आदिवासी समुदायाच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकार योजना, पायाभूत सुविधा वाढवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र, आदिवासींच्या परंपरा, संस्कृती, जीवन पद्धती यांच्या संवर्धनाबाबत व त्या परंपरांच्या आदर करण्याबाबत काय? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. हा असा प्रश्न उपस्थित करण्याचे कारण म्हणजे राजस्थानातील एका शिक्षिकेसोबत घडलेली घटना.
धर्मांध मानसिकतेतून मांडलेला उच्छाद कधीही समाज अवनत अवस्थेला घेऊन जाण्यास कारणीभूत ठरतो. ह्याच धर्मांध मानसिकतेतून राजस्थानच्या मेनका डामोर यांचे निलंबन करण्यात आले. त्याला कारण काय तर, मंगळसूत्र घालण्यास आणि कुंकू लावण्यास नकार देणारे त्यांचे वागणे. त्याचसोबत आदिवासींच्या या संस्कृतीचे, कुंकू व मंगळसूत्र नाकारण्याचे समर्थन करणारे वक्तव्य.
त्याचं झालं असं की, मेनका डामोर या डुंगरपुर येथील सादडिया गावच्या शाळेत संस्कृत या विषयाच्या शिक्षिका आहेत व त्या आदिवासी समाजातून येतात. 18 जुलै रोजी बांसवाडा जिल्ह्यातील मानगढ धाम येथे सांस्कृतिक महारॅली आयोजित केली होती. त्यात त्यांनी भील प्रदेशास समर्थन दिले.सोबतच त्यांनी त्या रॅलीत आदिवासी परंपरांचा संदर्भ देत त्या असे म्हणाल्या की,
"मी आधी मंगळसूत्र घालायचे,कुंकू लावायचे. पण जेव्हा मी आदिवासी परंपरांचा अभ्यास केला तेव्हा मात्र मी मंगळसूत्र घातले नाही व कुंकूही लावत नाही."

यानंतर त्यांच्या शाळा प्रशासनाने त्यांचे निलंबन केले. याआधी देखील एका शाळेत भील प्रदेशाशी संबंधित असलेली गाणी शाळेत मुलांकडून म्हणवून घेतली या कारणास्तव तीन शिक्षकांचे निलंबन केले होते. या घटनेचा उल्लेख मेनका डामोर यांनी या महारॅलीत केला होता.
त्याचा संदर्भ देत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणासंबंधीचे वाक्य, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, हे उच्चारले होते. त्यानंतर वेगाने सूत्रे हलली. राजस्थान आचरण नियमातील एका तरतुदीनुसार व शिक्षण विभागाची प्रतिमा मलिन केल्याचे कारण देत त्यांचे निलंबन करण्यात आले. या निलंबनाच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना मेनका म्हणतात,
"मी केलेल्या वक्तव्यात काहीही चूक नाही. याविरोधात मी न्यायालयात जाणार आहे. मी आदिवासी समाजातून येते त्यामुळे मी हिंदू नाही. 5 जानेवारी 2011 या तारखेला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात देखील सांगितले आहे की आदिवासी हिंदू नाहीत. मला वाटत नाही की मी शिक्षण विभागाची प्रतिमा मलिन केली आहे."
राजस्थानात सध्या भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आहे.केंद्रात देखील भाजपाचे सरकार आहे. म्हणजे हा सगळा डबल इंजिनचा कारभार असून देखील आदिवासी समाजातील एका शिक्षिकेला अशा घटनांना सामोरे जावे लागत आहे. शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलात आणत असताना धर्मांध मानसिकतेला आळा घालणं अधिक गरजेचं आहे.






