संजना खंडारे
- बुलढाण्यातील ग्रामीण महिलांपासून ते मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरमधील शहरी महिलांपर्यंत संवाद साधताना 'बाईमाणूस'ला एक महत्त्वाचं वास्तव दिसून आलं. ते म्हणजे 'मेनोपॉज’ अर्थात रजोनिवृत्ती बद्दल असलेलं कमालीचं अज्ञान…
- रजोनिवृत्ती हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील नैसर्गिक टप्पा असला, तरी त्याबद्दलची जागरूकता अजूनही मर्यादित आहे. ग्रामीण भागात माहितीचा अभाव आणि संकोच अधिक ठळकपणे जाणवतो, तर शहरांमध्ये माहितीची साधनं उपलब्ध असूनही अनेक महिला शरीरात होणाऱ्या बदलांकडे 'वयाचा परिणाम' म्हणूनच पाहतात.
- त्यामुळे रजोनिवृत्तीबाबतचा संवाद, योग्य माहिती आणि वेळेवर आरोग्यसेवा ही आजही अनेक महिलांसाठी अपुरीच असल्याचं ‘बाईमाणूस’ च्या या विशेष ग्राऊंड रिपोर्टमधून समोर आलं.
५२ वर्षांच्या गीताबाई या ग्रामीण महिला शेतकरी आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातल्या जानेफळ गावात त्या राहतात. गेल्या काही महिन्यांपासून अचानक त्यांना विचित्र वाटायला लागलंय आणि त्याचा परिणाम त्यांच्या दैनंदिन कामावार होतोय गीताबाईंचा दिनक्रम अतिशय कष्टाचा… म्हणजे गोठा साफ करायचा, गायींना चारा द्यायचा, डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणायचं, न्याहारी करायची आणि मग शेतात जाऊन राबायचं.
"अलीकडे रात्री झोपच लागत नाही, लय घाम फुटायला लागतो. आता पावसाळ्यात थोडं बरं वाटतं. पण उन्हाळ्यात तर घामानं अंग भिजून जायचं." गीताबाई आपला त्रास सांगतात.
‘दवाखान्यात गेलात का’, असा प्रश्न विचारल्यावर त्या शांतपणे म्हणतात, "आता वय झालं म्हणून होत असेल. वय झालं की हे सगळं व्हायचंच."
गीताबाईंना हा त्रास 'मेनोपॉज' म्हणजेच 'रजोनिवृत्ती'मुळे सुरू झाला होता. परंतू मासिक पाळीबद्दल विचारताच त्या आजूबाजूला पाहतात आणि हळू आवाजात सांगतात, "एक वरीस झालं पाळी बंद होऊन. बरं झालं, तो त्रास तरी गेला."
"आता वय झालं म्हणून होत असेल, वय झालं की हे सगळं व्हायचंच."
जानेफळ आणि बुलढाणा जिल्ह्यातील काही प्रौढ महिलांशी संवाद साधताना एकच चित्र वारंवार दिसून आलं. पाळी बंद झाल्यानंतर झोप न लागणं, अंगातून उष्णतेच्या लाटा जाणवणं, अचानक घाम येणं, सांधेदुखी, थकवा, चिडचिड यांसारखा त्रास अनेक महिलांना सुरू होता. मात्र या सगळ्या बदलांना 'रजोनिवृत्ती' म्हणतात, हेच त्यांना माहीत नाही. 'मेनोपॉज' किंवा 'रजोनिवृत्ती' हे शब्द त्यांनी यापूर्वी कधीच ऐकले नव्हते.
48 वर्षीय वंदना अवसरमोल
४८ वर्षांच्या वंदना अवसरमोल म्हणाल्या, "थोडंसं काम केलं तरी दमल्यासारखं होतं. वाटायचं वय झालं म्हणून असं होत असेल. एवढ्यासाठी डॉक्टरकडे कोण जातं?"
६० वर्षीय पारूबाई वाघ शेतमजुरी करतात. दिवसभर राबल्यानंतर रात्री कंबरदुखी आणि सांधेदुखी वाढते. "पाळी बंद झाल्यानंतरच हा त्रास वाढला का?" या प्रश्नावर त्या म्हणतात, "तसं कधी जोडून पाहिलंच नाही. वय वाढलं आणि त्रास सुरू झाला, एवढंच माहीत."
