शंतनू खुजे
- ताडोबातील काही वाघ दिसेनासे झाल्याच्या चर्चांमुळे वन्यजीव क्षेत्रात खळबळ माजली आहे.
- या पार्श्वभूमीवर बंगळुरूस्थित एका वन्यजीव छायाचित्रकाराच्या चौकशीमुळे संशयांना नवे वळण लागले आहे. छायाचित्रणाच्या नावाखाली जंगलात नियमबाह्य हालचाली, मेलेली जनावरे टाकणे आणि रात्री-अपरात्री फिरण्याचे आरोप या छायाचित्रकारावर आहेत.
- वन विभागाने मात्र चौकशी केवळ अनधिकृत प्रवेशासंदर्भात असून शिकारीचे कोणतेही पुरावे नाहीत, असा दावा केला आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प… महाराष्ट्रातील जंगलांचा मुकुटमणी. देशभरातील वन्यजीवप्रेमी, पर्यटक आणि छायाचित्रकारांसाठी आकर्षणाचे केंद्र. कोळसा खाणी आणि उष्ण, कोरड्या जंगलांसाठी ओळखला जाणारा चंद्रपूर जिल्हा आज जगभरातील व्याघ्रप्रेमींच्या नकाशावर आहे. ताडोबातील वाघांचे फोटो सोशल मीडियावर लाखो लोक पाहतात. एखाद्या वाघिणीच्या बछड्यांचा जन्म, एखाद्या नर वाघाचा नवीन क्षेत्रावर ताबा, जंगलातील शिकार किंवा पाणवठ्याजवळची त्याची वावर या सगळ्यांची आज मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. पण या चमकदार पर्यटन उद्योगाच्या सावलीत काही गंभीर प्रश्नही उभे राहत आहेत. वाघांच्या मागे धावणारे कॅमेरे केवळ निसर्गाची नोंद घेत आहेत की नकळतपणे शिकारीच्या जाळ्यालाही मदत करत आहेत?
गेल्या काही महिन्यांपासून ताडोबात काही परिचित वाघ दिसेनासे झाल्याच्या चर्चांनी वन्यजीव क्षेत्रात खळबळ उडवली आहे. त्यातच एका बंगळुरूस्थित प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकाराची वन विभागाकडून चौकशी झाल्याच्या बातम्या समोर आल्या आणि या चर्चेला नवे वळण मिळाले. या पार्श्वभूमीवर ताडोबातील व्याघ्र पर्यटन, छायाचित्रण, स्थानिक माहितीची देवाणघेवाण आणि वाघांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

वन्यजीव छायाचित्रकाराच्या चौकशीने खळबळ?
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प आणि परिसरातील काही वाघ गेल्या अनेक महिन्यांपासून पर्यटक, मार्गदर्शक आणि वन्यजीव छायाचित्रकारांच्या नजरेस पडत नसल्याने वन्यजीव वर्तुळात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात यापूर्वी उघडकीस आलेल्या शिकारीच्या घटनांचा इतिहास पाहता या वाघांच्या शिकारीची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यातच बंगळुरूस्थित एका वन्यजीव छायाचित्रकाराची सलग तीन दिवस चौकशी करण्यात आल्याने संशयाचे ढग अधिकच गडद झाले आहे.
संबंधित छायाचित्रकार गेल्या अनेक वर्षांपासून ताडोबात नियमित येत होता. निमढेला, मामला आणि केसलाघाट परिसरात तो सफारी करत होता. वाघांचे छायाचित्र मिळवण्यासाठी तो मेलेली जनावरे जंगलात ओढून आणत होता. यासाठी काही वाहनचालक आणि पर्यटक मार्गदर्शकाची मदत त्याला होती. बरेचदा छायाचित्रणासाठी गावातील गुराख्यांकडून जनावरे आणून त्यांना मोबदला देत होता, असे आरोप करण्यात येत आहेत.
