगल्या कॉलेजांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत वेळेवर पोहोचत नाही. नेटवर्क नसल्यामुळे अनेक संधींबद्दल कळतच नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी क्षमता असूनही मागे राहतात.
आज गौतमची निवड शिव नादर विद्यापीठातील एम.ए. इन रुरल डेव्हलपमेंट या अभ्यासक्रमासाठी झाली आहे. मात्र त्याची स्वप्नं केवळ स्वतःपुरती मर्यादित नाहीत. तो सांगतो, “मी मेळघाटातील शिक्षण, आरोग्य आणि कुपोषणाच्या समस्या जवळून पाहिल्या आहेत. त्यामुळे पुढे या क्षेत्रात काम करायचं आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध करून मला द्यायच्या आहेत जेणेकरून येणारी पुढची पिढी सगळ्या सोयी-सुविधांचा लाभ घेऊ शकेल, आणि शिक्षणाच्या संधीपासून वंचित राहणार नाही.”
संबंधित लेख -
मेळघाटच्या डोंगरातून नामांकित विद्यापीठांपर्यंत आदिवासी तरुणाईचा जिद्दीचा प्रवास...
मुच्छी पाड्यातील पहिला उच्चशिक्षित तरुण : अविनाश मडावी
गौतम बेठेकर यांच्याप्रमाणेच यवतमाळ जिल्ह्यातील झरी-जामणी तालुक्यातील मुच्छी या छोट्याशा आदिवासी पाड्यावर वाढलेल्या अविनाश मडावी याचाहीउच्चशिक्षणापर्यंतचा प्रवास संघर्षाचा राहिलाय. कोलाम या विशेषतः दुर्बल आदिम जमातीतील अविनाशने अनेक आर्थिक आणि सामाजिक अडचणींवर मात करत देशातील प्रतिष्ठित शिव नादर विद्यापीठापर्यंत मजल मारून उच्च शिक्षण पूर्ण केलं.
‘बाईमाणूस’शी बोलताना अविनाश सांगतो,
“मी कोलाम समाजातून येतो. आमच्या समाजात आजही शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे. अनेक मुलांना उच्च शिक्षणापर्यंत पोहोचण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करणाऱ्या आमच्या समाजातील पहिल्या पिढीचा भाग असल्याचा मला अभिमान वाटतो.’’
(गावकऱ्यांकडून अविनाश तडवी याचा सत्कार होतांना...)
मुच्छी हा अवघ्या काही घरांचा आदिवासी पाडा. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. वडिलांची प्रकृती बरी नसल्याने कुटुंबाची जबाबदारी आईच्या खांद्यावर होती. आई मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. अशा परिस्थितीत शिक्षण सुरू ठेवणं हेच मोठं आव्हान होतं. मात्र शिक्षणाच्या जोरावर आयुष्य बदलू शकतं, हा विश्वास अविनाशने कधीही सोडला नाही.
त्याच्या शालेय जीवनाविषयी बोलताना तो सांगतो, “आश्रमशाळेत शिकत असताना अनेक अडचणी होत्या. पण अभ्यासाची आवड होती. त्यामुळे परिस्थितीकडे न पाहता शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं.” त्याच्या या मेहनतीचं फळ दहावी आणि बारावीमध्ये मिळालं. अनुसूचित जमाती प्रवर्गातून अमरावती विभागात प्रथम येण्याचा मानही त्याने पटकावला होता. राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनातही त्यांनी सहभाग नोंदवत त्याची गुणवत्ता सिद्ध केली होती.
उच्च शिक्षणासाठी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यानंतर मात्र आर्थिक अडचणी अधिक तीव्र झाल्या. तेव्हाची आठवण सांगताना अविनाश म्हणतो, “शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मला काम करणं गरजेचं होतं. सुरुवातीला किराणा दुकानात काम केलं. नंतर सुरक्षा रक्षक म्हणूनही काम केलं. दिवसा शिक्षण आणि रात्री काम असा दिनक्रम होता.”
या सर्व संघर्षांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांनी त्याला प्रेरणा दिली. “परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षण हा बदलाचा सर्वात मोठा मार्ग आहे, हे त्यांच्या विचारांतून शिकायला मिळालं,” असं तो सांगतो.
अविनाशच्या मेहनतीचं चीज तेव्हा झालं, जेव्हा त्याची निवड आयआयटी गुवाहाटी आणि शिव नादर विद्यापीठ या दोन्ही प्रतिष्ठित संस्थांमध्ये झाली. मात्र त्यांनी शिव नादर विद्यापीठातील रूरल मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम निवडला. त्यासाठी त्यालासुमारे १२ लाख रुपयांची शंभर टक्के शिष्यवृत्ती ही मिळाली होती.
अविनाश पुढे म्हणतो, “मी ज्या समाजातून आलो आहे, त्या समाजासाठी काम करण्याची इच्छा आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील शिक्षण, रोजगार आणि विकासाच्या प्रश्नांवर काम करून अधिकाधिक मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं आहे.” मुच्छीसारख्या छोट्याशा पाड्यावरून सुरू झालेला अविनाश यांचा प्रवास आज राष्ट्रीय स्तरावरील विद्यापीठापर्यंत पोहचला आणि त्याने उछशिक्षण घेतलं. त्यांची ही वाटचाल केवळ वैयक्तिक यशाची कहाणी नसून, शिक्षणाच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते याचं जिवंत उदाहरण आहे.
(अविनाश म्हणतो, "उच्चशिक्षण घेणं यासाठी गरजेचं होतं.. की मला बघून आमच्या पाड्यातली पोरं शिकून मोठा होण्याचा विचार करतील.")
एकलव्य इंडिया फाउंडेशनची भूमिका
मेळघाटासारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एकलव्य इंडिया फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन, आर्थिक मदत, व्यक्तिमत्त्व विकास आणि विविध नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक सहकार्य संस्था पुरवत आहे. गौतम आणि अविनाश यांच्यासारख्या विद्यार्थ्यांना योग्य वेळी मिळालेल्या या मदतीमुळे त्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि ती पूर्ण करण्याचे बळ मिळाले.
गौतम बेठेकर आणि अविनाश मडावी यांच्या प्रवासात एक समान धागा आहे, शिक्षणावरील अढळ विश्वास. यातील एक जण देशातील प्रतिष्ठित शिव नादर विद्यापीठात पोहचलाय तर एकाने तिथून पदवीचे शिक्षण पूर्ण केलंय. पण त्यांचं यश केवळ वैयक्तिक नाही. ते मेळघाट, यवतमाळ आणि आदिवासी समाजातील असंख्य विद्यार्थ्यांच्या आकांक्षांचं प्रतिनिधित्व करतं. त्यांच्या यशातून हे स्पष्ट होतं की, योग्य मार्गदर्शन, संधी आणि पाठबळ मिळाल्यास दुर्गम भागातील विद्यार्थीदेखील राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करू शकतात.
मेळघाटातील अनेक गावांमध्ये आजही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. शिक्षणापर्यंत पोहोचण्याचा प्रवास अजूनही कठीण आहे. तरीही या अडचणींना छेद देत काही तरुण नवी स्वप्नं पाहतायेत आणि ती पूर्णही करतायेत. गौतम आणि अविनाश यांची कहाणी ही अशाच नव्या पिढीची कहाणी आहे.
कदाचित मेळघाटातील एखाद्या आश्रमशाळेत बसलेला विद्यार्थी आज या दोघांप्रमाणेच मोठी स्वप्नं पाहत असेल.