गावातल्या इतर महिलांशी बोलतानाही असंच चित्र दिसलं. 'पाळी' हा शब्द उच्चारताच काही महिला हसायला लागल्या, तर काहींनी आजूबाजूला पाहिलं. एक महिला म्हणाली,
"ह्या गोष्टी मोठ्यांदा बोलायच्या नसतात. लोक काय म्हणतील?"
अनेक महिलांनी सांगितलं की, पाळी बंद झाल्यानंतर शरीरात होणारे बदल, मानसिक ताण किंवा झोपेच्या समस्या याबद्दल त्यांनी कधीच घरात चर्चा केली नाही. कारण हा विषय अजूनही 'बायकांपुरताच' मानला जातो.
या सगळ्या अनुभवांमधून एक गोष्ट स्पष्ट होते, त्रास जवळपास सगळ्यांनाच आहे. पण त्या त्रासाला नाव नाहीये. माहितीचा अभाव, संकोच आणि 'हे वयामुळेच होतं' हा समज यामुळे अनेक ग्रामीण महिला 'रजोनिवृत्ती'च्या काळात आवश्यक असलेल्या वैद्यकीय सल्ल्यापासून दूर राहतात.
मेनोपॉज, रजोनिवृत्ती म्हणजे नेमकं काय?
महिलांच्या आयुष्यात मासिक पाळी कायमची बंद होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेला रजोनिवृत्ती (मेनोपॉज) म्हणतात. सलग १२ महिने मासिक पाळी आली नाही, तर त्या महिलेला रजोनिवृत्ती झाल्याचं मानलं जातं. साधारणपणे ४५ ते ५५ वर्षांच्या वयोगटात हा टप्पा येतो. मात्र त्याआधीचा 'पेरीमेनोपॉज' हा काळ अनेक महिलांसाठी अधिक आव्हानात्मक असतो. या काळात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकांमध्ये चढ-उतार होऊ लागतात. त्यामुळे मासिक पाळी अनियमित होणे, अचानक अंगातून उष्णतेच्या लाटा जाणवणे (हॉट फ्लॅशेस), रात्री घाम येणे, झोप न लागणे, चिडचिड, भावनिक अस्थिरता, विसराळूपणा, सांधेदुखी, थकवा आणि लैंगिक इच्छेत बदल अशी अनेक लक्षणं दिसू शकतात. रजोनिवृत्ती हा आजार नसला, तरी महिलांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे या काळात योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करणं तितकंच आवश्यक ठरतं.
बुलढाण्यातील जानेफळ गावातील गीताबाईंना रात्री घाम येतो, झोप लागत नाही, अंगातून उष्णतेच्या लाटा जातात. पण हा त्रास रजोनिवृत्तीमुळे आहे, हे त्यांना माहीत नाही. पण मग शहरांमध्ये परिस्थिती किती वेगळी आहे? अधिक शिक्षणाच्या संधी, इंटरनेट आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध असल्यामुळे शहरी महिलांना रजोनिवृत्तीची पुरेशी माहिती असते का? हा प्रश्न घेऊन ‘बाईमाणूस’ने छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईतील काही महिलांशीही संवाद साधला.
ग्रामीण महिलांमध्ये रजोनिवृत्तीबाबत माहितीचा अभाव स्पष्ट दिसत होता. मात्र शहरांमध्ये चित्र पूर्णपणे वेगळं आहे, असंही म्हणता येत नाही. माहिती उपलब्ध असली, तरी ती प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचतेच असं नाही. शिक्षण, आरोग्यसेवा आणि वैयक्तिक जागरुकता यामुळे काही महिलांचा प्रवास तुलनेने सुलभ होतो; तर अनेक जणी अजूनही हा बदल 'वयाचा परिणाम' म्हणूनच स्वीकारतात.

