जागतिक पातळीच्या इतिहाससंशोधकांनी आद्य महिला स्वातंत्र्य सेनानीचा सन्मान दिलेल्या भीमाबाई होळकरांना आमच्या इतिहासाने मात्र काळाच्या कालकुपीत दफन करुन ठेवले आहे, हे एक दुर्दैवच आहे. अठराव्या शतकात शिक्षित असलेली, परंपरेच्या जोखडाखाली न वाढवली गेलेली, पिता यशवंतराव होळकरांच्या पावलावर पाउल ठेवत ब्रिटिशांशी सर्वकश युद्ध पुकारणारी ही महान वीरांगना….
भीमाबाईंचा जन्म 1797 मध्ये पुणे येथे झाला. आईचे नांव लाडाबाई तर पिता इंग्रजांचे कर्दनकाळ, आद्य स्वातंत्र्य सेनानी यशवंतराव होळकर… दौलतराव शिंदेंनी सत्तालालसेमुळे मल्हारराव होळकर (दुसरे) यांचा पुण्यात खुन केला. यशवंतराव व विठोजींच्याही जीवावर शिंदे उठल्याने उभयतांना पुण्यातून निसटून जावे लागले.
शिंद्यांनी त्याचा सुड असा घेतला की, नवजात भीमाबाई आणि माता लाडाबाईला कैदेत टाकले. त्यांची सुटका यशवंतरावांनी 25 आक्टोबर 1802 रोजी पुण्यावर स्वारी करुन शिंदे व पेशव्यांचा दणदणीत पराभव केल्यानंतर झाली. तब्बल सहा वर्ष या वीरांगनेला मातेसह कैदेत रहावे लागले. सुटकेनंतर मात्र यशवंतरावांनी भीमाबाईच्या शिक्षणाची व लष्करी प्रशिक्षणाची सुरुवात केली.
ब्रिटिश विदुषि मेरी सदरल्यंड म्हणतात, ज्या काळात भारतात महिलांना गोषात रहावे लागे, शिक्षणाचा विचारही नव्हता, अत्यंत बंदिस्त व मानहानीचे जीवन जगावे लागे त्या काळात, यशवंतरावांसारख्या द्रष्ट्या पुरुषाने भीमाबाईला शिक्षण देणे व लढवय्याही बनवणे ही एक क्रांतीकारक घटना होती. अर्थात अशी सामाजिक क्रांती होळकर घराण्याला नवीन नव्हती.

अहिल्याबाई होळकर स्वत: शिक्षित तर होत्याच पण त्या काळात भालाफेकीत त्यांचा हात धरणारा कोणी पुरुषही नव्हता. एवढेच नव्हे तर जगातील पहिले महिलांना लष्करी प्रशिक्षण देणारे विद्यालयही स्थापन करुन त्यांनी महिलांची बटालियन उभारली होती. या बटालियनला घाबरुन रघुनाथराव पेशव्यालाही पळून जावे लागले होते.
यशवंतरावांचा ब्रिटिशांशी संघर्ष सुरु असला व एका मागोमाग एक अशा अठरा युद्धांत त्यांना पराजित करत राहिले असले तरी परिवाराकडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही. भीमाबाईचा विवाह धारचे संस्थानिक गोविंदराव बुळे यांच्याशी झाला. यशवंतरावांनी आपल्या लाडक्या कन्येला पेटलवाड येथील जहांगीरही व्यक्तिगत उत्पन्नासाठी दिली. परंतु विवाहानंतर दोनेक वर्षातच भीमाबाईवर वैधव्य कोसळले. त्या परत माहेरी आल्या व यशवंतरावांनी भानपुरा येथे सुरु केलेल्या तोफांच्या कारखान्याचे व नवीन लष्कर भरतीचे काम पाहू लागल्या.
त्यांना उत्तम अश्वपरिक्षा अवगत होती. त्यामुळे भारतभरातून यशवंतरावांनी एक लाख घोडे आपल्या सैन्यासाठी विकत घ्यायचा सपाटा लावला होता. त्यात निवडीची मुख्य भूमिका भीमाबाई बजावत होत्या. यशवंतरावांचा भारतीय स्वातंत्र्यासाठी कलकत्त्यावर ईस्ट इंडिया कंपनीच्या मुख्यालयावरच हल्ला करण्याचा बेत होता. पण दुर्दैवाने मेंदुतील गाठीच्या आजाराने यशवंतरावांचा 28 आक्टोबर 1811 रोजी भानपुरा येथे अकाली मृत्यू झाला.
त्यावेळीस भीमाबाईंच्या धाकट्या भावाचे, मल्हारराव तिसरा याचे वय होते फक्त सहा वर्ष. महाराणी तुळसाबाई या मल्हारराव (तिसरे) यांच्या रीजंट म्हणून कारभार पहात असतांना भीमाबाई लष्करी फेररचनेत व्यस्त होत्या.