छायाचित्रणाच्या नावाखाली जंगलात नियमबाह्य हालचाली, मेलेली जनावरे टाकणे आणि रात्री-अपरात्री फिरण्याचे आरोप या छायाचित्रकारावर आहेत. सफारीदरम्यान कित्येकदा त्याच्या वाहनात मोठ्या दोऱ्या, कुऱ्हाड आणि इतर साहित्य असायचे. काही महिन्यांपूर्वी मामला परिसरात एका म्हशीची शिकार झाली. गावातील वीजपुरवठा खंडित झाल्याचा फायदा घेत तो त्याठिकाणी पोहोचला. याच मृत म्हशीजवळ ‘ज्युनिअर बजरंग’ नावाचा वाघ असताना त्याच्यावर कृत्रिम प्रकाश टाकून त्याचे छायाचित्रण करण्यात आले. यानंतर हा वाघ तसेच एक वाघीण आणि तिचे बछडे त्या परिसरातून बेपत्ता झाले. पाण्यात वीजप्रवाह सोडून त्यांची शिकार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर काही गुप्तचर संस्थांचे अधिकारीही ताडोबात येऊन चौकशी करून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, वनविभागाने याबाबत मौन बाळगले आहे. ताडोबातील वाघांच्या हालचालींबाबत निर्माण झालेला संभ्रम, संशयास्पद छायाचित्रण आणि संभाव्य शिकारीच्या चर्चांमुळे व्याघ्रप्रकल्पाच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
वाघांचे छायाचित्र मिळवण्यासाठी मेलेली जनावरे जंगलात ओढून आणायचा?
या वन्यजीव छायाचित्रकारावर रात्री जंगलात फिरणे, वाहनातून उतरून छायाचित्रण करणे, वाघांच्या हालचालींवर परिणाम होईल, अशा पद्धतीने जनावरे बांधणे आणि नियमबाह्य हालचाली करणे, असे आरोप आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी त्याची सात ते आठ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत त्याने चंद्रपूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा मार्ग स्वीकारला. तेथूनही त्याला पुन्हा चौकशीसाठी नेण्यात आले. चौकशीसाठी कधीही हजर राहावे लागेल, या अटीवर त्याला बंगळुरूला जाण्याची परवानगी देण्यात आली.
नवेगावकडील झरणी तसेच रुद्रा, ताला, पारस, शिवाझरी, नटराज, ज्यु. नटराज, मामला हैदर, राका वाघाची आई, एरिनाची आई, देवाडा अडेगावकडील ऐश्वर्या, असे अनेक वाघ गेल्या अनेक दिवसांपासून दिसत नसल्याचे नियमित पर्यटक, वन्यजीव छायाचित्रकारांचे म्हणणे आहे. तसेच काटेझरी, कारवा, रानतळोधी, आष्टा, मामला, शिरखेडा अशा अनेक क्षेत्रात शिकारीची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, वनविभागाकडून याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
वन विभागाचे वेगवेगळे दावे
वन्यजीव छायाचित्रकाराच्या चौकशी प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभूनाथ शुक्ल यांनी अगोदर सांगितले होते की,
‘’आम्ही या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली असून संबंधित छायाचित्रकाराची वनविभागाकडून कसून चौकशी केली जात आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या बफर आणि कोअर क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या नियमबाह्य हालचाली किंवा प्राण्यांना आमिष दाखवण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. चौकशीत जे काही तथ्य समोर येईल, त्यानुसार दोषींवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.’’
मात्र आता ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणावर अधिकृत स्पष्टीकरण जारी करत अनेक चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशासनाच्या मते,
‘’ज्या बंगळुरूस्थित वन्यजीव छायाचित्रकाराची चौकशी करण्यात आली, ती कोणत्याही वाघ शिकारीच्या किंवा बेपत्ता वाघांच्या प्रकरणाशी संबंधित नव्हती. चौकशीचा विषय केवळ जंगल परिसरात झालेला कथित अनधिकृत प्रवेश हा होता. आतापर्यंतच्या तपासात वाघ शिकारीशी संबंधित कोणताही पुरावा समोर आलेला नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.’’

प्रशासनाने आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. सध्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर आणि बफर क्षेत्रात सुमारे ९५ वाघ असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. हे वाघ केवळ ताडोबाच्या सीमांमध्येच राहत नाहीत; तर विस्तृत वनक्षेत्रात, वन्यजीव मार्गिकांमधून आणि काहीवेळा राज्यांच्या सीमांपलीकडेही भ्रमण करतात. त्यामुळे एखादा वाघ काही काळ दिसत नसल्याचा अर्थ तो शिकारीचा बळी ठरला, असा होत नाही. वृद्धत्व, क्षेत्रीय संघर्ष, जखमा किंवा रोगांमुळे नैसर्गिक मृत्यूही होत असतात, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे, ताडोबा प्रशासनाने आपल्या निवेदनात या प्रकरणातील अनेक आरोपांना "अफवा" असे संबोधले आहे. स्थानिक रिसॉर्ट व्यावसायिक आणि वन्यजीव छायाचित्रकारांमधील व्यावसायिक स्पर्धा किंवा मतभेदांमधून काही माहिती पसरवली जात असल्याचीही शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
वाघाच्या हालचालींबाबतची अचूक माहिती चुकीच्या लोकांपर्यंत पोहोचली तर…?