ग्रामीण भागात मौन, शहरातही जागरूकता अपुरी
छ. संभाजी नगर शहरात ‘प्रॅक्टिस’ करणाऱ्या डॉ. मनीषा अमोल काकडे-पाथ्रीकर या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. विशेष म्हणजे ‘Unpause Your Menopause’ हे रजोनिवृत्तीवरचे पुस्तकच त्यांनी लिहिले आहे. ‘बाईमाणूस’ शी बोलताना डॉ. मनीषा यांनी ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरांमध्येही रजोनिवृत्तीबाबत जागरूकतेचा मोठा अभाव असल्याचं मत व्यक्त केलं. त्यांच्या मते, महिलांच्या आयुष्यातील हा नैसर्गिक टप्पा असला तरी त्याबद्दल बोलण्याची संस्कृती अजूनही समाजात निर्माण झालेली नाही.
डॉ. मनीषा म्हणाल्या, "मी छत्रपती संभाजीनगरसारख्या शहरात प्रॅक्टिस करते. तरीही रजोनिवृत्तीच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या महिलांची संख्या फार कमी आहे. कारण त्यांना शरीरात होणारे बदल रजोनिवृत्तीमुळे होत आहेत, हेच माहीत नसतं. काही सुशिक्षित किंवा नोकरी करणाऱ्या महिलांना याबद्दल थोडी माहिती असते. पण बहुतांश महिलांसाठी हा विषय अजूनही चर्चेचाच नाही."
त्या पुढे म्हणाल्या, "आपल्या समाजात महिलेच्या आरोग्याची काळजी तिच्या गर्भधारणेपासून बाळंतपणापर्यंत घेतली जाते. त्यानंतर मात्र तिच्या शरीरात काय बदल होत आहेत, याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे झोप न लागणं, सांधेदुखी, हॉट फ्लॅशेस, मानसिक ताण किंवा चिडचिड यांसारख्या समस्या अनेक महिला वर्षानुवर्षे सहन करत राहतात. प्रत्येक महिलेने नियमित आरोग्य तपासणी करावी, संतुलित आहार घ्यावा आणि गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नये. त्याचबरोबर शासनाने आणि आरोग्य यंत्रणेने गावागावांत रजोनिवृत्तीबाबत जनजागृती मोहीम राबवण्याची गरज आहे."
मुंबईतील ५० वर्षीय सविता प्रशांत या सध्या पेरीमेनोपॉजच्या टप्प्यातून जात आहेत. रजोनिवृत्ती येण्यापूर्वीचा काही वर्षांचा काळ 'रजोनिवृत्तीपूर्व टप्पा (पेरीमेनोपॉज)' म्हणून ओळखला जातो. या विषयावर त्या स्वतः वाचतात आणि डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेतात. त्यांच्या मते, माहितीचा अभाव आणि स्वतःच्या आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष हीच मोठी समस्या आहे.
रजोनिवृत्ती हा लपवण्याचा विषय नाही. त्याबद्दल मोकळेपणाने बोलावं
बाईमाणूसशी बोलताना त्या म्हणाल्या, "मी सध्या पेरीमेनोपॉजमध्ये आहे. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल आधीपासून माहिती घेत आहे. या विषयावर वाचते, डॉक्टरांशी बोलते. त्यामुळे काही लक्षणं जाणवली तरी त्यामागचं कारण समजतं. पण अनेक महिला अजूनही मेनोपॉजकडे दुर्लक्ष करतात. या काळात चिडचिड, अचानक भावनिक होणं, झोप न लागणं, थकवा किंवा हॉट फ्लॅशेस ही नैसर्गिक लक्षणं आहेत. अशा वेळी जोडीदार आणि कुटुंबीयांनी महिलेला समजून घेणं आणि भावनिक आधार देणं खूप महत्त्वाचं असतं."
त्या पुढे म्हणाल्या, "रजोनिवृत्तीच्या काळात औषधांइतकीच जीवनशैलीही महत्त्वाची आहे. आहारात कॅल्शियम, प्रथिने, फळं-भाज्या यांचा समावेश, नियमित व्यायाम, योग, पुरेशी झोप आणि ताण-तणाव कमी ठेवणं गरजेचं आहे. धूम्रपान आणि मद्यपान टाळावं, नियमित आरोग्य तपासणी करावी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रजोनिवृत्ती हा लपवण्याचा विषय नाही. त्याबद्दल मोकळेपणाने बोललं, तर अधिक महिला योग्य वेळी उपचार घेऊ शकतील."