(यशवंतराव होळकर)
यशवंतरावांच्या मृत्युमुळे होळकरी संस्थान ताब्यात घेता येईल या कल्पनेत इंग्रज रममाण होते व तसा प्रयत्नही करत होते, पण त्यांना यश येत नव्हते. कारण तत्कालीन भारतात होळकरांचे लष्कर बलाढ्य मानले गेलेले होते. शेवटी इंग्रजांनी कपटनीतिचा आश्रय घेतला. गफुरखान या होळकरांच्या सेनानीला त्यांनी जावऱ्याची जहागिरी देण्याचे आमिष दाखवत फोडले. या घरभेद्याने 19 डिसेंबर 1817 रोजी महाराणी तुळसाबाईंचा निर्दय खुन केला व त्यांचे प्रेत क्षिप्रा नदीत फेकून दिले.
त्याच वेळीस भीमाबाई आणि मल्हारराव (तिसरे) सर थोमस हिस्लोप या माल्कमने पाठवलेल्या ईंग्रज सैन्याचा सेनापतीशी मुकाबला करण्याच्या तयारीत महिदपुर येथे होते. मल्हाररावाचे वय त्यासमयी फक्त बारा वर्षाचे होते तर भीमाबाईचे वय होते वीस. त्या घोडदळाचे नेतृत्व करत होत्या. 20 डिसेंबरला सकाळी युद्ध सुरु झाले.
दुपारी तीन वाजेपर्यंत होळकरी सेना इंग्रजांना कापून काढत विजयाच्या क्षणापर्यंत पोहोचली होती. पण ऐन मोक्याच्या वेळी गफुरखान आपल्या सैन्यासह रणांगणातून निघुन गेला. हाती आलेला विजय त्याच्या गद्दारीमुळे निसटला. याबाबत लुत्फुल्लाबेग नामक तत्कालीन इतिहासकार लिहितो कि, जर गफुरखानाने जागिरीच्या लोभापाई गद्दारी केली नसती तर इंग्रजांचे नाक ठेचले गेले असते व त्यांना भारतावर राज्य करणे अशक्य झाले असते.
या युद्धानंतर मल्हाररावाला इंग्रजांशी मंदसोर येथे तह करावा लागला. पण भीमाबाई मात्र आपल्या तीन हजार पेंढारी घोडदळानिशी निसटली होती. इंग्रजांशी तिचा लढा थांबणार नव्हता. तिने अक्षरश: अरण्यवास पत्करला व पित्याच्या पावलावर पाऊल ठेवत गनिमी काव्याचा मंत्र जपला. तिने माल्कमच्या सैन्यावर गनिमी हल्ले सुरु केले. इंग्रजांचे खजिने लुटले, अनेक तळ उध्वस्त केले. मार्च 1818 मध्ये तर खुद्द माल्कमच्या सेनेवर अचानक हल्ला करुन असे झोडपले की माल्कमलाच पळून जावे लागले.

इंग्रजांनी भीमाबाईची खरी शक्ती तिचे पेंढारी इमानदार सैन्य आहे हे लक्षात घेऊन पेंढाऱ्यांविरुद्धच मोहीम हाती घेतली. पेंढाऱ्यांना पुनर्वसनाच्या, जमीनी-जागीरी देण्याच्या आमिषांचीही बरसात केली. त्यामुळे अनेक पेंढारी भीमाबाईला सोडून जाऊ लागले. आपल्या पित्याप्रमाणेच भीमाबाईने भारतातील संस्थानिकांना बंड करण्याची पत्रे पाठवण्याचा सपाटा लावला होता पण कोणीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. माल्कम तर पिसाळून भीमाबाईच्या सर्वनाशासाठी माग काढत होता, पण भीमाबाई आज येथे तर उद्या तिथे. तिने इंग्रजी तळांना अचानक हल्ले करुन लुटण्याचा धडाका लावलेला होता.
माल्कमने पुन्हा कपटाचा आश्रय घेतला. त्याने भीमाबाईचा मुख्य सेनानी रोशन खान ह्यालाच फितुर करुन घेतले. भीमाबाईचा तळ धारनजिक पडला असतांना त्याने ती खबर माल्कमला दिली. माल्कमने तातडीने विल्ल्यम केइर या नजिक असलेल्या सेनानीला भीमाबाईवर हल्ला करण्यास पाठवले. चहुबाजुंनी घेराव पडला. यावेळीस दुर्दैव असे की एकाही सैनिकाने शस्त्र उचलले नाही. ते सरळ भीमाबाईला एकाकी सोडून निघून गेले. भीमाबाईला कैद करण्यात आले. रामपुरा येथील गढीत त्यांना बंदिस्त करण्यात आले.
पुढे नोव्हेंबर 1858 मद्धे भीमाबाईंचा मृत्यु झाला. कैदेतच जन्म आणि कैदेतच मृत्यु असे दुर्दैव या थोर महिलेच्या वाट्याला आले. पुढचे दुर्दैव हे की ज्या अखिल भारताच्या स्वातंत्र्यासाठी जिने संगर मांडला तिला भारतवासी चक्क विसरुन गेले.