मुंबईचे वन्यजीव छायाचित्रकार आणि अभ्यासक नरेंद्र नायक यांच्याशी ‘बाईमाणूस’ने संपर्क साधल्यावर ते सांगतात की, एकेकाळी वाघ शोधणे हे वनरक्षक, संशोधक आणि जंगलाशी नाळ जोडलेल्या स्थानिक समुदायांचे काम मानले जात होते. आज परिस्थिती वेगळी आहे. ताडोबातील अनेक वाघांना पर्यटक नावाने ओळखतात. "माया", "मटका", "चोटी तारा", "ज्युनिअर बजरंग", "रुद्रा" अशा नावांनी ओळखले जाणारे वाघ सोशल मीडियावर सेलिब्रिटी झाले आहेत. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जाते. कोणता वाघ कोणत्या पाणवठ्यावर येतो, कोणत्या मार्गाने फिरतो, कोणत्या वेळी दिसतो, याची माहिती अनेकांच्या मोबाईलमध्ये आणि व्हॉट्सॲप गटांमध्ये फिरत असते.
ही माहिती पर्यटनासाठी उपयुक्त असली तरी तिचा दुसरा पैलूही आहे. संवर्धन क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ वर्षानुवर्षे सांगत आले आहेत की एखाद्या वाघाच्या हालचालींबाबतची अचूक माहिती चुकीच्या लोकांपर्यंत पोहोचली तर ती शिकाऱ्यांसाठी सोन्याची खाण ठरू शकते. शिकारीला जंगलातील प्रत्येक इंच माहिती असण्याची गरज नसते; त्याला फक्त योग्य वेळ आणि योग्य ठिकाण माहीत असणे पुरेसे असते. आधुनिक तंत्रज्ञान, मोबाईल नेटवर्क आणि सोशल मीडियाच्या युगात ही माहिती पूर्वीपेक्षा अधिक वेगाने प्रवास करत, असेही मत नरेंद्र नायक यांनी स्पष्ट केले.
वाघांच्या छायाचित्रासाठी वन्यजीव छायाचित्रकारांमध्ये तीव्र व्यावसायिक स्पर्धा
गेल्या १५ वर्षांपासून ताडोबामध्ये सातत्याने छायाचित्रण आणि जंगल सफारीचे आयोजन करणारे सौरभ महाडिक सांगतात की,
‘’ताडोबातील व्याघ्र पर्यटनाचा विस्तार गेल्या दशकात प्रचंड वेगाने झाला आहे. जंगलाच्या प्रवेशद्वारांभोवती रिसॉर्ट्स, होमस्टे, सफारी ऑपरेटर्स, खासगी गाईड्स आणि वन्यजीव छायाचित्रण कार्यशाळांचे जाळे निर्माण झाले आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा झाला, रोजगार निर्माण झाले आणि वाघांचे अस्तित्व स्थानिकांसाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे ठरले. ही सकारात्मक बाजू दुर्लक्षित करता येणार नाही. परंतु जेथे मोठा पैसा येतो तेथे स्पर्धा, दबाव आणि अनौपचारिक नेटवर्कही तयार होतात.’’
एखाद्या दुर्मिळ वाघाचा अनोखा फोटो मिळवणे आज प्रतिष्ठेची बाब झाली आहे. सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स, छायाचित्रण स्पर्धांमधील यश, पर्यटन व्यवसायातील लोकप्रियता आणि आर्थिक लाभ या सगळ्यांमुळे "सर्वोत्तम फोटो" मिळवण्याची शर्यत वाढली आहे. काही वेळा या स्पर्धेमुळे नैतिक मर्यादा धूसर होतात. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, प्राण्यांना आकर्षित करण्यासाठी खाद्य टाकणे, त्यांच्या हालचालींवर अनावश्यक लक्ष ठेवणे किंवा त्यांचा नैसर्गिक व्यवहार बदलणाऱ्या पद्धती वापरणे या गोष्टी गंभीर मानल्या जातात. बहुसंख्य छायाचित्रकार जबाबदारीने काम करत असले तरी काही अपवाद संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात, असेही सौरभ महाडिक स्पष्ट करतात.
जेव्हा सारिस्का आणि पन्ना व्याघ्र प्रकल्पातील वाघ गायब झाले होते…?