छ. संभाजीनगरच्या ६० वर्षीय तिलोत्तमा झाडे यांचा याबद्दलचा अनुभव यापेक्षा वेगळा आहे. वेळेवर माहिती आणि डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळाल्यामुळे त्यांना रजोनिवृत्तीच्या काळात फारसा त्रास झाला नाही.
‘बाईमाणूस’शी बोलताना त्या म्हणाल्या, "मी मेनोपॉजच्या टप्प्यातून गेले आहे. पण मला फारसा त्रास झाला नाही. माझ्या आईला या विषयाची माहिती होती. तिने आधीच शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल सांगितलं होतं. आमची एक डॉक्टर मैत्रीणही होती. तिच्याकडून मार्गदर्शन घेतलं आणि गरजेनुसार औषधंही घेतली. त्यामुळे शरीरात बदल जाणवत असले, तरी ते का होत आहेत हे मला माहीत होतं."
त्या पुढे म्हणाल्या, "'वय झालं म्हणून होतं' असं म्हणत अनेक महिला त्रास सहन करत राहतात. पण मी नियमित तपासणी केली, डॉक्टरांचा सल्ला घेतला, आहाराकडे लक्ष दिलं आणि स्वतःची काळजी घेतली. त्यामुळे हा काळ सहज गेला. प्रत्येक महिलेने या टप्प्याकडे दुर्लक्ष न करता योग्य माहिती घ्यावी आणि गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा."
या पुस्तकामध्ये डॉ. मनिषा काकडे -पाथ्रीकर यांनी रजोनिवृत्ती संदर्भात सर्व गोष्टींकडे लक्ष केंद्रित केलं आहे.
“पुरुषांना माहिती नसेल, तर महिलांना आधार कसा देणार?”
छत्रपती संभाजीनगर येथील निवृत्त प्राध्यापक आणि विचारवंत उमेश बगाडे यांच्या मते, रजोनिवृत्तीबद्दल महिलांइतकीच पुरुषांमध्येही जागरूकता असणं आवश्यक आहे. त्यांच्या पत्नी रजोनिवृत्तीच्या टप्प्यातून गेल्या आहेत. त्या काळातील अनुभवामुळे या विषयाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन अधिक स्पष्ट झाला आहे.
‘बाईमाणूस’शी बोलतांना ते सांगतात, "खरं सांगायचं तर मेनोपॉज म्हणजे काय, या काळात महिलांना कोणते शारीरिक आणि मानसिक त्रास होतात, याची माहिती बहुतांश पुरुषांना नसते. महिलाही या विषयावर फारसं बोलत नाहीत. त्यामुळे त्यांच्या स्वभावात बदल झाला, चिडचिड वाढली किंवा त्या वारंवार अस्वस्थ होत असल्या, तरी त्यामागचं कारण आम्हाला कळत नाही. मग अनेकदा गैरसमज होतात. तसं बघायला गेलं तर समाजात महिलांच्या आरोग्याबद्दलचा संवादच मर्यादित आहे. त्यामुळे पुरुषांना या विषयात सहभागी होण्याची संधीच मिळत नाही. जर पुरुषांना या काळात महिलांना नेमका काय त्रास होतो, हे माहीत नसेल, तर त्यांना समजून कसं घेणार? त्यांना आधार कसा देणार? त्यामुळे रजोनिवृत्तीबाबत महिलांइतकीच पुरुषांमध्येही जागरूकता निर्माण होणं गरजेचं आहे. कुटुंबात या विषयावर मोकळेपणाने संवाद झाला, तर महिलांचा हा प्रवास नक्कीच अधिक सोपा होईल."
हवामान बदलाचाही रजोनिवृत्तीवर परिणाम होतो का?”
रजोनिवृत्ती आणि हवामान बदल यांचा थेट संबंध असल्याचं अद्याप निश्चितपणे सिद्ध झालेलं नसले, तरी वाढतं तापमान आणि उष्णतेच्या लाटा (Heat Waves) रजोनिवृत्तीच्या काळातील काही लक्षणांची तीव्रता वाढवू शकतात, असं तज्ज्ञांचं मत आहे. या काळात अनेक महिलांना अचानक अंगातून उष्णतेच्या लाटा जाणवणं (हॉट फ्लॅशेस), रात्री घाम येणं, झोप न लागणं आणि थकवा जाणवणं अशा तक्रारी असतात. बाहेरचं तापमान अधिक असेल, तर या तक्रारी आणखी तीव्र होऊ शकतात.
विशेषतः ग्रामीण भागात शेतात किंवा उन्हात दिवसभर काम करणाऱ्या महिलांवर त्याचा अधिक परिणाम होण्याची शक्यता असते. बुलढाण्यासारख्या जिल्ह्यांमध्ये उन्हाळ्यात तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचतं. अशा परिस्थितीत पुरेसं पाणी पिणं, पौष्टिक आहार घेणं, शक्यतो उन्हाचा थेट संपर्क टाळणं आणि त्रास वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं अधिक महत्त्वाचं ठरतं.
रजोनिवृत्तीनंतर वाढतो गंभीर आजारांचा धोका…
रजोनिवृत्ती ही नैसर्गिक प्रक्रिया असली, तरी त्यानंतर शरीरातील इस्ट्रोजेनचं प्रमाण कमी झाल्यामुळे अनेक असंसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) वर प्रकाशित भारतीय अभ्यासांमध्ये रजोनिवृत्तीनंतर हृदयविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हाडांची झीज (ऑस्टिओपोरोसिस) यांचा धोका वाढत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
52 वर्षीय गीताबाई यांना रोज सकाळी विहिरीतून पाणी काढावं लागतं.
तसंच, BMJ Public Health मध्ये प्रसिद्ध झालेल्या दहा वर्षांच्या संशोधनानुसार, ४५ वर्षांपूर्वी रजोनिवृत्ती आलेल्या महिलांमध्ये सर्व कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका सुमारे २५ टक्क्यांनी अधिक आढळला आहे. European Society of Cardiology (ESC) मध्ये सादर करण्यात आलेल्या संशोधनात लवकर रजोनिवृत्ती झालेल्या महिलांमध्ये पुढील आयुष्यात हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका ३० ते ४० टक्क्यांनी अधिक असल्याचं समोर आलं आहे. तर Alzheimer's Association आणि The Lancet Healthy Longevity मध्ये प्रकाशित संशोधनानुसार, विशेषतः अकाली रजोनिवृत्ती झालेल्या महिलांमध्ये स्मृतिभ्रंश (डिमेन्शिया) आणि अल्झायमरचा धोका वाढण्याची शक्यता असते.
मेनोपॉज क्लिनिक सुरू झाले; पण माहिती महिलांपर्यंत पोहोचतेय का?
महिलांच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या टप्प्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने २०२६ मध्ये राज्यातील शासकीय रुग्णालये आणि नागरी आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र 'मेनोपॉज क्लिनिक' सुरू करण्याचा निर्णय घेतला. या क्लिनिकमध्ये रजोनिवृत्तीबाबत समुपदेशन, स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला, मानसिक आरोग्य मार्गदर्शन, आवश्यक तपासण्या आणि जीवनशैलीविषयक सल्ला देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मात्र बुलढाणा जिल्ह्यातील गावांमध्ये महिलांशी संवाद साधताना वेगळंच चित्र दिसलं. ‘बाईमाणूस’ने ज्या ज्या महिलांशी संवाद साधला त्यांना मेनोपॉज क्लिनिक, सरकारी जनजागृती मोहीम किंवा रजोनिवृत्तीबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नव्हती. त्यामुळे योजना सुरू होणं आणि त्या प्रत्यक्ष महिलांपर्यंत पोहोचणं यामध्ये अजूनही मोठी दरी असल्याचं या ग्राऊंड रिपोर्टमधून दिसून आलं.
छत्रपती संभाजीनगर येथील आशा सेविका शिल्पा पवार ‘बाईमाणूस’शी बोलतांना सांगतात, "महिलांच्या आरोग्यासाठी शासनाकडून गर्भवती माता, प्रसूती, लसीकरण, कुटुंब नियोजन, रक्तक्षय आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्यासंदर्भात विविध कार्यक्रम राबवले जातात. मात्र रजोनिवृत्तीबाबत स्वतंत्रपणे जनजागृती फार कमी प्रमाणात होते."