भारतातील व्याघ्र संवर्धनाच्या इतिहासात अशा प्रश्नांची पार्श्वभूमीही आहे. राजस्थानमधील सारिस्का व्याघ्र प्रकल्प हे याचे सर्वात मोठे नकारात्मक उदाहरण मानले जाते. २००४-०५ च्या सुमारास तेथील वाघ जवळपास पूर्णपणे नाहीसे झाल्याचे उघड झाले. अधिकृत नोंदींमध्ये वाघ असल्याचे दाखवले जात असताना प्रत्यक्ष जंगलात ते अस्तित्वातच नव्हते. स्थानिक माहिती, शिकारींची साखळी आणि व्यवस्थेतील त्रुटी यांच्या एकत्रित परिणामामुळे सारिस्कामध्ये वाघ संपल्याचा धक्का देशाला बसला.

मध्य प्रदेशातील पन्ना व्याघ्र प्रकल्पाची कहाणीही तितकीच धक्कादायक होती. २००९ मध्ये तेथील वाघ नामशेष झाल्याचे स्पष्ट झाले. नंतर इतर व्याघ्र प्रकल्पांतून वाघ आणून पन्नामध्ये पुनर्स्थापना करण्यात आली. आज पन्ना पुनरुज्जीवनाच्या यशस्वी उदाहरणांपैकी एक मानला जातो; मात्र त्या यशामागे पूर्वीच्या शिकारीच्या भीषण वास्तवाची सावली कायम आहे. ही दोन्ही उदाहरणे दाखवतात की जंगलातील वाघांची संख्या केवळ कागदोपत्री नव्हे, तर प्रत्यक्ष वैज्ञानिक पद्धतीने तपासणे किती आवश्यक आहे.
अलीकडील काळातही शिकारीचे स्वरूप अधिक संघटित आणि तांत्रिक होत असल्याचे दिसते. मध्य प्रदेशातील काही प्रकरणांमध्ये रेडिओ-कॉलर लावलेल्या वाघांचा विषप्रयोग करून खून करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे आधुनिक तंत्रज्ञान असूनही शिकारी नेटवर्क किती चतुराईने काम करू शकतात, याची जाणीव होते. त्यामुळे ताडोबासारख्या यशस्वी व्याघ्र प्रकल्पातही सतत सावध राहण्याची गरज आहे.
छायाचित्रकारांकडून मिळालेली माहिती व्याघ्र संवर्धनासाठी मोलाची
मात्र या चित्राची दुसरी बाजूही आहे. नरेंद्र नायक सांगतात की, भारतातील अनेक व्याघ्र प्रकल्पांमध्ये वन्यजीव छायाचित्रकार आणि नैसर्गिक अभ्यासकांनी संवर्धनासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अनेकांनी शिकारीविरोधी मोहिमांना मदत केली आहे. अनेक संशोधक सांगतात की पर्यटक आणि छायाचित्रकारांकडून मिळणारी दृश्य नोंद, फोटो अर्काइव्ह आणि वाघांच्या हालचालींची माहिती यामुळे काही वेळा वन विभागाला मॉनिटरिंगमध्ये मदत झाली आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेले फोटो आणि व्हिडिओ यांमुळे वाघांविषयी जनसामान्यांमध्ये आकर्षण निर्माण झाले, ज्याचा अप्रत्यक्ष फायदा संवर्धनाला झाला आहे.
ताडोबाच याचे एक महत्त्वाचे उदाहरण आहे. एकेकाळी तुलनेने कमी परिचित असलेला हा व्याघ्र प्रकल्प आज जागतिक स्तरावर ओळखला जातो. हजारो पर्यटक दरवर्षी येथे येतात. स्थानिक युवक गाईड, ड्रायव्हर, नैसर्गिक अभ्यासक किंवा रिसॉर्ट कर्मचारी म्हणून रोजगार मिळवतात. जंगलातील वाघ जिवंत राहणे हेच स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर असल्याची भावना अनेक गावांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्यटन हे केवळ धोका नसून योग्य व्यवस्थापन असेल तर ते संरक्षणाचे प्रभावी साधनही ठरू शकते.
तरीही प्रश्न कायम राहतो. व्याघ्र पर्यटनासाठी माहितीची मर्यादा काय असावी? एखाद्या वाघाचे अचूक लोकेशन, त्याची दिनचर्या किंवा संवेदनशील अधिवास याबाबतची माहिती सार्वजनिकपणे कितपत शेअर करावी? सोशल मीडियावर पोस्ट होणारे फोटो, रिअल-टाइम अपडेट्स आणि लोकेशन टॅग्स यांचा गैरवापर होऊ शकतो का? जगभरातील अनेक संवर्धन संस्थांनी याबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.