"आम्ही घराघरांत जाऊन गर्भवती महिलांची नोंद, लसीकरण, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरची काळजी, कुटुंब नियोजन यावर नियमित काम करतो. पण मेनोपॉज किंवा रजोनिवृत्तीबाबत महिलांना माहिती देण्यासाठी स्वतंत्र मोहीम किंवा आमचं प्रशिक्षण फारसं झालेलं नाही. अनेक महिला शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल सांगतात, पण त्याचा संबंध रजोनिवृत्तीशी असू शकतो, हे त्यांनाही माहिती नसतं आणि अनेकदा आम्हालाही त्यासाठी विशेष प्रशिक्षण मिळालेलं नसतं," असं त्या सांगतात.
आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षित करणं गरजेचं
त्या पुढे म्हणतात, "महाराष्ट्र शासनाने मेनोपॉज क्लिनिकसारखा उपक्रम सुरू करणं ही चांगली बाब आहे. मात्र त्याची माहिती गावपातळीपर्यंत पोहोचणं तितकंच गरजेचं आहे. आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांतील कर्मचाऱ्यांना याबाबत विशेष प्रशिक्षण दिलं, तर महिलांपर्यंत योग्य माहिती अधिक प्रभावीपणे पोहोचू शकते. जसं गर्भधारणा आणि प्रसूतीबाबत जनजागृती केली जाते, तसंच रजोनिवृत्तीबाबतही नियमित आरोग्य शिक्षणाची गरज आहे."
पुण्यामध्ये मेनोपाॅज क्लिनिक सुरू झालं आहे. मात्र अजून गावखेड्यात हे क्लिनिक सुरू झालेलं नाही.
राज्यातील शासकीय रुग्णालये आणि नागरी आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र 'मेनोपॉज क्लिनिक' सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालयातील अधिपरिचारिका असलेल्या अनुसया सावरगावे यांच्याशी संपर्क साधला.
त्यांच्या मते, महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मेनोपॉज क्लिनिकमुळे रजोनिवृत्तीच्या टप्प्यातील महिलांना समुपदेशन, उपचार आणि योग्य मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. या उपक्रमाची माहिती अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचावी यासाठी आशा सेविका, एएनएम (सहाय्यक परिचारिका) आणि एलएचव्ही (लेडी हेल्थ व्हिजिटर) यांनाही प्रशिक्षण देण्यात आलं आहे.
बाईमाणूसशी बोलताना त्या म्हणाल्या, "आमच्या जिल्हा रुग्णालयात दर बुधवारी मेनोपॉज क्लिनिक भरतं. ४५ वर्षांवरील महिलांना येथे रजोनिवृत्तीबाबत समुपदेशन, आवश्यक तपासण्या आणि उपचार दिले जातात. अशक्तपणा, अतिरक्तस्राव, हॉट फ्लॅशेस किंवा इतर त्रासांबाबत मार्गदर्शन केलं जातं. पोस्टर्स, बॅनर्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जनजागृती केली जाते. शहरातील महिलांसोबतच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील महिलाही या क्लिनिकमध्ये येतात. काही महिला स्वतःहून येतात, तर काहींना आशा सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर त्या उपचारासाठी येतात. सध्या दर आठवड्याला साधारण २० ते २५ महिला या क्लिनिकमध्ये येतात. मात्र अजूनही अनेक महिलांना रजोनिवृत्तीबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे त्या वेळेवर उपचार घेत नाहीत. जनजागृती करण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून जेवढं होईल तेवढं करतोय."
रजोनिवृत्तीबाबत प्रशिक्षण आणि जनजागृतीच्या बाबतीत वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळं चित्र दिसून आलं. काही आशा सेविकांच्या मते या विषयावर स्वतंत्र प्रशिक्षण अद्याप पुरेसं झालेलं नाही. तर जिल्हा रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं वेगळं आहे. त्यांच्या मते, मेनोपॉज क्लिनिक सुरू झाल्यानंतर आशा सेविका, एएनएम आणि एलएचव्ही यांना प्रशिक्षण देण्यात आलं असून महिलांना क्लिनिकपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.






